Wednesday, September 8, 2021

ओव्हलचा बखरनामा

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
          *|| ओव्हलचा बखरनामा ||*
              *डॉ अनिल पावशेकर*
************************************
युगाब्द ५१२३, शके २९४३, श्रावणमास, कृष्णपक्ष, अमावस्या आणि  निमित्त होते ओव्हलचा गड सर कराण्याचे. अर्थातच लॉर्ड्सची मोहिम फत्ते करूनही हेडींग्ले मुलखात दगाफटका झाला होता. सेनापती विराटने ओव्हलला हिंदुस्तानी पताका फडकवायचा चंग बांधला होता. यावेळी सातासमुद्रापार जवळपास ५० वर्षांनी ओव्हलचा गड अहोरात्र त्याला खुणावत होता. लढाईतल्या तिन चढाया पुर्ण होऊन अंतिम पाडाव टप्प्यात आला होता. सामना फिरंग्यांशी असल्याने सेनापती डोळ्यात तेल घालून मोर्चेबांधणी करत होते. अखेर झुंजुमुंजू झाले आणि संघसहकाऱ्यांची बैठक घेत सेनापतीचे अंतिम आक्रमणाची रणनिती ठरवली.

वास्तविकत: दोन्ही फौजा तुल्यबळ होत्या. दोन्ही फौजांनी एक एक लढाई जिंकत आपला दमखम दाखवला होता. हिंदुस्तानी संघात सलामीचा भार मुंबई प्रांताचे शिलेदार रोहीत आणि दख्खनचा सेनानी राहुलने सांभाळला होता. मध्यफळीत सेनापती विराटसह पुजारा आणि मराठमोळा अजिंक्य योद्धा रहाणे मोर्चा सांभाळून होते. अंतिम फळीत निधड्या छातीच्या पंतसोबत तलवारबाज जडेजा आणि उदयोन्मुख युवराज शार्दूल मांड ठोकून तयार होते. तर आणिबाणीच्या प्रसंगी बुमराह, उमेश यादव शिर तळहातावर घेवून लढण्यास सज्ज होते.

हिंदुस्तानी तोफखान्याची कमान बुमराहच्या ताब्यात होती. त्याला खतरनाक यादवद्वयीची साथ होती.भरीस भर म्हणून ताज्या दमाचा मो.सिराज आग ओकण्यास तत्पर होता. अटीतटीच्या प्रसंगी फिरकीचे गोळे फेकण्यात जडेजाचा हात कोणी पकडू शकत नव्हते. तर प्रतिपक्षाचाही तोफखाना बुलंद होता. ॲंडरसनच्या निगराणीत वेगवान फिरंगी तोफा हिंदुस्तानी फौजेला भाजून काढण्यात तरबेज होत्या. दिमतीला मोईन अली नावाचा धुर्त सरदार जोडी फोडण्यासाठी प्रसिद्ध होता.

फिरंगी फौजेचे नेतृत्व जो रूट कडे होते, जो प्रचंड पराक्रमी होता. मात्र बेअरस्टो वगळता इतर सरदार फारसे अनुभवी नव्हते. शिवाय हिंदुस्तानी तोफखान्यात विविधता असल्याने त्यांचा अडचणीत वाढतच होत्या. त्यातच सेनापती विराट लाथ मारीन तिथे पाणी काढीन बाण्याचा तर जो रूट शांतीमे क्रांती वर विश्वास ठेवून होता. अर्थातच ही लढाई जितकी शारिरीक क्षमतेची कसोटी पाहणारी होती तितकीच मानसिक कणखरतेची होती. बुमराह ॲंडरसन मधून विस्तव जात नव्हता. तर रोहीतच्या गदाप्रहाराने फिरंगी आक्रमणाची हाडे खिळखिळी झाली होती.

