Monday, November 20, 2023

तन्हा तन्हा लौटा हूं भरी महफिलसे!

@#👿👿👿👿👿👿👿👿#@
   *तन्हा तन्हा लौटा हूं,भरी महफिलसे!* 
            *डॉ अनिल पावशेकर*
********************************
कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की तिसऱ्यांदा आयसीसी विश्वचषक जिंकण्याचे आपले स्वप्न भंगले असून ऑस्ट्रेलिया ने सहाव्यांदा हा चषक पटकावला आहे. अत्यंत उत्कंठा लागलेल्या या लढतीत भरवश्याच्या म्हशीला टोणगा झाला आहे. अंतिम फेरीपर्यंत स्वप्नवत कामगिरी करणारा आपला संघ कांगारूंचा चक्रव्यूह भेदू शकला नाही आणि लाखो करोडो देशवासियांना दुःखाचा आवंढा गिळावा लागला आहे. १९८७ पासून क्रिकेट जगतावर दादागिरी दाखवणाऱ्या कांगारूंनी आपल्या लौकिकाला जागत गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही दर्जेदार कामगिरी करत दोन्ही संघांतील फरक दाखवून दिला आहे.

झाले काय तर अंतिम सामना कसा खेळायचा असतो, कसा गृहपाठ करायचा असतो, घेतलेल्या निर्णयाला प्रत्यक्षात कसे उतरवायचे असते याचा संपूर्ण सातबारा काल कांगारूंनी क्रिकेट जगताला दाखवला आहे. अगदी नाणेफेक जिंकून ज्या स्मितहास्याने कमीन्सने क्षेत्ररक्षण पत्करले ते पाहता कांगारूंच्या दृढनिश्चयाची कल्पना येते. काळीसावळी खेळपट्टी आणि दवबिंदू ची शक्यता लक्षात घेत कमीन्सने रोहीत ॲंड कंपनीला फलंदाजीला उतरवले आणि त्यांचा अभ्यास किती पक्का आहे याची जाणीव झाली. अनुभवी मिचेल स्टार्कला फारसे स्वींग, सीम न दिसल्याने कमीन्सने कडेकोट क्षेत्ररक्षणाची तटबंदी उभारली.

फलंदाजांसाठी ऑन,लेग ला सगळा फौजफाटा उभारून आपल्या फलंदाजांची कोंडी केली गेली. नेहमीप्रमानेच रोहीतने हल्ले करत डावाला सुरुवात केली परंतु यावेळी शुभमनने त्याला फारशी साथ दिली नाही. तरीपण रोहीतचे विराटच्या साथीने दे दणादण सुरू होते. इथेच कमीन्सने कल्पकता दाखवत चक्क रोहीतची विकेट विकत घेतली. पार्ट टाइम फसव्या ग्लेन मॅक्सवेलला पाहून रोहीतच्या तोंडाला पाणी सुटले. मात्र मॅक्सवेल नावाची शेळी त्याच्या शिकारीसाठी आणली गेली आहे याचा त्याला विसर पडला. इतर सामन्यात रोहीतने मानवी बॉम्ब होऊन प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडणे पचले होते. मात्र अंतिम सामन्यात कुठेतरी यावर नियंत्रण ठेवणे किंवा आवर घालणं गरजेचे होते. इथेच रोहीतची गफलत झाली.

मॅक्सवेलच्या षटकांत चौकार षटकार सहीत दहा धावा झाल्या असतांनाही रोहीत पुढे सरसावला आणि संघाला बॅकफूटवर ढकलून गेला. खरेतर कांगारूंना सामन्यात वर्चस्व गाजवण्यास हा क्षण पुरेसा ठरला. कारण यानंतर श्रेयस कधी आला कधी गेला कळलेच नाही. त्यातही केवळ सहा फलंदाज आणि एकमेव अष्टपैलू म्हणून जडेजा असल्याने विराट, राहुलवर दबाव स्पष्ट दिसत होता. या दोघांनीही फलंदाजीत अहिंसा परमो धर्मचा वसा घेतल्याने संघ चिखलात फसला तो त्यातून शेवटपर्यंत बाहेर पडू शकला नाही. एकवेळ बेडकाची शितनिद्रा (हायबरनेशन) लवकर संपली असती परंतु विराट, राहुलची शांत,संयमी, प्युअर व्हेज फलंदाजी काही केल्या टॉप गिअर टाकत नव्हती.

भरीस भर म्हणून कांगारू क्षेत्ररक्षक जणुकाही शिलाजीत खाल्यासारखे मैदानात दम दाखवत होते. तिशीचे लाबुशेन, ट्रॅव्हिस हेड आणि छत्तीसचा वॉर्नर जिंकू किंवा मरू वृत्तीने प्रत्येक चेंडूवर झेपावत होते. हेड ने रोहीतचा जो झेल पकडला तो केवळ आणि केवळ हेडच पकडू शकतो इतका तो कठीण होता, त्यात त्याचे जबरदस्त कमिटमेंट होते.  इकडे हेडने रोहीतचा झेल पकडला आणि भारतभर सागरा प्राण तळमळला झाले. भलेही आपले टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज बाद झाले होते परंतु विराट, राहुलच खेळपट्टीवर पंगत मारून बसणं टीम इंडियाच्या अंगलट आलं. या दोघांनीही जवळपास पंधरा षटके ना चौकार हाणला ना षटकार. कांगारूंचा दबाव झुगारून टाकण्यात हे दोघेही अपयशी ठरले. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली परंतु ती वांझोटी ठरली.

