@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*धूलों के शहर में है घर अपना,,!*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
सध्या आपल्याकडे दिवाळीचा सण सुरू झाला आहे आणि पर्यावरण, प्राणीवाद्यांना ध्वनी वायू प्रदूषणाने भेडसावले आहे. निश्चितच सर्वसामान्य जनताही आता याबाबतीत जागरूक झाल्याने यांत संयम पाळला जात आहे. मात्र याबाबतीत नागपूरचा हिंगणा मार्ग थोडा कमनशिबी म्हणावा लागेल. कारण जवळपास तीन चार महिन्यांपासून या मार्गावर रस्ते बांधकाम सुरू असून धूळ, वाहतूक कोंडीने सर्वसामान्य जनतेचा जीव मेतकुटीला आला आहे. भुतो न भविष्यती अशा धूळ समस्येने सर्वांना हैराण केले असून या मार्गावर अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
झाले काय तर हिंगणा मार्ग म्हणजे मिनी इंडीयाची झलक आहे. इथे काय नाही, नोकरी,रोजगार,व्यवसाय,शिक्षणाच्या दृष्टीने अखिल भारतीय बांधवांचा इथे संगम बघायला मिळतो. शैक्षणिक क्षेत्रातील अभियांत्रिकी महाविद्यालये, दोन मोठे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये, गल्लोगल्ली उगवलेल्या लहान मोठ्या शाळा, इतर महाविद्यालय, मंगल कार्यालय, मोठमोठाले शॉपिंग कॉम्प्लेक्स, शासकीय कार्यालये, एसआरपीएफ कॅम्प, सीआरपीएफ कॅम्प, एमआयडीसी,कामगार वस्ती, झोपडपट्टी सोबतच आठवड्यात दोनदा भरणारा आठवडी बाजार. अर्थातच लोकसंख्येची घनता जबरदस्त आहे. शिवाय हा मार्ग हिंगणा तालुक्याच्या संपर्कासाठी प्रमुख मार्ग असल्याने बारामाही वाहतूकीची समस्या असते. याच समस्येवर तोडगा म्हणून हा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या मार्गाची स्थिती आणि गती पाहता भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची पाळी आली आहे.
निश्चितच एवढ्या प्रमुख मार्गाचे काम तातडीने होणे अपेक्षित होते. मात्र बांधकाम विभागाची गती आणि कासव यांत शर्यत लावली तर कासव १००% जिंकणार यात वादच नाही. त्यातच सणासुदीचे दिवस, विद्यार्थ्यांचा परिक्षांचा काळ पाहता या मार्गाच्या बांधकामाला न्याय दिल्याचे वाटत नाही. इथे पादचारी, दुचाकी, ऑटोरिक्षा, चारचाकी वाहने,ट्रक ट्रेलर्स सर्वकाही एकाच गतीने चालत असल्याने सर्वधर्मसमभावाचे तंतोतंत पालन केले जाते. नाही म्हणायला जनप्रतिनिधी असो की सामाजिक संस्था अथवा वाहतूक विभाग आपापल्या परीने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु जिथे आभाळच फाटले आहे तिथे ठिगळं लावणार तरी कुठे कुठे? उरलीसुरली कसर वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे पुर्ण केली जाते. यामुळे आपलाच अमूल्य वेळ, इंधनाचा अपव्यय होतो. मात्र समजतं पण उमजत नाही अशी परिस्थिती आहे.
या मार्गावर धूळीचे साम्राज्य असल्याने वैद्यकीय व्यवसायात बरकत आली आहे. नाक गळणे,नाक चोंदणे,डोळे लाल होणे,खोकला, छाती भरून दाटून येणे, आवाजात फरक जाणवणे,दम लागणे, अंगावर खाज सुटणे, अंगदुखी, कंबर मणक्यांचे दुखणे आदी आजारांची रेलचेल आहे. छोटयामोठ्या अपघाताशिवाय या मार्गाचा उल्लेख करणे चुकीचे ठरेल. तरीपण धुळीने कळत नकळत स्थानिक रहिवाशांना आयरन पुरवल्याने या भागात आयरन डेफीशिअंशी जवळपास नसल्यात जमा आहे. एवढेच कशाला या मार्गावर नियमित प्रवास करणारे आता आयरन मॅन ओळखले जाऊ लागले आहेत. तर शालेय विद्यार्थी आता विद्यार्थी न राहता त्यांना सन्मानाने धूल का फूल म्हटले जाऊ लागले आहे. या धूळीने गोरगरीब श्रीमंतांतील दरी बुजवली असून सगळ्यांचा रंग एकसारखा दिसत असल्याने आता इथे राधा क्यों गोरी मै क्यूं काला असं कुणीही म्हणत नाही.