तरीही सुद्धा फिरंगी सेनेचा अहंकार उच्च कोटीचा होता. भलेही विराटच्या नजरेस नजर भिडवायची ताकद कोणाकडेही नव्हती परंतु हिंदुस्तानी फौजेला डिवचण्याचे प्रकार काही केल्या कमी होत नव्हते. मोईन अलीने जडेजाला गंडवल्यावर तो ज्या कुत्सितपणे हसला ते पाहता हा हिंदुस्तानी छोटा सरदार हिशोब नक्कीच चुकता करणार याद वाद नव्हता. सोबतच मैदानावरील वातावरणात गॉड सेव्ह दी किंगचा गजर होताच हरहर महादेवच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. विराटसेना बचेंगे तो और लेंढेंगे म्हणत छातीला माती लावून मैदानात उतरली होती तर जो रुट आपली सरशी होणार म्हणून निश्चिंत होता.

अखेर एकदाचे युद्धाला तोंड फुटले आणि समस्त देशवासीय डोळे फाडून आपल्या सैन्याची कामगिरी नजरेत साठवू लागले. सेनापती विराट जोष आणि त्वेष वातावरणात वीर रस भरत होता. तर उमेश, बुमराहचा भेदक मारा फिरंग्यांना सतावून सोडत होता. मात्र रॉरी बर्न, हसिब हमीदची जोडी हिंदुस्तानी तोफखान्याला थोपवून धरत होती. बघता बघता शत्रुपक्षाने शंभरी गाठली आणि विजयश्री फिरंग्यांना पावणार अशी चिन्हे दिसत होती. प्रसंग बाका होता आणि याच क्षणी विराटने शार्दूलला आक्रमणाला आणले. शार्दूलने आल्याआल्या रॉरी बर्नला छाटताच हिंदुस्तानी गोटात एकच जल्लोष झाला. हरहर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

हसीब हमीदने एक बाजू भक्कमपणे राखली होती तर दुसऱ्या टोकाला घुसखोरी करणाऱ्या डेव्हिड मालानचा विराटसेनेने वाटेतच खात्मा केला. एव्हाना रणांगणात जडेजाची दादागिरी दिसू लागली होती आणि यातच त्याने हसीबचे हसिन सपने चकणाचूर करून टाकले. शत्रुगोटात धावपळ माजताच हिंदुस्तानी मुलुख मैदान तोफ बुमराहने फिरंग्यांच्या खात्म्याचा विडा उचलला. त्याच्या भडीमारापुढे ओली पोप आणि बेयरस्टोने सपशेल शरणागती पत्करली. शत्रुपक्षाची दाणादाण उडवत विराटसेना आगेकूच करत होती.

अर्धे सैन्य खल्लास होताच जो रूटला आपला पराभव स्पष्टपणे दिसू लागला होता. परंतु एवढ्या लवकर हार मानतील ते फिरंगी कसले. रूटने मोईन अली सोबत किल्ला लढवणे चालू ठेवले. मात्र जडेजाला मोईन अलीमध्ये त्याची शिकार दिसताच तो त्याच्यावर तुटून पडला. मोईनला चुप करायला त्याला फारसे कष्ट पडले नाही. शेवटी अंतिम फळीला साथीला घेत जो रूटने प्रतिहल्ला करण्याचा निर्णय घेतला. मात्र शार्दूलने त्याला घुटने टेकायला मजबूर केले. जो रूट चा काटा काढताच विजयश्रीने हिंदुस्तानी गोटाकडे वाटचाल सुरू केली. तरीपण शत्रुचे शेपूट वळवळतच होते. अखेर उमेश यादवच्या भडक्यात शेपूट निमुटपणे गळले.

प्रचंड मारकाट आणि गदारोळात अखेर हिंदुस्तानची सरशी झाली. सेनापती विराटचा जल्लोष बघण्यासारखा होता. कधीकाळी मान खाली घालून पराभवाची धनी ठरलेली हिंदुस्तानी सेना ओव्हलवर आज डौलाने आपले निशाण फडकवत होती. एकाच दिवशी शत्रुपक्षाला त्यांच्याच रणभुमीत, त्यांच्याच क्लुप्तीने नेस्तनाबूत करतांना पाहून विराटसेनेचा सर्वत्र जयजयकार होऊ लागला. या विजयाने विराटसेनेचा अख्या जगात दबदबा वाढला असून सध्यातरी विराट क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम योध्दा आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
*************************************
दि. ०७ सप्टेंबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Tuesday, September 7, 2021

