Monday, November 3, 2025

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@

      “टीम इंडियाचा डबल धमाका”

        ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इंडियाच्या दोन्ही संघांनी क्रिकेटचे मैदान गाजवत डबल धमाका केला आहे. पुरुष संघाने तिसऱ्या टी ट्वेंटीत अटीतटीच्या सामन्यात ॲास्ट्रेलियाला धूळ चारली तर महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकात द. आफ्रिकेवर ५२ धावांनी मात करत प्रथमच विश्वचषक पटकावला आहे. होबार्टला झालेल्या रोमांचक सामन्यात भारतीय फलंदाजांनी निकराची लढत देत सामना खेचून आणला तर महिला संघाने दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल करत पहिलावहिला विश्वचषक जिंकला आहे.


झाले काय तर टी ट्वेंटी मालिकेत ॲासी संघाने मेलबोर्नचा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे मालिका जीवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला तिसरा सामना जिंकणे गरजेचे होते. त्यातही ॲासींचा धोकादायक गोलंदाज हेझलवूड नसल्याने भारतीय संघाचे दडपण कमी झाले होते तर भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात तब्बल तीन बदल केले होते. संजू सॅमसन, कुलदीप आणि हर्षित राणा ऐवजी अर्शदीप, जितेश शर्मा आणि वॅाशिंग्टन सुंदरला संधी मिळाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे होबार्टची पीच फलंदाजीला पोषक होती. तिथे मेलबोर्नसारखा ना स्पॅांजी बाउन्स होता ना पेस.


सूर्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली आणि अर्शदीपने तो टी ट्वेंटीत अग्रगणी गोलंदाज का आहे हे पहिल्याच षटकात दाखवून दिले. धोकादायक हेड आणि नंतर जॅाश इंग्लिशला चकवत त्याने टीम इंडीयाला झकास सुरुवात करून दिली. मात्र दोन गडी झटपट बाद झाले तरी मैदानात मिचेल मार्श, टीम डेव्हिडची खतरनााक जोडी उभी होती. खरेतर कांगारूंच्या मुसक्या आवळण्याची नामी संधी टीम इंडियाला मिळाली होती परंतु बुमराहच्या गोलंदाजीत वॅाशिंग्टन सुंदरने टीम डेव्हिडला जीवदान दिले. ॲासींसाठी हा टर्निंग पॉइंट ठरला. टीम डेव्हिडने लेग ला स्टान्स घेत ॲाफ साईडला तांडव न्रुत्य केले. त्याने अवघ्या ३८ चेंडूत ७४ धावां कुटत टीम इंडियाला बॅकफुटवर ढकलले.


भलेही नवव्या षटकात वरूण चक्रवर्तीने मिचेल मार्श, ओवेनला लागोपाठ बाद केले परंतु स्टोईनिसने भारतीय गोलंदाजांना उसंत घेऊ दिली नाही. त्यानेही ३९ चेंडूत ६४ धावांची वेगवान खेळी करत टीम इंडीयाच्या तोंडचे पाणी पळवले. अखेर अर्शदीपने त्याचा झंझावाती खेळी संपुष्टात आणली मात्र तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. ॲासी फलंदाजांनी घणाघाती फटकेबाजी करत तब्बल २० चौकार आणि ८ षटकार ठोकले. म्हणजे त्यांच्या १८६ धावसंख्येत ६८% धावा (१२८ धावा) ह्या चौकार षटकारांनी वसूल केल्या होत्या. वास्तविकत: या मैदानावर टी ट्वेंटीत सरासरी पाऊने दोनशे धावांचा आकडा असतो, ॲासींनी तो ओलांडलताच त्यांच्या जिंकण्याची शक्यता वाढली होती.


खरेतर हेझलवूड नसल्याने आणि विकेट बॅटर फ्रेंडली असल्याने ॲासी गोलंदाज म्हणजे दातनख काढलेला वनराज होता. मात्र त्यांनी कल्पकतेने चेंज ॲाफ पेस आणि वेरीएशनने भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मुख्य म्हणजे प्रारंभीच अभिषेक शर्माला बाऊंसरवर टिपत   नॅथन इलीसने आपली चुणूक दाखवली होती. लगेचच त्याने शुभमन गील ला पायचीतात पकडून भारतीय संघात धडधड वाढवली. तोपर्यंत कर्णधार सूर्या उजाडला होता पण त्याला मालवायला स्टोईनिसनला फारसे परिश्रम करावे लागले नाही. तर नॅथन इलीसने पुन्हा एकदा चतुराईने अक्षर पटेलला बाऊंसरवर नतमस्तक व्हायला भाग पाडले.


११४ धावांवर चार बाद होताच चांगल्या मॅचचा पचका होतो की काय अशी भीती वाटत होती कारण मैदानात तिलक वर्मा जरूर होता परंतु तो तेवढा कॅान्फिडन्ट वाटत नव्हता. तर वॅाशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा आणि शिवम दुबेला प्रस्थापित फिनिशर म्हणता येत नाही. अस्सल फिनिशर म्हणजे हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग. पांड्या संघात नाही तर रिंकू सिंग ला संघात स्थान मिळत नाही. खरेतर संघात फिनिशर नसणे, हीच आपल्या संघाची कमजोर कडी आहे. पूर्वार्धात वॅाशिंग्टनने टीम डेव्हिडचा झेल सोडण्याचे महापाप केले होते आणि त्याला गरज होती याचे पापमार्जन करण्याची.


त्याच्यासमोर तुम्ही ने दर्द दिया, तुम्ही दवां देना हा पर्याय उपलब्ध होता. अखेर तो आपल्या कर्तव्याला जागला तिलक वर्मा सोबत १९ चेंडूत ३४ धावांची आणि जितेश शर्मा सोबत ३५ चेंडूत नाबाद ४३ धावांची भागीदारी करत सामना ॲासींच्या तोंडातून हिसकावून घेतला. धावगती वाढली असताना आणि सेट फलंदाज तिलक वर्मा चुकीचा फटका मारून बाद झाला तरी वॅाशिंग्टनने अवघ्या २३ चेंडूत ४९ धावा करून सामना जिंकून दिला. १४ व्या षटकात त्याने लागोपाठ एक चौकार आणि दोन षटकार ठोकत सिन ॲबॅाटला चौदावे रत्न दाखवले. त्याला शेवटी साथ देणाऱ्या जितेश शर्माचे कौतुक करावे लागले. प्रचंड दबावात त्याने १३ चेंडूत २२ धावा करत आपला विजय सुकर केला.


