Monday, February 27, 2023

सुहाना सफर और मौसम हसीं, भाग ०१

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
     *सुहाना सफर और ये मौसम हसीं*
             *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
गेली दोन वर्षे कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला होता. यात प्रामुख्याने नुकसान झाले ते पर्यटन क्षेत्राचे. अर्थातच भटकंती करणे हे रक्तातच असल्याने ही दोन वर्षे आमची किती घालमेल झाली असेल ते आम्हालाच माहीत. तरीपण कितीही अडचणी असल्या तरी कुठे ना कुठे मार्ग निघतोच आणि झालेही तसेच. कोरोनाने जगबंदी केल्याने आमचा मोर्चा देशी पर्यटनाकडे वळला होता‌. कारण युरोपात जातो म्हटले तर रशिया युक्रेन च्या रासायनिक बॉम्ब ची दहशत तर पुर्वेकडे चीनचा जैविक कोरोना बॉम्ब! मग मागच्या वर्षी कार्डेलीयाचे क्रुझायण आटोपले आणि यावर्षी चंदीगढची वाट धरली. खरेतर हे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे होते. तरीपण समथींग इज बेटर दॅन नथिंग म्हणून आम्ही देशी पर्यटनाला सज्ज झालो.

आपल्या कडे पर्यटनासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळा. कारण सगळीकडे थंडी असल्याने फारसे नवनवीन ड्रेस सोबत घ्यावे लागत नाही. एक स्वेटर किंवा जॅकेट अंगावर टाकले की झाली कपड्यांची खरेदी. मात्र उत्तरेला हिवाळ्यात पर्यटनाला जाणे म्हणजे खतरों के खिलाडी असावे लागते. काय ती बोचरी थंडी असते आणि धोकादायक धुके. हिवाळा खरेतर माझा आवडता ॠतू. झोप येवो अथवा न येवो थंडीमुळे अंथरुणात सापासारखे अंग चोरून पहुडण्यात मस्त मजा असते. मात्र प्रवासाचे विमान सकाळी असले तर झोपेचे खोबरे झालेच म्हणून समजा. त्यातही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे असेल काही केल्या झोप येत नाही. अशावेळी आपण साक्षात घड्याळाच्या अलार्म पेक्षाही जास्त सतर्कतेने उठतो.

प्रवासाच्या दिवशी सकाळी उठणे म्हणजे झोप आणि प्रवास यात टू बी ऑर नॉट टू बी असा संघर्ष असतो. तसेही उठल्याबरोबर गरमागरम चहा म्हणजे दुग्धशर्करा योग असतो. त्यातही उपाशी पोटी थाईरॉइडची गोळी घेऊन अर्धा एक तास चहाची वाट पाहणं अत्यंत अवघड.या काळात झोपतो म्हटलो तर झोप येत नाही, जागतो म्हटलो तर डोळे चुरचुरतात. ना जीने देंगे ना मरणे देंगे अशी अवस्था असतो. ज्या दिवशी उठायचा अगदी आळस येतो नेमके त्याच दिवशी घरातले दुध संपले असते आणि डोळे चोळत जाऊन दुकानातून दुध आणणं म्हणजे आमच्या साठी सश्रम कारावास असतो. 

मात्र या दु:खातही प्रेमाची अनुभूती येते. होते काय तर गल्लीतली दहाबारा मोकाट कुत्र्यांची टोळी मालक अचानक कसेकाय सकाळी सकाळी बाहेर पडले म्हणून घर ते दुकाना पर्यंत सोबत देतात. त्यांच्या फुलप्रुफ संरक्षण गराड्यात चालतांना पाहून पुर्वीच्या जन्मी आपण राजे महाराजे अथवा एखाद्या संस्थानाचे मालक असावे असे उगाचच वाटून जाते.भलेही आजुबाजुची जनता माझ्याकडे कुत्सितपणे पाहत असते परंतु मला त्या टोळीबद्दल आपुलकी वाटते. खरेतर मी कट्टर श्वानप्रेमी वगैरे नाही परंतु त्यांचे निर्व्याज प्रेम पाहून मी गलबलून जातो. प्रेम केवळ आंधळच नसतं तर ते विश्वासू आणि इमानदार पण असतं असा माझा दावा आहे.