ओव्हलवर इंग्लंडचं वाट्टोळं

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                  *अगंबाई अरेच्चा*
          *ओव्हलवर इंग्लंडचं वाट्टोळं*
*************************************
भारत आणि इंग्लंड दरम्यानची कसोटी मालिका रंगतदार अवस्थेत आली असून चौथी कसोटी जिंकून भारताने २/१ अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडला चिवटपणे झुंजवत टीम इंडियाने जो रुटच्या संघाचा जोरदार पराभव केला आहे. पहिल्या डावात गटांगळ्या खाऊनही भारतीय संघाने दुसऱ्या डावात फिनिक्स पक्षासारखी भरारी मारली आणि इथेच इंग्लंडच्या पराभवाची बीजे रोवली गेली होती. स्विंग,सिम आणि वेगवान गोलंदाजी ही इंग्लंडची अस्त्रे इंग्लंडवरच उलटवून टीम इंडियाने ओव्हलवर  इंग्लंडचं वाट्टोळं केलं आहे.

खरेतर टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यात प्रथमा ग्रासे माक्षिकापात झाला होता. जागतिक कसोटी स्पर्धेत न्युझीलंड संघाने भारतीय संघाला धूळ चारली होती. या धक्क्यातून सावरत भारतीय संघाने पहिली कसोटी जवळपास जिंकल्यातच जमा केली होती. मात्र ऐनवेळी वरुणराजा इंग्लंडच्या मदतीला धावला आणि हातातोंडाशी आलेल्या विजयाच्या घासाला भारतीय संघ मुकला होता. याची परतफेड करण्याची नामी संधी लॉर्ड्स वर होती आणि भारतीय संघाने ती व्याजासकट वसूल केली होती. याच सामन्यात भारताला शार्दूल नावाचा एक नवा मसिहा गवसला होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे शार्दूलच्या अष्टपैलूत्वाने क्रिकेट पंडीतांचे लक्ष वेधले होते.

दुर्देवाने हेडींग्ले कसोटीत इंग्लंडचा तोफखाना धडाडला आणि भारतीय संघ भुईसपाट झाला होता. लॉर्ड्सचा बदला घेऊन इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधली होती. शिवाय त्यांनी हेडींग्लेत भारतीय संघाचे विमान क्रॅश लॅंडींग केल्याने चौथा सामना आरपारचा होणार यात वाद नव्हता. यातच पहिल्या डावात फलंदाजांनी पुन्हा एकदा हाराकिरी केल्याने हेडींग्लेची पुनरावृत्ती होते की काय अशी शंका उपस्थित झाली होती. मात्र यावेळी कहानीत ट्वीस्ट बाकी होते. ॲंडरसन ॲंड कंपनी भारतीय फलंदाजांना है कोई माईका लाल अशी चिथावनी देत असतांनाच शार्दूलने मैदान सांभाळले आणि खेळाचा नुर पालटला.

ॲंडरसनची गब्बर कंपनी ठाकूरला पाहून जो डर गया वो मर गया करत असतांनाच शार्दूलनेही डर के आगे जीत है हे दाखवून दिले. इंग्लिश गोलंदाज आग ओकत असतांनाच चेंडू मात्र शार्दूलच्या बॅटवर फिदा झाला होता. आग आगीवर झाली फिदा म्हणतात ते यापेक्षा वेगळे काय असू शकते. इंग्लंडच्या नाकावर टिच्चून शार्दूल ने घणाघाती अर्धशतक ठोकले आणि इंग्लंडची पाठ कशी शेकायची असते याचा धडा सर्वांसमोर मांडला. मग याचाच फायदा भारतीय संघाला दुसऱ्यांदा फलंदाजी करताना झाला.

