Monday, November 3, 2025

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@

      “टीम इंडियाचा डबल धमाका”

        ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इंडियाच्या दोन्ही संघांनी क्रिकेटचे मैदान गाजवत डबल धमाका केला आहे. पुरुष संघाने तिसऱ्या टी ट्वेंटीत अटीतटीच्या सामन्यात ॲास्ट्रेलियाला धूळ चारली तर महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकात द. आफ्रिकेवर ५२ धावांनी मात करत प्रथमच विश्वचषक पटकावला आहे. होबार्टला झालेल्या रोमांचक सामन्यात भारतीय फलंदाजांनी निकराची लढत देत सामना खेचून आणला तर महिला संघाने दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल करत पहिलावहिला विश्वचषक जिंकला आहे.


झाले काय तर टी ट्वेंटी मालिकेत ॲासी संघाने मेलबोर्नचा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे मालिका जीवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला तिसरा सामना जिंकणे गरजेचे होते. त्यातही ॲासींचा धोकादायक गोलंदाज हेझलवूड नसल्याने भारतीय संघाचे दडपण कमी झाले होते तर भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात तब्बल तीन बदल केले होते. संजू सॅमसन, कुलदीप आणि हर्षित राणा ऐवजी अर्शदीप, जितेश शर्मा आणि वॅाशिंग्टन सुंदरला संधी मिळाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे होबार्टची पीच फलंदाजीला पोषक होती. तिथे मेलबोर्नसारखा ना स्पॅांजी बाउन्स होता ना पेस.


सूर्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली आणि अर्शदीपने तो टी ट्वेंटीत अग्रगणी गोलंदाज का आहे हे पहिल्याच षटकात दाखवून दिले. धोकादायक हेड आणि नंतर जॅाश इंग्लिशला चकवत त्याने टीम इंडीयाला झकास सुरुवात करून दिली. मात्र दोन गडी झटपट बाद झाले तरी मैदानात मिचेल मार्श, टीम डेव्हिडची खतरनााक जोडी उभी होती. खरेतर कांगारूंच्या मुसक्या आवळण्याची नामी संधी टीम इंडियाला मिळाली होती परंतु बुमराहच्या गोलंदाजीत वॅाशिंग्टन सुंदरने टीम डेव्हिडला जीवदान दिले. ॲासींसाठी हा टर्निंग पॉइंट ठरला. टीम डेव्हिडने लेग ला स्टान्स घेत ॲाफ साईडला तांडव न्रुत्य केले. त्याने अवघ्या ३८ चेंडूत ७४ धावां कुटत टीम इंडियाला बॅकफुटवर ढकलले.


भलेही नवव्या षटकात वरूण चक्रवर्तीने मिचेल मार्श, ओवेनला लागोपाठ बाद केले परंतु स्टोईनिसने भारतीय गोलंदाजांना उसंत घेऊ दिली नाही. त्यानेही ३९ चेंडूत ६४ धावांची वेगवान खेळी करत टीम इंडीयाच्या तोंडचे पाणी पळवले. अखेर अर्शदीपने त्याचा झंझावाती खेळी संपुष्टात आणली मात्र तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. ॲासी फलंदाजांनी घणाघाती फटकेबाजी करत तब्बल २० चौकार आणि ८ षटकार ठोकले. म्हणजे त्यांच्या १८६ धावसंख्येत ६८% धावा (१२८ धावा) ह्या चौकार षटकारांनी वसूल केल्या होत्या. वास्तविकत: या मैदानावर टी ट्वेंटीत सरासरी पाऊने दोनशे धावांचा आकडा असतो, ॲासींनी तो ओलांडलताच त्यांच्या जिंकण्याची शक्यता वाढली होती.


खरेतर हेझलवूड नसल्याने आणि विकेट बॅटर फ्रेंडली असल्याने ॲासी गोलंदाज म्हणजे दातनख काढलेला वनराज होता. मात्र त्यांनी कल्पकतेने चेंज ॲाफ पेस आणि वेरीएशनने भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मुख्य म्हणजे प्रारंभीच अभिषेक शर्माला बाऊंसरवर टिपत   नॅथन इलीसने आपली चुणूक दाखवली होती. लगेचच त्याने शुभमन गील ला पायचीतात पकडून भारतीय संघात धडधड वाढवली. तोपर्यंत कर्णधार सूर्या उजाडला होता पण त्याला मालवायला स्टोईनिसनला फारसे परिश्रम करावे लागले नाही. तर नॅथन इलीसने पुन्हा एकदा चतुराईने अक्षर पटेलला बाऊंसरवर नतमस्तक व्हायला भाग पाडले.