तर दुसरीकडे महिला संघाने द. आफ्रिकेला लोळवून विश्वचषक जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे. मात्र ही वाट खाचखळग्यांची होती. साखळी फेरीत लागोपाठ तीन सामने गमावल्याने भारतीय संघाचे खाते बुडीत खात्यात होते. पण न्युझीलंड विरुद्ध विजयाने भारतीय संघाचे मनोबल उंचावले होते तर बलाढ्य ॲास्ट्रेलियाला सेमीफायनलला हरवताच तिथे फायनल जिंकायची बीजे रोवली गेली होती. कारण ॲासी म्हणजे बॅास संघ, तुलनेत फायनलला द. आफ्रिकेचा संघ म्हणजे अर्धे टेंशन दूर. 


स्म्रुती आणि शेफालीने भक्कम सुरुवात करून दिली आणि त्यामुळे आपल्या संघाला तीनशेच्या जवळ पोहोचता आले. विशेषत: शेफाली आणि रिचा घोष यांनी जबरदस्त पॅावर हिटींग करत मैदान दणाणून सोडले. तर अष्टपैलू दिप्तीने अर्धशतक झळकावून आपली उपयुक्तता सिद्ध केली. सेमीफायनलची यशस्वी जोडी जेमीमा आणि हरमनप्रीत फायनलला फलंदाजीत चमक दाखवू शकले नाहीत. तरीपण फायनलला पाठलाग करताना जवळपास तीनशेचे टारगेट म्हणजे निश्चितच कठीण होते. 


अर्धशतक करणाऱ्या शेफाली आणि दिप्तीने फलंदाजी पाठोपाठ गोलंदाजीतही धमाल केली. शेफाली ने दोन तर दिप्तीने पाच विकेट्स घेत द.आफ्रिकेला शरणागती पत्करायला लावली. द.आफ्रिकेची कर्णधार लॅारा वेलवार्डने शतकी प्रतिकार केला परंतु तिचा हा प्रयत्न तोकडा पडला. फलंदाजीत फारशी चमक न दाखवणार्या अमनज्योतने पहिला रन आउट आणि लॅारा वोलवार्डचा अफलातून झेल घेत क्षेत्ररक्षणात चमक दाखवली. निश्चितच क्षेत्ररक्षणात दोन्ही संघानी ढिसाळपणा दाखवला परंतु फलंदाजी आणि गोलंदाजीत भारतीय महिला वरचढ ठरल्याने त्या विश्वचषकाच्या हकदार ठरल्या.


थोडक्यात काय तर आपल्या दोन्ही संघांनी सुपर संडेला सुपरहीट कामगिरी करून देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. आपल्या महिला संघाची कामगिरी पाहता “म्हारी छोरीयां किसी छोरोंसे कम नहीं” असे म्हणावे लागेल. यापूर्वीही भारतीय महिला संघाने फायनल पर्यंत मजल मारली होती, मात्र प्रयत्न अपुरे पडले होते. यावेळी मात्र जिद्दीने पेटून उठत त्यांनी इतिहास घडवला आहे. २०२५ चा हा दिग्विजय महिला क्रिकेटच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला आहे. जेवढे महत्त्व १९८३ च्या विजयाचे आहे, अगदी तितकेच महत्त्व २०२५ च्या विजयाचे आहे. भारतीय क्रिकेटच्या दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. 

—————————————————

दिनांक ०३ नोव्हेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

Saturday, November 1, 2025

जिगर मा बडी आग है!

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

         “जिगर मा बडी आग है!”

      ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

भारत आणि ॲास्ट्रेलिया संघातील टी ट्वेंटीचे द्वंद्व सुरू झाले असून पहिला सामना वरूणराजाला समर्पित झाला तर दुसऱ्या सामन्यात कांगारूंची सरशी झाली आहे. एक दिवसीय मालिके पाठोपाठ टी ट्वेंटीतही भारतीय संघ पिछाडीवर असून उर्वरित तीन सामन्यात आपल्या संघाकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. आशिया चषक ते ॲास्ट्रेलिया दौरा हे अंतर भारतीय संघाने लगेच गाठले परंतु मंद संथ खेळपट्टी आणि वेगवान उसळत्या खेळपट्टीवर भारतीय संघाचा कस लागत आहे. पुरेसे सराव सामने नसल्याने आणि काही खेळाडू प्रथमच ॲास्ट्रेलिया दौरा करत असल्याने त्याचा परिणाम सामन्याच्या निकालावर दिसून येत आहे.


झाले काय तर एकदिवसीय मालिका जरी भारताने गमावली असली तरीही तिसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत थोडीफार अब्रु राखली होती. त्यातच भारतीय महिलांनी ॲास्ट्रेलियाच्या महिला संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात पराभूत केल्याने भारतीय पाठीराख्यांना हुरूप आला होता. शिवाय भारतीय संघाने पहिल्या टी ट्वेंटीत भलेही सामना पावसामुळे रद्द झाला असला तरीही उत्तम सुरुवात केली होती. त्यामुळे तशीच कामगिरी दुसऱ्या टी ट्वेंटीत अपेक्षित होती. मात्र प्रत्येक सामना हा नवीन असतो, नवनवे चॅलेंज असतात आणि प्रत्येक सामन्यात नव्याने सुरुवात करावी लागते. पहिल्या सामन्यात पेस अॅंड बाऊंस सोबत मिले सुर मेरा तुम्हारा करणारी गील सूर्याची जोडी दुसऱ्या सामन्यात संपूर्णपणे निष्प्रभ ठरली.


अभिषेक शर्मा, गील आणि सूर्या हे आघाडीचे तीन खेळाडू भारतीय संघाचे तन मन धन आहे. या तिघांवर डावाचा टेम्पो सेट करणे, पडझडीत सावरणे याची जबाबदारी असते. पहिल्या टी ट्वेंटीत अभिषेक स्वस्तात निपटल्यावर गील सूर्याने सुपरफास्ट खेळी करत डाव पुढे नेला होता. विशेषतः गील चे लेग ला जाऊन षटकार मारणे असो की सूर्याने हेझलवुडला स्क्वेअर लेगला ठोकलेला उत्तुंग षटकार असो. दोन्ही खेळाडूंनी सुरेख फुटवर्क करत झकास फटकेबाजी केली होती. पावसाचा वारंवार व्यत्यय येऊनही या दोघांनी सामन्यात रंगत आणली होती. मात्र यांच्या फटकेबाजीला अखेर पावसाने मुरड घातली आणि पहिला टी ट्वेंटी पावसाच्या नावे राहिला.