इंग्लंडने ही आपला दमखम दाखवत पहिल्या डावात शतकी आघाडी घेतली. खरेतर यामुळे जो रुट निश्चिंत झाला होता. मात्र यावेळी विराट ॲंड कंपनी जो रुटचे मनसुबे उधळण्यास आतुर होती. त्यातच रोहीतने बलदंड फलंदाजी करत धावांचा चारमिनार उभा करण्याचा पाया रचला. त्याला पुजारा, पंत, शार्दूल ने कळस चढवला. पहिल्या डावाची उधारी चुकवत भारताने जवळपास ३७० ची आघाडी घेतली होती. मात्र ३७० चे आव्हान केवळ मोदी,शाहची जोडीच मोडून काढू शकते हे सर्वांना माहीत होते.

अखेर ६ सप्टेंबर चा दिवस उजाडला आणि भारतीय संघ विजयाचा एक नवा अध्याय लिहायला तयार झाला. इंग्लंडरूपी राक्षसाचे प्राण जो रुट नावाच्या पोपटात दडले होते. तसेही जो रुट इज दी रुट कॉज ऑफ इंग्लंड्स सक्सेस हे वेगळे सांगायची गरज नव्हती. बमराह, शार्दूल, सिराज आणि जडेजा सहित उमेश यादवची अग्निपरीक्षा होती. मात्र या अग्निपरीक्षेत सिराज वगळता सर्वांनी बळी घेतले. शंभरी गाठेपर्यंत निश्चिंत असलेला इंग्लंड संघ शार्दूल ने बोहणी करुन देताच ढेपाळू लागला. त्यातच जडेजाची जादू आणि बुमराहच्या तिखट माऱ्याने इंग्लंडचे सालटे निघाले होते.

तरी पण खेळपट्टीवर जो रुट पाय रोवून उभा ठाकल्याने भारतीय संघ चिंतातूर होता. तसे पाहता जो बायडेनने अफगाण सोडताना जी तत्परता दाखवली त्यापेक्षा कैकपटीने जो रूट सामन्यात संयम दाखवत होता. भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत कित्येकदा जो रुट ला जो जो रे बाळा म्हणून झोपवण्याचा प्रयत्न केला. मात्र हट्टी,जिद्दी बाळाप्रमाणे तो शतके रचत भारतीय गोलंदाजांना रडवत आला होता. अखेर ठाकूरने त्याचा अडसर दूर करताच भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.

या सामन्यात जितके शार्दूल चे कौतुक करावे तितकेच रहाणेचे अपयश चिंताजनक आहे. अजिंक्य, एवढा गुणी फलंदाज मात्र आत्मविश्वास हरवल्याने त्याची कामगिरी ढासळली आहे. बुद्धीमत्तेला आत्मविश्वासाची जोड न लाभल्याने त्याची कारकीर्द काळवंडत आहे. जिथे आपले तळाचे फलंदाज इंग्लिश गोलंदाजांवर तुटून पडत आहे तिथे अजिंक्य गळपटून बसला आहे. त्याची बॅट आणि त्याच्या धावांत इतके सोशल डिस्टंसींग आहे की तो कोरोना बचावाचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर शोभून दिसतो. खेळपट्टीवर त्याचे दचकणे, दांदरणे, अडखळणे पाहून एखादी नवविवाहिता खाष्ट सासू समोर उभी आहे की काय असा भास होतो. या प्रकारचा अजिंक्य भारतीय संघात राहणे, संघाच्या अजिबात हिताचे नाही. याच कारणाने अजिंक्य वन-डे, टी ट्वेंटी, एवढेच नव्हे तर आयपीएल मध्येही आपली पत गमावून बसला आहे. एखादी मोठी खेळी करायची आणि त्याच्या व्याजावर नंतर पाच-सहा सामने सडवायचे, या दुष्टचक्रातून तो जेवढा लवकर बाहेर पडेल तेवढं ते त्यांच्यासाठी, संघासाठी उपयुक्त ठरेल.