दोघांच्याही दिनमे चले ढाई कोस खेळीने ना संघाचा टेम्पो वाढला, ना येणाऱ्या फलंदाजांना आत्मविश्वास राहीला, ना या दोघांना. याच दबावात विराट आपली विकेट गमावून बसला. पॅट कमीन्सने या संपूर्ण स्पर्धेत स्लो बाऊंसर, स्लोअरवन वर बळींची माया जमवली. आपले संघ व्यवस्थापन यावर तोडगा का काढू शकले नाही ते कळायला मार्ग नाही. त्याचीच री जोश हेझलवूडने ओढली. जडेजा काय नी सूर्या काय ,, दोघांनाही कांगारूं गोलंदाज कुक्कल बाळ समजून खेळवत होते. सूर्यासाठी लेगला तटबंदी उभारली आणि चेंडूची गती कमी केली की तो लवकरच मावळतो हे प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चांगले लक्षात आले आहे. रोहीत सोडला तर पांव भारी होना म्हणजे काय असते हे आपल्या फलंदाजांचे फुटवर्क पाहून समजत होते. कांगारूंच्या दडपणाखाली आपले खेळाडू फुटवर्क विसरून गेले होते. पुढे जातो तर बाऊंसर, मागे जातो तर इनर सर्कलचे क्षेत्ररक्षक खाऊ की गिळू करत सिंगल देत नव्हते.

संपूर्ण स्पर्धेत आपली फलंदाजी इतकी हतबल आणि फॅमिली प्लॅनिंग चे ऑपरेशन झाल्यासारखी पाहण्यात आली नव्हती, निव्वळ खेळत होते पण धावा होत नव्हत्या. जणुकाही भारताचा दुय्यम संघ फलंदाजीला उतरला आहे असे वाटत होते. अखेर व्हायचे तेच झाले. अडीचशेच्या आत आपला गाशा गुंडाळला गेला. वास्तविकत: इतकी धावसंख्या कांगारूंना दमवायला पुरेशी नसली तरी टक्कर देण्याइतपत नक्कीच होती. त्यातही शमी बुमराहने सनसनाटी सुरूवात करून दिली होती. मुख्य म्हणजे स्टीव्ह स्मिथने रिव्ह्यू न घेता एक विकेटची गिफ्ट पण दिली होती.

शमी, बुमराहने जी अप्रतिम सुरूवात करून दिली, ती लय ना फिरकीपटुंनी राखली, ना सिराज ने. पहिला पॉवर प्ले संपताच हेड ने आपले असली रूप दाखवले. खरेतर काहीही झाले तरी आक्रमण हाच बचावाचा उत्तम मार्ग आहे हे हेडने जाणून दणक्यात फलंदाजी केली. बरेचदा स्टंप उघडे सोडून तो फटकेबाजी करत होता. नंगे से खुदा डरे म्हणतात ते याचसाठी! कित्येकदा तो बिट झाला, बाद होता होता वाचला. पण बचेंगे तो और लढेंगे करत त्याने वायग्रा फलंदाजी केली. बचानेवालेसे मारनेवाला बडा होता है, हे त्याने दणकेबाज फलंदाजी करत दाखवून दिले. तसेही ऑसी म्हटले की त्यांच्या रक्तात आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स असो वा नसो, आक्रमक पेशी प्रचुर मात्रेत असतात. कांगारूंच्या आक्रमक ॲप्रोच पुढे रोहीतचा संघ गरीब गाय वाटत होता.

खेळात हारजीत तर होणारच. मात्र अंतिम सामन्यात, मोठ्या स्टेजला प्लॅनिंग, होमवर्क किती करता यावर सगळं अवलंबून असते. एकदिवसीय सामना म्हटला की धावगतीची काळजी घेतलीच पाहिजे. कामचलाऊ हेड आणि मिचेल मार्शच्या दोन दोन षटकांत केवळ चार पाच धावा निघत असेल तर प्रमुख गोलंदाजांच्या षटकांबाबत न बोललेले बरे! विराट, राहुलने इतके कोषात जाऊन खेळणे संघाला भारी पडले. कांगारूंनी टीम इंडियाची शिकार करताना तब्बल सात गोलंदाज वापरले तर आपल्याकडे फक्त पाचच पर्याय होते. कांगारूंनी एकंदरीत बावीस चौकार आणि पाच षटकार ठोकले तर आपण फक्त बारा चौकार आणि तीन षटकार. म्हणजेच कांगारूंनी बाऊंड्रीने ११८ धावा, तर आपण केवळ ६६ धावा गोळा केल्या.

