@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*मेलबोर्नला विराटची रनत्रयोदशी*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
मेलबोर्न, सुपर संडेला झालेल्या ब्लॉकबस्टर सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकची नांगी ठेचत चित्तथरारक विजय मिळवला आहे. एखाद्या हॉरर शो सारख्या रंगलेल्या या लढतीत खरेतर 'कमजोर दिल वाले ना देखे' अशी आयसीसीने सूचना द्यायला हवी होती. न भूतो न भविष्यती अशा थरारक द्वंद्वात अखेर किंग कोहलीने रनत्रयोदशी साजरी करत पाकला हॅपी इंडेक्स मध्ये मागे पाडले आहे. नमनालाच घडीभर तेल सांडूनही टीम इंडियाने पाकच्या घशातून विजय खेचून आणला आहे.
झाले काय तर स्त्री च्या मनात आणि पुरुषाच्या भाग्यात काय लिहिले आहे हे कोणीही सांगू शकत नाही. सामन्याच्या पुर्वार्धात अर्शदिपसिंगने तर उत्तरार्धात कोहलीने आपले भाग्याला विराट कलाटणी देत याची देही याची डोळी क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. चार सप्टेंबरला आशिया चषकात पाकविरूद्ध एक सोपा झेल सोडत अर्शदिपने क्रिकेट प्रेमींचा राग ओढवून घेतला होता. मात्र या पठ्ठ्याने हिंमत न हारता पुन्हा मैदानात उभा राहिला आणि आजच्या पाकविरूद्ध लढतीत विजयाची बीजे रोवण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता.
बाबर आझम, मोहम्मद रिझवान ही जोडागोळी म्हणजे पाकची दिल आणि धडकन आहे. मात्र आपल्या भन्नाट चेंडूने अर्शदिपने दोघांना दिवे लावण्याची संधी दिली नाही. निश्चितच अर्शदिपची फर्शसे अर्शतक ची कहानी कौतुकास्पद आहे. वास्तविकत: इथेच आपल्याला विजयाचे मधूर फळ चाखायला मिळण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्यातच भुवीने धावांचा सेल बंद केल्याने भारतीय गोटात आनंदाचे वातावरण होते. तरीपण पाकची धावसंख्या हनुमानाच्या शेपटी सारखी लांबत चालली होती आणि अक्षर पटेलला इफ्तीखार अहमदने अक्षरशः धुवत सामना पाककडे झुकवला होता. अखेर मोहम्मद सामी ने ही कोंडी फोडली आणि भारतीयांच्या जीवात जीव आला. सामी पाठोपाठ भारतीय संघातील एक्स फॅक्टर म्हणजेच पांड्या ने वाहत्या गंगेत हात धुवून चक्क तीन बळी टीपले.
खरी मजा तर इंटरव्हल नंतर येणार होती. एकतर मेलबोर्नला खेळपट्टीवर गवत,पेस आणि बाऊन्स. पाठीशी १६० धावांचे चिलखत लाभताच पाकचे गोलंदाज मैदानात राडा करणार हे निश्चित होते. तसेही ते 'आज कुछ तुफानी करते है' मुडमध्ये असल्याने पाक गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजीत आन बान शान की लढाई होती. आपली सलामीची जोडी मागील टी ट्वेंटी विश्वचषकाच्या कटू स्मृतीने गारठलेली दिसत होती. अखेर राहुल रोहीतला त्या दु:स्वप्नाने ग्रासले आणि दोन्ही सलामीवीरांनी तुमचा संघ तुमची जबाबदारी करत तंबूची वाट धरली. मेलबोर्नला तसाही रात्रीचा सूर्य दिसत नाही तर मग तिथे सूर्यकुमार कसा काय तळपणार? भरीस भर म्हणून अक्षर पटेलने खेळपट्टीवर धावचीत होण्याची आत्महत्या करताच भारतीय पाठीराख्यांनी आभाळाला हात जोडले.
तसेही भारतीय पाठीराख्यांचे चुकले कुठे? प्रत्येक काळ्या ढगाला रूपेरी चंदेरी किनार असतेच आणि मैदानावर झालेही तसेच. चार बाद एकतीस वरून एकशे साठ धावा म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे होते. मैदानावर लाखो करोडो भारतीयांच्या आशा आकांक्षा चेस मास्टर विराटवर अवलंबून होत्या. वर्षभरापूर्वी विराटचे प्रदर्शन पाहता तो संपल्यात जमा आहे असेच वाटत होते. परंतु त्याने फॉर्म इज टेंपररी बट क्लास इज पर्मनंट चा क्रिकेट जगताला साक्षात्कार घडवून दिला. बरं विराटच्या सोबतीला कोण होतं तर पांड्या आणि शेवटचा तज्ञ फलंदाज म्हणून दिनेश कार्तिक, नंतर आनंदी आनंद होता. अशा बिकट अवस्थेत विराटसाठी एकशेसाठ धावांचा आकाशकंदील लावणे एक महत्कार्य होते.
