Sunday, May 29, 2022

बेबी ऑफ सुकेशिनी, अंतिम भाग

@#👿👿👿👿👿👿👿👿#@
     *बेबी ऑफ सुकेशिनी, अंतिम भाग*
               *डॉ अनिल पावशेकर*
************************************
रुग्णालयातील अग्नितांडव आता हळूहळू संपुष्टात आले होते. आगीच्या झळांनी स्पेशल न्युबॉर्न‌‌‌ केअर युनिट बेचिराख करून टाकले होते. दरवाजे, भिंती काळवंडल्या होत्या तर जागोजागी अग्निज्वालांचे निशाण आगीची भयानकता दाखवून देत होते. आगीच्या दाहकतेने जळलेली कापडे, वाकलेले वितळलेले फर्निचर रात्रीच्या अप्रिय घटनेचे मुक साक्षीदार होते. त्या वार्डातील एक विशिष्ट गंध आगीच्या क्रुर खेळाची आठवण करून देत होता. जीव वाचलेले रुग्ण देवाचे आभार मानत घरची वाट धरू लागले होते तर बघ्यांची गर्दी हळूहळू पांगायला सुरूवात झाली होती.

तब्बल चार तासांचा जीवघेणा संघर्ष उतरणीला लागला होता. प्रकृतीच्या नित्यनेमाने तांबडे फुटायला सुरुवात झाली होती. बाळांच्या वार्डाचा लेखाजोखा यायला सुरुवात झाली. एव्हाना सुकेशिनी शुद्धीवर यायला लागली होती. अस्पष्ट आरडाओरड, हुंदके, देवाचा धावा तिच्या कानी पडू लागला होता. डोळे किलकिले करून रुग्णालयाकडे बघताच तिची तंद्री भंग पावली. तोपर्यंत सहकारी महिलांनी तिला सांभाळले होते. अग्निशमन दल परतीच्या वाटेवर होते तर पोलिस दलाने रुग्णालयाचा ताबा घेतला होता. अनावश्यक गर्दी हाकलून पोलिसांनी नातेवाईकांना एकत्र केले.

या भीषण अग्निकांडात एकूण दहा बालके मरण पावली होती तर सात बालकांना वाचविण्यात यश आले होते. वाचलेल्या बालकांना इतरत्र सुरक्षित हलविण्यात आले होते तर मृत बालकांच्या नातेवाईकांना त्यांची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. ओळख निश्चित करुन मातेच्या नावाने पुकारा करण्यात येऊ लागला होता. जसजसे नाव पुकारण्यात येत होते तसतसे रुग्णालयाचा परिसर दुःखावेगाने व्यापून जात होता. प्रत्येक वेळी अनोळखी मातेचा हंबरडा पहाटेच्या भयाण शांततेला चिरत उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेत होता.

प्रत्येक नाव पुकारतेवेळी सुकेशिनीचे हात आपोआप जोडले जात होते तर मनोमन आपले नाव न आल्याबद्दल देवाचे आभार मानत होती. मात्र नशिबापुढे कोणाचं चालतं? आता फक्त एक नाव पुकारणे बाकी होते आणि सुकेशिनी अंगातले सर्व बळ एकवटून, कान टवकारुन, डोळ्यात तेल घालून नियतीच्या निर्णयाची वाट बघत होती. आतापर्यंत सामान्य असलेली तिच्या ह्रदयाची धडधड अचानक तीव्र झाली होती, कपाळावर आठ्या पडल्या होत्या तर पुर्ण अंगात कापरे भरायला सुरुवात झाली होती. दोन्ही हातांच्या मुठी गच्च ह्रदयाशी बांधून, श्वास रोखून शेवटच्या नाव पुकारण्याची वाट बघू लागली.

