Monday, September 29, 2025

दुबईत टीम इंडियाचा राजतिलक

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

   “दुबईत टीम इंडियाचा राजतिलक”

       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

क्षणाक्षणाला धडधड वाढवणार्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकचा सुपडा साफ करत नवव्यांदा आशिया चषक हस्तगत केला आहे. पाक गोलंदाज आणि भारतीय फलंदाजांतील जीवघेण्या द्वंद्वाला रिंकू सिंहने शेवटचा वार करत संपुष्टात आणले आहे. दिडशेच्या आतले लक्ष्य असले तरी फायनलच्या दबावाने आपला टॅाप ॲार्डर कोसळला तरीही मध्यक्रमात तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबेने निकराने खिंड लढवत विजयावर मोहोर उमटवली आहे. आशिया चषकाच्या इतिहासात प्रथमच एकमेकांशी अंतिम फेरीत लढणार्या दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला परंतु डेथ ओव्हर्समध्ये पाक गोलंदाजांवर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत चषक पटकावला आहे.


झाले काय तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी पत्करण्याचा सूर्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता कारण अंतिम सामन्यात पाठलाग करण्यात दबाव येत असतो. त्यातच अष्टपैलू पांड्या नसल्याने संघाचा समतोल बिघडला होता. पण शिवम दुबेने आपल्या अष्टपैलू कामगिरीने “दुबे पांड्या तो नहीं लेकिन पांड्या से कम भी नहीं” हे दाखवून दिले. पाक ने सामन्यागणिक आपली फलंदाजी सुधारत झकास सुरुवात केली. त्यांचे सलामीवीर धावांची बरसात करत असताना आपला वरूणराजा चक्रवर्ती देवासारखा धावून आला. खतरनाक साहीबजादा फरहानचा काटा काढून त्याने पाकच्या रथाचे एक चाक काढले.


अनुभवी फखर झमनच्या दिमतीला सैम अयुब आला पण त्याला कुलदीपने चकवले. यानंतर आपल्या फिरकीने जो चिखल केला, त्यात पाकचा रथ पुर्णपणे फसला. पाक संघ दोन बाद ११३ ते सर्वबाद १४६ असा गडगडला. मुख्य म्हणजे कुलदीपने ४ बळी टिपत पाकच्या फलंदाजीचे अड्डे उध्वस्त केले. तर प्रारंभी अपयशी ठरलेल्या बुमराहने हॅरीस रौफ आणि मो. नवाझला स्वस्तात निपटवले. नवीन चेंडू आणि वेगवान गोलंदाजी समोर पाक सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली होती परंतु नंतर ते संथ विकेट, जुना चेंडू आणि फिरकीच्या जाळ्यात पुरते अडकले.


टीम इंडियाला पाठलाग करतांना ना खूप मोठे लक्ष्य होते ना समोर खतरनाक गोलंदाज. पण अंतिम सामन्याचा दबाव आपले काम करून गेला. भरवश्याच्या टॅाप ॲार्डरला (म्हशीला) टोणगा झाला. अभिषेकचे बाद होणे समजू शकतो. पण सूर्या आणि गील बेजबाबदारपणे बाद झाले. सूर्या तर संपूर्ण मालिकेत फलंदाजीत ना कॅान्फीडंट दिसला ना सिरीअस. त्याला फुल लेंथ डिलीव्हरी टाकून प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी त्याचा झिरो डिग्री प्लेअर केला. तर शुभमन गील ने चौकार ठोकून पुढच्याच चेंडूंवर विकेट दिली. स्लो पीचला अनुसरून गोलंदाज अशरफने कमी गतीने चेंडू टाकत गील ला फसवले.