विराट पांड्या जोडीने सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे चा मुलमंत्र जपत आगेकूच केली. हळूहळू 'कत्ल की रात' जवळ येत होती आणि यावेळी दोघांनीही शक्ती पेक्षा युक्ति श्रेष्ठ चा मार्ग अवलंबला. बाबर सेनेचा तोफखाना क्रुर शाहिन आफ्रिदी आणि तेजतर्रार हॅरीफ रौफने सांभाळला होता. तर आपल्या संताजी धनाजी जोडीचा डोळा पाक आक्रमणातील कच्चा दुवा फिरकीपटू मोहम्मद नवाज वर होता. मात्र मो.नवाजची वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता. आफ्रिदी,रौफ सारख्या मुळावर घाव घातले की मो.नवाज सारख्या फांद्या आपोआप खाली येणार हे दोघांनी ताडले आणि अब की बार विराट सरकारचा नारा मेलबोर्नच्या रणांगणावर घुमू लागला.
खरेतर शाहिन आफ्रिदी आज पुर्णपणे लयात नव्हता, त्यातच पांड्या विराट जोडीचा चांगलाच वार्मअप झाला होता. अठरा चेंडूत अठ्ठेचाळीस धावांचे गणित येताच दोघांनीही टॉप गिअर टाकत आफ्रिदीचा धुव्वा उडवत पहिले ठाणे जिंकून भारताच्या कुडीत प्राण ओतले. एकोणिसावे षटक हॅरिस रौफच्या वाट्याला आले आणि इथेच भारताच्या कित्येक वर्षांच्या भळभळत्या जखमेवर कोहली विराटलेप लावणार होता. आठवा जावेद मियांदादचा चेतन शर्माला हाणलेला तो षटकार. चीन च्या भिंतीपेक्षाही मजबूत होत विराटने हॅरीसला दोन सणसणीत षटकार ठोकले. त्यातला पहिला अविश्वसनिय षटकार केवळ कोहली अथवा देवंच मारू शकतो. दुसरा षटकार तर वेटरला टीप द्यावी एवढ्या सहजतेने मारला होता. या दोन्ही षटकारांच्या भुकंप लहरी थेट लाहौर ते इस्लामाबाद पर्यंत जाणवल्याच्या बातम्या आहेत.
भारतियांनी दोन्ही ठाणी काबीज करताच अंतिम पाडाव दृष्टीपथात आला होता. गोलंदाजांच्या रक्ताची चटक लागलेल्या वाघ सिंहाच्या जोडीपुढे मो.नवाज नावाचे कोवळे सावज होते. मात्र हे सावज नसून सापळा होता. पांड्या अलगद या सापळ्यात अडकला आणि पुन्हा एकदा काळीज वरखाली होऊ लागले होते. हातातोंडाशी आलेला घास पाक हिसकावून तर घेणार नाही ना अशी भीती वाटत होती. मात्र विराटने स्ट्राईक घेताच नवाजच्या सापळ्याची शेळी झाली. पहिले षटकार आणि नोबॉल नंतर वाईड बॉल. नंतर फ्री हिटवर तीन धावा काढताच विजयश्री माळ घेऊन टीम इंडियाकडे येऊ लागली. मात्र कहानी में ट्वीस्ट अजूनही बाकी होते.
अनुभवी दिनेश कार्तिक ऐनवेळी गोंधळला आणि परत एकदा भारतीयांची धडधड वाढली. अखेर रविचंद्रन अश्विनने शांतचित्ताने मो.नवाजला चुक करण्यास भाग पाडले. एक चेंडू वाईड जाताच पाकचे अवसान गळाले. उरलीसुरली कसर पुर्ण करत अश्विनने पाकच्या जखमेवर मीठ चोळले. अद्भुत, अवर्णनीय असा विजय साकारत टीम इंडियाने देशवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. विराटच्या बॅटींग क्लासला पाककडे तोड नव्हता. शेवटचे षटक फिरकीपटूला देऊन बाबरने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. जर या सामन्याचा थोडक्यात सारांश लिहायचा झाला तर अर्शदिपसिंगचे दोन बळी आणि विराटचे दोन षटकार सर्वाकाही सांगून जाते. तरीपण विराटचे हॅरीसला मारलेले दोन षटकार पाहून 'दो ही मारा लेकिन सॉलीड मारा' असे म्हणावेसे वाटते. भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
**********************************
दिनांक २३ ऑक्टोबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com