पहिल्या सामन्यात पाऊस कोसळला तर दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी. एकतर हेझलवुडची अचूक लाईन अॅंड लेंथ आणि सोबतीला पीच चा बाऊंस ॲंड पेस! भारतीय टॅाप ॲार्डरसाठी ही तारेवरची कसरत होती. त्यातही गील हा मिडॅान, मिडॅाफचा गिर्हाईक आहे. मग ती २०२३ ची फायनल असो की आशिया चषक ची फायनल किंवा या सामन्यात असो, मिडॅान मिडॅानला झेलबाद होणे हा गील चा आवडता छंद. तर सूर्याचा ओपन स्टान्स, क्रिझच्या आत राहून, पाय न हलवता तो हेझलवुडच्या अचुकतेचा सामना कसाकाय करणार? त्यातही एक जीवदान मिळूनही मेलबोर्नला भारतीय कर्णधाराचा सूर्य मावळला. जितका वेळ सूर्याने स्टान्स घ्यायला लावला तेवढा वेळ तो क्रिझवर टिकू शकला नाही.


या सामन्यात टॅाप ॲार्डरच्या भाऊगर्दीत संजू सॅमसन ला अचानक घुसवण्यात आले. तो आला केंव्हा गेला केंव्हा कळलेच नाही. हेझलवूड आग ओकत असताना चेंडू हलत होता पण संजू सॅमसनचे पाय हललेच नाही. भारतीय फलंदाजांचे इनकमींग आऊटगोईंग ज्या गतीने चालू होते ते पाहता डकवर्थ लुईस जोडी बिना पावसाची सामना थांबवण्याती शक्यता होती. अर्धा संघ अर्धशतकाच्या आत तंबूत परतल्याने सामन्याचे भविष्य सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती. पण ॲास्ट्रेलियाच्या तंबूचे कळस कापण्याची धमक असलेला एकमेव खेळाडू अभिषेक अजूनही मैदानात उभा होता. गरज होती त्याला कोणीतरी साथ देण्याची. मात्र ज्याप्रकारे आपले मतदार “माझ्या राजा” ला साथ देत नाहीत तसेच उर्वरित फलंदाजांनी केले. एकमेव हर्षित राणाने जीगरी खेळी करत अभिषेकला साथ दिली आणि आपल्या संघाने सव्वाशेचा टप्पा गाठला.


अभिषेक शर्माचे नक्कीच कौतुक करावे लागेल. कारण हेझलवूडच्या आगीवर मात करत त्याने स्फोटक फलंदाजी केली. मैदानात चोहोबाजुंनी टोलेबाजी करत त्याने ॲासी आक्रमणाचा सामना केला. सामना कुठेही असो, प्रतिस्पर्धी गोलंदाज कोणीही असो, त्याच्या तडाख्यातून कोणीही सुटू शकत नाही. आक्रमण करण्याची जी मानसिकता असते, ती त्याच्यात ठासून भरली आहे. “अटॅक इज बेस्ट डिफेन्स” या ब्रीदवाक्याला जागून त्याने कांगारूंशी एकाकी झुंज दिली. भलेही आपला संघ सव्वाशेत आटोपला परंतु अभिषेकची झुंजार खेळी या पराभवातही उठून दिसली. 


आजकाल टी ट्वेंटीत जिथे दोनशे धावांची नवलाई राहिली नाही, तिथे सव्वाशे धावा ॲासींच्या खिजगणतीतही नसणार. हेड मिचेल मार्शच्या जोडीने ते दाखवूनही दिले. एखाद्या फलंदाजाने जरी चाळीशी गाठली तरी सव्वाशेचे टारगेट सहजसाध्य होते. मग ॲासी कर्णधार तरी कसा मागे राहणार? त्याने भारतीय गोलंदाजांचा फडशा पाडत सामना एकतर्फी केला. भारतीय गोलंदाजांना सूर गवसेपर्यंत सामना कांगारूंच्या खिशात (पाऊचमध्ये) गेला होता. कुलदीप, बुमराहने “हुजूर आते आते बहोत देर” केली होती. टॅाप ॲार्डर कोसळताच उर्वरित फलंदाजांनी संयम राखला नाही. अभिषेकने खिंड जरूर लढवली परंतु परतीचे दोर कांगारूंनी केंव्हाच कापले होते. 


अभिषेकने “जीगरमा बडी आग है” हे दाखवून दिले होते पण दुसऱ्या टोकाला इतर फलंदाजांनी “जागते रहो, मेरे भरोसे मत रहो” केल्याने हा सामना आपल्या हातून निसटला. ॲासी गोलंदाज अनप्लेयेबल आहेत असे अजिबात नाही. हेझलवूड सोडला तर त्यांचे इतर गोलंदाज आक्रमक फलंदाजीपुढे नमतात. शिवाय त्यांच्याकडे दर्जेदार फिरकीपटू नाहीत. त्यामुळे पुढील सामन्यात हेझलवूडचे चार षटक सावधपणे खेळून इतर गोलंदाजांना टार्गेट केले तर काही चांगले रिझल्ट मिळू शकतील. मात्र त्याकरिता टॅाप ॲार्डरला पडझड झाली तरी इतर फलंदाजांनी हाराकिरी करू नये. तेंव्हाच कुठे आपला संघ मालिकेत कमबॅक करू शकतो. 

—————————————————

दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


Sunday, October 26, 2025

कोई रोको ना दिवाने को

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

        “कोई रोको ना दिवानें को”

        ✍️डॅा अनिल पावशेकर✍️

—————————————————

ॲास्ट्रेलिया विरूद्ध भारत ही एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली असून ॲास्ट्रेलियाने यात २-१ अशी बाजी मारली आहे. मात्र ही मालिका लक्षात राहिल ती रोहित कोहली अर्थातच रोको या जोडीसाठी. गड गेला पण सिंह आला असे या मालिकेचे वर्णन करता येईल. पहिल्या दोन सामन्यात फ्लॅाप शो करणाऱ्या टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात विलक्षण कामगिरी करत सामना एकतर्फी जिंकला आहे. खट्याळ संघव्यवस्थापन आणि नाठाळ क्षेत्ररक्षकांनी पहिल्या दोन सामन्यांतील चुका सुधारून अंतिम सामन्यात संघबदल करून आणि प्रदर्शन उंचावत मालिकेत थोडीफार अब्रू राखली आहे. येणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेसाठी हा विजय भारतीय संघासाठी महत्वाचा असून रोहित कोहली जोडीने आपल्या लौकिकास साजेशी खेळी करत सिडनीमध्ये छोटी दिवाळी साजरी केली आहे.


