Wednesday, June 25, 2025

पहिल्या कसोटीत इंग्लंडची सरशी!

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

  “पहिल्या कसोटीत इंग्लंडची सरशी” 

        ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडची सरशी झाली असून भारताचा धक्कादायक पराभव झाला आहे. दोन्ही डावात भारतीय संघाचा वरचष्मा राहिला होता परंतु ऐनवेळी तळाचे फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी सुमार कामगिरी केल्याने भारताच्या हातून सामना निसटला आणि इंग्लंडचा संघ विजयी झाला आहे. खरेतर कसोटीत प्रत्येक दिवशी प्रत्येक सत्रात कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे असते आणि इथेच आपला संघ इंग्लंडवर लगाम घालू शकला नाही. त्यातही दोन्ही डावात मान्सून सेल लागल्याप्रमाने भारतीय क्षेत्ररक्षकांनी जवळपास अर्धा डझन झेल सोडले आणि स्वहस्ते सामना इंग्लंडला बहाल केला.


झाले काय तर गेल्या ९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाची कामगिरी ७ पराभव, एक ड्रॅा आणि एक विजय अशी दारिद्र्य रेषेखालची होती. त्यातही रोहित, विराट वानप्रस्थाश्रमाला लागल्याने “मेरे करन अर्जुन आएंगे, मॅच बचाएंगे” असे अजिबात नव्हते. त्यामुळे जे का रंजले गांजले आहेत ते संघात ठेवून भारतीय संघाची वाटचाल चालू झाली. केएल राहुल सोडला तर करुण नायर, जडेडा, शार्दूल ठाकूर हे भुले बिसरे गीत होते आणि त्यांची कामगिरीही यथातथाच राहिली. तर फलंदाजीत नवोदित साई सुदर्शन आणि गोलंदाजीत क्रिष्णा हे प्रसिद्ध होऊ शकले नाहीत. 


वास्तविकत: पहिल्या डावात जैस्वाल, शुभमन गिल आणि पंतने शतकांची रास लावून भक्कम सुरुवात केली होती. परंतु ४ बाद ४३० ते सर्वबाद ४७१ अशी आपली घसरगुंडी झाली. ९/११ च्या हल्ल्यात न्युयॅार्कचे ट्विन टॉवर जेवढ्या वेगाने कोसळले त्यापेक्षाही जास्त वेगाने आपले तळाचे फलंदाज कोसळले. जणुकाही सर्वांच्या अंगात ग्लेन मॅक्सवेल घुसल्यासारखे ते त्वेषाने खेळले आणि स्वस्तात माघारी परतले. फलंदाजी म्हणजे निव्वळ चौकार आणि षटकार ठोकणे नव्हे तर भागीदारी करणे, खेळपट्टीवर तग धरून राहणे, विरोधी गोलंदाजांना थकवणे आणि शेपूट जास्तीत जास्त लांबवणे हे आपले फलंदाज विसरले. पहिल्या डावात कमीत कमी ५०० चा आकडा आपण नक्कीच गाठू शकलो असतो पण तसं झालं नाही.


फलंदाजांच्या मर्यादित कामगिरीला गोलंदाजांनी चांगली साथ दिली होती परंतु तिथे क्षेत्ररक्षण आडवे आले. इंग्लंडनेही काही झेल सोडले होते आणि भारतीय क्षेत्ररक्षकांनी मनापासून त्यांना रिटर्न गिफ्ट दिले. सर्वात कहर म्हणजे जडेजा सारखा क्षेत्ररक्षक जेव्हा झेल सोडतो तेव्हा नक्की कोणाकडून चांगल्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा करावी हे कळत नाही. तरीही आपल्या गोलंदाजांनी इंग्लंडला ४६५ वर थोपवून थोडीफार लाज राखली होती.