थोडक्यात काय तर मेहनती, अभ्यासू, ध्येयवेड्या आणि प्रचंड चिकाटीच्या विद्यार्थ्यांने मेरीटच्या विद्यार्थ्यांला मात दिली. अंतिम फेरीपर्यंत दमदार कामगिरी करण्याऱ्या टीम इंडियाचे श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तरीपण क्रिकेट जगतात एका बाजूला ऑस्ट्रेलियन संघ आणि दुसऱ्या बाजूला इतर सर्व संघ अशी दरी पहायला मिळते. इतर संघ विजयी जरूर होऊ शकतात, होतात. पण चॅम्पियन म्हणून बिरूदावली एकच संघ मिरवू शकतो आणि तो म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ. प्रत्येक सामना अंतिम सामना म्हणून खेळण्याची वृत्ती त्यांना चॅम्पियन बनवून जाते. राहिली बाब टीम इंडियाची तर, या सामन्यात कांगारूंची कामगिरी त्यांच्या पेक्षा सरस झाली. रोहीतचा उताविळपणा, विराट राहुलचा संथपणा, जडेजा सूर्याला सूर न गवसण्याने आपला संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. तर बुमराह,शमी वगळता इतर गोलंदाज दबाव टाकू शकले नाही‌‌. ‌दिमतीला ढिसाळ,सुस्त क्षेत्ररक्षणाने उरलेसुरले काम पूर्ण केले. टीम इंडियाची या सामन्यात भट्टी जमलीच नाही. त्यामुळे,, तन्हा तन्हा लौटा हूं मैं तो भरी महफिलसे अशी आपल्या संघाची अवस्था झाली.
*********************************
दि. २० नोव्हेंबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Friday, November 17, 2023

तुम बेवफा हरगीज ना थे!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
           *तुम बेवफा हरगीज ना थे!*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
ईडन गार्डन वर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने द.आफ्रिकेला धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. लो स्कोअरिंग परंतु थोडी उत्कंठा वाढवणारी ही लढत कांगारूंनी आपल्या नावे केली असून फायनलला टीम इंडियाशी दोन हात करायला ते सज्ज झाले आहेत. खरेतर पुरुषांच्या भाग्यात काय आहे हे सांगणे कठीण असले तरी मोक्याच्या वेळी द.आफ्रिकेच्या नशिबात काय आहे, असते हे सांगणे त्यामानाने सोपे असते. एखाद्या शापीत गंधर्वा सारखा हा संघ ऐनवेळी गळपटतो आणि सामना गमावून बसतो. खंदे फलंदाज, धारदार गोलंदाज, प्रभावी फिरकीपटुंनी सजलेला हा संघ पुन्हा एकदा सेमीफायनलला खचला असून या संघाबाबत कितीही ममत्व असले तरी रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती आहे.

झाले काय तर द.आफ्रिका संघाने साखळी सामन्यात दणदणीत कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या संघाने साखळी सामन्यातील नऊ पैकी सात सामने जिंकून आपला दबदबा कायम केला होता. विशेष म्हणजे सेमीफायनलला ज्या संघाविरुद्ध त्यांनी लोटांगण घातले त्याच कांगारूंचा त्यांनी १३४ धावांनी पराभव केला होता. सोबतच लंकेवर १०२ धावांनी, इंग्लंडवर २२९ धावांनी, बांगलादेशवर १४९ धावांनी, किवींवर १९० धावांनी मात केली होती. तर पाकिस्तानला एका विकेटनी आणि अफगाणला पाच विकेट्सनी पराभूत केले होते. या संघाचे पाठलाग करताना धाबे दणाणते हे दिसून येत होते आणि यामुळे ते नेदरलँड्स विरूद्ध ३८ धावांनी तर टीम इंडिया विरुद्ध २४३ धावांनी मागे पडले होते.

उपांत्य लढतीबाबत बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून द.आफ्रिकेने फलंदाजी जरुर पत्करली परंतु ते त्यांच्यासाठी आ बैल मुझे मार झालं. कारण स्टार्क आणि हेझलवूडने टिच्चून गोलंदाजी करत त्यांच्यावर दबाव टाकला. टेम्बा बवूमा तर साधं एक षटक सुद्धा टिकू शकला नाही. या स्पर्धेत चार शतके ठोकणारा क्लिंटन डिकॉक धावा रखडल्याने उतावीळ झाला आणि आपली विकेट गमावून बसला. दोन बळी स्वस्तात निपटताच द. आफ्रिकेच्या नाटकाची तिसरी घंटा वाजू लागली. या पडझडीत केवळ बारा षटकांत चार बळी जाऊन या संघाचे बारा वाजले. निश्चितच नमनाला घडीभर तेल झाल्याने पुढची वाटचाल बिकट होती.