झाले काय तर कसोटी, टी ट्वेंटीत रोको जोडी निव्रुत्तीनाथ झाल्याने आणि बराच काळ मैदानाबाहेर राहिल्याने ते या मालिकेत कशी कामगिरी बजावतील याबद्दल सगळेच साशंक होते. मात्र ही जोडी याबाबत ओल्ड वाईन ठरली. निजाम उल मुल्कने त्याच्या म्रुत्यूपत्रात चातुर्याच्या ओळी लिहिल्या आहेत. “नान तहहयात, दौलत ब करामत” म्हणजेच तुम्हाला अन्न जन्मभर मिळेल परंतु दौलत ही पराक्रमाने कमवावी लागते. या जोडीवर जे संशयाचे सावट पसरले होते, त्याला या जोडीने आपल्या पराक्रमाने दूर सारले आहे. दोघांनीही आपल्या मनगटाच्या जोरावर रन दौलत गोळा करत टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.


रोहित बाबत बोलायचे झाले तर “रूक जाना नहीं तू कहीं हार के” याची प्रचिती येते. टी ट्वेंटी विश्वचषक आणि चॅम्पियन ट्रॅाफी जिंकूनही त्याच्या वाट्याला उपेक्षा आली होती. कधी मुंबई इंडियन्स चे कर्णधारपद पद हिरावून घेतले तर आता वन डे त पदावनती. ज्या शुभमनला रोको जोडीने आपल्या अंगा खांद्यावर खेळवले, त्याच्या हाताखाली या दोघांना खेळावे लागत आहे. भलेही निवड समिती भविष्याचे वेध घेत हे प्रयोग करत आहे पण कमीत कमी वन डे साठी रोहितची कर्णधार पदावरून उचलबांगडी नक्कीच खटकते. मात्र रोहित असे मानापमान पचवून पुढे गेला आहे. या मालिकेत पहिला सामना वगळता त्याचा खेळ म्हणजे बावनकशी सोने आहे.


तिसऱ्या सामन्यात, सिडनीचा त्याचा खेळ म्हणजे ओल्ड ॲंड गोल्ड रोहित होता. जणुकाही नियतीने त्याची ही खेळी त्याच्या अखेरच्या ॲास्ट्रेलिया दौर्यासाठी राखून ठेवली होती. वासिम अक्रम म्हणतो त्याप्रमाणे रोहितच्या खेळीला एक प्रकारचा लेझी एलीगन्स असतो. अचूक टायमिंग आणि अचाट ताकद ही त्याची कवचकुंडले! याचा वापर करून त्याने सिडनी मैदानावर स्वीप, फ्लिक, पुल आणि लॅाफ्टेड शॅाटची उधळण करत शतक झळकावले आणि रोहितपंचमी साजरी केली. ना कुठले अॅग्रेशन ना कुठली खुन्नस, बस फक्त रक्तविहीन रोहित क्रांती! सिडनीमध्ये ज्याप्रकारे त्याचा खेळ बहरतो ते पाहता त्याला सिडनीचा राजा ही उपाधी निश्चितच लागू पडते.


राहिली बाब विराटची तर पाठलाग करताना विराट आणि चित्ता यांत कोण सरस हे ठरवणे कठीण आहे. त्याचा मॅच फिटनेस तर एक दंतकथा झाली आहे. मॅट शॅार्टचा झेल घेताना त्याचे शरीर यंत्रवत हलले. कमालीचे हॅंड आय कॅार्डीनेशन, फिजिकल फिटनेस आणि झेल घेतांना त्याचे बॅाडी रिफ्लेक्सेस निव्वळ अवर्णनीय! विराटसारखा फिटनेस जर सर्वांनी आत्मसात केला तर आर्थोपेडीक आणि फिजोओथेरपीचे दुकान बंद झाले म्हणून समजा. प्रुथ्वी तिच्या अक्षावर २३.५ अंश झुकली आहे तर दर तासाला ती १५ अंश फिरते. मात्र विराट लेग ला खेळताना विशेषतः पुल, हुक करताना कमालीच्या वेगाने आणि भिंगरीसारखा फिरताना पाहून डोळ्याचे पारणे फिटते. पहिल्या दोन सामन्यात त्याचे फुटवर्क नीट न झाल्याने तो बाद झाला, मात्र याची कसर त्याने तिसऱ्या सामन्यात भरून काढली. त्याचे कट शॉट, फ्लिक आणि स्टार्कला मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह तर सचिनची आठवण करून देत होता. त्याचा शेवटचा शॅाट, अप्परकट तर कांगारूंना “हंसते जख्म” देऊन गेला असणार.


वास्तविकत: हा मालिका पराभव टीम इंडिया साठी टी ट्वेंटी विश्वचषक, चॅम्पियन ट्रॅाफी, आशिया चषक या विजयानंतरचा उतारा होता. चुकीची संघनिवड चांगल्या संघाचा कसा पालापाचोळा करू शकते हे आपण या मालिकेत पाहिले आहे. निव्वळ फलंदाज नव्हे तर गोलंदाजही सामने जिंकून देतात यावर संघव्यवस्थापणाने विश्वास ठेवायला हवा. आठव्या क्रमांकावर फलंदाजीच्या नादात नितीश रेड्डीला अक्षरश: पहिल्या दोन सामन्यात संघात कोंबण्यात आले. तर जगातील सध्याचा सर्वोत्तम फिरकीपटू कुलदीपला खुर्ची उबवायला लागली. बुमराह कधी आणि कोणत्या सामन्यात, मालिकेत खेळणार हे सांगता येत नाही. यशस्वी जैस्वाल आणि मो. शमीचे कंपोस्ट खत करणे सुरू असून योग्य संघनिवड ही काळाची गरज बनली आहे.


थोडक्यात काय तर मालिका गमावूनही भारतीय पाठीराखे रोहित कोहलीच्या प्रदर्शनाने खुष आहेत. निश्चितच या दोघांचा सूर्य मावळतीला आलेला आहे. काळवेळ कोणालाही चुकली नाही. मात्र या मुद्द्यावर त्यांची हेळसांड अपेक्षित नाही. कमीतकमी वन डे मध्ये या दोघांचे फिटनेस, प्रदर्शन चांगले असेपर्यंत त्यांना विश्रांती देऊ नका. संघाच्या जडणघडणीत या दोघांचा मोलाचा वाटा आहे. ही जय विरूची जोडी पुन्हा होणे नाही. चमत्काराशिवाय जग नमस्कार करत नाही. या दोघांनी सिडनीमध्ये दाखवलेल्या चमत्काराचा निवड समिती नक्कीच बोध घेईल अशी अपेक्षा आहे. क्रिकेट रसिकांसाठी रोको जोडी म्हणजे “कोई रोको ना दिवाने को, दिल मचल रह, इन्हे खेलते देखने को” अशी स्थिती आहे. या जोडीबाबत निवड समितीने बहादूर शहा जफरचा एक शेर जरूर ध्यानात ठेवावा. 