चंदीगढची स्वारी बॅचलर गॅंगसोबत असल्याने दे धमाल असणार यांत वादच नव्हता. मी दोन मित्रांसोबत नियोजित वेळेत म्हणजेच उड्डाणाच्या दोन तास पहिले विमानतळावर पोहोचलो. दोन मित्र २५ किमी दुर, कामठी वरून येणार होते. वाहतुकीचा खेळखंडोबा लक्षात घेता त्यांनी मेट्रोने येण्याचा निर्णय घेतला परंतु या निर्णयाने त्यांना गोंधळात टाकले. झाले काय तर ऑटोमोटीव्ह चौक ते विमानतळ असे तिकिट काढून ते रमतगमत बसले. मात्र नागपु‌रला एअरपोर्ट नावाचे तीन मेट्रो स्थानक असल्याने (एअरपोर्ट, न्यू एअरपोर्ट-चिंचभवन, साऊथ एअरपोर्ट-शिवणगाव) ते सर्वात शेवटच्या स्थानकावर पोहोचले.

इकडे आमची घालमेल सुरू झाली, नक्की हे मित्र कुठे आहे हे समजायला मार्ग नव्हता. कारण गरजेच्या वेळी नेटवर्क नसणे हा मोबाईल कंपन्यांचा स्थायीभाव झाला आहे. अखेर कसाबसा संपर्क झाला आणि दोन मिनिटांत पोहोचतो असा निरोप आला. दहा मिनिटे झाली तरी ही दुक्कल दर्शन देत नव्हती कारण जे तिकिट काढले ते मशिनद्वारे रीड होत नव्हते. अखेर मेट्रोचे कर्मचारी देवदुतासारखे धावून आले आणि या दोन मित्रांना आमच्या हवाली केले. एकदाची सर्वांशी गळाभेट झाली आणि चेक इन सोपस्कारासाठी निघालो. त्यातही अनेकांचा आधार कार्डाचा फोटो म्हणजे निखळ मनोरंजन असते. एखाद्या व्यक्तीचे बावळट रुप बघायचं असल्यास त्याचे आधार कार्ड जरूर बघावे. मी मात्र या प्रसंगातून अनेकदा गेल्याने पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स दाखवतो आणि लवकर सुटका करून घेतो.

या टप्प्यात अनेक घोळ असतात, कोणती वस्तू कॅबीन बॅग मध्ये आणि कोणती लगेज बॅगमध्ये यांत माझा हमखास गोंधळ उडतो. तसेही प्रत्येक विमानतळावर कोणते नियम लागू असतात याचा नेम नसल्याने तिथला गोंधळ पाचवीलाच पुजला आहे. दुसरा टप्पा सेक्युरीटी चेकइन म्हणजे आणखी दिव्य असते. एकतर पेन, घड्याळ, चष्मा, जॅकेट, कॅप, चिल्लर नाणी, बेल्ट आणि जोडे काढून ट्रे मध्ये वेगळे ठेवावे लागते. बाकी सगळं ठीक आहे परंतु कंबरेचा बेल्ट सोडणे म्हणजे फारच अवघड जाते. त्यातही रांग मोठी असली तर बेल्ट नसल्याने पॅंट गुरूत्वाचे नियम पाळायला सुरुवात करते आणि हळूहळू खाली सरकत जाते. कसेबसे पॅंटमध्ये कोंबलेले शर्ट, पॅंटशी फारकत घेऊन बाहेर डोकवायला लागते. त्यातच दोन्ही हातात सामानाचा ट्रे असल्याने असहाय स्थिती उत्पन्न होते. जेंव्हा स्लाईडींग बेल्ट वर ट्रे ठेवला जातो तेव्हा कुठे या दिव्यातून सुटका होते.

यानंतर खरी गंमत मेटल डिटेक्टर तपासणीच्या वेळी येते. तिथेही टायटॅनिकच्या केट विन्सलेट सारखी दोन्ही हात पसरवून उलट सुलट पोझ द्यावी लागते. यामुळे होते काय तर उरलेसुरले शर्ट हक्काने पॅंटबाहेर पडते आणि कसेतरीच वाटते. मात्र नाईलाज असतो. झाडाझडतीतून बाहेर पडून पुन्हा एकदा आपला ट्रे पकडून सामानाची आवराआवर करावी लागते. बाहेर सुटलेले पोट पुन्हा बेल्टने बांधून आत टाकावे लागते.आधीच आम्ही लंबोदर, त्यात सर्वांसमोर पोटाचे आतबाहेर करणे अजिबात आवडत नाही. मात्र पोटाला दोष देऊन काय फायदा? जगण्यासाठी खाण्यापेक्षा, खाण्यासाठी जगणे हे आमचे ब्रीदवाक्य असल्याने पोट खाल्लेल्या मिठाला, मिठाईला जागत असते. शेवटी आपलेच ओठ आपलेच पोट अशी मनाची समजूत घालून नियोजित विमानप्रवासाला सज्ज होतो.
क्रमशः,,,,
*********************************
दि. २७ फेब्रुवारी २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Monday, February 20, 2023