तरीपण हेन्री क्लासेन आणि मिलरने ९५ धावांची दमदार भागिदारी करत द.आफ्रिकेच्या जीवात जीव आणला. तीस षटकापर्यंत १२० धावफलक असताना आणि या दोघांचा जम बसला असतांना कमिन्स ने जुगार खेळत ट्रॅव्हिस हेडला गोलंदाजीला पाचारण केले. हा खरेतर सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. पार्ट टाईम गोलंदाज हेडने लागोपाठ दोन चेंडूत क्लासेन, यान्सनला माघारी धाडत सामना कांगारूंकडे झुकवला. मात्र खेळपट्टीवर मिलर असल्याने या संघाच्या आशा अजूनही जिवंत होत्या. मिलरने एकाकी झुंज देत आपले शतक झळकावले परंतु त्याला दुसऱ्या बाजूला फारशी साथ मिळाली नाही.

कांगारूंना फायनलमध्ये पाऊल टाकायला केवळ २१३ धावा हव्या होत्या. मात्र बरेचदा छोटे टारगेट फसवे असते. ज्याप्रकारे वार्नर, हेडने ३८ चेंडूत ६० धावांची सलामी दिली ते पाहता सामना लवकरच संपेल असे वाटत होते. पण झाले उलटेच. वेगवान गोलंदाजांना फारशी भीक न घालणारे कांगारु फलंदाज समोर फिरकीपटूंना पाहून थबकले. एडन मार्क्रम, केशव महाराज आणि तब्रेज शम्सीने लढतीत रंग भरला. तर कोट्झीने आपल्या वेगाने तळातील फलंदाजांना काबूत ठेवले. खरेतर गोलंदाजांच्या मेहनतीला क्षेत्ररक्षकांनी उत्तम साथ देणे गरजेचे होते आणि इथेच घात झाला. द.आफ्रिकेची कबर खोदणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला दोनदा तर स्मिथ आणि कमीन्सला प्रत्येकी एक जीवदान देत त्यांनी आत्मघात करून घेतला.

थोडक्यात काय तर लान्स क्लुझनर ते आत्ताच्या लुझर्स पर्यंतचा या संघाचा प्रवास त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत वेदनादायी आहे. जॉंटी रोड्स, ॲलन डोनाल्ड, एबीडी, मखाया एनटीनी, कॅलीस, स्टेन, ड्युप्लेसी, डिकॉक, मिलर, रबाडा आदी क्रिकेट रत्नांची खाण असूनही या संघ विश्वविजेतेपदाला शिवू शकला नाही. यांत मॅच टॅलेंट म्हणा की गेम प्लॅन म्हणा, कुठेतरी हा संघ ताळेबंदात चुकतो, दबावात भरकटतो असे होत आहे. छोटे टारगेट असताना जवळपास चार झेल सुटले तर काय कप्पाळ जिंकणार? जो जोश, जी स्फुर्ती गोलंदाजीत दाखवली, त्याच्या तोडीस तोड क्षेत्ररक्षण आवश्यक होते. तिथेच खेळ उंचावणे गरजेचे होते. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर द.आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूम आणि समर्थकांतील ललनांचे चेंडूगणिक हिरमुसले चेहरे पाहून जीव तीळ तीळ तुटत होता‌‌. कांगारूंनी थोडेतरी स्त्री दाक्षिण्य दाखवायला हवे होते. मात्र क्रिकेट हा निष्ठूर खेळ आहे.

राहिली बाब कांगारूंची तर ते त्यांच्या डीएनए ला जागले. तिच खडूस वृत्ती, तोच विजिगिषु बाणा, तेच लढवय्ये रुप, सर्व काही ठरल्याप्रमाणे ते खेळत होते. सात गडी बाद होऊनही मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी जवळपास आठ षटके खेळत जिंकायच्या बावीस धावा काढल्या. तर स्टीव्ह स्मिथने एक बाजू लावून धरत तब्बल पाच भागिदाऱ्या करत गळती थांबवली. गोलंदाजीत स्टार्क, हेझलवूड आणि हेड पाठोपाठ पॅट कमिन्स ने चतूरता दाखवत स्लो बाऊंसर, स्लोअरवन टाकत कोट्झी, मिलर, रबाडाला फसवले. तर स्टार्कने फुललेंथवर बवुमा, मार्क्रम आणि महाराजला चकवले. या लढतीत कांगारूंनी बाजी मारली असली तरी द.आफ्रिकेने उत्तरार्धात चांगली झुंज दिली. मात्र छोटं टारगेट असल्याने कांगारूंचा गोट निश्चिंत होता. शेवटी काय तर,जो जिता वही सिकंदर! द.आफ्रिकेच्या बाबतीत आपण एवढेच म्हणू शकतो,,,
तुम बेवफा हरगीज ना थे, पर तुम वफा कर ना सके!
तुम को मिली उसकी सजा, तुम जो खता कर ना सके!
*********************************
दि. १७/११/२०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Thursday, November 16, 2023

कोई जब तुम्हारा ह्रदय तोड दे!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
       *कोई जब तुम्हारा ह्रदय तोड दे!*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत टीम इंडियाने किवी संघाची चिवट झुंज मोडून काढत अहमदाबादचे तिकीट कन्फर्म केले आहे. आयसीसी सामन्यात वारंवार गळफास बनलेल्या किवी संघाने यावेळी सुद्धा आपल्या संघाला चांगलाच घाम फोडला होता. मात्र टीम इंडियाच्या मो.शमी नामक बब्बर शेर ने न्युझीलंडचा फडशा पाडत किवीग्रहण संपुष्टात आणले. शमीने बळींचा सत्तेपे सत्ता ठोकत पुन्हा एकदा या स्पर्धेत गोलंदाजीतील सिकंदर आपणच आहोत हे सिद्ध करून दाखवले आहे.