चौथ्या षटकातच आपली तीन बाद वीस अशी दयनीय अवस्था झाली होती. आता सगळ्या नजरा तिलक वर्मावर टिकल्या होत्या. त्याने संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ करत निश्चयाने फलंदाजी केली. त्याने संजू सोबत चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची बहुमुल्य भागीदारी करत डाव सांभाळला. मात्र सॅमसन बाद होताच अष्टपैलू शिवम दुबे मैदानात आला आणि सामना आपल्याकडे झुकू लागला. त्याने २२ चेंडूत ३३ धावा फटकावतांना “सिर्फ कानून के ही नहीं, दुबेजी के भी हात लंबे होते है” हे दाखवून दिले. तिलक वर्मा आणि दुबेच्या वेगवान ६० धावांच्या खेळीमुळे अशक्यप्राय वाटणारे आव्हान सोपे झाले होते. 


खरेतर पाक ने फलंदाजीत जरी कच खाल्ली होती तरी ते गोलंदाजीत भारी पडले होते. मात्र क्षेत्ररक्षणात अक्षम्य चुका केल्याने त्यांच्या हातातून सामना निसटला. गील ला धावबाद करण्यात ते चुकले पण ते त्यांना महागात पडले नाही. पण संजू सॅमसन चा १२ धावांवर झेल सोडणे आणि तिलक वर्माला ऐन मोक्याच्या वेळी धावबाद करू न शकल्याने ते पराभूत झाले. गोलंदाजीत फिरकीपटू चांगला दबाव टाकत असताना पाक कर्णधार सलमान आगा ने वेगवान हॅरिस रौफ ला पाचारण केले आणि इथेच त्यांचा घात झाला. हॅरीस रौफच्या १५ व्या षटकात १७ धावा निघताच रौफ चा खौफ नष्ट झाला. तर घुंगरू शेठ अब्रार अहमदचे बॅालिंग एन्ड चेंज केल्याने त्याची लय बिघडली होती.


पाक कर्णधार रणनितीत कमी पडला. त्याने शाहीन आफ्रिदीची षटके लवकर संपवल्याने डेथ ओव्हर्स मध्ये ते नागडे झाले. तर अनुभवी मो. नवाझला त्याने केवळ एक षटक गोलंदाजी दिली. हॅरिस रौफ टीम इंडीयासाठी रन मशीन ठरला. तर टीम इंडीयाने फलंदाजीतील पडझडीनंतरही डाव सावरला. तिलक वर्माने एका बाजूला किल्ला लढवत शेवटपर्यंत तो मैदानात उभा राहिला. कोणताही अनावश्यक फटका न मारता जबाबदारीने फलंदाजी करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. आशिया चषकातील सर्वच्या सर्व सामने जिंकून भारताने आपणच आशिया चषकाचे खरे हकदार आहोत हे सिद्ध केले आहे.

—————————————————

दिनांक २९ सप्टेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


दुबईत टीम इंडियाचा राजतिलक

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

   “दुबईत टीम इंडियाचा राजतिलक”

       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

क्षणाक्षणाला धडधड वाढवणार्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकचा सुपडा साफ करत नवव्यांदा आशिया चषक हस्तगत केला आहे. पाक गोलंदाज आणि भारतीय फलंदाजांतील जीवघेण्या द्वंद्वाला रिंकू सिंहने शेवटचा वार करत संपुष्टात आणले आहे. दिडशेच्या आतले लक्ष्य असले तरी फायनलच्या दबावाने आपला टॅाप ॲार्डर कोसळला तरीही मध्यक्रमात तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबेने निकराने खिंड लढवत विजयावर मोहोर उमटवली आहे. आशिया चषकाच्या इतिहासात प्रथमच एकमेकांशी अंतिम फेरीत लढणार्या दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला परंतु डेथ ओव्हर्समध्ये पाक गोलंदाजांवर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत चषक पटकावला आहे.


