Wednesday, October 5, 2022

मन के हारे, इंदौर में हारे!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
           *मन के हारे, इंदौर में हारे*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
भारतीय क्रिकेट संघाचा एक गुण कौतुकास्पद आहे. परदेशी संघाला शक्यतोवर ते रित्या हाताने परत पाठवत नाही. पाहुण्यांच्या हातात काही तरी द्यायची रित असल्यासारखे टी ट्वेंटीचा अखेरचा सामना आपण द.आफ्रिकेला बहाल केला. अर्थातच आपल्या गोलंदाजांनी आपल्या नावारुपाला जागत दी ग्रेट इंडियन बॉलर सेल लावला आणि द.आफ्रिकेने मिळालेल्या संधीचे सोने केले. खरेतर दसरा हा सण आपला परंतु प्रोटीयाज संघाने शेवटच्या सामन्यात अक्षरशः धावांची सोनेरी लयलूट करत त्यांच्यासाठी मालिकेचा शेवट गोड केला.

झाले काय तर भारतीय संघ मालिकेतील संपूर्ण सामने व्हायच्या आधीच जर मालिका जिंकत असेल तर उर्वरित सामने खेळण्यात ते नेहमीच नाखूष असतात. केवळ औपचारिकता म्हणून मारून मुटकून जबरदस्तीचा रामराम केल्यासारखी आपल्या संघाची मानसिकता असते. याउलट जर मालिकेत प्रारंभीच दणके बसले तर ते उर्वरित सामने जीव तोडून खेळतात. मालिका जरी जिंकली असली तरी अंगात चॅम्पियन बनायची रग भारतीय संघात फारशी दिसत नाही. याचाच जिवंत प्रत्यय इंदोरच्या अंतिम सामन्यात आला.

एकतर इंदौरचे मैदान छोटे, त्यातही रोहीत ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी पत्करली. तसेही रोहीत कडे काय करावे आणि काय करू नये याबाबत फारसे पर्याय नसतात. कारण दुसऱ्या टी ट्वेंटीत २३७ धावा करूनही द.आफ्रिकेने आपल्या संघाच्या तोंडाला फेस आणला होता. आपण पहिले गोलंदाजी घेतली काय नी नंतर केली काय, मार खाणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. बरं त्यातही मैदान बदलले, गोलंदाज बदलले तरीपण पळसाला पाने तीनच राहतात. वास्तविकत: बीसीसीआयने अटल पेंशन योजना राबवून भुवनेश्वर कुमार,रवी अश्विन आणि उमेश यादव सारख्या गोलंदाजांना सन्मानपूर्वक शाल श्रीफळ देणे अपेक्षित आहे.

 याचा अर्थ नवोदित गोलंदाज खुप चांगली कामगिरी करत आहेत असे नसले तरी त्यांचे वय,फिटनेस, अनुभव पाहता त्यांना माफ केले जाऊ शकते किंवा नया है वह म्हणून सोडून दिले जाऊ शकते. एकंदरीत काय तर भारतीय गोलंदाजी म्हणजे कागज के फूल आहेत. रंग ले आओगे, रुप ले आओगे, पर खुशबू कहांसे लाओगे कागज के फूल अशी आपली गोलंदाजी आहे. अशी भोंगळ गोलंदाजी आणि जोडीला गचाळ क्षेत्ररक्षण लाभल्यावर आपल्या विजयाचे स्वप्न म्हणजे नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असल्यासारखे आहे. अगदी पहिल्याच षटकांत क्लिंटन डिकॉकला धावबाद करण्याची नामी संधी आपण गमावली. त्यानंतर डिकॉकने भारतीय गोलंदाजीचा कॉक मोकळा करताच रिली रोस्सोवने बादलीभरून धावा गोळा केल्या.

कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या करत आपल्या गोलंदाजांनी चौकार, षटकारांचा भंडारा लावला. एवढे आदरतिथ्य केल्यावर द.आफ्रिकन फलंदाजांनी हर ओव्हर से चौका,छक्का निकलेगा याची पुरेपूर काळजी घेत दोनशेच्या वर धावांचे कर्ज आपल्या नावे केले. अर्थातच गोलंदाजांनी भरमसाठ कर्ज काढायचे आणि फलंदाजांनी टाचा घासत ते फेडायची ही आपली जिंकण्याची पध्दत. मात्र प्रत्येक वेळी फासे तुमच्या मनासारखे कसे काय पडणार. तसेही आफ्रिकन चीत्ते असो की गोलंदाज. त्यांचा वेग, चपळता आणि अचूकता वादातीत आहे.

दुसऱ्याच चेंडूवर क्रॉस सीम टाकत रबाडाने भारतीय फलंदाजीचा कबाडा करणे सुरू केले. त्यात भीत भीतच मैदानावर उतलेल्या श्रेयसला वेन पार्नेल ने बाऊंसरची भीती दाखवत पायचितात पकडले. भारतावर डबल स्ट्राईक होताच दिनेश कार्तिकला मैदानावर उतरवले. मात्र तुफान फॉर्मात असलेल्या सूर्यकुमारला डावलून डीके ला वर पाठवण्याचे डावपेच अनाकलनिय होते. भारतीय फलंदाजी धापा टाकत असतांनाच पंतचा बेजबाबदारपणा उफाळून आला. याच मानसिकतेचे पुढच्या फलंदाजांनी तंतोतंत पालन केले. मग तो दिनेश कार्तिक असो की सूर्यकुमार असो. पंत, डीके आणि सूर्यकुमार संपूर्ण षटक चांगले खेळून अखेरच्या चेंडूवर सर्वस्व गमावून बसले.

प्रमुख पाच फलंदाज माघारी परतताच हर्षल पटेल आणि अक्षर पटेलने गाडा सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येकच वेळी दोन गुजराती तुम्हाला तारुन नेईल याची शाश्वती नाही. प्रत्येकाने हातभार लावला तरच काम जमेल. जणुकाही आपल्या फलंदाजांना गरबा खेळण्याची घाई झाल्यासारखे सगळे झटपट परतत होते.अखेर धावांचे बहुमत आपल्याविरुद्ध असल्याने आपला पाडाव झाला. बरे झाले कायद्याने आता २६ आठवडे पर्यंत गर्भपाताला मान्यता दिली परंतु भारतीय फलंदाजीचा तर १९ व्या षटकांतच बोजवारा उडाला. पहिल्या षटकांत लागलेली गळती शेवटपर्यंत थांबली नाही. यापेक्षा मोदीजींनी आणलेल्या चीत्यांनी आपले काम चोखपणे बजावले. बहुतेक मादा चीत्ते प्रेग्नंट असल्याची बातमी आहे तर आपले फलंदाजीतील शेर आफ्रिकन चीत्यांसमोर ढेर झालेले आहेत.

खेळ म्हटले की हारजीत तर होणारच परंतु न लढता हार स्वीकारणे योग्य नव्हे. जणुकाही धावफलकावर दोनशे धावा दिसताच भारतीय फलंदाजांनी नांगी तर टाकली नाही ना असे वाटत होते. विशेषतः टी ट्वेंटीत अशक्य असे काहीच नाही. मात्र मन के हारे सब हारे, मन के जीते सब जीते असे असते. पहिले दोन सामने आणि मालिका जिंकल्याचे यश आपला संघ पचवू शकला नाही. तसेही धन पचवावे व्यापाऱ्याने, खुराक पचवावी म्हशीने आणि क्रिकेट चे यश पचवावे कांगारूंनी असे म्हणतात. एकतर टीम इंडिया अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली असावी किंवा त्यांना द.आफ्रिकेच्या हॅपी इंडेक्स ची काळजी असावी अथवा आपला देश खेळात सुद्धा असहिष्णू नाही असे जगाला दाखवायचे असावे यापलीकडे भारतीय संघाच्या पराजयाचे अन्य कोणतेही कारण सध्यातरी दिसत नाही. असो यानिमित्ताने का होईना, कांगारू आणि द.आफ्रिकेविरूद्ध दुहेरी मालिका आपण निर्भेळपणे जिंकू शकलो नाही याचे उराशी शल्य जरूर राहते.
********************************
दि. ०५ ऑक्टोबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...