भारताचा दुसरा डाव जणुकाही पहिल्या डावाची कॅापी होती. यावेळी जैस्वाल, शुभमन ऐवजी केएल राहुल, पंतने शतके झळकावून संघाचा डोलारा सांभाळला. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघ ४ बाद ३३४ ते सर्वबाद ३६४ असा गळपटला. दुसऱ्या डावात कमीत कमी १०० धावा कमी केल्याने इंग्लंडवर जो दबाव निर्माण व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. पुन्हा एकदा तळातील फलंदाजांनी तू चल मै आया केल्याने इंग्लिश संघाचा हुरूप वाढला. चौथ्या दिवशी दबावात येणाऱ्या इंग्लंड संघाला भारतीय संघाने संध्याकाळी तुलनेत कमी धावांचे टार्गेट आणि पुरेसा वेळ दिल्याने ते ड्राईव्हिंग सिटवर येऊन बसले. 


पाचव्या आणि निर्णायक दिवशी इंग्लंडने भारतीय गोलंदाजांना भीक घातली नाही. बुमराह ॲंड कंपनी चातकासारखी विकेटची वाट बघत होते पण डकेट, क्राऊलीने दमदार फलंदाजी करत सामना इंग्लंडकडे झुकवला. खेळपट्टी जरूर जीवंत होती पण बॅझबॅालपुढे आपले गोलंदाज हतबल झाले. त्यातही जैस्वालने डकेटला नव्वदीत जीवदान दिल्याने भारतीय गोलंदाजांचे उरलेसुरले अवसान गळून पडले. मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णाने जरूर लय पकडली होती मात्र तोपर्यंत “हुजूर आते आते बहोत देर कर दी” असे झाले होते.


प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर रोहित, विराट संघात असताना आपल्या संघाची जी दादागिरी असायची, एक लय असायची, मैदानात जी एनर्जी दिसायची ती या सामन्यात दिसली नाही. कर्णधार म्हणून शुभमन नवखा असल्याने त्याला शिकायला वेळ द्यावा लागेल. तर गोलंदाजीत “एक अकेला बुमराह क्या करेगा” हा प्रश्न वारंवार पडतो. त्यातही बुमराहचे गोलंदाजीतील दुसऱ्या डावातील अपयश चिंतेची बाब आहे. जडेजा, शार्दूल ठाकूर हे दोघेही आपले अष्टपैलूत्व सिद्ध करू शकले नाहीत. तर नवोदित साई सुदर्शन आणि करून नायर फारशी चमक दाखवू शकले नाहीत. सर्वात जास्त निराशा झाली ती आपल्या संघाचे क्षेत्ररक्षण पाहून. संघाचे कोच असलेले श्रीयुत गौतम नक्कीच हा विषय गंभीरपणे घेऊन पुढे अशा चुका सुधारतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.


थोडक्यात काय तर या कसोटीत फलंदाजांनी कमावले, क्षेत्ररक्षकांनी गमावले असे झाले आहे. गचाळ क्षेत्ररक्षण, लोअर ॲार्डरची अवसानघातकी खेळी, दुसऱ्या डावात निष्प्रभ गोलंदाजी हे आपल्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. समाधानाची बाब म्हणजे पंतने दोन्ही डावात धडाकेबाज खेळी करून डावाचा टेंपो राखला परंतु त्यानंतर इतर फलंदाजांनी डावाची माती केली. मालिकेत अजूनही ४ कसोटी सामने बाकी असल्याने भारतीय संघ मुसंडी नक्कीच मारू शकतो. मात्र त्याकरिता पहिल्या कसोटीत फारशी चमक न दाखवणार्यांना शाल श्रीफळ द्यावे लागेल. तसेच अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, वॅाशिंग्टन सुंदर, आकाशदीप, अर्शदीप, हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांच्यातून योग्य निवड करावी लागेल. 

—————————————————

दिनांक २५ जून २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

Sunday, June 15, 2025

द. आफ्रिकेचा लॅार्डसवर टेंभा!