११४ धावांवर चार बाद होताच चांगल्या मॅचचा पचका होतो की काय अशी भीती वाटत होती कारण मैदानात तिलक वर्मा जरूर होता परंतु तो तेवढा कॅान्फिडन्ट वाटत नव्हता. तर वॅाशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा आणि शिवम दुबेला प्रस्थापित फिनिशर म्हणता येत नाही. अस्सल फिनिशर म्हणजे हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग. पांड्या संघात नाही तर रिंकू सिंग ला संघात स्थान मिळत नाही. खरेतर संघात फिनिशर नसणे, हीच आपल्या संघाची कमजोर कडी आहे. पूर्वार्धात वॅाशिंग्टनने टीम डेव्हिडचा झेल सोडण्याचे महापाप केले होते आणि त्याला गरज होती याचे पापमार्जन करण्याची.


त्याच्यासमोर तुम्ही ने दर्द दिया, तुम्ही दवां देना हा पर्याय उपलब्ध होता. अखेर तो आपल्या कर्तव्याला जागला तिलक वर्मा सोबत १९ चेंडूत ३४ धावांची आणि जितेश शर्मा सोबत ३५ चेंडूत नाबाद ४३ धावांची भागीदारी करत सामना ॲासींच्या तोंडातून हिसकावून घेतला. धावगती वाढली असताना आणि सेट फलंदाज तिलक वर्मा चुकीचा फटका मारून बाद झाला तरी वॅाशिंग्टनने अवघ्या २३ चेंडूत ४९ धावा करून सामना जिंकून दिला. १४ व्या षटकात त्याने लागोपाठ एक चौकार आणि दोन षटकार ठोकत सिन ॲबॅाटला चौदावे रत्न दाखवले. त्याला शेवटी साथ देणाऱ्या जितेश शर्माचे कौतुक करावे लागले. प्रचंड दबावात त्याने १३ चेंडूत २२ धावा करत आपला विजय सुकर केला.


तर दुसरीकडे महिला संघाने द. आफ्रिकेला लोळवून विश्वचषक जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे. मात्र ही वाट खाचखळग्यांची होती. साखळी फेरीत लागोपाठ तीन सामने गमावल्याने भारतीय संघाचे खाते बुडीत खात्यात होते. पण न्युझीलंड विरुद्ध विजयाने भारतीय संघाचे मनोबल उंचावले होते तर बलाढ्य ॲास्ट्रेलियाला सेमीफायनलला हरवताच तिथे फायनल जिंकायची बीजे रोवली गेली होती. कारण ॲासी म्हणजे बॅास संघ, तुलनेत फायनलला द. आफ्रिकेचा संघ म्हणजे अर्धे टेंशन दूर. 


स्म्रुती आणि शेफालीने भक्कम सुरुवात करून दिली आणि त्यामुळे आपल्या संघाला तीनशेच्या जवळ पोहोचता आले. विशेषत: शेफाली आणि रिचा घोष यांनी जबरदस्त पॅावर हिटींग करत मैदान दणाणून सोडले. तर अष्टपैलू दिप्तीने अर्धशतक झळकावून आपली उपयुक्तता सिद्ध केली. सेमीफायनलची यशस्वी जोडी जेमीमा आणि हरमनप्रीत फायनलला फलंदाजीत चमक दाखवू शकले नाहीत. तरीपण फायनलला पाठलाग करताना जवळपास तीनशेचे टारगेट म्हणजे निश्चितच कठीण होते. 


अर्धशतक करणाऱ्या शेफाली आणि दिप्तीने फलंदाजी पाठोपाठ गोलंदाजीतही धमाल केली. शेफाली ने दोन तर दिप्तीने पाच विकेट्स घेत द.आफ्रिकेला शरणागती पत्करायला लावली. द.आफ्रिकेची कर्णधार लॅारा वेलवार्डने शतकी प्रतिकार केला परंतु तिचा हा प्रयत्न तोकडा पडला. फलंदाजीत फारशी चमक न दाखवणार्या अमनज्योतने पहिला रन आउट आणि लॅारा वोलवार्डचा अफलातून झेल घेत क्षेत्ररक्षणात चमक दाखवली. निश्चितच क्षेत्ररक्षणात दोन्ही संघानी ढिसाळपणा दाखवला परंतु फलंदाजी आणि गोलंदाजीत भारतीय महिला वरचढ ठरल्याने त्या विश्वचषकाच्या हकदार ठरल्या.


थोडक्यात काय तर आपल्या दोन्ही संघांनी सुपर संडेला सुपरहीट कामगिरी करून देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. आपल्या महिला संघाची कामगिरी पाहता “म्हारी छोरीयां किसी छोरोंसे कम नहीं” असे म्हणावे लागेल. यापूर्वीही भारतीय महिला संघाने फायनल पर्यंत मजल मारली होती, मात्र प्रयत्न अपुरे पडले होते. यावेळी मात्र जिद्दीने पेटून उठत त्यांनी इतिहास घडवला आहे. २०२५ चा हा दिग्विजय महिला क्रिकेटच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला आहे. जेवढे महत्त्व १९८३ च्या विजयाचे आहे, अगदी तितकेच महत्त्व २०२५ च्या विजयाचे आहे. भारतीय क्रिकेटच्या दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. 

—————————————————

दिनांक ०३ नोव्हेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

Saturday, November 1, 2025

जिगर मा बडी आग है!

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

         “जिगर मा बडी आग है!”

      ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

भारत आणि ॲास्ट्रेलिया संघातील टी ट्वेंटीचे द्वंद्व सुरू झाले असून पहिला सामना वरूणराजाला समर्पित झाला तर दुसऱ्या सामन्यात कांगारूंची सरशी झाली आहे. एक दिवसीय मालिके पाठोपाठ टी ट्वेंटीतही भारतीय संघ पिछाडीवर असून उर्वरित तीन सामन्यात आपल्या संघाकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. आशिया चषक ते ॲास्ट्रेलिया दौरा हे अंतर भारतीय संघाने लगेच गाठले परंतु मंद संथ खेळपट्टी आणि वेगवान उसळत्या खेळपट्टीवर भारतीय संघाचा कस लागत आहे. पुरेसे सराव सामने नसल्याने आणि काही खेळाडू प्रथमच ॲास्ट्रेलिया दौरा करत असल्याने त्याचा परिणाम सामन्याच्या निकालावर दिसून येत आहे.


झाले काय तर एकदिवसीय मालिका जरी भारताने गमावली असली तरीही तिसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत थोडीफार अब्रु राखली होती. त्यातच भारतीय महिलांनी ॲास्ट्रेलियाच्या महिला संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात पराभूत केल्याने भारतीय पाठीराख्यांना हुरूप आला होता. शिवाय भारतीय संघाने पहिल्या टी ट्वेंटीत भलेही सामना पावसामुळे रद्द झाला असला तरीही उत्तम सुरुवात केली होती. त्यामुळे तशीच कामगिरी दुसऱ्या टी ट्वेंटीत अपेक्षित होती. मात्र प्रत्येक सामना हा नवीन असतो, नवनवे चॅलेंज असतात आणि प्रत्येक सामन्यात नव्याने सुरुवात करावी लागते. पहिल्या सामन्यात पेस अॅंड बाऊंस सोबत मिले सुर मेरा तुम्हारा करणारी गील सूर्याची जोडी दुसऱ्या सामन्यात संपूर्णपणे निष्प्रभ ठरली.


अभिषेक शर्मा, गील आणि सूर्या हे आघाडीचे तीन खेळाडू भारतीय संघाचे तन मन धन आहे. या तिघांवर डावाचा टेम्पो सेट करणे, पडझडीत सावरणे याची जबाबदारी असते. पहिल्या टी ट्वेंटीत अभिषेक स्वस्तात निपटल्यावर गील सूर्याने सुपरफास्ट खेळी करत डाव पुढे नेला होता. विशेषतः गील चे लेग ला जाऊन षटकार मारणे असो की सूर्याने हेझलवुडला स्क्वेअर लेगला ठोकलेला उत्तुंग षटकार असो. दोन्ही खेळाडूंनी सुरेख फुटवर्क करत झकास फटकेबाजी केली होती. पावसाचा वारंवार व्यत्यय येऊनही या दोघांनी सामन्यात रंगत आणली होती. मात्र यांच्या फटकेबाजीला अखेर पावसाने मुरड घातली आणि पहिला टी ट्वेंटी पावसाच्या नावे राहिला.


पहिल्या सामन्यात पाऊस कोसळला तर दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी. एकतर हेझलवुडची अचूक लाईन अॅंड लेंथ आणि सोबतीला पीच चा बाऊंस ॲंड पेस! भारतीय टॅाप ॲार्डरसाठी ही तारेवरची कसरत होती. त्यातही गील हा मिडॅान, मिडॅाफचा गिर्हाईक आहे. मग ती २०२३ ची फायनल असो की आशिया चषक ची फायनल किंवा या सामन्यात असो, मिडॅान मिडॅानला झेलबाद होणे हा गील चा आवडता छंद. तर सूर्याचा ओपन स्टान्स, क्रिझच्या आत राहून, पाय न हलवता तो हेझलवुडच्या अचुकतेचा सामना कसाकाय करणार? त्यातही एक जीवदान मिळूनही मेलबोर्नला भारतीय कर्णधाराचा सूर्य मावळला. जितका वेळ सूर्याने स्टान्स घ्यायला लावला तेवढा वेळ तो क्रिझवर टिकू शकला नाही.