अचानक तिला कानात काल रात्रीच्या तिच्या छकुलीच्या हाका अस्पष्ट,आर्तपणे पुन्हा एकदा ऐकू यायला लागल्या होत्या,, आई मला वाचव, आई मला चटके लागत आहे, आई माझा श्वास कोंडतोय, आई मला जवळ घे. एकाएक काळचक्र कुठेतरी थांबून आपली क्रुर थट्टा करत आहे असा तिला भास झाला. असं काही झालंच नाही याची ती मनाला वारंवार खात्री पटवून देत होती. माझ्या छकुलीचं देव नक्कीच रक्षण करेल यावर तिचा ठाम विश्वास होता. शिवाय इतक्या दिवसांनी तिच्या आयुष्यात आलेल्या आनंदाला कोणीही इतके निर्दयपणे हिसकावू शकत नाही याची तिला खात्री होती.

अखेर तिची प्रतिक्षा संपली आणि एक कर्कश, निष्ठूर आवाज तिच्या कानी पडला,,, बेबी ऑफ सुकेशिनी,, खरेतर हे शब्द कानाद्वारे नाही तर तिच्या ह्रदयाद्वारे ऐकले गेले आणि क्षणार्धात तिच्या आशा आकांक्षा, विश्वासाचा, श्रद्धेचा डोलारा कोसळून पडला. असं होऊच कस शकतं म्हणून ती उसळली आणि नाव पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यावर धावून गेली. मात्र नियतीचा संदेश स्पष्ट होता. काळाचे गणित चुकण्याचा प्रश्नच नव्हता. सुकेशिनीचा गोड संसार उध्वस्त झाला होता. धरणी दुभंगून त्यात समाविष्ट होऊन जावे अशी तिची मनोवस्था झाली होती. आतापर्यंत थोपवून धरलेले अश्रूंचे धरण ओसंडून वहायला लागले होते. वेड्या ममतेने पान्हा झरायला लागला होता.

काही वेळातच अश्रू आटायला लागले, पान्हा सुकायला लागला आणि वेडीपिसी होऊन ती छकुलीच्या नावे टाहो फोडायला लागली होती. कोणाला दोष देऊ,  कोणाला शाप देऊ, तिला काही सुचत नव्हते. तर तिकडे कोणीतरी सुरेशला या ह्रदयद्रावक घटनेची माहिती देताच तो ओक्साबोक्शी रडू लागला. आयुष्यात कधी कोणाचे चुकुनही वाईट केले नसतांना आपल्या नशिबी हा भोग का आला याचेच त्याला वाईट वाटले. साधी टाचणी टोचली किंवा अगरबत्तीचा चटका लागला तरी आपण कळवळून उठतो तर माझ्या छकुलीने हे सर्वकाही कसेकाय सोसले असेल याचा विचार करताच तो कोलमडून पडला.

नेहमीप्रमाणे दुर्घटना झाल्यानंतर जे होते ते इथेही झाले. राजकीय पर्यटनाला उधाण आले. मृतांच्या कुटुंबीयांना मदतीच्या नावे लाखोलाखोंच्या बोली राजकारणी करु लागले. सामाजिक चळवळीतले गिधाडे इथेही स्वार्थीपणे घिरट्या घालायला लागली. कडक कारवाईची आवई उठवण्यात आली. लगेचच बळीचे बकरे शोधायला सुरुवात झाली. एवढ्या मोठ्या दुर्घटनेचे खापर फक्त डॉक्टर, नर्सेस वर फोडण्यात आले. बहुतेकांना केंव्हा एकदा दोन-चार जणांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली जाते याची घाई झाली होती. दुर्घटनेचे मुळ कारण शोधण्यात कोणालाही स्वारस्य नव्हते कारण ते कित्येकांच्या मुळावर आले असते. निलंबन आणि बडतर्फीच्या सोयिस्कर शब्दाखाली दोषयुक्त यंत्रसामुग्री असो अथवा जुगाडी विजयंत्रणा असो अथवा फायर सेफ्टीचे नियम पायदळी तुडवणे असो किंवा रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा असो, सर्वकाही झाकले गेले.