झाले काय तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी पत्करण्याचा सूर्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता कारण अंतिम सामन्यात पाठलाग करण्यात दबाव येत असतो. त्यातच अष्टपैलू पांड्या नसल्याने संघाचा समतोल बिघडला होता. पण शिवम दुबेने आपल्या अष्टपैलू कामगिरीने “दुबे पांड्या तो नहीं लेकिन पांड्या से कम भी नहीं” हे दाखवून दिले. पाक ने सामन्यागणिक आपली फलंदाजी सुधारत झकास सुरुवात केली. त्यांचे सलामीवीर धावांची बरसात करत असताना आपला वरूणराजा चक्रवर्ती देवासारखा धावून आला. खतरनाक साहीबजादा फरहानचा काटा काढून त्याने पाकच्या रथाचे एक चाक काढले.


अनुभवी फखर झमनच्या दिमतीला सैम अयुब आला पण त्याला कुलदीपने चकवले. यानंतर आपल्या फिरकीने जो चिखल केला, त्यात पाकचा रथ पुर्णपणे फसला. पाक संघ दोन बाद ११३ ते सर्वबाद १४६ असा गडगडला. मुख्य म्हणजे कुलदीपने ४ बळी टिपत पाकच्या फलंदाजीचे अड्डे उध्वस्त केले. तर प्रारंभी अपयशी ठरलेल्या बुमराहने हॅरीस रौफ आणि मो. नवाझला स्वस्तात निपटवले. नवीन चेंडू आणि वेगवान गोलंदाजी समोर पाक सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली होती परंतु नंतर ते संथ विकेट, जुना चेंडू आणि फिरकीच्या जाळ्यात पुरते अडकले.


टीम इंडियाला पाठलाग करतांना ना खूप मोठे लक्ष्य होते ना समोर खतरनाक गोलंदाज. पण अंतिम सामन्याचा दबाव आपले काम करून गेला. भरवश्याच्या टॅाप ॲार्डरला (म्हशीला) टोणगा झाला. अभिषेकचे बाद होणे समजू शकतो. पण सूर्या आणि गील बेजबाबदारपणे बाद झाले. सूर्या तर संपूर्ण मालिकेत फलंदाजीत ना कॅान्फीडंट दिसला ना सिरीअस. त्याला फुल लेंथ डिलीव्हरी टाकून प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी त्याचा झिरो डिग्री प्लेअर केला. तर शुभमन गील ने चौकार ठोकून पुढच्याच चेंडूंवर विकेट दिली. स्लो पीचला अनुसरून गोलंदाज अशरफने कमी गतीने चेंडू टाकत गील ला फसवले.


चौथ्या षटकातच आपली तीन बाद वीस अशी दयनीय अवस्था झाली होती. आता सगळ्या नजरा तिलक वर्मावर टिकल्या होत्या. त्याने संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ करत निश्चयाने फलंदाजी केली. त्याने संजू सोबत चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची बहुमुल्य भागीदारी करत डाव सांभाळला. मात्र सॅमसन बाद होताच अष्टपैलू शिवम दुबे मैदानात आला आणि सामना आपल्याकडे झुकू लागला. त्याने २२ चेंडूत ३३ धावा फटकावतांना “सिर्फ कानून के ही नहीं, दुबेजी के भी हात लंबे होते है” हे दाखवून दिले. तिलक वर्मा आणि दुबेच्या वेगवान ६० धावांच्या खेळीमुळे अशक्यप्राय वाटणारे आव्हान सोपे झाले होते. 


खरेतर पाक ने फलंदाजीत जरी कच खाल्ली होती तरी ते गोलंदाजीत भारी पडले होते. मात्र क्षेत्ररक्षणात अक्षम्य चुका केल्याने त्यांच्या हातातून सामना निसटला. गील ला धावबाद करण्यात ते चुकले पण ते त्यांना महागात पडले नाही. पण संजू सॅमसन चा १२ धावांवर झेल सोडणे आणि तिलक वर्माला ऐन मोक्याच्या वेळी धावबाद करू न शकल्याने ते पराभूत झाले. गोलंदाजीत फिरकीपटू चांगला दबाव टाकत असताना पाक कर्णधार सलमान आगा ने वेगवान हॅरिस रौफ ला पाचारण केले आणि इथेच त्यांचा घात झाला. हॅरीस रौफच्या १५ व्या षटकात १७ धावा निघताच रौफ चा खौफ नष्ट झाला. तर घुंगरू शेठ अब्रार अहमदचे बॅालिंग एन्ड चेंज केल्याने त्याची लय बिघडली होती.