एक मात्र खरे, पराभवाचा दणका बसुनही टीम इंडियाने मुसंडी मारत इंग्लंडला नामोहरम केले आहे. ओव्हलवर ५० वर्षांनी पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवून भारतीयांना सुखद धक्का दिला आहे. राहुल रोहीतची आश्वासक सुरूवात, पुजारा विराट आणि पंतच्या उपयुक्त खेळींना शार्दूलच्या व्हायग्रा बॅटींगची साथ महत्वाची ठरली. सोबतच बुमराहला उमेश यादवची भेदक तर शार्दूल ची चमत्कारिक गोलंदाजी भक्कम साथ देऊन गेली. इंग्लंडतर्फे निश्चितच ॲंडरसन ॲंड कंपनीने सदाबहार गोलंदाजी केली. मात्र दुसऱ्या डावात त्यांनी लय गमावली आणि तिथेच सामन्याचे पारडे भारताकडे फिरले. 

शेवटच्या दिवशी भारतीय माऱ्यात इंग्लंडचे जहाज भरकटले होते. जो रूट सारखा निष्णात नावाड्या सुद्धा इंग्लंडची नाव पैलतीरावर नेऊ शकला नाही. इंग्लंडचा अतिआत्मविश्वास तर भारताचा जबर आत्मविश्वास हाच या कसोटीची कहानी लिहून गेला. तर फलंदाजी आणि गोलंदाजीत शार्दूल ची ठाकूरकी पाहता जो संकटकाळी कामी येतो तोच खरा शार्दूल हा नवीन वाक्प्रचार येत्या काळात पुढे येऊ शकतो. सोबतच घर घरसे शार्दूल निकलेगा अशा घोषणा लंडनमध्ये ऐकायला आल्यास नवल वाटायला नको.
************************************
दि. ०७ सप्टेंबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Friday, September 3, 2021

काबूल, मै तूझे कबूल तू मुझे कबूल


    "काबूल, मै तूझे कबूल, तू मुझे कबूल"
***********************************
१५ ऑगस्ट २०२१, आपल्या देशात स्वातंत्र्य दिन साजरा होत असतांनाच काबूल वर क्रुर तालिबान्यांनी आपल्या विजयाचे काळेपांढरे निशाण फडकवले होते. अर्थातच बायडन सैन्याने आपला बाडबिस्तरा गुंडाळून तलवारी म्यान केल्याने तालिबान्यांचे आयतेच फावले होते. याचेच दुष्परिणाम म्हणून पुन्हा एकदा तालिबान्यांचे भुत जगाच्या मानगुटीवर बसले आहे. खरेतर हा अफगाणिस्तानचा अंतर्गत मामला, मात्र आपल्या देशातील तालिबान्यांच्या हमदर्दींना अचानक हर्षवायू झाल्याचे दिसत आहे. यातच जेष्ठ सिनेकलावंत नसीरुद्दीन शहा यांनी याच टोळक्यांचे कान टोचून एक सुखद धक्का दिला आहे.

वास्तविकत: याच नसीरुद्दीन शहांनी यापुर्वी या देशात राहायची भिती वाटते, डर का माहौल है अशा वल्गना केल्या होत्या. मात्र काळापरत्वे त्यांच्या मानसिकतेत हा बदल का झाला असावा हे सांगणे कठीण आहे. कदाचित २०१९ पासून केंद्रात अमित शाह निती लागू झाल्याने नसीरुद्दीन शहा सारख्यांना शहाणपण आले असावे. किंबहुना तालिबान्यांनी आपली मध्ययुगीन रानटी संस्कृती, पाशवी कायदे आणि अधम प्रवृत्तीचे जे हिडीस प्रदर्शन केले आहे ते पाहता इथली डर पलटण गर्भगळीत झालेली दिसते.

तालिबान्यांना मात्र मानावेच लागेल. अत्याचार करतांना त्यांनी जे सर्वधर्मसमभाव, सर्वसमावेशकतेचे धोरण राबवले, त्याला तोड नाही. धर्म कोणताही असो, स्त्री,पुरुष,बालक असा भेदाभेद न करता आणि स्वदेशी विदेशीची गफलत न करता जे सरसकट मृत्युतांडव चालवले आहे ते पाहता आपला देश कित्येकांना स्वर्गासमान भासू लागला आहे. इतके सर्व सुर्यप्रकाशासारखे स्वच्छ आणि स्पष्ट असतांनाही इथल्या काही माथेफिरुंना आणि ढोंगी पुरोगाम्यांना तालिबानचा पुळका आल्याचे दिसत आहे. काय म्हणे तर तालिबान्यांनी चक्क पत्रकार परिषद घेतली. खरेतर तालिबान्यांचा हा सौ सौ चुहे खाके बिल्ली,,चा प्रकार आहे.