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

     “द. आफ्रिकेचा लॅार्डसवर टेंभा”

       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

————————————————-

प्रचंड उत्सुकता लागलेल्या कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत द.आफ्रिका संघाने बलाढ्य ॲासी संघाला खडे चारत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एडन मार्करम आणि टेंबा बवुमाने कांगारूंचा प्रतिकार करत लॅार्डसवर विजयाचा टेंभा मिरवला आहे. आयसीसी स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या द.आफ्रिकेला यश वारंवार हुलकावणी देत होते. मात्र यावेळी त्यांचे नशीब फळफळले आणि तब्बल २७ वर्षानंतर त्यांचा आयसीसी चषकाचा दुष्काळ संपुष्टात आला आहे.


झाले काय तर द. आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड हे तीन संघ कायम अस्सल क्रिकेट रसिकांच्या गुड बुक्स मध्ये आहेत. यापैकी वेस्ट इंडीज आणि किवी संघाने आयसीसी चषकाला गवसणी घातली आहे परंतु प्रोटीयाज संघ नेहमीच मोक्याच्या वेळी गळपटत होता आणि हातातोंडाशी आलेला विजय गमावत होता. यामुळेच की काय त्यांना चोकर्स चा टॅग लागला होता. मात्र यावेळी परिस्थिती बदलली होती, टेंबा बवुमाच्या नेतृत्वात या संघाने इतिहास रचत चोकर्सचा डाग पुसून काढला आहे. चौथ्या डावात यशस्वी पाठलाग करताना त्यांनी स्टार्क, हेझलवूड आणि पॅट कमीन्सला भीक न घालता पक्का निर्धार करत अजिंक्यपद प्राप्त केले आहे.


दोन्ही संघांचा विचार केला तर निश्चितच कांगारूंचे पारडे जड होते, त्यातही अंतिम सामना म्हटला की कांगारूंचे बळ दुप्पट होते. फायनलला त्यांचे किलर इंस्टिक्ट कमाल पातळीवर असते. त्याविरूद्ध द.आफ्रिकेचा संघ एकदम सज्जन आणि सोज्वळ. तरीपण शेवटी क्रिकेट म्हटले की “बस समझ लिए” असे नसते आणि हेच या सामन्यात घडले. पहिल्याच दिवशी ॲासी संघ दोनशेत गुंडाळून आफ्रिकन संघाने चढाई जिंकली होती. पण कांगारूंनी जबरदस्त प्रतिहल्ला करत आफ्रिकेला १३८ धावांत गारद केले. तर ॲासींच्या दुसऱ्या डावात पुन्हा एकदा रबाडा ॲंड कंपनीने ॲासींचा कबाडा करत त्यांना २०७ धावांवर रोखले.


पहिल्यावहिल्या कसोटी जेतेपदासाठी आफ्रिका संघाला चौथ्या डावात चांगली कामगिरी करणे गरजेचे होते आणि त्यांच्याकडे मार्करम हा हुकमाचा एक्का होता परंतु पहिल्या डावात त्याने भोपळा न फोडल्याने चिंता वाढली होती. मात्र मार्करमने संघाचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने मुल्डर, बवुमा, स्टब्स आणि बेडींघम सोबत अनुक्रमे ६१, १४७, २४ आणि ३५ धावांच्या चार महत्त्वपूर्ण भागीदारी रचल्या आणि आपल्या संघाला आयसीसी चषक मिळवून दिला. या कसोटीत दोन्ही संघांशिवाय खरी गंमत आणली तर ती लॅार्डस च्या खेळपट्टीने.


पहिल्या दोन दिवसात खेळपट्टी जणुकाही सळसळती नागीण होती. तिच्या वेग आणि बाऊंसने भलेभले फलंदाज गांगरून गेले. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येकी १४/१४ फलंदाजांना फस्त करत खेळपट्टीने आपले जहाल रूप दाखवले होते. मात्र या रणात पहिल्या डावात ॲासींच्या स्टीव्ह स्मिथ, वेबस्टर यांनी किल्ला लढवला तर आफ्रिकेच्या टेंबा बवुमा आणि बेडींघमला थोडाफार प्रतिकार करता आला. पहिल्या डावात ॲासींना ७४ धावांची बहुमूल्य आघाडी मिळाली होती. मात्र त्यांचा दुसरा डाव पुन्हा एकदा दोनशेत संपल्याने त्यांना मोठी आघाडी घेता आली नाही. ॲासींचे दुर्दैव म्हणा की आफ्रिकेचे सुदैव म्हणा, तिसऱ्या दिवशी खेळपट्टी वाल्याची वाल्मिकी झाली होती. 


तिसऱ्या दिवशी पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात प्रत्येकी दोन विकेट्स गेल्या. तिसऱ्या सत्रात तर मार्करम बवुमा जोडीने आरामात फलंदाजी करत सामना पुर्णपणे आफ्रिकेकडे वळविला होता. चौथ्या दिवशीचा खेळ म्हणजे खरेतर आफ्रिकेच्या विजयाची औपचारिकता होती परंतु कांगारूं सहजासहजी सामना सोडणार नव्हते. तरीपण खेळपट्टी आपल्या शांत सौम्य रूपात कायम असल्याने कांगारूंची दाळ शिजली नाही. ॲास्ट्रेलिया संघाने कधी नव्हे ते गचाळ क्षेत्ररक्षण करत सामन्यात पुनरागमनाची संधी दवडली. मार्करमला २३ धावांवर तर बवुमाला ३ आणि ४३ धावांवर जीवदान देत कांगारूंनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला.


स्टीव्ह स्मिथ, वेबस्टर आणि ॲलेक्स कॅरी वगळता इतर फलंदाजांचा विशेषतः ट्रॅव्हिस हेडचा फ्लॅाप शो कांगारूंच्या मुळावर आला. तर गोलंदाजीत कमीन्सने पहिल्या डावात सहा बळी जरूर घेतले पण दुसऱ्या डावात तो आणि त्याचे सहकारी बेअसर ठरले. आफ्रिकेच्या रबाडाने दोन्ही डावात धारदार गोलंदाजी करत तब्बल ९ बळी टिपले. त्याला जान्सेन आणि एनगीडीने उत्तम साथ दिली. तर फलंदाजीत पहिल्या डावात पिछाडीवर असतानाही मार्करम बवुमा जोडीने दमदार फलंदाजी करत सामना जिंकून दिला.


टी ट्वेंटी विश्वचषक, चॅम्पियन ट्रॅाफी पाठोपाठ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत कांगारूंचे गर्वहरण झाले असून द. आफ्रिका नवा विजेता म्हणून उदयास आला आहे. १९९८ ला बांगलादेशात झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या विजयानंतर या संघाला आयसीसी चषकासाठी जीवघेणी प्रतीक्षा करावी लागली. मग तो स्मिथ असो की एबीडी अथवा शॅान पोलॅाक, डेल स्टेन असो द. आफ्रिका संघाची जेतेपदाला हुलकावनी म्हणजे पप्पू कान्ट डान्स साला होती. मात्र छोटी हाईट बिग फाईट असलेल्या टेंबा बवुमाने आपल्या नेत्रुत्वात आफ्रिका संघाला हिमालयाची उंची गाठून दिली आहे. “छोटे तीर घाव गंभीर” सारखे त्याने तुलनेत कमी अनुभवी संघाला जगज्जेता बनवले आहे. थोडक्यात काय तर टेंबा बवुमाने आपल्या लिलयेने आफ्रिका संघाला “पंगुं लंघयते गिरिम” करून दाखवले आहे.

—————————————————

दिनांक १४ जून २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


Wednesday, June 4, 2025

अश्रूंची झाली विराट फूले!

 #@😈😈😈😈😈😈😈😈@#

         अश्रूंची झाली विराट फुले!