कांगारूंचा अडीच दिवसांत खुर्दा!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
       *कांगारूंचा दिड दिवसांत खुर्दा!*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने कांगारूंचा अडीच दिवसांत धुव्वा उडवत बॉर्डर गावस्कर चषक चौथ्यांदा आपल्याकडे राखला आहे. लागोपाठ दोन कसोटीत कांगारुंनी फिरकीपुढे सपशेल शरणागती पत्करली आहे. क्रिकेट विश्वात चॅम्पियन संघ म्हणून ओळखला गेलेला कांगारू संघ दोन्ही कसोटीत त्यांच्या दुसऱ्या डावात ज्याप्रकारे गळपटला ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. फिरकीपुढे आक्रमण करावे की बचाव करावे या द्विधा मनस्थितीत सापडल्याने त्यांचा केवळ अडीच दिवसांत खुर्दा उडाला आहे.

झाले काय तर बलाढ्य कांगारू संघाने भारतभूमी वर पाय ठेवताच त्यांनी खेळपट्ट्यांबाबत कुरबुर चालू केली होती. पण फिरकी खेळपट्ट्या भारतात नाही तर पर्थला मिळणार काय हा प्रश्न होता. त्यातच भित्यापाठी ब्रह्मराक्षस असतो आणि झालेही तसेच. अश्विन, जडेजाच्या जोडगोळीने दोन्ही कसोटीत तब्बल एकतीस बळी टिपून कांगारूंची हालत खस्ता केली. त्यातच मो.सिराज आणि मो.शमीने तिखट मारा करुन त्यांना सळो की पळो करून सोडले होते. दिल्ली कसोटीत पहिल्या दिवशी तर मो.सिराजने डेव्हिड वॉर्नरला अक्षरशः शेकून काढले. सिराजच्या आखूड टप्प्याच्या चेंडूने तर त्याला चांगलेच नाचवले. अखेर सिराजने त्याला हेल्मेट वर दणका देऊन त्याचा कसोटीतून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला. भलेही वॉर्नरला मो.शमीने बाद केले परंतु त्याचा पाया सिराजने रचला होता हे मान्य करावे लागेल.

आयसीसीच्या लॉज ऑफ क्रिकेट २४ नुसार (बदली क्षेत्ररक्षक, सबस्टीट्यूट) डोक्यावर मार लागल्याने कंकशन नियमानुसार (लाईक फॉर लाईक) वॉर्नर ऐवजी दुसऱ्या डावात मॅथ्यू रेनशॉ फलंदाजीला उतरला होता. पण  रेनशॉ बरसण्याच्या पहिलेच अश्विनने त्याला पायचितात पकडले. पहिल्या डावात उस्मान ख्वाजा, पीटर हॅन्डसकॉम्ब यांनी थोडेफार हातपाय चालवल्याने त्यांनी कसेबसे अडीचशे धावांचा टप्पा ओलांडला. मात्र प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाची सुद्धा घसरगुंडी झाली होती. मात्र रवी अश्विन आणि अक्षर पटेलने आठव्या गड्यासाठी ११४ धावांची भागीदारी करून संघाचे वस्त्रहरण थांबवले. कांगारूना प्रोत्साहन पर एक धावाची आघाडी मिळाली होती आणि दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करून टीम इंडियावर दबाव आणता आला असता.

पण दुसरा डाव म्हटले की 'मन के हारे सब हारे ' अशी स्थिती होती. दुसऱ्या दिवसअखेरीस एक बाद एकसष्ट अशा सुस्थितीत असणारा संघ तिसऱ्या दिवशी फिरकीसमोर एकोणीस षटकांत बावण बावण करत नऊ गडी आणि बावन्न धावात गारद झाला. शोले पिक्चरच्या गावकऱ्यांना जेवढी भिती गब्बरची वाटली नाही त्याच्या कैकपट फिरकीच्या दहशतीखाली कांगारू फलंदाज खेळले. खेळपट्टीवर अक्षरशः झिंगाचिका नाचत ते बाद झाले. खरेतर तिसऱ्या दिवशी दोन्ही फिरकीपटूंना सुरूवातीपासून कांगारूच्या उरावर बसवणे हा कर्णधार रोहीतचा मास्टर स्ट्रोक होता. पुढे जावे की मागे खेळावे या भानगडीत ते फुटवर्क विसरले. आक्रमण हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आक्रमणाला सुरूवात केली परंतु आक्रमण आणि आत्मघात यातला फरक त्यांना कळला नाही. माइंडेड ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी ब्लाईंड गेम खेळला.