“काटों को मत निकाल चमन से ओ बागवां”

“यें भी गुलों के साथ पलें है बहार में”

—————————————————

दिनांक २६ ॲाक्टोबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

Monday, September 29, 2025

दुबईत टीम इंडियाचा राजतिलक

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

   “दुबईत टीम इंडियाचा राजतिलक”

       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

क्षणाक्षणाला धडधड वाढवणार्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकचा सुपडा साफ करत नवव्यांदा आशिया चषक हस्तगत केला आहे. पाक गोलंदाज आणि भारतीय फलंदाजांतील जीवघेण्या द्वंद्वाला रिंकू सिंहने शेवटचा वार करत संपुष्टात आणले आहे. दिडशेच्या आतले लक्ष्य असले तरी फायनलच्या दबावाने आपला टॅाप ॲार्डर कोसळला तरीही मध्यक्रमात तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबेने निकराने खिंड लढवत विजयावर मोहोर उमटवली आहे. आशिया चषकाच्या इतिहासात प्रथमच एकमेकांशी अंतिम फेरीत लढणार्या दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला परंतु डेथ ओव्हर्समध्ये पाक गोलंदाजांवर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत चषक पटकावला आहे.


झाले काय तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी पत्करण्याचा सूर्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता कारण अंतिम सामन्यात पाठलाग करण्यात दबाव येत असतो. त्यातच अष्टपैलू पांड्या नसल्याने संघाचा समतोल बिघडला होता. पण शिवम दुबेने आपल्या अष्टपैलू कामगिरीने “दुबे पांड्या तो नहीं लेकिन पांड्या से कम भी नहीं” हे दाखवून दिले. पाक ने सामन्यागणिक आपली फलंदाजी सुधारत झकास सुरुवात केली. त्यांचे सलामीवीर धावांची बरसात करत असताना आपला वरूणराजा चक्रवर्ती देवासारखा धावून आला. खतरनाक साहीबजादा फरहानचा काटा काढून त्याने पाकच्या रथाचे एक चाक काढले.


अनुभवी फखर झमनच्या दिमतीला सैम अयुब आला पण त्याला कुलदीपने चकवले. यानंतर आपल्या फिरकीने जो चिखल केला, त्यात पाकचा रथ पुर्णपणे फसला. पाक संघ दोन बाद ११३ ते सर्वबाद १४६ असा गडगडला. मुख्य म्हणजे कुलदीपने ४ बळी टिपत पाकच्या फलंदाजीचे अड्डे उध्वस्त केले. तर प्रारंभी अपयशी ठरलेल्या बुमराहने हॅरीस रौफ आणि मो. नवाझला स्वस्तात निपटवले. नवीन चेंडू आणि वेगवान गोलंदाजी समोर पाक सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली होती परंतु नंतर ते संथ विकेट, जुना चेंडू आणि फिरकीच्या जाळ्यात पुरते अडकले.


टीम इंडियाला पाठलाग करतांना ना खूप मोठे लक्ष्य होते ना समोर खतरनाक गोलंदाज. पण अंतिम सामन्याचा दबाव आपले काम करून गेला. भरवश्याच्या टॅाप ॲार्डरला (म्हशीला) टोणगा झाला. अभिषेकचे बाद होणे समजू शकतो. पण सूर्या आणि गील बेजबाबदारपणे बाद झाले. सूर्या तर संपूर्ण मालिकेत फलंदाजीत ना कॅान्फीडंट दिसला ना सिरीअस. त्याला फुल लेंथ डिलीव्हरी टाकून प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी त्याचा झिरो डिग्री प्लेअर केला. तर शुभमन गील ने चौकार ठोकून पुढच्याच चेंडूंवर विकेट दिली. स्लो पीचला अनुसरून गोलंदाज अशरफने कमी गतीने चेंडू टाकत गील ला फसवले.


चौथ्या षटकातच आपली तीन बाद वीस अशी दयनीय अवस्था झाली होती. आता सगळ्या नजरा तिलक वर्मावर टिकल्या होत्या. त्याने संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ करत निश्चयाने फलंदाजी केली. त्याने संजू सोबत चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची बहुमुल्य भागीदारी करत डाव सांभाळला. मात्र सॅमसन बाद होताच अष्टपैलू शिवम दुबे मैदानात आला आणि सामना आपल्याकडे झुकू लागला. त्याने २२ चेंडूत ३३ धावा फटकावतांना “सिर्फ कानून के ही नहीं, दुबेजी के भी हात लंबे होते है” हे दाखवून दिले. तिलक वर्मा आणि दुबेच्या वेगवान ६० धावांच्या खेळीमुळे अशक्यप्राय वाटणारे आव्हान सोपे झाले होते. 


खरेतर पाक ने फलंदाजीत जरी कच खाल्ली होती तरी ते गोलंदाजीत भारी पडले होते. मात्र क्षेत्ररक्षणात अक्षम्य चुका केल्याने त्यांच्या हातातून सामना निसटला. गील ला धावबाद करण्यात ते चुकले पण ते त्यांना महागात पडले नाही. पण संजू सॅमसन चा १२ धावांवर झेल सोडणे आणि तिलक वर्माला ऐन मोक्याच्या वेळी धावबाद करू न शकल्याने ते पराभूत झाले. गोलंदाजीत फिरकीपटू चांगला दबाव टाकत असताना पाक कर्णधार सलमान आगा ने वेगवान हॅरिस रौफ ला पाचारण केले आणि इथेच त्यांचा घात झाला. हॅरीस रौफच्या १५ व्या षटकात १७ धावा निघताच रौफ चा खौफ नष्ट झाला. तर घुंगरू शेठ अब्रार अहमदचे बॅालिंग एन्ड चेंज केल्याने त्याची लय बिघडली होती.


पाक कर्णधार रणनितीत कमी पडला. त्याने शाहीन आफ्रिदीची षटके लवकर संपवल्याने डेथ ओव्हर्स मध्ये ते नागडे झाले. तर अनुभवी मो. नवाझला त्याने केवळ एक षटक गोलंदाजी दिली. हॅरिस रौफ टीम इंडीयासाठी रन मशीन ठरला. तर टीम इंडीयाने फलंदाजीतील पडझडीनंतरही डाव सावरला. तिलक वर्माने एका बाजूला किल्ला लढवत शेवटपर्यंत तो मैदानात उभा राहिला. कोणताही अनावश्यक फटका न मारता जबाबदारीने फलंदाजी करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. आशिया चषकातील सर्वच्या सर्व सामने जिंकून भारताने आपणच आशिया चषकाचे खरे हकदार आहोत हे सिद्ध केले आहे.