झाले काय तर आयसीसी स्पर्धेत न्युझीलंडचा अपशकून आपल्या पाचवीलाच पूजला होता. भलेही साखळी स्पर्धेत आपण धर्मशाळेत किवींवर मात केली असली तरी विलीयम्सच्या टीमचे उपद्रवमूल्य वादातीत होते. त्यातही या स्टेजवर चुकले तर सरळ घरवापसी असल्याने इथे चुकीला माफी नव्हती. काहीही करून कसेही करून किवीमर्दन केल्याशिवाय टीम इंडियाकडे तरणोपाय नव्हता. यासाठी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे गरजेचे होते आणि झालेही तसेच. किवींची गोलंदाजीची मदार बोल्ट, साऊदी आणि सॅंटनरवर होती. मात्र मुळावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली झुकतात हे रोहीत जाणून होता. याच तत्त्वाला जागत त्याने बोल्टला दणके देत डावाचा प्रारंभ केला.

खरेतर या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत रोहीतची फलंदाजी दादागिरी सारखी झाली आहे. त्यामुळे धावगतीचा टेम्पो सेट होऊन येणाऱ्या फलंदाजांवर धावगतीचा दबाव राहत नाही‌. त्याने शुभमन सोबत सत्तरीची सलामी देत झकास प्रारंभ करून दिला. मात्र साऊदीने त्याला बाद करत त्याची घोडदौड रोखली‌. यानंतर शुभमनने विराटच्या साथीने फटकेबाजी केली परंतु तो क्रॅम्पमुळे हतबल झाला. ज्याप्रकारे मुंबईत फलंदाज क्रॅम्पग्रस्त होत आहेत (उदा. ग्लेन मॅक्सवेल, शुभमन, विराट, डॅरेल मिचेल इ.) ते पाहता खेळपट्टीवर फलंदाजांसाठी चारा, निवारा छावण्या उभारण्यास हरकत नसावी. 

या सर्व धावपळीत अनुभवी विराटने श्रेयसला दिमतीला घेत डावाला आकार दिला. विराटच्या फलंदाजी बाबत काय बोलावे? सचिनचा शतकांचा विक्रम त्याच्याच उपस्थितीत मोडत त्याने आपले ५० वे शतक झळकावले. अगदी कॉपी बुक स्टाईल फलंदाजी करत त्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. एका टोकाला विराटची दर्जेदार फलंदाजी होती तर दुसरीकडे श्रेयसच्या अफाट ताकद आणि टायमिंगने किंवींना नामोहरम केले होते. श्रेयसने चार चौकार आणि आठ षटकारांच्या साहाय्याने आपले तुफानी शतक पूर्ण केले. विराट, श्रेयसच्या शतकी दणक्याला कळस चढवला तो राहुलच्या विस चेंडूतील क्लासी चाळीसीने.

एकतर उपांत्य सामना, त्यातही चारशेचा पाठलाग म्हणजे एक दिव्य होते. तरीपण प्रतिस्पर्धी न्यूझीलंड म्हणजे बिते हुए लम्हों की कसक, साथ होती! सोबतच मुळचे भारतीय परंतु इतर देशांकडून खेळणारे खेळाडू नेहमीच आपल्या संघाला छळत असतात. मग तो विंडीजचा चंदरपॉल असो की आत्ताचे ईश सोढी, रचिन रविंद्र. तरी बरे झाले शमीने किवींच्या सलामीवीरांना लवकरच निरोप दिला. मात्र केन विलियम्स आणि डॅरेल मिचेलने झुंजार खेळी करत टीम इंडियाच्या तोंडचे पाणी पळविले. दोघांनीही सावध, तितकीच आक्रमक फलंदाजी करत सामन्यात रंग भरला. ज्याप्रकारे हे दोघे खेळत होते ते पाहता चारशे काय, पाचशे धावा सुद्धा पार करतील असे वाटत होते. वेगवान गोलंदाज असो की फिरकीपटू, दोघांचाही योग्य समाचार घेत या दुक्कलीने रोहीतला चांगलेच हैराण केले होते.