पाक कर्णधार रणनितीत कमी पडला. त्याने शाहीन आफ्रिदीची षटके लवकर संपवल्याने डेथ ओव्हर्स मध्ये ते नागडे झाले. तर अनुभवी मो. नवाझला त्याने केवळ एक षटक गोलंदाजी दिली. हॅरिस रौफ टीम इंडीयासाठी रन मशीन ठरला. तर टीम इंडीयाने फलंदाजीतील पडझडीनंतरही डाव सावरला. तिलक वर्माने एका बाजूला किल्ला लढवत शेवटपर्यंत तो मैदानात उभा राहिला. कोणताही अनावश्यक फटका न मारता जबाबदारीने फलंदाजी करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. आशिया चषकातील सर्वच्या सर्व सामने जिंकून भारताने आपणच आशिया चषकाचे खरे हकदार आहोत हे सिद्ध केले आहे.

—————————————————

दिनांक २९ सप्टेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


Thursday, September 25, 2025

ये बनाएंगे इक आशियां


 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

         “ये बनाएंगे इक आशियां”

        ✍️डॅा अनिल पावशेकर✍️

—————————————————

आशिया चषकात सलग पाच सामने जिंकून टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. बांगलादेशच्या उत्साही संघाला आणि उतावीळ पाठीराख्यांना जोर का झटका धीरे से देत टीम इंडियाने ही लढत ४१ धावांनी जिंकली आहे. संघात तब्बल चार बदल करत बांगलादेशने संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला परंतु पुन्हा एकदा अभिषेक शुभमन जोडीने दणक्यात सुरुवात करत पहिली चढाई जिंकली. तर मध्यक्रम ढेपाळूनही हार्दिक पांड्याच्या बुस्टर डोझने टीम इंडीयाला तारले आणि आपल्या संघाचा अंतिम फेरीत प्रवेश सुकर झाला. आता पाक विरुद्ध बांगलादेश यातील विजेता अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.


झाले काय तर दुबईत पाठलाग करून सामने जिंकणे सोपे आहे. मात्र त्याकरिता फलंदाजी तेवढीच सक्षम असणे गरजेचे आहे आणि इथेच बांग्ला संघ गळपटला. प्रथम गोलंदाजी करताना बांग्ला संघाने टीम इंडियाला फार मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. आपल्या सलामीवीरांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट सुरुवात केली. विशेषत: अभिषेकचा धावांचा अभिषेक कायम होता. मात्र गील बाद होताच आपल्या संघाची स्पिड फाईव्ह जी वरून टू जी वर आली. शिवम दुबे, सूर्या आणि तिलक वर्मा मैदानावर आले आणि लगेच डेझर्ट सफारीला निघून गेले. 


चांगल्या ओपनिंग चा पचका व्हायला वेळ लागला नाही. अवघ्या साडेसहा षटकात ४६ धावांत चार विकेट्स गमावताच आपला संघ दिडशेत गारद होतो की काय अशी शंका यायला लागली होती. गील, दुबे, सूर्या आणि तिलक वर्मा हे चौघेही झेलबाद झाले होते. एकतर स्ट्रोक्सचे टायमिंग जुळत नव्हते आणि त्यामागे ताकद पण कमी वाटत होती. जणुकाही या फलंदाजांचे नवरात्रीचे उपवास तर सुरु नाही ना असे वाटत होते. त्यामुळेच यापुढे ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपल्या फलंदाजांना हमदर्द का टॅानिक सिंकारा द्यावे अशी सूचना कराविशी वाटते.


टीम इंडियाला खरा धक्का बसला जेव्हा तडाखेबंद फलंदाजी करणारा अभिषेक धावबाद झाला. खरेतर बॅकवर्ड प्वाईंटला तिथे धाव होतीच नाही. त्यामुळे तिथे ‘रन चोर विकेट छोड’ चा प्रयोग बघायला मिळाला. मात्र अनुभवी पांड्याने तिथे आपले कौशल्य पणाला लावले. त्याच्या फेव्हरेट एक्स्ट्रा कव्हर एरियात त्याने खणखणीत चौकार ठोकत २९ चेंडूत ३८ धावांची उपयुक्त खेळी केली. बांगलादेश गोलंदाजांचे खरोखरच कौतुक करावे लागेल. अभिषेकच्या झंझावातानंतरही त्यांनी अचूक मारा करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही.


लंकेविरूद्ध यशस्वी पाठलाग केल्याने बांगलादेशला विजयाची आशा होती. मात्र मागच्या सामन्यात महागडा ठरलेला बुमराह यावेळी त्याच्या जुन्या रंगात दिसून आला. त्याने पहिल्याच षटकात बळी घेत त्यांच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्याला सहकारी गोलंदाजांनी उत्तम साथ दिली. मात्र आपल्या क्षेत्ररक्षकांनी मागील चुकांतून बोध घेतला नाही. ट्रम्पच्या ५०% टेरिफ नियमाचे तंतोतंत पालन करून त्यांनी हाय कॅचेसवर बांग्ला फलंदाजांना ५०% नवरात्र ॲाफर दिली. लागोपाठ दोन सामन्यात अर्धा डझन झेल सोडणार्या क्षेत्ररक्षकांना काय म्हणावे ते कळत नाही. 


क्षेत्ररक्षणात हाच धांगडधिंगा चालू राहिला तर बीसीसीआय एच वन बी व्हिसाने जगातले चांगले दहा क्षेत्ररक्षक भाड्याने आणू शकतात. मात्र क्षेत्ररक्षकांचे पाप पोटात घेत कुलदीप, वरूण आणि अक्षरच्या फिरकीने लाज राखली. कुलदीपची तर हॅट्रिक होता होता राहिली. तर बांगलादेश तर्फे सैफ हसनने एकाकी झुंज दिली. त्याने तीन चौकार आणि पाच उत्तुंग षटकार ठोकत ६९ धावांची खेळी केली. मात्र त्याला परवेझ होसेन इमॅान वगळता कोणीही साथ दिली नाही. या दोघां व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला नाही. त्यातही मिस्टर एक्स्ट्रा म्हणजेच वाईड बॅालच्या सर्वाधिक नऊ धावा होत्या.


थोडक्यात काय तर बांगलादेश संघाने गोलंदाजीत बाजी मारली परंतु फलंदाजांनी त्यांना दगा दिला. याउलट आपला संघ फलंदाजी आणि गोलंदाजीत भरपूर पर्याय असल्याने काम जमून गेले . मात्र क्षेत्ररक्षण, विशेषतः हाय कॅचेस ही आपली नवीन डोकेदुखी होऊन बसली आहे. तर मध्यक्रमात सगळं ॲाल इज वेल नाही आहे. मध्य फळीत विविध प्रयोग नकोच. दुबे ला दुबईत तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचे लॅाजिक फक्त आणि फक्त सूर्या, गौतम गंभीरच सांगू शकतील. मात्र अंतिम सामन्यात मध्यफळीच्या योग्य घडी सोबतच उत्तम क्षेत्ररक्षण राहिले तर हा संघ ‘ये बनाएंगे इक आशियां’ असं आपण म्हणू शकू.