—————————————————

दिनांक २९ सप्टेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


दुबईत टीम इंडियाचा राजतिलक

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

   “दुबईत टीम इंडियाचा राजतिलक”

       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

क्षणाक्षणाला धडधड वाढवणार्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकचा सुपडा साफ करत नवव्यांदा आशिया चषक हस्तगत केला आहे. पाक गोलंदाज आणि भारतीय फलंदाजांतील जीवघेण्या द्वंद्वाला रिंकू सिंहने शेवटचा वार करत संपुष्टात आणले आहे. दिडशेच्या आतले लक्ष्य असले तरी फायनलच्या दबावाने आपला टॅाप ॲार्डर कोसळला तरीही मध्यक्रमात तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबेने निकराने खिंड लढवत विजयावर मोहोर उमटवली आहे. आशिया चषकाच्या इतिहासात प्रथमच एकमेकांशी अंतिम फेरीत लढणार्या दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला परंतु डेथ ओव्हर्समध्ये पाक गोलंदाजांवर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत चषक पटकावला आहे.


झाले काय तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी पत्करण्याचा सूर्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता कारण अंतिम सामन्यात पाठलाग करण्यात दबाव येत असतो. त्यातच अष्टपैलू पांड्या नसल्याने संघाचा समतोल बिघडला होता. पण शिवम दुबेने आपल्या अष्टपैलू कामगिरीने “दुबे पांड्या तो नहीं लेकिन पांड्या से कम भी नहीं” हे दाखवून दिले. पाक ने सामन्यागणिक आपली फलंदाजी सुधारत झकास सुरुवात केली. त्यांचे सलामीवीर धावांची बरसात करत असताना आपला वरूणराजा चक्रवर्ती देवासारखा धावून आला. खतरनाक साहीबजादा फरहानचा काटा काढून त्याने पाकच्या रथाचे एक चाक काढले.


अनुभवी फखर झमनच्या दिमतीला सैम अयुब आला पण त्याला कुलदीपने चकवले. यानंतर आपल्या फिरकीने जो चिखल केला, त्यात पाकचा रथ पुर्णपणे फसला. पाक संघ दोन बाद ११३ ते सर्वबाद १४६ असा गडगडला. मुख्य म्हणजे कुलदीपने ४ बळी टिपत पाकच्या फलंदाजीचे अड्डे उध्वस्त केले. तर प्रारंभी अपयशी ठरलेल्या बुमराहने हॅरीस रौफ आणि मो. नवाझला स्वस्तात निपटवले. नवीन चेंडू आणि वेगवान गोलंदाजी समोर पाक सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली होती परंतु नंतर ते संथ विकेट, जुना चेंडू आणि फिरकीच्या जाळ्यात पुरते अडकले.


टीम इंडियाला पाठलाग करतांना ना खूप मोठे लक्ष्य होते ना समोर खतरनाक गोलंदाज. पण अंतिम सामन्याचा दबाव आपले काम करून गेला. भरवश्याच्या टॅाप ॲार्डरला (म्हशीला) टोणगा झाला. अभिषेकचे बाद होणे समजू शकतो. पण सूर्या आणि गील बेजबाबदारपणे बाद झाले. सूर्या तर संपूर्ण मालिकेत फलंदाजीत ना कॅान्फीडंट दिसला ना सिरीअस. त्याला फुल लेंथ डिलीव्हरी टाकून प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी त्याचा झिरो डिग्री प्लेअर केला. तर शुभमन गील ने चौकार ठोकून पुढच्याच चेंडूंवर विकेट दिली. स्लो पीचला अनुसरून गोलंदाज अशरफने कमी गतीने चेंडू टाकत गील ला फसवले.


चौथ्या षटकातच आपली तीन बाद वीस अशी दयनीय अवस्था झाली होती. आता सगळ्या नजरा तिलक वर्मावर टिकल्या होत्या. त्याने संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ करत निश्चयाने फलंदाजी केली. त्याने संजू सोबत चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची बहुमुल्य भागीदारी करत डाव सांभाळला. मात्र सॅमसन बाद होताच अष्टपैलू शिवम दुबे मैदानात आला आणि सामना आपल्याकडे झुकू लागला. त्याने २२ चेंडूत ३३ धावा फटकावतांना “सिर्फ कानून के ही नहीं, दुबेजी के भी हात लंबे होते है” हे दाखवून दिले. तिलक वर्मा आणि दुबेच्या वेगवान ६० धावांच्या खेळीमुळे अशक्यप्राय वाटणारे आव्हान सोपे झाले होते. 


खरेतर पाक ने फलंदाजीत जरी कच खाल्ली होती तरी ते गोलंदाजीत भारी पडले होते. मात्र क्षेत्ररक्षणात अक्षम्य चुका केल्याने त्यांच्या हातातून सामना निसटला. गील ला धावबाद करण्यात ते चुकले पण ते त्यांना महागात पडले नाही. पण संजू सॅमसन चा १२ धावांवर झेल सोडणे आणि तिलक वर्माला ऐन मोक्याच्या वेळी धावबाद करू न शकल्याने ते पराभूत झाले. गोलंदाजीत फिरकीपटू चांगला दबाव टाकत असताना पाक कर्णधार सलमान आगा ने वेगवान हॅरिस रौफ ला पाचारण केले आणि इथेच त्यांचा घात झाला. हॅरीस रौफच्या १५ व्या षटकात १७ धावा निघताच रौफ चा खौफ नष्ट झाला. तर घुंगरू शेठ अब्रार अहमदचे बॅालिंग एन्ड चेंज केल्याने त्याची लय बिघडली होती.


पाक कर्णधार रणनितीत कमी पडला. त्याने शाहीन आफ्रिदीची षटके लवकर संपवल्याने डेथ ओव्हर्स मध्ये ते नागडे झाले. तर अनुभवी मो. नवाझला त्याने केवळ एक षटक गोलंदाजी दिली. हॅरिस रौफ टीम इंडीयासाठी रन मशीन ठरला. तर टीम इंडीयाने फलंदाजीतील पडझडीनंतरही डाव सावरला. तिलक वर्माने एका बाजूला किल्ला लढवत शेवटपर्यंत तो मैदानात उभा राहिला. कोणताही अनावश्यक फटका न मारता जबाबदारीने फलंदाजी करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. आशिया चषकातील सर्वच्या सर्व सामने जिंकून भारताने आपणच आशिया चषकाचे खरे हकदार आहोत हे सिद्ध केले आहे.

