@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*कबाब मे ईड्डी,,!*
*डॉ अनिल पावशेकर*
***********************************
देशभरातील हुडहुडी कमी होत असली तरी ईडीच्या धाडीने घोटाळेबाजांच्या ह्रदयात धडधडी वाढल्या आहेत. राजकारणातील तमाम मुरब्बी आणि भ्रष्टाचाराच्या गंगेत पट्टीचे पोहणारे सुद्धा ईडीच्या लाटेने गर्भगळीत झाले आहे. "जो उखाडना है, उखाड लो" म्हणणारे ही ईडीच्या नावाने पत्रकार परिषदेत घामाघूम झालेले आहेत. ईडीच्या तुफान गोलंदाजीने पहिलेच राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना सरकारी तंबूत परत पाठवले आहे. तर नुकतेच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने क्लिन बोल्ड केलेले आहे.
झाले काय तर कुख्यात दहशतवादी असलेला दाऊद, त्याचे साथीदार आणि अंडरवर्ल्ड संबंधीत बेकायदेशीर सावकारी प्रकरणी नवाब मलिक गुंतले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अर्थातच एवढा मोठा मासा ईडीच्या गळाला लागणे हे एवढे सोपे काम नक्कीच नाही. मात्र कधीतरी "पापाचा घडा भरतोच" आणि याप्रकरणी नेमके हेच झाले. नवाब मलिकांना ईडीने आलिंगन देताच राष्ट्रवादीचा प्राण तळमळला परंतु मुंबई बॉम्बस्फोटाच्या झळा ज्यांना बसल्या त्यांचे काय? राष्ट्रवादीने जे पेरले तेच उगवले मग ईडीच्या नावाने खडे फोडण्याला काहीच अर्थ उरत नाही.
केवळ राष्ट्रवादीच कशाला येत्या काळात महाआघाडीच्या आणखी काही विकेट ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. किरीट सोमय्या यांनी उडवलेल्या धुराळ्यात महाआघाडीची दाणादाण उडाली असून "ईडी नको पण सोमय्याला आवर" अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. निश्चितच किरिट सोमय्यांनी सबळ पुराव्यानिशी महाआघाडीच्या शिलेदारांची जी लक्तरे वेशीवर टांगली आहे त्याला तोड नाही. सध्यातरी किरीट सोमय्यांच्या झंझावातापुढे घोटाळेबाजांना "बाबूजी जरा धीरे चलो, ईडी खडी यहाँ ईडी खडी" हे गाणे नक्कीच ऐकू येत असणार.
खरेतर नवाब मलिक हे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चांगलेच प्रकाशझोतात आले होते. आर्यनला एनसीबीने ताब्यात घेताच कित्येक पुरोगाम्यांचा प्राण कंठाशी आला होता. आर्यनला बेड्या ठोकताच फिनाईल टाकल्यावर जसे जंतू,किडे वळवळत बाहेर येतात अगदी तसेच सो कॉल्ड पुरोगामी पुढे सरसावले होते. मात्र एनसीबी आणि न्यायालयाच्या दणक्यापुढे त्यांची डाळ शिजली नाही. तरीपण "गिरे भी तो टांग उपर" करत नवाब मलिकांनी चक्क तपास यंत्रणांना वेठीस धरले होते. वरकरणी आर्यनचा लळा जरी असला तरी मलिकांना त्यांचे जावई समीर मलिकांच्या अटकेच्या वेदना सतावत होत्या.
फुटका डोळा काजळाने साजरा करायचा असतो मात्र मलिकांनी तपास यंत्रणांवर आरोपांचा पिसारा फुलवला. अखेर त्यात शेवटी त्यांचे पितळ उघडे पडले आणि त्यांना माफी मागावी लागली. त्यातच दाऊदच्या गुन्हेगारी संबंधित जुन्या प्रकरणांना नुकतेच उजाळा मिळाला आणि नवाब मलिक बेनकाब झाले. मलिकांनी ईडा पिडा टळो चा भरपूर प्रयत्न केला शिवाय "बुलाती है मगर जाने का नहीं" यावर ते ठाम होते. परंतु ईडीने पहाटेच त्यांना गुड मॉर्निंग केले आणि गुड नाईट होईपर्यंत ते ईडीच्या ताब्यात होते. शेवटी ईडी न्यायालयाने त्यांना तिन मार्चपर्यंत सरकारी पाहुणचाराचा आदेश दिला आहे.