—————————————————

दिनांक २५ सप्टेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

Monday, September 22, 2025

सुपर फोरमध्ये पाकवर सुपर विजय

  #@😈😈😈😈😈😈😈😈#@

      “सुपर फोरमध्ये सुपर विजय”

            ‘डॅा अनिल पावशेकर’

————————————————-

आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकचा सहा गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. साखळी फेरी पाठोपाठ पाकला पुन्हा दणका देत भारताने पाकवर हुकूमत गाजवली आहे. अभिषेक शर्मा आणि शुभमन गील जोडीने पाक गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत सामना पुन्हा एकदा एकतर्फी केला. पूर्वार्धात आपल्या गचाळ क्षेत्ररक्षण आणि बेरंग गोलंदाजीने पाकला चांगलाच ॲडव्हांटेज मिळाला होता परंतु उत्तरार्धात भारतीय फलंदाजांनी धाडसी फलंदाजी करत पाकला चारी मुंड्या चीत केले.


झाले काय तर सूर्याचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय योग्यच होता आणि पांड्याने झकास सुरुवात पण केली होती. मात्र पहिल्या सामन्यानंतर सूर्याने जी नो शेकहॅन्ड्स पॅालीसी खेळली होती ती या सामन्यात सुद्धा दिसून आली. मात्र यावेळी शेकहॅन्ड्स पाक खेळाडूंसोबत नव्हते तर ते उडलेल्या झेलांसोबत होते. अभिषेक ने दोन तर कुलदीपने एक झेल सोडून प्रारंभी जो दबाव पाकवर निर्माण करता आला असता, तो गमावला. भलेही आक्रमक फखर झमन लवकर बाद झाला परंतु जीवदान मिळाल्याने पाक फलंदाजांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी बुमराह अॅंड कंपनीला ठोकून काढले.


पाकने मागील सामन्यातील चुकांचा बोध घेत यावेळी वेगळी रणनिती आखली होती. अनुभवी फखर झमनला सलामीला धाडले आणि त्यांनी यावेळी बुमराहला लक्ष्य केले होते. कारण मुळावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतात हे त्यांना चांगले माहीत होते. बुमराहचा बेरंग होताच पाकने दहा षटकांत नव्वदी ओलांडून चांगली सुरुवात केली होती. अखेर नियमित गोलंदाजांना पाक फलंदाज भीक घालत नाही हे लक्षात येताच सूर्याने पार्ट टाईम शिवम दुबेला आक्रमणाला लावले आणि दुबेने पाक संघाची नांव कशी डुबेल याची काळजी घेतली.


अकराव्या षटकात सईम अयुब बाद होताच पाकची बुलेट ट्रेन चक्क पॅसेंजर गाडी झाली. अकरा ते सतराव्या षटकापर्यंत दुबेसहीत फिरकीपटूंनी अचूक मारा करत पाक फलंदाजांना वेसण घातले. मात्र डावाच्या अखेरीस पाक फलंदाजांनी फटकेबाजी करत धावसंख्या १७१ पोहचवली. अर्थातच ही धावसंख्या नक्कीच चांगली होती आणि यावेळी पाक संघात वेगवान गोलंदाज हॅरिस रौफचा समावेश झाल्याने ही लढत मध्यंतरापर्यंत फिप्टी फिप्टी अशी होती. उत्तरार्धात पाक गोलंदाज आणि भारतीय फलंदाजांतील जुगलबंदी रंगणार अशी चिन्हे दिसत होती.


मात्र अभिषेक आणि शुभमन जोडीचा इरादा काही वेगळा होता. शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूंवर षटकार ठोकत अभिषेकने झिरो टॅालरन्स, नो मर्सी पॅालिसी दाखवून दिली. दोघांनीही पाक गोलंदाजांना उठता लाथ बसता बुक्की करत चोपून काढले. त्याने सहा चौकार आणि पाच षटकारांसह उंच उंच लढत दिली तर शुभमनने खणखणीत आठ चौकार ठोकत पाकचा इंच इंचाचा हिशोब चुकता केला. या दोघांच्या झंजावाताने पाक गोलंदाजीचा पालापाचोळा झाला आणि दहा षटकाच्या आतच भारताने शंभरी गाठली.