माध्यमांनी जरूर या घटनेला उचलून धरले, प्रसिद्धी दिली. मात्र त्या कोवळ्या जीवांना जातीपातीचे वलय नव्हते, धर्माची गडद किनार नव्हती, प्रांतवाद, अस्मितेचे वेष्टन नसल्याने ते लवकरच विस्मृतीत गेले. झाले गेले विसरून जग पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच कामाला लागले. मात्र ज्यांनी या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावले त्यांचे दुःख मायबाप सरकारने कागदी नोटांत मोजले. ही घटना सरकारी रुग्णालयात झाल्याने आंदोलनजीवींना याचे फारसे सोयरसुतक नव्हते. शिवाय ज्या राज्यात ही घटना घडली ते राज्य अशा बाजारु आंदोलनाला पोषक नव्हते. गोरगरिबांचे दिपक अकाली मालवून काळ पुन्हा एकदा आपल्या नव्या सावजाच्या शोधात निघाला होता. मात्र जाता जाता या दुर्घटनेत वाचलेल्या सातपैकी एका बाळावर एक महिन्याने काळाने झडप घालून बळीसंख्या अकरावर नेली होती.
************************************
दि. ३० मे २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

बेबी ऑफ सुकेशिनी भाग ०२

@#👿👿👿👿👿👿👿👿#@
       *बेबी ऑफ सुकेशिनी, भाग ०२*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
खरेतर सुकेशिनी भंडाऱ्यापासून दुरवर खेड्यातील रहिवासी होती. नवरा सुरेश सोबत मोलमजुरी करून दिवस पुढे ढकलत होती. घरी अठराविश्व दारिद्र्य असूनही दोघांचा चांद्रमौळी झोपडीत एकोप्याने संसार सुरू होता. तसेही आपणास गरिबीत एकोपा आणि श्रीमंतीत दुरावा जागोजागी बघायला मिळतो. अर्थातच त्यांच्यावर लक्ष्मी जरी प्रसन्न नसली तरी निसर्गाने आपला प्राकृतधर्म तंतोतंत पाळला होता. पहिल्यांदाच आई होण्याच्या कल्पनेने सुकेशिनी सुखावली होती. तर सुरेश, नवरा ते बाप अशा प्रमोशनने मनोमन आनंदी झाला होता.

गावी फारशा आरोग्य सुखसुविधा नसल्याने या जोडप्याने भंडारा गाठले. बाळंतपण सुरळीतपणे पार पडले, सुकेशिनीच्या पोटी भाग्यलक्ष्मी जन्माला आली. मात्र सुकेशिनी आपल्या बाळाला मायेची ऊब देण्यात कमी पडली. यामुळे तिच्या छकुलीला कृत्रिम वातावरणात म्हणजेच इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. अर्थातच तिची बाळाशी जरी ताटातूट झाली असली तरी बाळाच्या भल्याकरीता हा निर्णय घेणे अत्यंत गरजेचे होते. तर दुसरीकडे सुरेशला आपल्या कन्येचे केंव्हा एकदा दर्शन घेतो असे झाले होते.

वास्तविकत: बाप गरीब असो की श्रीमंत, त्याच्यासाठी त्याची मुलगी राजकन्या असते. तिच्या कोडकौतुकासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. मुलगा जरी वंशाचा दिवा मानला गेला असला तरी घराला घरपण, ममत्व देण्यात मुलींचा हात कोणी पकडू शकत नाही. आजीची आपुलकी,ॠणानुबंध, आईचे वात्सल्य, मावशीची माया,ममता, काकूची कणव, आत्याचा आपलेपणा, बापाची अधिकारवाणी हे सर्वकाही विधात्याने मुलीच्या रुपात समाविष्ट करून तिला तुमच्या पोटी धाडले असते. बापाचा उर्मटपणा कमी करणे असो की भावाला वळण लावणे असो, आईला घरकामात हातभार लावणे अथवा तिला मानसिक आधार देणे असो, हे सर्व गुण मुलींमध्ये उपजत असतात. 