या सामन्यात टॅाप ॲार्डरच्या भाऊगर्दीत संजू सॅमसन ला अचानक घुसवण्यात आले. तो आला केंव्हा गेला केंव्हा कळलेच नाही. हेझलवूड आग ओकत असताना चेंडू हलत होता पण संजू सॅमसनचे पाय हललेच नाही. भारतीय फलंदाजांचे इनकमींग आऊटगोईंग ज्या गतीने चालू होते ते पाहता डकवर्थ लुईस जोडी बिना पावसाची सामना थांबवण्याती शक्यता होती. अर्धा संघ अर्धशतकाच्या आत तंबूत परतल्याने सामन्याचे भविष्य सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती. पण ॲास्ट्रेलियाच्या तंबूचे कळस कापण्याची धमक असलेला एकमेव खेळाडू अभिषेक अजूनही मैदानात उभा होता. गरज होती त्याला कोणीतरी साथ देण्याची. मात्र ज्याप्रकारे आपले मतदार “माझ्या राजा” ला साथ देत नाहीत तसेच उर्वरित फलंदाजांनी केले. एकमेव हर्षित राणाने जीगरी खेळी करत अभिषेकला साथ दिली आणि आपल्या संघाने सव्वाशेचा टप्पा गाठला.


अभिषेक शर्माचे नक्कीच कौतुक करावे लागेल. कारण हेझलवूडच्या आगीवर मात करत त्याने स्फोटक फलंदाजी केली. मैदानात चोहोबाजुंनी टोलेबाजी करत त्याने ॲासी आक्रमणाचा सामना केला. सामना कुठेही असो, प्रतिस्पर्धी गोलंदाज कोणीही असो, त्याच्या तडाख्यातून कोणीही सुटू शकत नाही. आक्रमण करण्याची जी मानसिकता असते, ती त्याच्यात ठासून भरली आहे. “अटॅक इज बेस्ट डिफेन्स” या ब्रीदवाक्याला जागून त्याने कांगारूंशी एकाकी झुंज दिली. भलेही आपला संघ सव्वाशेत आटोपला परंतु अभिषेकची झुंजार खेळी या पराभवातही उठून दिसली. 


आजकाल टी ट्वेंटीत जिथे दोनशे धावांची नवलाई राहिली नाही, तिथे सव्वाशे धावा ॲासींच्या खिजगणतीतही नसणार. हेड मिचेल मार्शच्या जोडीने ते दाखवूनही दिले. एखाद्या फलंदाजाने जरी चाळीशी गाठली तरी सव्वाशेचे टारगेट सहजसाध्य होते. मग ॲासी कर्णधार तरी कसा मागे राहणार? त्याने भारतीय गोलंदाजांचा फडशा पाडत सामना एकतर्फी केला. भारतीय गोलंदाजांना सूर गवसेपर्यंत सामना कांगारूंच्या खिशात (पाऊचमध्ये) गेला होता. कुलदीप, बुमराहने “हुजूर आते आते बहोत देर” केली होती. टॅाप ॲार्डर कोसळताच उर्वरित फलंदाजांनी संयम राखला नाही. अभिषेकने खिंड जरूर लढवली परंतु परतीचे दोर कांगारूंनी केंव्हाच कापले होते. 


अभिषेकने “जीगरमा बडी आग है” हे दाखवून दिले होते पण दुसऱ्या टोकाला इतर फलंदाजांनी “जागते रहो, मेरे भरोसे मत रहो” केल्याने हा सामना आपल्या हातून निसटला. ॲासी गोलंदाज अनप्लेयेबल आहेत असे अजिबात नाही. हेझलवूड सोडला तर त्यांचे इतर गोलंदाज आक्रमक फलंदाजीपुढे नमतात. शिवाय त्यांच्याकडे दर्जेदार फिरकीपटू नाहीत. त्यामुळे पुढील सामन्यात हेझलवूडचे चार षटक सावधपणे खेळून इतर गोलंदाजांना टार्गेट केले तर काही चांगले रिझल्ट मिळू शकतील. मात्र त्याकरिता टॅाप ॲार्डरला पडझड झाली तरी इतर फलंदाजांनी हाराकिरी करू नये. तेंव्हाच कुठे आपला संघ मालिकेत कमबॅक करू शकतो. 

—————————————————

दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


काव्या मारन आणि दि हंड्रेड लीग वाद

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@  काव्या मारन आणि दि हंड्रेड लीग वाद        ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— हैदराबाद सनराईझर्सच्या सर्वेसर्वा ...