निश्चितच ज्यांना तालिबानशी चुंबाचुंबी करायची आहे किंवा रोटी बेटी व्यवहार करायचे आहे त्यांनी ते जरूर करावे. किंबहुना ज्यांना तालिबान प्रेमाचे भरते आले आहे त्यांनी काबूलला जाऊन मै तूझे कबूल तू मुझे कबूल म्हणत चौकाचौकात फेर धरावा. राष्ट्रप्रेमी जनता अशा महाभागांना अफगाण सिमेपर्यंत स्वखर्चाने नक्कीच सोडून देईल. एवढेंच नव्हे तर तिथे जाऊन तालिबान दर्दींनी हवे तेवढी शांततेची कबुतरे आणि धर्मनिरपेक्षतेचे तितर बटेर उडवावेत. वाटल्यास तालिबान उदयाच्या आनंदसोहळ्यासाठी त्यांनी उंटावरून साखर किंवा खजूर जरूर वाटावेत.

मात्र असे करतांना भारतभूमी आणि इथल्या संस्कृतीवर उगाचंच पिचकाऱ्या मारू नयेत. तालिबान्यांशी इथल्या संस्कृतीची तुलना करून ते महापातक करत आहे. दुर्देवाने यात शिकले सवरलेलेच अग्रभागी आहेत. मग ते मुनव्वर राणा सारखे काबूली चने असो की काही लखनवी टुंडे कबाब असो. काही नररत्नांनी तर तालिबान्यांची तुलना स्वातंत्र्य सैनिकांशी करुन आपल्या अकलेची दिवाळखोरी जाहीर केली आहे. जेएनयु छाप मर्कटांच्या अजब तर्कटानुसार त्यांना दिल्लीचे काबूल कधी होईल याची दिवास्वप्ने पडू लागली आहेत. मात्र इथे आता अयोध्या पॅटर्न सुरू झाला असल्याने त्यांचे दुष्ट मनसुबे पुर्ण होणार नाहीत.

मुख्य म्हणजे कोरोना झाल्याने शरिरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन अस्वस्थ वाटते. मात्र २०१४ पासून काहींना विनाकारण अस्वस्थ वाटत आहे. मग ते नजराणे, बिदागीला आसुसलेली मिडीया असो अथवा पुरस्कारजीवी विचारवंत असोत. दोन्हींचे हुक्कापाणी बंद झाल्याने तालिबान संकटातही ते देशासोबत खंबिरपणे उभे राहायला तयार नाहीत. उलट तालिबानची वकीली करण्यात ते धन्यता मानत आहेत. नशिब समजा की केंद्रात खंबीर सरकार असल्याने या देशाच्या सिमा अफगाण टोळधाडींसाठी उघडल्या नाहीत. अन्यथा या देशाला जागतिक धर्मशाळा होण्यापासून कोणीही वाचवू शकले नसते.

निश्चितच या पार्श्वभूमीवर नसीरुद्दीन शहांच्या विधानाचे कौतुक करायला हवे. तालिबान्यांची निती आणि नियती एवढ्या स्पष्टपणे सांगितल्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. बरे झाले तालिबानचा खरा चेहरा जगासमोर आला आणि नसीरुद्दीन सारखे कलाकार ताली से नही साहब, तालिबान से डर लगता है म्हणू लागले. अन्यथा इथल्या तालिबान दर्दींनी केंव्हाचेच तालिबान से ताल मिला म्हणत नाचणे सुरू केले होते. अर्थातच सीएए सारख्या कायद्यांचे महत्व याप्रसंगी अधोरेखित होते. सोबतच आणखी एका भुभागातून हिंदू आणि हिंदू संस्कृतीचे उच्चाटन झाले याची योग्य ती दखल घेणे ही काळाची गरज आहे.
************************************
दि. ०३ ऑगस्ट २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...