खरेतर यानंतर सामन्यातली चुरस निघून गेली होती . भलेही शुभमन, सूर्या, अभिषेक आणि संजू सॅमसन उर्वरित धावा काढतांना बाद झाले परंतु पाकला सामन्यात परतता आले नाही. पाकतर्फे हॅरिस रौफने थोडीफार जिद्द आणि ॲग्रेशन दाखवले परंतु बाकी गोलंदाज म्हणजे चिनी कम होते. जसा आपल्या कडे बुमराह प्रभाव पाडू शकला नाही, तसेच त्यांचा हुकमी गोलंदाज शाहीन आफ्रिदी निष्प्रभ ठरला. तर सईम अयुब, अब्रार आणि अश्रफ हे गोलंदाज अभिषेक शुभमनला शरण गेले. 


पाक संघाचे काय चुकले तर त्यांनी फलंदाजीत चांगली सुरुवात करूनही त्याचे मातेरे केले. विशेषतः भारतीय क्षेत्ररक्षकांनी चार झेल आणि एक धावबाद ची लयलूट करूनही ते १७१ पर्यंत थबकले. शिवाय त्यांनी ४२% डॅाट बॅाल खेळल्याने स्वतःवर दबाव निर्माण करून घेतला. तर आपले दोन तीन गडी बाद होताच आक्रमक क्षेत्ररक्षण लावून एकेरी धावबंदी करून फलंदाजांची कोंडी निर्माण करता आली असती. तसेच सईम अयुब ऐवजी हॅरिस रौफला लवकर गोलंदाजीला लावले असते तर काही अंशी त्याचा फायदा झाला असता.


आपल्या संघाबाबत बोलायचे झाले तर क्षेत्ररक्षण सुमार होते आणि पहिल्या दहा षटकात पाक फलंदाजांना आपले गोलंदाज काबूत ठेवू शकले नाहीत. तर फिरकीपटू दबाव निर्माण करत असताना अक्षरला केवळ एक षटक दिले गेले. फलंदाजीत अभिषेक शुभमनने धडाकेबाज फलंदाजी केली पण सूर्या, सॅमसन फारशी चमक दाखवू शकले नाहीत. मात्र तिलक वर्माने एक बाजू लावून धरत पाकवर सुपर फेरीत सुपर विजयाची औपचारिकता पूर्ण केली. 

_________________________________

दिनांक २२ सप्टेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


Monday, September 15, 2025

दुबईत पाक क्षेपणास्त्रे निकामी

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

    “दुबईत पाक क्षेपणास्त्रे निकामी”

             “डॅा अनिल पावशेकर”

————————————————

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या भारत पाक लढतीत कर्णधार सूर्याच्या एस-४०० डिफेन्स सिस्टिमने शाहीन आफ्रिदी समवेत पाकचे गोलंदाजीतले सगळे क्षेपणास्त्रे निकामी करून भारताला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करताना पाकची भारतीय गोलंदाजांसमोर घसरगुंडी झाली आणि त्यांना अवघ्या १२७ धावांत गुंडाळले गेले . फलंदाजी करताना पाक संघ प्रचंड दबावात दिसला आणि केवळ साहीबजादा फरहान, फखर झमन, शाहीन आफ्रिदी वगळता इतर फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. तर प्रत्युत्तरात आपल्या फलंदाजांनी पाक गोलंदाजी सहज खेळत सामना ७ गड्यांनी जिंकला आहे .


