@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*केपटाऊनला टीम इंडिया डाऊन*
*डॉ अनिल पावशेकर*
***********************************
प्रचंड गाजावाजा करत फ्रीडम श्रृंखला सर करायला निघालेल्या टीम इंडियाने चाहत्यांना निराश केले आहे. सेंच्युरीअन मैदानातून उड्डाण भरलेल्या टीम इंडियाचे अखेर केपटाऊनला मिटर डाऊन झाले आहे. दुसऱ्या कसोटीतील चुकांमधून काही धडे न घेता "हम नहीं सुधरेंगे" चा धडा आपल्या संघाने घेतल्याने मालिका गमावली आहे. खेळात हारजीत तर होणारच आहे. परंतु तिसऱ्या कसोटीत फलंदाजांनी हाराकिरी करत मालिका द.आफ्रिकेला अर्पण केली आहे. बुजगवाण्या खेळाडूंनी भारतीय संघाला पोकवण्याचे काम इमानेइतबारे केले असून द.आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
खरेतर या मालिकेचे नाव "ससा कासव शर्यत" ठेवले असते तर ते जास्त संयुक्तिक ठरले असते. मालिकेच्या प्रारंभी बढत घेऊनही भारतीय सश्याला आफ्रिकन कासवाने सहज हरवले. पहिल्या कसोटीतील विजयाने उन्मत्त झालेल्या टीम इंडियाच्या गजराजला डीन एल्गर नावाच्या माहुताने चांगलेच काबूत केले. पराभवाने खचून न जाता डीन एल्गरने संघात आपल्या कर्तृत्वाने प्राण फुंकून आपल्या संघाला वर खेचले. अनुभवी कसिगो रबाडा, लुंगी एनगिडीने आपल्या सहकारी गोलंदाजांसोबत अचूक मारा करत भारतीय फलंदाजांना बांधून ठेवले होते. थोडी लाज राखायला भारतीय फलंदाजांनी या मालिकेत दोन शतके जरुर झळकावली परंतु ते प्रयत्न तोकडे पडले. फलंदाजांच्या ढेपाळलेल्या कामगिरीने यौवनात असलेली आपली गोलंदाजीही भरकटून गेली. फलंदाजांच्या सुमार आणि गोलंदाजांच्या साधारण कामगिरीने भारतीय संघाची अवस्था "डाळ शिजत नाही,वरण उकळत नाही" अशी झाली होती.
भारतीय फलंदाजी कागदावर बलाढ्य आहे. मात्र त्यांचा "घरमें शेर, बाहर मे ढेर" चा प्रत्यय या मालिकेत पहायला मिळाला. पहिली कसोटी सोडल्यास उर्वरित कसोटीत जणुकाही दोनशेच्या आसपासच धावा करायचा विडा टीम इंडियाने उचलल्याचे दिसत होते. मयंक आणि राहुलच्या सलामी जोडीने थोडीफार चुणूक दाखवली होती परंतु आफ्रिकन वेगापुढे ते हतबल ठरले. विराटच्या एकखांबी तंबूवर विसावून पाच दिवसांची कसोटी जिंकता येत नाही. याकरिता मध्यफळीत पुजारा,रहाणेचा समावेश होता. मात्र या दोन्ही खेळाडूंना बहुतेक बीसीसीआयने ध्रुवताऱ्यासारखे अढळपद दिले असावे. इतकी बेक्कार फलंदाजी तर गल्लीबोळातले पोरं सुद्धा करत नसणार. या दोन्ही फलंदाजांनी मध्यफळीत केलेला खेळखंडोबा पाहता या दोघांनी "राष्ट्रीय अंडी उबवणे उपक्रम" हाती घ्यायला हरकत नाही.