भलेही तीन पत्तीत बावन्न पैकी तीन पत्त्यात नशिब आजमावे लागते परंतु कांगारूंना फिरकीपुढे ब्लाईंड गेम खेळतांना आपले अकरा पत्ते नक्कीच माहिती होते. जडेजाच्या विकेट टू विकेट गोलंदाजीवर हल्ला करतांना कांगारूंची अवस्था 'न्हाणी ला बोळा आणि दरवाजा मोकळा ' अशी झाली. बॅटचा दांडपट्टा चालवितांना स्टंप उघडे पडले. वळवळणाऱ्या फिरकीला स्विप करण्याच्या मोहात त्यांचे फलंदाज त्रिफळाचित झाले. ट्रॅव्हिस हेड, लाबुशेन वगळता इतरांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. नागपूर असो की दिल्ली दोन्ही जागी दुसऱ्या डावात ते बत्तीस षटकांपेक्षा जास्त तग धरू शकले नाही.

टीम इंडियाला मालिकेत २/० अशी आघाडी आणि जागतिक कसोटी अंतिम सामन्याच्या दृष्टीने एकशे पंधरा धावा हव्या होत्या. त्यातच भारतीय संघाच्या मस्तकावर राहुल ग्रह असल्याने थोडी धाकधूक वाटत होती. अखेर राहुल आपल्या नियमाला जागला आणि परत एकदा हात हलवत तंबूत परतला. काहीही असो एखादा व्यक्ती जर वारंवार संधी देऊन हमखास अपयशी ठरत असेल तर त्याचे नाव १००% राहुल असणार आता हे कोणीही सांगू शकतो. यातील गंमतीचा भाग वगळला तरी राहुलचे फलंदाजीतील नग्न सत्य कोणीही नाकारू शकत नाही. फार पूर्वी मोहींदर आमरनाथने निवड समितीला जोकर्स म्हटले होते, राहुलची सातत्याने होत असलेली निवड पाहून मो.अमरनाथ किती दूरदृष्टीचे होते याचा प्रत्यय येतो.

भारतीय फलंदाजांचा विचार केला तर राहुलला कच्चा निंबू म्हणून धरायला हरकत नाही. रोहीतला कर्णधाराची जबाबदारी देताच त्याची फलंदाजी बाळसे धरु लागली आहे. विराट बाबत एवढेच म्हणता येईल,,'हिरा है सदा के लिये ' तर शंभरावा कसोटी खेळणारा पुजारा कष्टकरी फलंदाज म्हणून ओळखला जातो. सर्वात कौतुक करावे लागेल ते नवोदित यष्टिरक्षक श्रीकर भरतचे. ०४ बाद ८८ धावफलक असतांना त्याने मैदान गाठले आणि एक सुरेख छोटेखानी खेळी करत त्याने आपली दखल घ्यायला लावली.

दोन्ही कसोटींचा विचार करता भारतीय फलंदाजीत कधी रोहीत, कधी विराट तर कधी अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेलने संघाला तारुन नेले. भलेही अक्षर पटेलची गोलंदाजी 'गंगा घरी आली पण आंघोळ नाही केली' अशी झाली असली तरी त्याने दोन्ही कसोटीत जबरदस्त फलंदाजी करुन विरोधी संघाला जेरीस आणले. वास्तविकत: दोन्ही कसोटीत विजयाचा पाया त्याने रचला आहे. भारतीय फलंदाजांनी फिरकीला उत्तम फुटवर्कने निष्प्रभ केले. याउलट कांगारू फलंदाजांनी फिरकीसमोर हाराकिरी केली. वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथच्या भरवश्यावर त्यांचे फलंदाजीचे दुकान. मात्र यावेळी दोघेही कामी आले नाही. उस्मान ख्वाजा, हॅन्डसकॉम्बचे प्रयत्न थिटे पडले. तर गोलंदाजीत नॅथन लिओन, टॉड मर्फीने थोडीफार चमक जरुर दाखवली परंतु त्यांनी त्यांच्या वेगवान गोलंदाजांवर फारसा विश्वास दाखवला नाही. जागतिक कसोटी अंतिम सामन्यात स्थान निश्चिती साठी भारताला मालिकेत ३/० असा विजय आवश्यक आहे आणि भारतीय संघ त्यादृष्टीने उर्वरित कसोटीत प्रयत्न जरूर करतील अशी आशा आहे.
********************************* 
दि. २० फेब्रुवारी २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Saturday, February 18, 2023

ट्रेलर हिट पिक्चर सुपरहिट!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
        *ट्रेलर हिट, पिक्चर सुपरहिट*
             *डॉ अनिल पावशेकर*
********************************
शाहरुखच्या 'पठाणचे' कवित्व संपते न संपते तोच मुख्यमंत्री शिंदेंचा 'गुवाहाटी की गोद में' हा राजकिय पिक्चर सुपरहिट झाला असून आता तर चक्क निवडणूक आयोगानेच त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. जुन २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या नऊ महिन्याच्या काळात सेनेच्या दोन्ही गटांनी प्रचंड प्रसुती कळा सोसल्या. दोघांनीही सुप्रीम कोर्ट ते निवडणूक आयोग अशा येरझाऱ्या घातल्या. अखेर निवडणूक आयोगाने नॉर्मल डिलिव्हरीची अपेक्षा सोडून सिझर करत हा वाद निकालात काढला. खऱ्याखुऱ्या शिमग्याला वेळ असला तरी विरोधकांनी निकाल लागताच शिमगा सुरू केला परंतु 'जब
चिडीया चुग गयी खेत अब पछताने से क्या फायदा' अशी अवस्था झाली आहे.

झाले काय तर सेना भाजपा युतीने २०१९ ला विधानसभेत दिडशेवर जागा जिंकून कॉंग्रेस राष्ट्रवादीला धुळ चारली होती. जनतेलाही आता युतीचेच सरकार स्थापन होणार असे वाटत होते. मात्र युतीत मधुचंद्राऐवजी चक्क काडीमोड झाला. आयुष्यभर मा.बाळासाहेबांनी ज्या कॉंग्रेस राष्ट्रवादीला थारा दिला नाही, त्याच्या वळचणीला सेना उभी राहिली. होत्याचे नव्हते झाले. कधी बंद दाराआडचे वचन, तर कधी मुख्यमंत्री पदाची ओढ. सत्तेचा पेचप्रसंग काही सुटत नव्हता. अखेर जनमताचा कौल पायदळी तुडवण्यात आला. तीन नापासांनी मिळून मेरिटचे स्थान हिसकावले होते. तीन दिशाला तीन तोंडे असणारे अमर अकबर अँथनी सरकार जन्माला आले होते. मात्र अमर अकबर अँथनीचा बाप किशनलाल अजूनही जीवंत आहे हे ते विसरले होते.

तिघाडीचे महाआघाडी सरकार स्थापन जरी झाले असले तरी काॅंग्रेस, राष्ट्रवादी पक्ष आपल्या अजेंड्यावर ठाम होते. खरी गोची झाली ती सेनेची. हिंदुत्वाला हात लावतो म्हटले तर खुर्ची धोक्यात आणि हिंदुत्व सोडले तर मतदारांची प्रतारणा. अखेर खुर्ची जिंकली आणि हिंदुत्वाला तिलांजली दिली गेली. हिंदुत्व हीच सेनेची ओळख असतांना उगाचच धर्मनिरपेक्षतेची झुल ओढली गेली. सेनेचा ढाण्या वाघ ओशाळून चक्क शुद्ध शाकाहारी झाला होता. पक्षातील निष्ठावंतांना सेनेचे पतन उघड्या डोळ्यांनी दिसत होते मात्र त्यावर त्यांचा नाईलाज होता. आधीच पालघर साधु हत्याकांडाने जनमानस क्षुब्ध होते. त्यात अर्णव, कंगणा आणि केतकी प्रकरणाने आणखी भर घातली.