एरवी पाषाणह्रदयी असणारे बाप मुलीच्या लग्नात कोपऱ्यात एकटे डोळ्यांच्या कडा पुसतांना आपण नेहमीच अनुभवतो. शिवाय कन्यादान करण्याचे महतपुण्य सर्वांनाच लाभते असेही नाही. सुरेशही आपल्या लाडक्या कन्येच्या स्वागताला उत्सुक होता. कारण त्याच्या दारी लक्ष्मीची चिमुकली पाऊले उमटण्याची पुर्ण तयारी झाली होती. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या हे गुणगुणत तो छकुलीची वाट बघत होता.

मात्र दुसरीकडे नियती आणि काळाची अभद्र युती झाली होती.   छकुलीची प्रकृती झपाट्याने सुधरत असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी सुकेशिनीला बाळासहीत सुट्टी होणार होती. केवळ आजची रात्र कशीबशी काढायची असल्याने ती निश्चिंत होऊन झोपायला गेली होती. मात्र मध्यरात्रीला अनाहुत चाहूल लागल्याने ती दचकून जागी झाली होती. काळाचा भास झाल्याने ती मनोमन हादरली होती. कोणीतरी तिची आणि छकुलीची ताटातूट करत आहे याची अनामिक भिती तिच्या मनात घर करून गेली होती. कडाक्याच्या थंडीतही ती भितीपोटी घामाने डबडबून गेली होती. मात्र अंथरुणात पडून राहण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

तर काळाने आपल्या अंतिम टप्प्यात प्रवेश केला होता. स्पेशल न्युबॉर्न केअर युनिट आणि तिथली ३६ बेड त्याचे लक्ष्य होते. सुदैवाने तिथे केवळ सतरा बालके उपचार घेत होती. मात्र काळाला सतरा काय आणि छत्तीस काय, कशाशी देणेघेणे नव्हते. त्याने वार्डात नजर टाकली, त्या सतरा कोवळ्या जिवांशिवाय तिथे कोणीही नव्हते. ना डॉक्टर ना नर्सेस. तिथे बिनधास्तपणे वावरत काळाने आपली क्रुर योजना आखली. ना तिथे त्याला आडकाठी करणारे, टोकणारे कोणी होते, ना आपात्कालीन प्रसंगी बाळांच्या मदतीला कोणी धाऊन येणारे होते. आपली कामगिरी किती चोख आणि अचूक असते याची काळाला खात्री पटली होती. अखेर घड्याळाने मध्यरात्रीचा दोन वाजण्याचा टोला देताच काळ भानावर आला, त्याने आपले मिशन स्पेशल न्युबॉर्न केअर युनिट तडीस न्यायला सुरूवात केली.

हळुवारपणे तो एका इनक्युबेटरच्या वार्मरमध्ये शिरला. आपल्या प्रभावाने त्याने ज्वाळा निर्माण केल्या आणि कोवळी पाती, रोपटे अमानुषपणे करपण्यास सुरूवात झाली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर अग्नी नंतर धुरावाटे त्याने कोवळ्या जिवांचा श्वास रोखायचा प्रयत्न केला. सकाळपासून ओव्हरहिटींग झालेले इन्क्युबेटर काळाची साथ लाभताच धडाडून पेटू लागले. कोवळ्या जीवांना वाचविण्याचे प्रण घेतलेले इन्क्युबेटर कोवळ्यांचाच कोळसा करू लागले. अर्थातच ते हतबल, असहाय हाडामांसाचे इवलेसे, निष्पाप गोळे बलाढ्य काळाचा प्रतिकार करणे शक्यच नव्हते. शिवाय कच्याबच्च्यांचा रडण्याचा आवाज तरी किती असणार? काळाने छद्मी हास्य करत आपली दुष्ट कामगिरी फत्ते झाल्याची खात्री केली. जाता जाता आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून शॉर्ट सर्किटचा आभास निर्माण करून तो हळूच पसार झाला.