खरेतर या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी आत्मचरित्र लिहून "फलंदाजी कशी करु नये" याबाबत नवोदितांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. सोबतच निवड समितीने या दोघांना संबंधीत रणजी संघाचे कर्णधार पद देऊन सन्मानाने शाल श्रीफळ द्यायला हरकत नाही. एवढे असले तरी कसोटी सामन्यांपासून प्रेक्षकांना दूर करण्याचे श्रेय या दोन फलंदाजांना नक्कीच जाते. फलंदाजीच्या शेपटाकडे पाहिल्यास रिषभ पंत असो की हनुमा विहारी, यांना उर्वरित फलंदाजांना घेऊन धावसंख्या फुगवता आली नाही. अंतिम कसोटीत रिषभ पंतने शतक जरूर झळकावले परंतु बुमराहला स्ट्राईक देऊन त्याने संघाचा खेळ खल्लास करून टाकला. वास्तविकत: बुमराह हा अकराव्या क्रमांकाचा फलंदाज. त्याच्या गोलंदाजीला तोड नसली तरी तो मनोरंजनात्मक फलंदाजी निश्चितच करतो. यापुर्वी आपण मुथय्या मुरलीधरन आणि हरभजनजी कॉमेडी फलंदाजी पाहिली होती. त्यांचाच वारसा बुमराह पुढे नेत आहे. मात्र त्यावर विश्वास ठेऊन रिषभ पंतने घोडचूक केली आणि भारतीय संघाचा डाव लवकर संपुष्टात आला.
नाही म्हणायला आपल्या संघात शार्दुल ठाकूर आणि अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या भुमिकेत आहेत. परंतु हे दोघेही फार चमक दाखवू शकले नाही किंबहुना त्यांनी कामगिरीत सातत्य राखले नाही. विराट सहीत भारतीय खेळाडूंनी मैदानावर आक्रमकता जरूर दाखवली. मात्र ही लढाई "शक्ती पेक्षा युक्ति श्रेष्ठ" अशी होती आणि इथेच भारतीय संघ गडबडला. भारतीय आक्रमणाला द.आफ्रिकन फलंदाजांनी खेळपट्टीवर धिरोदात्तपणे उभे राहीत चौथ्या डावात भारतीय गोलंदाजांचा चोथा करून टाकला. खेळपट्टीवर चेंडू जेवढा उसळत होता त्यापेक्षा जास्त भारतीय खेळाडू विकेटसाठी उसळत होते. मात्र डीन एल्गर ॲंड कंपनीने शांतपणे भारतीय आक्रमणाची धार बोथट करत आपले लक्ष्य गाठले.
संपूर्ण दौऱ्याचा विचार करता भारतीय संघ आणि कर्णधार निवडीबाबत जे मानापमानाचे नाट्य रंगले त्याचा प्रतिकूल प्रभाव संघाच्या कामगिरीवर झाला. पहिली कसोटी जिंकताच द.आफ्रिकेवर दबाव आणून मालिका जिंकण्याची नामी संधी भारताला होती. मात्र दुसऱ्या कसोटीत विराट संघात नसणे द.आफ्रिकेच्या पथ्यावर पडले. त्यातच राहुलला कसोटीचे कर्णधार पद झेपले नाही. पुजारा रहाणे जोडीने "हम बने तुम बने टीम इंडियाको डुबानेके लिये" चा राग आवळल्याने संघाची गाडी चिखलात फसली. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करून थोड्याफार आशा जागवल्या होत्या. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत द.आफ्रिकेला जिंकण्यापासून ते थोपवू शकले नाही. या मानहानीकारक पराभवानंतर निवड समितीने संघात जागा अडवून बसलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणे गरजेचे आहे. सोबतच रूतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर,शुभमन गिल आदी खेळाडूंचा जरूर विचार करावा. भुतकाळातील कामगिरीपेक्षा वर्तमान फॉर्म,फिटनेसच्या आधारे संघनिवड करावी. अन्यथा "काम के ना काज के दुश्मन अनाजके" खेळाडू संघात भरल्यास भविष्यात आणखी नाचक्की अटळ आहे.
************************************
दि. १५ जानेवारी २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment