#@😈😈😈😈😈😈😈😈@#
“टीम इंडिया अंतिम फेरीत”
‘डॅा अनिल पावशेकर’
++++++++++++++++++++++++
२०२३ विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाचा टीम इंडियाने तब्बल दिड वर्षांनंतर कांगारूंचा प्रतिशोध घेतला असून चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला आहे. अत्यंत रोमांचक आणि चुरशीच्या लढतीत दोन्ही संघासाठी कभी खुशी कभी गम सारखे प्रसंग आले परंतु दमदार गोलंदाजी आणि भक्कम फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने बाजी मारली आहे. झेल टिपण्याच्या बाबतीत दोन्ही संघांनी उदारता दाखवली असली तरी आपल्या संघाची गोलंदाजी उजवी असल्याने आपला संघ विजयी ठरला. जसप्रित बुमराहची जेवढी उणीव आपल्याला जाणवली नाही त्याच्या कैकपट उणीव कांगारूंना स्टार्क, कमीन्स आणि हेझलवूडची जाणवली असणार.
झाले काय तर आयसीसी स्पर्धांमध्ये कांगारूंची दादागिरी जगजाहीर आहे. त्यातच समोर टीम इंडिया असली की त्यांचे बळ आपोआप दुप्पट होते. नुकतेच त्यांनी कसोटीत भारतीय संघाची धुळधाण केल्याने त्यांना आकाश दोन बोटे उरले होते. तर आपला संघ स्पर्धेतील तिन्ही साखळी सामने जिंकून त्यांच्याशी दोन हात करायला उत्सुक होता. त्यामुळेच सामन्याला अंतिम सामन्याचे स्वरूप आले होते. नाणेफेक जिंकत कांगारूंनी फलंदाजी निवडली कारण त्यांच्याकडे ट्रॅव्हीस हेड नामक हुकमाचा एक्का होता. जन्मोजन्मीचे वैर असल्यागत हेड नेहमीच टीम इंडीयावर तुटून पडतो आणि पाहता पाहता सामना एकतर्फी करून टाकतो. यामुळेच ही लढत हेड विरुद्ध भारतीय संघ अशी वाटत होती.
सामन्याचा प्रारंभ सनसनाटी झाला. मो. शमीने पहिल्याच षटकात हेडचा फॅालोथ्रुत झेल सोडत त्याला जीवदान दिले तर जडेजाने त्याला धावचीत करायची संधी गमावली. मात्र आपल्या गोलंदाजांनी त्याला फटकेबाजीसाठी रूम न दिल्याने तो अस्वस्थ होता. कारण एकदा का त्याला हात मोकळे करायला रूम दिली तर त्या रूमचा तो ओयो करून धिंगाणा घालतो. त्याला आवर घालायला ॲाफीसर ॲान स्पेशल ड्यूटी वरूण चक्रवर्तीला आणले आणि त्याने त्याचे काम चोख बजावले. अहमदाबादला विराटला बाद करून जी शांतता आणि स्तब्धता पॅट कमीन्सने निर्माण केली होती त्याची परतफेड या सामन्यात वरूण, शुभमन गील जोडीने केली.
हेड चा शिरच्छेद करताच टीम इंडिया फ्रंटफूटवर आली पण ॲास्ट्रेलिया संघाला कमी लेखून चालणार नव्हते. कारण त्यांच्याकडे ‘घर घरसे हेड निकलेगा’ अशी स्थिती होती. सोबतच हेड शिवाय पण ‘करून दाखवले’ यात ते वाकबगार होते. त्यामुळे कर्णधार स्टिव्ह स्मिथने मोर्चा सांभाळला आणि संघाला निर्भय बनो चा संदेश दिला. त्याने हेड, लाबुशेन, जॅाश इंग्लिश आणि ॲलेक्स कॅरी सोबत चार अर्धशतकी भागीदार्या करत सामन्यात संघाची स्थिती मजबूत केली. खरेतर या सामन्यातील खेळपट्टी गुड फॅार नथिंग होती. ना वेगवान गोलंदाजांना मदत होती ना फिरकीला साथ देत होती ना फलंदाजांना मोठ्या फटक्याची मोकळीक देत होती. जणुकाही खेलते रहो, मेरे भरोसे मत रहो चा संदेश ती दोन्ही संघाना देत होती.