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या राज्यासारखं सुजलाम सुफलाम दुसरं राज्य या भुतलावर अस्तित्वात नाही याची सर्वांना खात्री आहे. कोरोनाच्या कितीही लाटा आल्या तरी "महाआघाडीच्या खाटा कधीच कुरकुरल्या नाही." नॉटी विरोधकांनी कित्येकदा या सरकारच्या चांगल्या निर्णयात खोडा घातला आहे. या सरकारने नतद्रष्ट विरोधकांना कैक वेळा समजावून सांगितले की वाझे म्हणजे लादेन नाही. जिलेटीन म्हणजे स्फोटके नाही, नॉटी म्हणजे हरामखोर नाही, हर्बल तंबाखू म्हणजे गांजा नाही, विवाहबाह्य संबंध म्हणजे लफडे नाही, वाईन म्हणजे दारू नाही. तरीपण वेंधळे विरोधक उगाचच महाआघाडीच्या तोंडाला फेस आणत आहेत.
वास्तविकत: महाआघाडीने २८८ पैकी १६९ जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. "अमर अकबर अँथनी" सरकारने आपल्या कर्तृत्वाने जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. अर्थातच काही अपवादात्मक घटना जरूर घडल्या आहेत मात्र विरोधकांनी उगाचच त्याचा बाऊ केला आहे. एखाद्या मंत्र्याविरुद्ध बोलले म्हणून बंगल्यावर त्याची थोडी पाठ शेकली यात वावगे ते काय? एखाद्या मंत्र्याचे बहुपत्नीत्व सिद्ध झाले तर इतरांना पोटदुखी का व्हावी. खुद्द न्यायालयानेच व्यभिचार हा गुन्हा नसल्याचे ( भादंवि ४९७) सांगितलेले आहे. कोणी मंत्री एखाद्या तरुणीसोबत "उलाला उलाला" करत असेल तर तो त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे, त्यात कोणीही नाक खुपसू नये. शिवाय प्रत्येकात ही कला असतेच असेही नाही.
कुणी मंत्री महिन्याला करोडोंची वसूली करत असेल तर त्याने "करून दाखवलं" म्हणून त्याचे कौतुक करायला हवे. सोबतच अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी "गावं तिथे किराणा, किराणा तिथे वाईन" ही योजना आखली तर कोणाच्या डोळ्यात का यावे? मुळातच या सरकारच्या चांगल्या गोष्टी कोणाच्याही लक्षात येतंच नाही. दाऊद सारख्या गुन्हेगारांचे मन वळविण्यासाठी आणि त्याला सामाजिक जिवनात परतण्यासाठी कोण्या मंत्र्याने त्याची मालमत्ता विकत घेतली तर काय बिघडले? शेवटी दाऊद सुद्धा एक मनुष्य आहे आणि कोणत्याही व्यक्ती कडून चुका होऊ शकतात. मग सुबहका भुला शामको घरी येण्यासाठी त्याला मदत करणे कसाकाय गुन्हा होऊ शकतो? माझे कुटुंब माझी जबाबदारी या नात्याने मंत्री महोदयांनी दाऊद ॲंड कंपनीला हातभार लावला तर काय बिघडले?
शेवटी काय तर एवढ्या गुणसंपन्न मंत्रीमंडळाला कुणाचे गालबोट लागले कुणास ठाऊक. मंत्री महोदयांनी दाऊद मालमत्ता प्रकरणी सावकारी करुन सरकारला रेव्हेन्यू प्राप्त करून दिला याचे कुणाला कौतुकच नाही. शिवाय मलिकांना अटक झाल्याने ते पालकमंत्री असलेले गोंदिया आणि परभणी हे दोन्ही जिल्हे पोरके झाले त्याचे काय? आधीच माजी गृहमंत्री अटकेत असतांना नवाबांच्या अटकेने जनमानस ढवळून निघाले आहे. जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाआघाडीच्या मंत्र्यांचे दुःख पाहून चांदा ते बांदा पर्यंत जनता व्यथित आहे. तिनचाकी पांगुळगाडा असुनही जवळपास अडीच वर्षे सर्वोत्कृष्ट कारभार करणाऱ्या सरकारचे चिरहरण पाहून अख्खे ब्रह्मांड तळमळत आहे. त्यातच नवाब मलिकांना अटक करुन ईडीने कबाबमे हड्डी केली आहे.
***********************************
दि. २४ फेब्रुवारी २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com