—————————————————

दिनांक २९ सप्टेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


Thursday, September 25, 2025

ये बनाएंगे इक आशियां


 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

         “ये बनाएंगे इक आशियां”

        ✍️डॅा अनिल पावशेकर✍️

—————————————————

आशिया चषकात सलग पाच सामने जिंकून टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. बांगलादेशच्या उत्साही संघाला आणि उतावीळ पाठीराख्यांना जोर का झटका धीरे से देत टीम इंडियाने ही लढत ४१ धावांनी जिंकली आहे. संघात तब्बल चार बदल करत बांगलादेशने संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला परंतु पुन्हा एकदा अभिषेक शुभमन जोडीने दणक्यात सुरुवात करत पहिली चढाई जिंकली. तर मध्यक्रम ढेपाळूनही हार्दिक पांड्याच्या बुस्टर डोझने टीम इंडीयाला तारले आणि आपल्या संघाचा अंतिम फेरीत प्रवेश सुकर झाला. आता पाक विरुद्ध बांगलादेश यातील विजेता अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.


झाले काय तर दुबईत पाठलाग करून सामने जिंकणे सोपे आहे. मात्र त्याकरिता फलंदाजी तेवढीच सक्षम असणे गरजेचे आहे आणि इथेच बांग्ला संघ गळपटला. प्रथम गोलंदाजी करताना बांग्ला संघाने टीम इंडियाला फार मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. आपल्या सलामीवीरांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट सुरुवात केली. विशेषत: अभिषेकचा धावांचा अभिषेक कायम होता. मात्र गील बाद होताच आपल्या संघाची स्पिड फाईव्ह जी वरून टू जी वर आली. शिवम दुबे, सूर्या आणि तिलक वर्मा मैदानावर आले आणि लगेच डेझर्ट सफारीला निघून गेले. 


चांगल्या ओपनिंग चा पचका व्हायला वेळ लागला नाही. अवघ्या साडेसहा षटकात ४६ धावांत चार विकेट्स गमावताच आपला संघ दिडशेत गारद होतो की काय अशी शंका यायला लागली होती. गील, दुबे, सूर्या आणि तिलक वर्मा हे चौघेही झेलबाद झाले होते. एकतर स्ट्रोक्सचे टायमिंग जुळत नव्हते आणि त्यामागे ताकद पण कमी वाटत होती. जणुकाही या फलंदाजांचे नवरात्रीचे उपवास तर सुरु नाही ना असे वाटत होते. त्यामुळेच यापुढे ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपल्या फलंदाजांना हमदर्द का टॅानिक सिंकारा द्यावे अशी सूचना कराविशी वाटते.


टीम इंडियाला खरा धक्का बसला जेव्हा तडाखेबंद फलंदाजी करणारा अभिषेक धावबाद झाला. खरेतर बॅकवर्ड प्वाईंटला तिथे धाव होतीच नाही. त्यामुळे तिथे ‘रन चोर विकेट छोड’ चा प्रयोग बघायला मिळाला. मात्र अनुभवी पांड्याने तिथे आपले कौशल्य पणाला लावले. त्याच्या फेव्हरेट एक्स्ट्रा कव्हर एरियात त्याने खणखणीत चौकार ठोकत २९ चेंडूत ३८ धावांची उपयुक्त खेळी केली. बांगलादेश गोलंदाजांचे खरोखरच कौतुक करावे लागेल. अभिषेकच्या झंझावातानंतरही त्यांनी अचूक मारा करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही.


लंकेविरूद्ध यशस्वी पाठलाग केल्याने बांगलादेशला विजयाची आशा होती. मात्र मागच्या सामन्यात महागडा ठरलेला बुमराह यावेळी त्याच्या जुन्या रंगात दिसून आला. त्याने पहिल्याच षटकात बळी घेत त्यांच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्याला सहकारी गोलंदाजांनी उत्तम साथ दिली. मात्र आपल्या क्षेत्ररक्षकांनी मागील चुकांतून बोध घेतला नाही. ट्रम्पच्या ५०% टेरिफ नियमाचे तंतोतंत पालन करून त्यांनी हाय कॅचेसवर बांग्ला फलंदाजांना ५०% नवरात्र ॲाफर दिली. लागोपाठ दोन सामन्यात अर्धा डझन झेल सोडणार्या क्षेत्ररक्षकांना काय म्हणावे ते कळत नाही. 


क्षेत्ररक्षणात हाच धांगडधिंगा चालू राहिला तर बीसीसीआय एच वन बी व्हिसाने जगातले चांगले दहा क्षेत्ररक्षक भाड्याने आणू शकतात. मात्र क्षेत्ररक्षकांचे पाप पोटात घेत कुलदीप, वरूण आणि अक्षरच्या फिरकीने लाज राखली. कुलदीपची तर हॅट्रिक होता होता राहिली. तर बांगलादेश तर्फे सैफ हसनने एकाकी झुंज दिली. त्याने तीन चौकार आणि पाच उत्तुंग षटकार ठोकत ६९ धावांची खेळी केली. मात्र त्याला परवेझ होसेन इमॅान वगळता कोणीही साथ दिली नाही. या दोघां व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला नाही. त्यातही मिस्टर एक्स्ट्रा म्हणजेच वाईड बॅालच्या सर्वाधिक नऊ धावा होत्या.


थोडक्यात काय तर बांगलादेश संघाने गोलंदाजीत बाजी मारली परंतु फलंदाजांनी त्यांना दगा दिला. याउलट आपला संघ फलंदाजी आणि गोलंदाजीत भरपूर पर्याय असल्याने काम जमून गेले . मात्र क्षेत्ररक्षण, विशेषतः हाय कॅचेस ही आपली नवीन डोकेदुखी होऊन बसली आहे. तर मध्यक्रमात सगळं ॲाल इज वेल नाही आहे. मध्य फळीत विविध प्रयोग नकोच. दुबे ला दुबईत तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचे लॅाजिक फक्त आणि फक्त सूर्या, गौतम गंभीरच सांगू शकतील. मात्र अंतिम सामन्यात मध्यफळीच्या योग्य घडी सोबतच उत्तम क्षेत्ररक्षण राहिले तर हा संघ ‘ये बनाएंगे इक आशियां’ असं आपण म्हणू शकू.