एव्हाना आगीने आपले रौद्ररूप धारण केले होते. इतरांना याची खबरबात लागताच एकच हलकल्लोळ माजला. पहिल्या मजल्यावरील आगीने इतरत्र डोकावणे सुरू केल्याने जो तो जीव मुठीत धरून धावायला लागला. प्रचंड अफरातफरी माजल्याने अर्धवट झोपेत असलेल्या सुकेशिनीला जाग आली. ती सुद्धा इतरांसारखी देवाचा धावा करत तळमजल्यावर आली. मात्र शेवटच्या पायरीवर ती थबकली, लगेच भानावर आली, आपली छकुली कुठे आहे, ती सुरक्षीत तर आहे ना, तिला काही झालं तर नाही ना? अशी एक ना असंख्य प्रश्नांची मालिका तिच्या डोक्यात घर करु लागली. मात्र तिला उत्तर तरी कोण देणार होतं? रुग्ण, नातेवाईकांच्या लोंढ्याने तिला फरफटत बाहेर ढकलले होते. 

अखेर ठेचाळत, पडझड करत ती रुग्णालयाच्या पटांगणात आली. लगेच तिची नजर पहिल्या मजल्यावर जाताच तिची वाचा बंद पडली. रात्री काळोखाच्या पार्श्वभूमीवर आगीच्या ज्वाळा भयानकपणे उठून दिसत होती. मधातच धुराचे लोंढे आकाशी झेपावत होते. रुग्णांच्या अगतिक, असहाय्यपणे रडण्याने आसमंत दणाणून गेला होता. आत जावे म्हटले तर ना तेवढे त्राण तिच्या शरीरात उरले नव्हते ना आत जायचा मार्ग तिला सुचत होता. अग्निशमन दलाचे जवान आणि उपस्थित लोकांनी क्रुर आगीशी झुंजत काहींना बाहेर काढण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता. बाहेर काढलेल्या प्रत्येकावर सुकेशिनी आशाळभूतपणे नजर टाकत होती. मात्र तिची छकुली तिच्या नजरेस पडत नव्हती. इतक्यात पहिल्या मजल्यावरून कोणीतरी ओरडले,,, बच्चे जल गये आणि हे ऐकताच सुकेशिनीची शुद्ध हरपली.
क्रमशः,,,,
--------------------------------------------------------
वाचकांना नम्र सूचना,,,
सत्यघटनेवर आधारित या लेखात पात्रांची नावे काल्पनिक आहेत.
*************************************
दि. २९ मे २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

Saturday, May 28, 2022

बेबी ऑफ सुकेशिनी, भाग ०१

            बेबी ऑफ सुकेशिनी, भाग ०१
                   डॉ अनिल पावशेकर
********************************
साल २०२१, दि. ०९ जानेवारी, स्थळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा आणि वेळ होती मध्यरात्रीची. मार्गशीर्ष अमावस्या तोंडावर आली होती आणि क्रुर काळ आपल्या सावजासाठी टपून होता. सर्वकाही शांत होताच काळाने वैनगंगेचे पात्र ओलांडून भंडारा शहरात प्रवेश केला होता. महामार्गावरील तुरळक वाहतूक वगळता तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर निद्रादेवीच्या अधीन झाले होते. काळ झपाझप पाऊले टाकत आपल्या लक्ष्याकडे निघाला होता. मार्गातील पिंपळ, चिंचेचे मोठाले वृक्ष आणि त्यावरील अतृप्त आत्मे काळाच्या दहशतीने गारठून गेले होते.

मात्र मानवाचे विश्वासू मित्र असलेले शहरातील श्वान काळाच्या मार्गात खोडा बनून उभे राहिले होते. आपल्या भेसूर ओरडण्याने ते इतरांना सावध करत होते. तसेही एवढ्या काळकुट्ट रात्री, कडाक्याच्या थंडीत भटक्या कुत्र्यांचे रूदन ऐकायला रस्त्यांवर चिटपाखरूही नव्हते. सर्वकाही सारीपाट काळाच्या मर्जीनुसार आखला गेला होता. आपले सावज नजरेच्या टप्प्यात येताच काळ क्षणभरासाठी थबकला. एक जळजळीत कटाक्ष त्याने भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयावर टाकला. आपल्या कामगिरीची परत एकदा उजळणी केली आणि मोहीम फत्ते करायची मनोमन तयारी केली.

रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळूराम नावाचा पहारेकरी पेंगत होता. मात्र मानवाच्या सुरक्षेच्या कल्पना किती तुच्छ आणि तकलादू आहेत हे पाहून काळाने मनोमन स्मित केले. काळूरामला कोणीतरी आत शिरल्याचा भास झाला मात्र झोपेच्या तंद्रीत तो अरिष्ट ओळखू शकला नाही. काळाने आकस्मिक कक्ष न्याहाळला मात्र तिथे सगळं सुनसान होतं. वर्हांड्यातून समोर जाताच त्याला पुरुष रूग्णांच्या वार्डात काही वृद्ध, अगतिक, दुर्धर व्याधींनी ग्रस्त, प्राणांतिक वेदनेने तडफडणारे रुग्ण त्याची डोळ्यात तेल घालून वाट पाहतांना आढळले.

मात्र काळाची आजची निवड जगावेगळी होती. शस्त्रक्रिया वार्डातही फारसे वेगळे चित्र नव्हते. कित्येक रुग्ण आपला नंबर कधी लागणार यासाठी ताटकळत पहुडले होते तर शस्त्रक्रिया झालेल्यांना घरादाराची ओढ लागली होती. ऑर्थोपेडीक वार्डातील एकंदरीत परिस्थिती पाहता मानवाला जगण्यासाठी कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागते याची काळाला कल्पना आली. सृष्टीकर्त्याच्या रचनेला मानवाने विज्ञानाच्या सहाय्याने कितीही वाकुल्या दाखवल्या असल्या तरी विज्ञान आपलं अजुनही काही वाकडं करू शकत नाही हे समजल्याने काळाची मान गर्वाने आणखी उंचावली. कारण आज काळही आला होता आणि वेळही आली होती.

तळमजल्यावर फेरफटका मारल्यावर काळाने पहिल्या मजल्याकडे वाट धरली. खरेतर हाच पहिला मजला त्याची युद्धभूमी होती. तसेही सरकारी दवाखाने काळासाठी अपरिचित तर नव्हतीच. शिवाय इथे कितीही  धुमाकूळ घातला तरी बोलणारे कोणीही नव्हते. सोबतच मृत्युचे सरकारी सापळे बिनदिक्कतपणे तिथे पहिलेच स्थिरावले होते. गरज होती फक्त एका निमित्ताची, केमीकल रिॲक्शन सुरू व्हायची. अखेर पहिल्या मजल्यावर येताच काळाचे काऊंटडाऊन संपले. आता फक्त त्याला महिला, माता वार्ड ओलांडायचा होता. मात्र इथेच काळाची चाल मंदावली होती. त्याने स्मृती जागवताच भुतकाळात कुठेतरी स्त्री शक्तीने आपणास हतबल केले होते याची त्याला जाणीव झाली.

माता वार्डातही सामसूम होती. मात्र त्याची नजर सुकेशिनी वर पडताच काळ थोडा थबकला. एक अनामिक भावनेने त्याच्या पायाला ब्रेक लागले होते. कधी नव्हे ते आज या भयाण रात्री काळाची पाऊले जड झाली होती. फिक्कट पिवळ्या प्रकाशातही त्या माऊलीच्या तेजस्वी चेहऱ्याने काळाचा मार्ग रोखला होता. मात्र त्या माऊलीच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे या कल्पनेने खुद्द काळही शहारला. आपल्या हस्ते कोणते पातक होणार आहे याची जाणीव होताच त्याला स्वतःला लाज वाटली. पहिल्यांदाच काळाच्या काळजाला भोके पडली होती. काळाचे क्रुर हात, राक्षसी पाऊले आणि निष्ठूर मन त्याच्याशी आज बंडखोरीच्या पावित्र्यात होते.