यामुळेच तिथे विकेट टू विकेट गोलंदाजी करणे गरजेचे होते आणि आपल्या गोलंदाजांनी तेच केले. तरीदेखील स्मिथ, लाबुशेन आणि ॲलेक्स कॅरीने आदर्श फलंदाजी करत भारतीय संघाला लक्ष्य गाठतांना कशी फलंदाजी करायची याची मोफत शिकवण ते देऊन गेले. धोकादायक ग्लेन मॅक्सवेलचा आतातायीपणा टीम इंडियाच्या पथ्यावर पडला. वास्तविकतः या तिघांनी आणखी संयमाने आपली खेळी पुढे नेली असती आणि धावसंख्या जर २८० पार नेली असती तर भारतीय संघाची धडधड वाढली असती. कारण धावांचा पाठलाग करतांना एक वेगळेच दडपण असते आणि प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व कसे गाजवायचे यात स्मिथ ॲंड कंपनी तरबेज आहे. तरीही २६४ धावा चीनी कम अशाच वाटत होत्या.
२६५ धावांचा पाठलाग करताना रोहित जणुकाही दुहेरी जीवन विमा पॅालिसी घेतल्यासारखा खेळत होता. शुभमन गील लवकरच बाद झाला तरी रोहित वर त्याचा किंचितही परिणाम जाणवला नाही. पुर्वार्धात मो. शमीने उजव्या हाताने हेड ला, डाव्या हाताने स्मिथला आयुष्यमान भवः करत जीवदान दिले होते. स्मिथचा संघही तेवढाच दिलदार निघाला. खतरनाक रोहितला कुपर कॅानलीने गल्लीत तर लाबुशेनने मिडॅाफला जीवदान देत क्षेत्ररक्षण हे क्षेत्ररक्षण असतं, तुमचं आमचं सेम असतं हे दाखवून दिले. मात्र रोहितने या जीवनदान पॅालिसीचे प्रिमीयम फक्त २८ पर्यंत भरून पॅालिसी बंद करून निघून गेला.
पण खेळपट्टीवर चेस मास्टर विराटने ठाण मांडले होते, स्लो ॲंड स्टेडी विन्स दी रेस हा त्याचा मूलमंत्र होता. खेळपट्टी संथ आणि सीमारेषा मोठ्या असल्याने मोठ्या फटक्यांना फारसा वाव नव्हता. शिवाय धावगती सहाच्या आत असल्याने सातच्या आत घरात येण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र श्रेयसने नैसर्गिक खेळ खेळला आणि विराटचे ओझे कमी झाले. खरेतर मध्यफळीत श्रेयस आणि अक्षर एकाचवेळी मैदानावर फायर ब्रिगेड सारखे आग विझवतात आणि संघाची पडझड रोखून डागडुजी करतात. या दोघांनीही त्यामानाने क्रेडिट मिळत नाही. सध्या आपला संघ विजयावर स्वार आहे, त्यात श्रेयस अक्षरचा मोलाचा वाटा आहे.