झाले काय तर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील ही लढत एकतर्फी ठरली. तसे पाहता दोन्ही संघ सध्या संक्रमणावस्थेत आहेत. भारतीय संघातील रोहित, विराट, जडेजाने टी ट्वेंटीतून निव्रुत्त झाले आहे तर पाक संघाने बाबर आझम, रिझवानला संघातून डच्चू दिला आहे. मात्र तरीही भारतीय संघ पाक संघापेक्षा सरस आहे आणि हेच सामन्यात सिद्ध झाले. पाक संघात नाव घेण्यासारखा ना फलंदाज आहे ना गोलंदाज. शाहीन आफ्रिदीने जरूर गोलंदाजीत नाव कमावले आहे पण या सामन्यात तो निष्प्रभ ठरला. एकतर नवखा संघ आणि त्यातही साधारण रणनिती. कारण दुबईत पाठलाग करणाऱ्या संघाने जास्त विजय मिळवले आहेत परंतु पाकने प्रथम फलंदाजी निवडून पहिलेच ते बॅकफुटवर आले होते.


भारत पाक सामन्यात खेळाडूंवर मानसिक दबाव काय असतो हे या सामन्यात दिसून आले. डावाच्या सुरुवातीला आक्रमणाच्या नादात पाकचे दोन फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर जी फलंदाजीत जी गळती लागली ती शेवटपर्यंत कायम राहिली. पांड्या बुमराहने दोन बळी टिपत जो दबाव पाक फलंदाजांवर निर्माण केला तो कुलदीप अक्षर आणि वरूण चक्रवर्तीने कायम ठेवला. त्यातही साहीबजादा फरहान आणि फखर झमनने ३९ धावांची भागीदारी करत डाव सावरला होता मात्र कोणताही फलंदाज आश्वासक फलंदाजी करत नव्हता. डावाच्या अखेरीस शाहीन आफ्रिदीने दांडपट्टा चालवत पाकची थोडीफार लाज राखली. 


पाक सव्वाशेत गारद होताच सामना कुठे चालला याचा अंदाज येत होता मात्र भारतीय संघाचा काय ॲप्रोच असेल याची उत्सुकता होती. अभिषेक शर्माने ती उत्सुकता लवकर संपवली. शाहीन आफ्रिदीवर ताबडतोब हल्ले करत त्याने आपल्या संघाला शानदार सुरुवात करून दिली. त्याची झटपट ३१ धावांची खेळी भारतीय संघाचा टेम्पो सेट करून गेली. शुभमन गिल जरूर लवकर बाद झाला परंतु त्यानेही दोन चौकार मारत आक्रमक सुरुवात केली होती. दोन्ही सलामीवीर परतताच कर्णधार सूर्या आणि तिलक वर्माने पाक गोलंदाजांना कोणतीही संधी न देता ५६ धावांची भागीदारी करत सामना आवाक्यात आणला. शेवटी शिवम दुबेच्या साथीने सूर्याने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. 


थोडक्यात काय तर पाक संघाने या सामन्यात सपशेल शरणागती पत्करली होती. ना फलंदाज चमकले ना गोलंदाजांना प्रभाव पाडता आला. दोन्ही बाबतीत भारतीय संघ उजवा ठरला. कुलदीप, अक्षर आणि वरूणच्या फिरकीसमोर पाक संघाने सरेंडर केले तर सैम अयूब सोडता इतर पाक गोलंदाजांनी निव्वळ खानापुर्ती केली. पाक संघ सुपर फोर मध्ये जरूर प्रवेश करेल. मात्र तिथे त्यांना कामगिरीत सुधारणा करावी लागेल. अन्यथा तिथे ते भारता सहित श्रीलंका, अफगाण किंवा बांगलादेश समोर ते टिकाव धरू शकणार नाहीत. याउलट भारतीय संघाने टी ट्वेंटीत आपणच दादा आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. 

—————————————————

दिनांक १५ सप्टेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


काव्या मारन आणि दि हंड्रेड लीग वाद

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@  काव्या मारन आणि दि हंड्रेड लीग वाद        ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— हैदराबाद सनराईझर्सच्या सर्वेसर्वा ...