        ✍️डॅा अनिल पावशेकर✍️

—————————————————

तब्बल दिड तपानंतर म्हणजेच १८ वर्षानंतर विराटच्या आरसीबी संघाने आयपीएल चषक पटकावला असून अंतिम सामन्यात त्यांनी पंजाब संघाला पटकनी दिली आहे. आरसीबी संघ पाठीराख्यांच्या नसानंसात उसळणार्या आरबीसींना (रेड ब्लड सेल्स) साक्षी ठेवत विराटने चषक जिंकला आणि संघ तसेच पाठीराख्यांना अश्रूपूर्ण अभिवादन केले. तर प्रितीचा पंजाब किंग्ज संघ कमनशिबी ठरला. पाठलाग करतांना आवश्यक असलेली धावगती आणि सामन्यावरची पकड दोन्ही बाबतीत प्रितीचा संघ ढेपाळला आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.


झाले काय तर दुसऱ्या एलीमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्सला बुकलून काढत पंजाब किंग्जने फायनलला दणक्यात प्रवेश केला होता. विशेषतः कर्णधार श्रेयस अय्यरची कामगिरी लक्षवेधी होती आणि अशीच काहीशी खेळी त्याच्या कडून, त्याच्या संघाकडून अपेक्षित होती. मात्र अंतिम सामन्यात नंतर फलंदाजी करताना एकप्रकारे दडपण असते. त्यातही पाठलाग करताना धावगती जवळपास दहापर्यंत असल्याने एखाद्या फलंदाजाने मोठी खेळी करणे अपेक्षित होते. खरेतर इथेच पंजाब किंग्जची रणनिती फसल्यामुळे त्यांचा घात झाला. तसेही आरसीबी संघाकडे नाव घेण्यासारखे घातक गोलंदाज कुठे होते? मात्र फायनलचे प्रेशर श्रेयसचा संघाला झेपले नाही.


आरसीबी संघाबाबत बोलायचे झाले तर त्यांनी प्रथम फलंदाजी करत एक आव्हानात्मक धावसंख्या नक्कीच उभारली. भलेही ते २०/३० आणखी करू शकले असते परंतु शेवटच्या १० चेंडूत त्यांनी फक्त २३ धावां करत तब्बल पाच गडी गमावले. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही फलंदाजाने अर्धशतक ठोकले नाही तरी पण आरसीबी संघाने चाळीशीच्या चार भागीदारी करत दोनशेच्या जवळ पोहोचले. पहिल्या सात फलंदाजांनी वैयक्तिक धावा न बघता संघासाठी दणदणीत, वेगवान खेळी करत पंजाब गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. विशेषतः अर्शदीप, जेमीसन आणि चहल या प्रमुख गोलंदाजांना अजिबात भीक न घालता मुक्तहस्ताने ठोकले. 


 गमतीशीर बाब म्हणजे पंजाब संघाचा आखूड टप्प्यावर (शॅार्ट बॅाल) गोलंदाजीचा प्लॅन होता, जो आरसीबीने उधळून लावला तर अर्शदीप आणि जेमीसनला प्रत्येकी ३/३ बळी मिळाले ते फुल लेंथ बॅालवर. पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी पॅावर प्ले (५५ धावा, १ बळी) आणि फायनल ओव्हर (४५ धावा, ५ बळी) मध्ये चांगली कामगिरी केली परंतु मिडल ओव्हर मध्ये ते आरसीबी फलंदाजांवर अंकुश लावू शकले नाहीत. मिडल ओव्हरला आरसीबी संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात ९० धावा कुटल्या. अर्थातच १९१ धावांचे टार्गेट पंजाब संघासाठी घाम फोडणारे होते आणि झालेही तसेच.


सलामीवीर प्रियांश आणि प्रभसिमरनने साडेचार षटकांत ४३ धावांची सलामी जरूर दिली पण त्यात जिंकू किंवा मरू चा बाणा नव्हता. हॅपी गो लकी प्रमाणे खेळ सुरू होता. त्यातच सॅाल्टने प्रियांशचा सिमारेषेवर अफलातून झेल घेत पंजाबचे मीठ अळणी करून टाकले. तर प्रभसिमरनच्या धडपडी खेळीला कुणाल पांड्याने विराम दिला. पंजाब किंग्ज कडे श्रेयस, जॅाश इंग्लिश, नेहाल वढेरा, स्टॅायनिस  आणि शशांक सिंग सारखी भक्कम फलंदाजी लाभली होती. तिथे गरज होती या सुंदर टवटवीत फुलांना एका माळेत ओवणार्या एका मजबूत धाग्याची आणि तो धागा होता कर्णधार श्रेयस अय्यरचा. मात्र तो धागा दोन चेंडूत तुटला आणि प्रितीच्या संघाची अवस्था “इस दिल के टुकडे हजार हुए, कोई यहां गिरा कोई वहां गिरा” सारखी झाली.