वैद्यकीय व्यवसायाला या मार्गावर अच्छे दिन आले असले तरी किराणा आणि जनरल स्टोअर्स मधून पॉण्ड्स सारख्या फेस टॅल्कम पावडरची मागणी अचानक कमी झाल्याची चर्चा आहे. धुळीचे सर्वव्यापी रूप पाहता या भागांत लवकरच एक सौंदर्य स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना धूळकन्या, धूळसम्राज्ञी, धूळश्री, धूळगौरव आदी पुरस्कारांनी गौरविण्यात येण्याची शक्यता आहे. एवढेच कशाला धुळीचे महत्व, त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम पाहता विमा कंपन्या पुढे सरसावल्या असून येत्या काही दिवसांत धूळ जीवन, धूळ आनंद सारख्या आरोग्य विमा योजना 'धूल के साथ भी, धूल के बाद भी' या कॅच लाईनसह विक्रीस उपलब्ध होतील अशी आशा आहे.
खरेतर या मार्गावरील धूळ पाहता धूळ चारणे, धूळीस मिळवणे, डोळ्यांत धूळ फेकणे,धूळ माथ्यावर लावणे, धूळधाण उडणे आदी वाक्प्रचार प्रचलित झाले असावे असे वाटते. यावेळी धूळीने या मार्गाची केलेली दुर्दशा पाहता खुद्द फटाके सुद्धा लोकलाजेखातर प्रदुषण करणार नाही असा विश्वास वाटतो. कदाचित या मार्गाची दुरावस्था पाहता हिंगणा तालुक्याचे नामकरण धुळे तालुका तर हिंगणा मार्गाला धूळमार्ग घोषित करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करु शकतात. निश्चितच एवढ्या गजबजलेल्या मार्गावर बांधकाम थोडे अवघड जरूर आहे मात्र अशक्य अजिबात नाही. सोबतच हिंगणा मार्गाला पर्याय म्हणून त्रिमुर्ती नगरच्या मंगलमुर्ती चौकातून जयताळा मार्गे जाण्याचा किंवा एमआयडीसी भागातून वाहतूक काही प्रमाणात वळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.मात्र या दोन्ही पर्यायी मार्गांची अवस्था पाहता आगीतून निघून फुफाट्यात जाण्यासारखे आहे.
तरीपण बांधकाम विभाग तत्परता दाखवून सर्वासामान्यांना या जोखडातून लवकरच मुक्त करतील अशी अपेक्षा आहे. 'रोम वॉज नॉट बील्ट इन ए डे' हे जरी खरे असले तरी आजकालचे आधुनिक तंत्रज्ञान पाहता अशक्य असे काहीच नाही. गरज आहे ती सामान्य जनतेसोबतच लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी आणखी योग्य प्रकारे पाठपुरावा करण्याची. 'गाव करी ते राव काय करी' म्हणतात ते याचसाठी. अन्यथा आणखी काळासाठी जनतेला धुळीचा पाहुणचार टाळणे अपरिहार्य आहे. तसेच १९८१ च्या लव्ह स्टोरी या चित्रपटातील कुमार गौरव, विजेता पंडीत यांवर चित्रीत केलेलं, अमीत कुमार लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि आरडी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गित 'देखो मैने देखा है ये इक सपना, फुलों के शहर में है घर अपना' गाण्याऐवजी धूलों के शहर में है घर अपना म्हणण्याची आपल्यावर पाळी येईल असे वाटते.
*********************************
दिनांक २२ ऑक्टोबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment