Monday, January 17, 2022

कोहलीची विराट पतंग कटली

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
       *कोहलीची 'विराट' पतंग कटली*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
 देशभरात नुकतेच मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे. यानिमित्ताने नामचीन पतंगबाजांनी मोठ्या मोठ्या पतंगी लिलया कापल्या आहेत. क्रिकेटच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाशक्तीमान असलेल्या बीसीसीआयने नायलॉन मांजा पेक्षाही मजबूत असलेल्या निवड समितीद्वारे कोहलीची विराट पतंग कापली आहे. खरेतर मोठ्या विश्वासाने बीसीसीआयने विराटकडे टीम इंडियाची धुरा सोपवली होती. मात्र विराट "कानामागून आला आणि शहाणा झाल्याने" त्याच्यावर निवड समितीची खप्पा मर्जी झाली होती. याच वादाचे रुपांतर वादळात होऊन विराटच्या डोक्यावर असलेलं कर्णधार पदाचं छप्पर उडून गेले आहे.

झाले काय तर धोनीचा सूर्य मावळताच टीम इंडियाला कोहलीच्या रूपाने एक विराटसूर्य गवसला होता. खंदा फलंदाज, तडफदार कर्णधार आणि लढवय्या सरदार म्हणून विराटने अल्पावधीतच क्रिकेट जगतावर आपली छाप सोडली. टीम इंडियाला आक्रमकतेचे बाळकडू जरी सौरभ गांगुलीने दिले असले तरी त्याला धार लावण्याचे काम विराटने केले होते. मैदानावर त्याच्या दादागिरीला त्याची बॅटही साथ देत होती. त्यातच विराटचा झंझावात पाहता तो सचिनचे रेकॉर्ड तोडण्याच्या गावगप्पा सर्वत्र ऐकू येत होत्या. विरोधी संघाशी दोन हात करणे असो की मैदानावर प्रेक्षकांशी पंगा घेणे असो, विराटने प्रत्येक वेळी जशास तसे उत्तर दिले होते. विराटच्या या डॅशिंग रुपचे त्याचे समर्थकच नव्हे तर विरोधकही कौतुक करत होते.

विराटच्या क्रिकेट लिला पाहता क्रिकेट जगतात त्याची ओळख किंग कोहली म्हणून झाली होती. विराटच्या आक्रमकतेला शास्त्री बुवाचा वरदहस्त लाभताच कोहलीच्या गुणवंत खेळाडूची जागा एका उन्मत्त कर्णधाराने घेतली. शास्त्री बुवांची ढाल चिलखते घेऊन विराटने संघात आपली हुकूमशाही सुरु केली. शास्त्री विराट या गुरूशिष्याने बीसीसीआयला हायजॅक करून टाकले होते. "हम करे सो कायदा" या न्यायाने कुलदिप यादव आणि इतरही नावडत्या खेळाडूंची कुचंबणा केली गेली. मात्र जोपर्यंत टीम इंडिया जिंकत होती तोपर्यंत याबाबत फारशी चर्चा होत नव्हती. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी असो की २०१९ चा वर्ल्ड कप असो, संघाची माती होताच विराटच्या नेतृत्वावर शंका घेण्यात येऊ लागली होती.

अर्थातच विराटचे मुसके आवळायला मध्यंतरी सन्मार्गी असलेल्या अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदी नेमले होते. मात्र मस्तवाल झालेल्या विराटने उलट कुंबळेलाच पद सोडण्यास बाध्य केले होते. दरम्यान बीसीसीआयचे सुकाणू सौरभ गांगुलीने घेतले आणि इथेच ठिणग्या उडायला सुरुवात झाली. एका म्यानात दोन तलवारी राहणे शक्यच नव्हते. गांगुलीने बीसीसीआयचा पदभार स्वीकारताच टीम इंडियाला आयसीसीच्या स्पर्धा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. विराट मातीचा गोळा असेपर्यंत बीसीसीआय त्याला आकार देऊ शकली असती. परंतु आता उशीर झाला होता. उत्कृष्ट फलंदाज असलेल्या विराटचे एका उद्दाम कर्णधारात रूपांतर झाले होते. त्यातच त्याच्या फलंदाजीत धावा आटू लागल्या होत्या.