मागील सामन्यात मुंबई इंडियन्सच्या बोल्ट, बुमराह या क्षेपणास्त्रांना श्रेयसच्या एस ४०० या डिफेन्स सिस्टमने लीलया निष्प्रभ केले होते. मात्र या सामन्यात “शिकारी खुद यहां शिकार” झाला होता. तरीही जॅाश इंग्लिशच्या जोशने सामन्यात रंगत बाकी होती. पण पंजाब किंग्ज साठी “ये दुख काहे खतम नहीं होता” अशी अवस्था होती. पांड्या लिविंगस्टोन युतीने जॅाश इंग्लिशला बाद करत पंजाबची नशा उतरवली. तर अनुभवी भुवीने १७ व्या षटकात वढेरा, स्टॅायनिसचा फडशा पाडत पंजाबच्या आशा मावळून टाकल्या. यशदयालने ओमरजाई आल्या पावली परत जाईल याची दक्षता घेतली.


मात्र कहाणीत अजून ट्वीस्ट बाकी होते. प्रचंड आशावादी असलेल्या शशांकने शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा ध्यास घेतला होता. शेवटच्या षटकांत २९ धावा हव्या होत्या मात्र हेझलवूडचे चक्रव्यूह तो भेदू शकला नाही. अवघ्या सहा धावांनी पंजाब पराभूत झाला. श्रेयस बाद होताच त्याच्या संघाचा टेम्पो हरवला, नाव पैलतीरावर नेण्यासाठी कुशल नावाडी उरला नव्हता, धावगती सोन्याच्या भावासारखी झपाट्याने वाढल्याने पंजाब किंग्जचा नाईलाज झाला होता. अखेर प्रितीच्या संघासाठी आयपीएल चषक पुन्हा एकदा “दिल अपना और प्रित पराई” ठरला. 


विराट जिंकला याचा जेवढा आनंद झाला तेवढेच दुःख प्रितीचा संघ हरल्याचे आहे. पन्नाशी गाठलेली परंतु हार जीत तेवढ्याच ताकदीने पचवणारी प्रिती झिंटा क्रिकेटच्या बाबतीत संयमाचा महामेरू ठरली आहे. पंजाबच्या फलंदाजांनी ३९% डॅाट बॅाल खेळले आणि ११ अवांतर धावा दिल्या ज्या त्यांना विजयापासून दूर घेऊन गेल्या. आरसीबी फलंदाजांची तडाखेबाज फलंदाजी, अय्यरचे लवकर बाद होणे, पांड्या भुवीने मोक्याच्या वेळी बळी घेणे हे या सामन्याचे महत्त्वाचे क्षण ठरले. शेवटच्या षटकात आरसीबी संघ अजिंक्य होत असताना विराटच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती. एक कमकुवत संघ, चोकर्स आणि नेहमी सामना नव्हे तर ह्रुदय जिंकणारा संघ म्हणून ओळखल्या गेलेल्या संघांशी विराट प्रामाणिक राहिला. याचं प्रामाणिकपणाचे फळ म्हणून यावर्षी त्याच्या अश्रूंची विराट फूले झाली. हारसीबी चे रूपांतर जीतसीबी त करण्यात किती खस्ता खाव्या लागल्या याची साक्ष विराटचे अश्रू देत होते. 

—————————————————

दिनांक ४ जून २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


काव्या मारन आणि दि हंड्रेड लीग वाद

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@  काव्या मारन आणि दि हंड्रेड लीग वाद        ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— हैदराबाद सनराईझर्सच्या सर्वेसर्वा ...