सचिन वाझे असो की राष्ट्रवादीच्या मंत्र्यासंत्र्यांची जेलयात्रा असो अथवा आणखी काही भानगडी, सरकार प्रमुख म्हणून बील मुख्यमंत्र्यांच्या नावाने फाडले गेले. तिघाडी सरकारमध्ये सर्वात जास्त नाव सेनेचे खराब होत होते. वर्षानुवर्षे सेनेसाठी खस्ता खालेल्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत होता. अखेर या खदखदीचा ज्वालामुखी कधीतरी फुटणारच होता. राज्यसभेची निवडणूक हे एक नाममात्र कारण होते. त्यातच स्वयंघोषित ब्रह्मांड प्रवक्त्यांच्या जीभेचा दांडपट्टा बेकाबू झाला होता. जेमतेम पन्नास जागा आणि कॉग्रेस राष्ट्रवादीच्या कुबड्यांवर सत्ता मिळालेल्यांना पुढील पंचवीस वर्षे मुख्यमंत्री आमचाच म्हणून डोहाळे लागले होते. सत्तेची झिंग काही केल्या उतरत नव्हती. १०५ घरी बसवल्याची नशा काही औरच होती. पक्षांतर्गत एवढी खदखद असूनही नेतृत्व कसे काय गाफिल राहिले हे एक आश्चर्यच आहे. 

राज्यसभा, विधान परिषदेची निवडणूक होताच सेनेचा पोळा फुटला. मुंबई ते गुवाहाटी व्हाया सुरत सत्तासंघर्ष सुरू झाला. डोंगर, झाडी, हॉटेल, गद्दार, खोके आदी शब्दांच्या फैऱ्या झडू लागल्या. सेनेला सुख के सब साथी दुख मे न कोय चा प्रत्यय येऊ लागला होता. मात्र आता उशीर झाला होता. चाळीस आमदार आणि तेरा खासदार शिंदे गटात सामील झाले होते. राज्यसभा, विधान परिषदेचा ट्रेलर हिट होताच गुवाहाटीचा पिक्चर सुपरहिट होणार होता. न्यायनिवाड्यासाठी तारीख पे तारीख सुरु झाले होते. तोपर्यंत एकनाथ शिंदेंनी राजमुकुट धारण केला होता. तेलं ही गेलं तुप ही गेलं अशी सेनेची अवस्था झाली होती. आता सर्वकाही सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगास ठरवायचे होते. दावे प्रतिदावे मांडले गेले आणि तिथे पुराव्यांवर न्यायनिवाडा झाला. शिवसेना या नावासहीत धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाच्या झोळीत पडले.

या सर्व सत्तासंघर्षात सेनेचे सर्वात जास्त नुकसान झाले. नवीन चिन्ह, नवा डाव त्यांना सुरू करावा लागणार आहे. सत्तेची चुंबकीय शक्ती फार मोठी आहे आणि सध्या सत्ता शिंदेंकडे आहे. त्यामुळे सेनेचे काम आणखी अवघड आहे.  राहिली बाब राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तर त्यांना तसेही जनतेने विरोधी पक्षात बसायचा कौल दिला होता. अचानक लॉटरी लागावी तशी त्यांना सत्ता मिळाली होती. आत्ताही राष्ट्रवादीकडे त्यांचा हुकुमाचा एक्का असल्याने ते डॅमेज कंट्रोल करू शकतात. कॉंग्रेसचे मात्र काम कठीण दिसते. इकडे भारत जोडो यात्रा आली गेली आणि तिकडे नाशिकच्या निवडणूकीने अंतर्गत खदखद आणखी वाढली आहे. भाजपला सुरवातीच्या पिछेहाटी नंतर आता अच्छे दिन आले आहे. जरी देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असले तरी स्टीअरींग व्हिलवर ताबा त्यांचाच आहे.

या सत्तासंघर्षाचा जर कुठलाही प्रभाव, परिणाम नाही पडला तर तो मनसे पक्षावर. नेहमीप्रमाणे हा पक्ष नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आहे. सध्यातरी शिंदे गटाला अधिकृतपणे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याने ते या सत्तासंघर्षाचे सर्वात जास्त लाभार्थी ठरले आहेत. सेनेची अवस्था मात्र बिकट झाली आहे. ज्या धनुष्यबाणाने त्यांना विजयी केले, सत्ता दिली, तोच त्यांच्याकडे उरला नाही. असंगाशी संग आणि हिंदुत्वाची प्रतारणा सेनेच्या अंगलट आली. युती करुन चांगले बहुमत असतांनाही सेनेने चुकीचे पाऊल उचलले. अखेर जे व्हायचे तेच झाले. आता पश्चात्ताप करुन फायदा नाही. गद्दार, खोके, पाठीत खंजीर खुपसला यातून बाहेर पडले तरच उर्वरित सेनेचा पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. 
**********************************
दि. १८ फेब्रुवारी २०२३
मो.९८२२९३८२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...