काही केल्या ही चिक्कट, चिवट आणि खडूस जोडी कोणत्याही गोलंदाजांना जुमानत नव्हती. या जोडीने जवळपास १८० धावांची भागीदारी करत सामना किवींकडे झुकवला होता. भलेही धावगती वाढत होती पण या जोडीच्या खात्म्याचा विडा कोण उचलणार हा यक्षप्रश्न होता. कारण या दोघांनी आमचं ठरलंय सारखं खेळत फलंदाजीची वज्रमूठ बांधली होती. मैदानात स्मशान शांतता पसरली होती. बळी मिळत नसल्याने भारतीय खेळाडूंची देहबोली सर्वकाही सांगून जात होती तर चाहत्यांच्या नजरेत बळींची तृष्णा स्पष्ट झळकत होती. कित्येक चाहते मन मारून, टिव्ही बंद करून भरल्या मनाने भाऊबीज साजरी करत होते. आपल्या संघाचे नष्टचर्य केंव्हा संपेल काही कळायला मार्ग नव्हता.

अखेर काळ्या ढगाला रुपेरी, चंदेरी किनार गवसली. बुमराहच्या रुपात एक रहनुमा संघासाठी धावून आला. बुमराहच्या गोलंदाजीवर गले की हड्डी बनलेल्या विलीयम्सचा झेल उडाला पण शमीने ही सुवर्णसंधी गमावली. एका क्षणासाठी लाखो करोडो सुस्कारे सोडले गेले. कोई जब तुम्हारा ह्रदय तोड दे म्हणजे काय असते ते सर्वांनी अनुभवले. जणुकाही टाईम ट्रॅव्हल करून शमीने तो सुटलेला झेल पुन्हा पकडावा असे मनोमन वाटत होते. मात्र प्रत्यक्षात असं काही घडत नाही. शमी वर दबाव प्रचंड वाढला होता. मात्र सर्वांना त्याच्याकडूनच अपेक्षा होत्या. कारण तुम्ही ने दर्द दिया और तुम्ही ने दवा देना, हे समयोचीत होते, तेवढी क्षमता, धमक त्याच्यात नक्कीच होती आणि झालेही तसेच.

किवीं सव्वादोनशेच्या टप्प्यात असतांना शमीने विलियम्सचा गेम केला. सीमारेषेवर सूर्याने सुरेख झेल टिपत विलीयम्सची वेलिंग्टनची वारी निश्चित केली. लगेचच डबल धमाका करत त्याने टॉम लाथमला लोळवले. मात्र खेळपट्टीवर अजूनही डॅरेल मिचेल काळ बनून उभा होता. डोक्यावरून घामाच्या धारा वाहत असतांना, पायात क्रॅम्प असतांनाही तो धीरोदात्तपणे संघाच्या विजयासाठी धडपडत होता. त्याने ग्लेन फिलीप्ससोबत पाऊनशे धावांची भागीदारी करत किवींची धडधड कायम ठेवली होती. खेळपट्टीवर मिचेलचा जम बसल्याने त्याला बाद करणं कठीण होतं तर फिलिप्स अवखळत का होईना धावा गोळा करत होता. अखेर बुमराहने त्याच्या खेळीला विराम दिला. दुसरीकडे कुलदीपने माफक गोलंदाजी करत चॅपमनचा बळी घेतला.

सहा गडी बाद होताच किवींच्या हातून सामना निसटायला लागला. किवींची एकमेव लाईफ लाईन असलेल्या मिचेलचा धीर खचला होता. तर बुमराह कुलदीपने शमीचा भार हलका केल्याने शेवटच्या स्पेलमध्ये शमीने न भुतो न भविष्यती कामगिरी केली. त्याने मिचेल सहित किवींचे शेपूट निर्दयपणे छाटतांना एकंदर सात बळी घेतले. पहिल्या काही सामन्यांत आपल्या संघसहकाऱ्यांना पाणी पाजणाऱ्या शमीने संधी मिळताच प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या भन्नाट गोलंदाजीचे पाणी पाजले. लेंथ आणि लाईनवर जबरदस्त नियंत्रण ठेवत शमीने विरोधी फलंदाजांना चित केले. या लढतीत फुल लेंथ, गुड लेंथचा मारा करत, एकाच टप्प्यात चेंडू टाकून कधी आंत कधी बाहेर काढल्याने त्याची गोलंदाजी फलंदाजांसाठी भुलभुलैय्या ठरली होती.

थोडक्यात काय तर योग्यता असतांनाही बेंचवर बसून राहण्याची सजा भोगून त्याने जीगरमां बडी आग है, हे दाखवून दिले. तर न्यूझीलंड संघाने आपल्या नावारूपाला जागत कडवी झुंज दिली. विशेषतः विलीयम्स, मिचेलची भागिदारी दृष्ट लागण्यासारखी होती. फलंदाजीत किवींनी दम मारो दम केले परंतु गोलंदाजीत ते ढेपाळले. रोहीत, शुभमन, विराट, श्रेयस आणि राहुलला ते वेसण घालू शकले नाहीत. मुख्य म्हणजे त्यांचा हमखास बळी टिपणारा मॅट हेन्री संघात नसल्याने त्याचा चांगलाच फटका त्यांना बसला. आपल्या गोलंदाजांनी सुद्धा या सामन्यात थोडी स्वैर गोलंदाजी करत तब्बल २९ अवांतर धावा दिल्या ज्यात १९ चेंडू वाईड होते. तसेच क्षेत्ररक्षणातही ढिसाळपणा जाणवला गेला. मात्र शेवटी निकाल आपल्या बाजूने लागल्याने ही बाब लपल्या गेली. या लढतीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले तर,, किवींनी छळले होते, शमी ने सुटका केली, असे करता येईल.
*********************************
दि. १६ नोव्हेंबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Monday, November 6, 2023