इकडे काळाच्या काळजात घालमेल सुरू होती तर तिकडे सुकेशिनीला तिचे अंतर्मन काहीतरी विपरीत घडणार याची चाहूल देत होते. तरीपण ती निश्चिंत होती. आपल्या नवजात बाळासाठी तिचा पान्हा अहोरात्र झिरपत होता. मात्र तिच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. झोपेत असुनही तिला आपल्याकडे कोणीतरी नजर रोखून पाहत असल्याचा भास झाला आणि खाडकन तिला जाग आली. मान वळवताच कोणीतरी वर्हांड्यातून आपल्याला न्याहाळते आहे असे वाटले. मात्र डोळे फाडून पाहिले असता तिथे कोणीही नव्हते. आजुबाजुला नजर फिरवताच इतर माता पांढऱ्याशुभ्र बिछान्यावर लाल ब्लॅंकेट ओढून निजलेल्या दिसल्या. मनाची कशीबशी समजूत घालत ती पुन्हा एकदा बिछान्यात शिरली. इतक्यात हळुवारपणे तिच्या कानात तिच्या छकुलीचा क्षीण,आर्त आवाज घुमला, "आई मला वाचव, आई मला वाचव".
क्रमशः,,,,,
------------------------------------------------------
वाचकांना नम्र सूचना,,,
लेखातील सर्व पात्रे काल्पनिक आहेत.
**********************************
दि. २८ मे २०२१ 
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Sunday, May 1, 2022

बॉलिवूडचा टिनेज सुपरस्टार, रिषी कपूर

@#😈😈😈😈😈😈😈😈😈😈#@
                   *अगंबाई अरेच्चा*
    *बॉलिवूडचा टिन एज सुपरस्टार रिषी कपूर*
***************************************
जगभरात करोनाने धुमाकूळ घातला असून आता कॅन्सरनेही आपले उपद्रवमुल्य दाखवणे सुरू केले आहे. लागोपाठ दोन दिवसांत ५३ आणि ६५ वयाच्या दोन बॉलिवूड कलाकारांचे बळी घेऊन कॅंसरने चित्रपट रसिकांना चांगलेच दुखावले आहे. इरफान खानच्या दु:खातुन सावरत असतांनाच बॉलिवूडचा टिन एज सुपरस्टार रिषी कपूरनेही आपली एक्झिट घेतल्याने चाहत्यांना दुहेरी धक्का बसलेला आहे. खरेतर मृत्यू हे अंतिम सत्य आहे मात्र या दोघांच्या जाण्याने मनाला चटका लागला असून सिनेक्षेत्राची अपरिमित हानी झालेली आहे.

अभिनयाचे बाळकडू कोळून प्यालेल्या रिषीचे दर्शन पहिल्यांदा प्यार हुआ इकरार हुआ मध्ये झाले आणि त्याच्यावर चाहत्यांनी आयुष्यभर भरभरून प्रेम केले. रिषी कधीच सुपरहिरो किंवा आडदांड भुमिकेत जगला नाही तर आपल्या सहजसुंदर अभिनयाने तो सर्वांना आपलासा आणि हवाहवासा वाटायचा. ढिशुम ढिशुमच्या भानगडीत न पडता, उगाच ही मॅन सारख्या एखाद्या बलदंड चौकटीत न अडकता सुद्धा चित्रपट गाजवू शकतो हे त्याने दाखवून दिले. हातात कधी डफली असो वा गिटार अथवा व्हायोलीन, कोणत्याही वाद्याला उत्तम नृत्य, कमालीच्या पददालित्याची जोड देत हमखासपणे प्रेक्षकांना आकर्षित करायचा.

खरेतर राजेश खन्ना, अमिताभ, विनोद खन्ना, जितेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा सारख्या दिग्गजांच्या भाऊगर्दीतही रिषीने आपले वेगळेपण जपले होते. नायिका मग ती नितू सिंग असो की दिव्या भारती, रिषीची केमेस्ट्री कुठेही सहज खुलायची‌. कधी बचना ऐ हसिनो म्हणून तर कधी मैं शायर तो नहीं म्हणत आपल्या शैलीत प्रेमरसाची बरसात करायचा‌. मैं हुं प्रेमरोगी, दर्दे दिल दर्दे जिगर सारख्या गाण्यातून त्याने कित्येक पिढ्यांच्या व्यथा सर्वांसमोर मांडल्या होत्या. प्रेमात थोडी मॅच्युरीटी दाखवतांना त्याचे चेहरा है या चांद खिला है आणि सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं करत आदर्श प्रेमवीर साकारला होता. 