भरीस भर म्हणून टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंनी त्याच्याविषयी तक्रार करणे सुरू केले होते. टीम इंडिया २०१९ चा वर्ल्डकप, जागतिक कसोटी विजेतेपद आणि टी ट्वेंटी सारख्या स्पर्धात ढेपाळली आणि विराटचा परतीचा प्रवास सुरू झाला. कर्णधार पदाच्या मुकुटाला साजेसा असा विश्वचषक त्याला पटकवता आला नाही. त्यातच टीम इंडिया द.आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका जिंकण्यास उत्सुक होती आणि त्यासाठी सर्वच प्रचंड आशावादी होते. मात्र केपटाऊनला टीम इंडिया नावाच्या भरश्याच्या म्हशीला टोणगा झाला. आधीच विराटला टी ट्वेंटी ची सुभेदारी गमवावी लागली होती. त्यातच एकदिवसीय संघासाठी त्याला कर्णधार पदाची झुल उतरावी लागली. दोन्हीकडे कोंडी झाल्याने विराट चवताळला. परंतु त्याच्या पाठीशी ना शास्त्रीबुवा होते ना आणखी कोणी. यावेळी त्याला "सुखके सब साथी, दुख मे न कोय" चा प्रत्यय आला असेल.

अर्थातच मानभंगाने पेटलेल्या विराटने कर्णधार पद सोडले. आपण खेळात १२०% टक्के योगदान देण्याचा उल्लेख त्याने केला परंतु त्याने कळत नकळत काही खेळाडूंबाबत चारसौ बिसी केली हे तो विसरला. मग बीसीसीआयने त्याला चारशे चाळीसचा झटका दिला त्यात वावगे काय. विराटसाठी त्याने जे पेरले तेच त्याच्यासाठी उगवले. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतोच. बीसीसीआय, निवड समिती आणि विराटमध्ये असलेला लव्ह ट्रॅंगल शेवटी हेट स्टोरीमध्ये रूपांतरीत झाला. याप्रकरणी जुळवाजुळवी करण्याचा प्रयत्न झाला परंतु "रहिमन धागा प्रेम का मत तोरो चटकाए, टूटे पे फिर ना जुरें, जुरें गाॅंठ परी जाय" हेच खरे ठरले.

पाण्यात राहून माशाशी वैर करू नये हे विराटला बीसीसीआयशी पंगा घेतांना समजायला पाहिजे होते. त्याला शिखरावर जायचे होते मात्र शिखराकडे जातांना झुकून जावे लागते हा साधा नियम आहे. "गॉड ऑफ क्रिकेट" सचिन याचे उत्तम उदाहरण आहे.  कोहलीने सचिनमार्गा ऐवजी विराटमार्ग निवडला. मात्र त्या मार्गावर डेड एंड आहे हे त्याच्या ध्यानात आले नसावे. कमीतकमी सात वर्षे टीम इंडियाचे सारथ्य करताना त्याने आपला एखादा वारसदार निर्माण केला असता तर आणखी बरे झाले असते. 

विराट पायउतार होताच बीसीसीआयला कोणाच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ टाकावी यासाठी डोकेदुखी वाढली असणार. कारण रोहित नक्की केंव्हा फिट होणार हे कोडंच आहे. के एल राहुलला आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व करतांना मोठा फरक जाणवला असेल. पुजारा रहाणे सध्या पेन्शनर आहेत. त्यांचा अनुकंपा तत्वावर फारतर झिंबाब्वे, बांगलादेश विरुद्ध विचार केला जाऊ शकतो.रिषभ पंत कर्णधार पदासाठी ना छोटा आहे ना मोठा आहे. जसप्रीत बुमराह कर्णधार पदाचे मटेरियल आहे किंवा नाही याबाबत शंका आहे. खरेतर वासरात लंगडी गाय शहाणी म्हणून अश्विनचा विचार केला जाऊ शकतो. शिवाय संघात विराट असतांना नाकापेक्षा मोती जड ठरू नये यासाठी कुवतीचा कर्णधार अपेक्षित आहे.

 विराटची घणाघाती फलंदाजी, त्याचा मुठा आवळत मैदानावर वावर, जिंकण्याचा जोश,विकेट मिळताच त्वेषाने धावणे,, क्रिकेट रसिक कधीच विसरणार नाही. तरीपण त्याने क्रिकेट युद्धात टीम इंडियाला चढाया जिंकून दिल्या. मात्र निर्णायक लढतीत तो अपयशी ठरला. एक साहसी, सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून जरी ओळखला गेला असला तरी त्याचे याप्रकारे पायउतार होणे क्रिकेट प्रेमींसाठी धक्कादायक ठरले आहे. कर्णधार म्हणून जवळपास सात वर्षे टीम इंडियावर अधिराज्य केलेल्या विराटला "विद्या विनयेन शोभते" चा विसर पडला आणि हेच त्याच्या पतनाला कारणीभूत ठरले आहे. कर्णधार विराटच्या निर्गमनाबाबत आपण फारतर एवढंच म्हणू शकतो,,,,
"पलट के सु ए चमन देखने से क्या होगा,,वो शाख ही ना रहीं जो थी आशियाॅं के लिये"
"ना तू जमीं के लिये हैं न आसमां के लिये,, तेरा वजूद है अब सिर्फ दास्ताॅं के लिये"
************************************
दि. १७ जानेवारी २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...