हम तुम दोनो जब मिल जाएंगे!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
       *हम तुम दोनो जब मिल जाएंगे!*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
आयसीसी विश्वचषकात सध्या दोन प्रकारचे संघ खेळत आहे. एक म्हणजे भारतीय संघ आणि दुसरा म्हणजे उर्वरित सगळे संघ. ज्याप्रकारे आपला संघ प्रतिस्पर्ध्याला सहजासहजी लोळवत आहे ते पाहता या विश्वचषकावर केवळ आणि केवळ आपल्याच संघाचा हक्क आहे असे वाटते. पण क्रिकेट हा बेभरवशाचा खेळ आहे. एखादा दिवशी कोणता संघ कशी कामगिरी करेल हे गुपीत असते. मात्र जोपर्यंत आपल्या संघाचा अत्यंत खराब खेळ होणार नाही किंवा मोठा उलटफेर होणार नाही अथवा डकवर्थ लुईस खेळखंडोबा करणार नाही तोपर्यंत वर्ल्ड इलेव्हन संघ जरी मैदानात उतरला तरी त्याला आपला संघ पुरून उरणार असेच काही दिसत आहे.

झाले काय तर सुपर संडेला ईडन गार्डन वर टीम इंडियाने द.आफ्रिकेशी दोन हात केले होते. द.आफ्रिकेवर चोकर्सचा ठप्पा लागला आहे आणि काही केल्या तो मिटायचे नांव घेत नाही. खरेतर हा संघ मस्क्युलर, पॉप्युलर, स्पेक्टॅक्युलर असून वर्ल्ड कप च्या बाबतीत बॅचलर आहे. शिवाय त्यांच्याकडे रबाडा, यान्सन, लुंगी सारखे तेज बॉलर असून आजही आपल्या कडे त्यांच्या खेळाडूंची क्रेझ आहे. तरीपण ऐन मोक्याच्या क्षणी त्यांचा पप्पू कान्ट डान्स साला होतोय. ‌या स्पर्धेत त्यांनी प्रथम फलंदाजी करतांना धावांचे डोंगर उभारले. पण पाठलाग करताना मात्र ते लटपटले, गळपटले. अगदी हाच किस्सा ईडन गार्डन वर बघायला मिळाला.

रोहीतने नाणेफेक जिंकून चाणाक्षपणे फलंदाजी घेतली आणि प्रारंभी आपली गाडी टॉप गिअरला टाकली. प्रतिस्पर्धी गोलंदाज कोणीही असो, कोणतेही मैदान असो, रोहीतची बेधडक फलंदाजी संघाच्या धावगतीचा टेम्पो सेट करून देतो. मात्र अवघ्या चाळीशीत त्याची खेळी संपुष्टात आली आणि मैदानात विराट उतरला. मात्र गेल्या काही सामन्यांपासून त्याच्यामागे शतकाचे ग्रहण लागलेले दिसत आहे. रोहीतचा झंझावात संपताच विरोधी गोलंदाज लयात आले आणि केशव महाराजने शुभमनला चकवले. नव्वदीत दोन बळी मिळताच द.आफ्रिकेला हुरूप चढला आणि शम्सी, महाराज या फिरकीपटुंनी विराट, श्रेयसवर फास आवळले. महाराजने विकेट टू विकेट संथ चेंडू सोडले तर शम्सीने दोन्ही फलंदाजांचे पाय जखडून टाकले होते. 

सुसाट निघालेली आपली धावगती अक्षरशः धक्कागाडी झाली होती. विराटला ना स्ट्राईक रोटेट करता येत होते ना तो मोठे फटके मारत होता. तर केशव महाराजची अचूकता आणि शम्सीच्या निगेटीव्ह गोलंदाजीने श्रेयसला पुरते हैराण केले होते. अखेर ड्रेसिंग रूममधून रोहीतने वॉरंट पाठवताच श्रेयसची कळी खुलली. जणुकाही लंकेविरूद्धची मागचीच खेळी खेळत असल्यासारखे त्याने यान्सन, शम्सीचा समाचार घेणे सुरू केले. श्रेयसच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गोलंदाजांनी चेंडूची गती कमी केली आणि त्यांना त्याचा लगेच फायदा झाला. लुंगी ने श्रेयसला झेलबाद करताच राहुल मैदानात आला. पण पुन्हा एकदा आपल्या धावगतीने गोगलगाईचे रुप घेतले. जणुकाही आपल्या फलंदाजांनी विश्वशांतीचा वसा घेतल्यासारखे ते शांतपणे खेळत होते.