मेरा नाम जोकर पासून सुरू झालेला त्याचा अल्लड प्रेमाचा प्रवास बॉबी ते दिवाना पर्यंत अनोख्या अदाकारीने भरभराटीला आला होता. अमर अकबर अँथनी मध्ये त्याने नजाकतीने अकबर साकारुन अमिताभ, विनोद खन्नाच्या उपस्थितीतही आपली दखल घ्यायला भाग पाडले होते. सरगम, प्रेमरोग, कर्ज, हिना, नगीना सारखे चित्रपट आपल्या उत्तम अभिनयाने साकारत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. तर आपल्या सेकंड इनिंग मध्येही चांदणी, दिवाना,सागर, सिंदूर, बोल राधा बोल, नसिब अपना अपना आणि दामिनी सारख्या चित्रपटातून आपली जादू कायम असल्याचे दाखवून दिले होते. दो दुनी चार, अग्निपथ, स्टुडंट ऑफ दी इअर, कपूर ॲंड सन्स, डी डे सारख्या चित्रपटातून आपला जलवा दाखवत त्याच्यातला कलाकार अजुनही जिवंत असल्याचा पुरावा दिला होता.

नायकांसोबत, विशेषतः त्याची अमिताभ सोबत जोडी छान जमायची. लंबू टिंगूच्या या जोडीने अमर अकबर अँथनी, कुली, नसिब, कभीकभी आणि अजुबा सारख्या चित्रपटातून धमाल केली होती. अमिताभ सारख्या दिग्गजाच्या सोबत काम करतानाही रिषीने आपल्या भुमिकेत जिव ओतत आपली भुमिकेचे महत्त्व अबाधित राखले होते. या दोघांवर चित्रित केलेले नसिब मधले चल चल मेरे भाई हे गाणे या दोघांच्या निखळ अभिनयाचे उदाहरण होते. आपल्या अभिनयात प्रयोग म्हणून रिषींनी नाक मुरडत का होईना अग्निपथमध्ये रौफलाला साकारला होता आणि त्याने या भुमिकेचे अक्षरशः सोने केले.

१९७० पासून जवळपास ९० चित्रपटातून आपली छाप सोडणाऱ्या या कलाकाराला २०१८ ला ल्युकेमियाने गाठले, याकरिता त्यांनी न्युयाॅर्कला आपले उपचार पण घेतले. मात्र ३० एप्रिलला त्याची झुंज संपली. आपल्या परखड विचारांसाठी आणि सडेतोड भुमिकेसाठी त्याने कधी कोणाचीही पर्वा केली नाही. 

"चांदणीचा" "दिवाना" असणारा हा कलाकार आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही. अभिनयात "नगीना" असणारा हा "सागर" कधी "कुली" तर कधी "कपुर ॲंड सन्स" मध्ये झळकला होता. कोणत्याही आव्हानासमोर "हम किसिसे कम नहीं" असणारा हा "अजुबा" कॅन्सरच्या "निगाहे" समोर "नसिब" हरवून बसला. कोणत्याही भुमिकेला "दो दुनी चार" करणारा हा नट कॅन्सरच्या "अग्निपथवर" "ऑल इज वेल" राहू शकला नाही. गंभीर आजारातही हसतखेळत राहणारा याच्यासारखा "दुसरा आदमी" शोधुनही सापडणार नाही. "साजन का घर" ते "नमस्ते लंडन" पर्यंतचा यांचा आपल्यासोबतचा "याराना" आता संपला असून, ते आता अनंतात विलीन झाले आहे. समस्त चाहत्यांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
***************************************
दि‌. ०१ मे २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...