हे दोघेही बाद होताच सामना जीवंत होऊ लागला कारण गोलंदाज थोडेफार वर्चस्व गाजवू लागले होते आणि जिंकायला ८७ धावा बाकी होत्या. एक टोक विराटने सांभाळल्याने राहुलने मुक्त फलंदाजी केली. हे दोघेही नाबाद परततील असे वाटतांनाच विराटचा संयम सुटला आणि पुन्हा एकदा कहानीमें ट्विस्ट येते की काय अशी भिती वाटू लागली होती. पांड्या मैदानात आला परंतु तो प्रेक्षकांची जणुकाही सत्वपरिक्षा घेतो की काय असे वाटत होते. कारण रन ए बॅाल स्थिती असताना त्याच्या डॅाट बॅालने तमाम रसिकांच्या घशाला कोरड पडली होती. पण कुंगफू पांड्याने षटकार चौकाराची आतषबाजी करत तहानलेल्या प्रेक्षकांना थंडगार शितल जल दिले. राहूल इंच इंच लढत असतांना पांड्याने उंच उंच लढत सामना आपल्या झोळीत टाकला. मात्र विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी जडेजाला मैदान गाठावे लागले.
थोडक्यात काय तर बलाढ्य फलंदाजी असली तरी तुल्यबळ गोलंदाजी नसली की सामना जिंकता येत नाही हे ॲास्ट्रेलिया संघाला समजले असेलच. स्टार्क, कमीन्स, हेझलवूडच्या पोलादी कड्यात ॲडम झॅम्पा, मॅक्सवेल उगाचच भाव खाऊन जात होते. बेन डॅार्शुस, नॅथन इलीस, कुपर कोलोनी, तनवीर संघा हे कोणत्याही द्रुष्टीने भेदक गोलंदाज वाटत नव्हते. जणुकाही पिवळे डगले घालून कोणते दुसरेच खेळाडू ॲास्ट्रेलियाकडून गोलंदाजी करत आहेत असे वाटत होते. ना कोणते ॲग्रेशन, ना खुन्नस ना गोलंदाजीत धार, एकंदरीत काय तर प्युअर व्हेज गोलंदाजी. त्यातही रोहितला दोनदा तर विराटला ५१ धावांवर असतांना दिलेले जीवदान त्यांना महागात पडले. डावाच्या मध्यात खोदून विकेट काढणार्या गोलंदाजाची कमतरता ॲासींना भासली. त्यातही डाव्याखुर्या अक्षरने थोडाफार असलेला फिरकी प्रभाव नष्ट केला होता.
आपल्या गोलंदाजी बाबत बोलायचे झाले तर भलेही मो.शमी रंगात नसला तरी त्याने कुपर कोनोलीला चांगलेच नाचवले तर वरूणने ब्रह्मराक्षस ट्रॅव्हिस हेडला फसवत टीम इंडीयाला डिप्रेशन मधून बाहेर काढले. जडेजाने फेविकॅाल लाबुशेनला आणि धोकादायक जॅाश इंग्लिश ला माघारी धाडत ॲासींना बॅकफुटवर ढकलले. तर शिरजोर झालेल्या स्मिथला शमीने लो फुलटॅसवर मामा बनवले. मुख्य म्हणजे ॲलेक्स कॅरी असेपर्यंत त्यांना आणखी मोठी धावसंख्या गाठता आली असती परंतु श्रेयसच्या डायरेक्ट थ्रो ने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. फलंदाजीत विराटने श्रेयस सोबत ९१ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. सोबतच अक्षर आणि राहुल बरोबर क्रमशः ४४,४७ धावांची भागीदारी करत विजय सुनिश्चित केला. तर राहुल पांड्याच्या ३१ चेंडूत ३४ धावांनी विजयाला फिनिशींग टच दिला.विराटच्या खेळी बाबत सांगायचे झाले तर त्याच्या द्रुढनिश्चयाचे कौतुक करावे तितके कमी आहे. धावफलक सतत हलता ठेवणे, एकेरी दुहेरी धावा करत क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकणे, मोठे फटके टाळणे आणि स्पिनर्सना उत्तम फुटवर्कने खेळणे हे होय. ॲासीविरूद्धच्या दिग्विजयासाठी टीम इंडियाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
++++++++++++++++++++++++
दिनांक ०५ मार्च २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++

No comments:
Post a Comment