—————————————————

दिनांक २५ सप्टेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

Monday, September 22, 2025

सुपर फोरमध्ये पाकवर सुपर विजय

  #@😈😈😈😈😈😈😈😈#@

      “सुपर फोरमध्ये सुपर विजय”

            ‘डॅा अनिल पावशेकर’

————————————————-

आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकचा सहा गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. साखळी फेरी पाठोपाठ पाकला पुन्हा दणका देत भारताने पाकवर हुकूमत गाजवली आहे. अभिषेक शर्मा आणि शुभमन गील जोडीने पाक गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत सामना पुन्हा एकदा एकतर्फी केला. पूर्वार्धात आपल्या गचाळ क्षेत्ररक्षण आणि बेरंग गोलंदाजीने पाकला चांगलाच ॲडव्हांटेज मिळाला होता परंतु उत्तरार्धात भारतीय फलंदाजांनी धाडसी फलंदाजी करत पाकला चारी मुंड्या चीत केले.


झाले काय तर सूर्याचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय योग्यच होता आणि पांड्याने झकास सुरुवात पण केली होती. मात्र पहिल्या सामन्यानंतर सूर्याने जी नो शेकहॅन्ड्स पॅालीसी खेळली होती ती या सामन्यात सुद्धा दिसून आली. मात्र यावेळी शेकहॅन्ड्स पाक खेळाडूंसोबत नव्हते तर ते उडलेल्या झेलांसोबत होते. अभिषेक ने दोन तर कुलदीपने एक झेल सोडून प्रारंभी जो दबाव पाकवर निर्माण करता आला असता, तो गमावला. भलेही आक्रमक फखर झमन लवकर बाद झाला परंतु जीवदान मिळाल्याने पाक फलंदाजांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी बुमराह अॅंड कंपनीला ठोकून काढले.


पाकने मागील सामन्यातील चुकांचा बोध घेत यावेळी वेगळी रणनिती आखली होती. अनुभवी फखर झमनला सलामीला धाडले आणि त्यांनी यावेळी बुमराहला लक्ष्य केले होते. कारण मुळावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतात हे त्यांना चांगले माहीत होते. बुमराहचा बेरंग होताच पाकने दहा षटकांत नव्वदी ओलांडून चांगली सुरुवात केली होती. अखेर नियमित गोलंदाजांना पाक फलंदाज भीक घालत नाही हे लक्षात येताच सूर्याने पार्ट टाईम शिवम दुबेला आक्रमणाला लावले आणि दुबेने पाक संघाची नांव कशी डुबेल याची काळजी घेतली.


अकराव्या षटकात सईम अयुब बाद होताच पाकची बुलेट ट्रेन चक्क पॅसेंजर गाडी झाली. अकरा ते सतराव्या षटकापर्यंत दुबेसहीत फिरकीपटूंनी अचूक मारा करत पाक फलंदाजांना वेसण घातले. मात्र डावाच्या अखेरीस पाक फलंदाजांनी फटकेबाजी करत धावसंख्या १७१ पोहचवली. अर्थातच ही धावसंख्या नक्कीच चांगली होती आणि यावेळी पाक संघात वेगवान गोलंदाज हॅरिस रौफचा समावेश झाल्याने ही लढत मध्यंतरापर्यंत फिप्टी फिप्टी अशी होती. उत्तरार्धात पाक गोलंदाज आणि भारतीय फलंदाजांतील जुगलबंदी रंगणार अशी चिन्हे दिसत होती.


मात्र अभिषेक आणि शुभमन जोडीचा इरादा काही वेगळा होता. शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूंवर षटकार ठोकत अभिषेकने झिरो टॅालरन्स, नो मर्सी पॅालिसी दाखवून दिली. दोघांनीही पाक गोलंदाजांना उठता लाथ बसता बुक्की करत चोपून काढले. त्याने सहा चौकार आणि पाच षटकारांसह उंच उंच लढत दिली तर शुभमनने खणखणीत आठ चौकार ठोकत पाकचा इंच इंचाचा हिशोब चुकता केला. या दोघांच्या झंजावाताने पाक गोलंदाजीचा पालापाचोळा झाला आणि दहा षटकाच्या आतच भारताने शंभरी गाठली.


खरेतर यानंतर सामन्यातली चुरस निघून गेली होती . भलेही शुभमन, सूर्या, अभिषेक आणि संजू सॅमसन उर्वरित धावा काढतांना बाद झाले परंतु पाकला सामन्यात परतता आले नाही. पाकतर्फे हॅरिस रौफने थोडीफार जिद्द आणि ॲग्रेशन दाखवले परंतु बाकी गोलंदाज म्हणजे चिनी कम होते. जसा आपल्या कडे बुमराह प्रभाव पाडू शकला नाही, तसेच त्यांचा हुकमी गोलंदाज शाहीन आफ्रिदी निष्प्रभ ठरला. तर सईम अयुब, अब्रार आणि अश्रफ हे गोलंदाज अभिषेक शुभमनला शरण गेले. 


पाक संघाचे काय चुकले तर त्यांनी फलंदाजीत चांगली सुरुवात करूनही त्याचे मातेरे केले. विशेषतः भारतीय क्षेत्ररक्षकांनी चार झेल आणि एक धावबाद ची लयलूट करूनही ते १७१ पर्यंत थबकले. शिवाय त्यांनी ४२% डॅाट बॅाल खेळल्याने स्वतःवर दबाव निर्माण करून घेतला. तर आपले दोन तीन गडी बाद होताच आक्रमक क्षेत्ररक्षण लावून एकेरी धावबंदी करून फलंदाजांची कोंडी निर्माण करता आली असती. तसेच सईम अयुब ऐवजी हॅरिस रौफला लवकर गोलंदाजीला लावले असते तर काही अंशी त्याचा फायदा झाला असता.


आपल्या संघाबाबत बोलायचे झाले तर क्षेत्ररक्षण सुमार होते आणि पहिल्या दहा षटकात पाक फलंदाजांना आपले गोलंदाज काबूत ठेवू शकले नाहीत. तर फिरकीपटू दबाव निर्माण करत असताना अक्षरला केवळ एक षटक दिले गेले. फलंदाजीत अभिषेक शुभमनने धडाकेबाज फलंदाजी केली पण सूर्या, सॅमसन फारशी चमक दाखवू शकले नाहीत. मात्र तिलक वर्माने एक बाजू लावून धरत पाकवर सुपर फेरीत सुपर विजयाची औपचारिकता पूर्ण केली. 

_________________________________

दिनांक २२ सप्टेंबर २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...