अखेर या पेचप्रसंगात आपला बळी देत राहुलने सूर्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. सूर्याने शॉर्ट बट स्वीट खेळी करत संघाची सुटका केली. त्याची १४ चेंडूतील २२ धावांची खेळी संघाचे मनोबल आणि धावगती वाढवून गेली. मात्र रिव्हर्स स्विपच्या नादात तो आपली विकेट गमावून बसला. तत्पूर्वी विराटचे खग्रास ग्रहण सुटले आणि तमाम क्रिकेटप्रेमींनी सुटकेचा निःश्वास टाकला. आपल्या वाढदिवसाला सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी करत कोहलीने आणखी एक विराट पाऊल टाकले आहे. मात्र आजची विराटची खेळी नेहमी प्रमाणे फ्री फ्लोविंग नव्हती. कुठेतरी शतकाचे स्पीड ब्रेकर त्याला रिस्क घेऊ देत नव्हते. अखेर सर जडेजा टीम इंडियाच्या मदतीला धावून आले आणि आपण सव्वा तीनशेला ओलांडू शकलो.

प्रत्त्युत्तरात द.आफ्रिकेची झालेली वाताहत कल्पनातीत आहे. समोर सव्वातीनशेचे ओझे आणि सामना होता बुमराह, सिराज, शमीच्या धारदार गोलंदाजी सोबत. त्यातही द.आफ्रिकेचे फलंदाज म्हणजे मन के हारे सब हारे होते. सिराज काय, शमी काय आणि जडेजा काय! जणुकाही हर गेंद पे लिखा है विकेट का नाम! कोण कोणाला बाद करेल याचा नेम नव्हता. इनकमींग आऊटगोईंग फ्री असल्यासारखे त्यांचे फलंदाज आतबाहेर येतजात होते. सिराज, शमी, जडेजा आणि कुलदीपने फुल लेंथ, गुडलेंथ गोलंदाजी करत द. आफ्रिकेचा अवघ्या ८३ धावांत फडशा पाडला. सध्या आपले गोलंदाज स्वप्नवत कामगिरी करत आहेत. बुमराह, सिराज प्रतिपक्षाला खिंडार पाडतात तर शमीची गोलंदाजी म्हणजे तुम मुझे गेंद दो, मै तुम्हे विकेट दुंगा सारखी असते. चायनामन कुलदीपची फिरकी आणि जडेजा ची काटेकोर गोलंदाजी भेदने विरोधी फलंदाजांना जड जात आहे.

थोडक्यात काय तर आश्वासक फलंदाजी, धारदार गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाला रोहीतच्या नेतृत्वाचा सुवर्ण मुलामा लाभल्याने टीम इंडिया अजेय झाली आहे. असा धाक्कड संघ सध्यातरी या स्पर्धेत दिसून येत नाही. ज्याप्रकारे हा संघ विरोधकांवर केवळ मात करत नाही तर मानहानीकारक पराभव करतो ते पाहता लंकेच्या नेतृत्वात इतर संघांनी टीम इंडियावर अब्रुनुकसानीचा दावा करायला हरकत नाही. टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, रोहीतची दणकेबाज सुरूवात, विराट श्रेयसची शतकी भागीदारी, विराटचे बहुप्रतिक्षित शतक, सूर्या जडेजाची छोटेखानी परंतु वेगवान खेळी, सिराज शमीचा भेदक मारा आणि जडेजाचे पाच बळी हे या लढतीचे वैशिष्ट्य ठरले. तर तब्बल दोन नो बॉल, बावीस वाईड सहीत एकंदर २६ अवांतर धावा देत द.आफ्रिकेने बेशिस्त गोलंदाजीचे दर्शन घडवले. भरीस भर म्हणून त्यांच्या कचखाऊ फलंदाजीने उरलीसुरली कसर भरून काढली.

विश्वचषकापासून टीम इंडिया अवघे दोन पाऊले दूर आहे. तोपर्यंत संघाची लय अशीच राखणं अत्यंत गरजेचे आहे. टीम इंडिया तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक उंचावण्यास जरूर सक्षम आहेत. निश्चितच आपले फलंदाज आणि गोलंदाज मिळून "हम तुम दोनो जब मिल जाएंगे, इक नया इतिहास बनाऐंगे" अशी आशा आहे. 
**********************************
दि. ०६ ऑक्टोबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Friday, November 3, 2023

मुंबईत शमी, सि'राज' ची एकहाती सत्ता!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*शमी, सि'राज' ची मुंबईत एकहाती सत्ता*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाची तुफानी घोडदौड कायम असून सातव्या लढतीत त्यांनी लंकेला अक्षरशः पायदळी तुडवले आहे. विजयाचा सत्ते पे सत्ता ठोकत टीम इंडियाने सेमीफायनलचे बुकींग कन्फर्म केले आहे. शुभमन, विराट, श्रेयसच्या घणाघाती फलंदाजीने लंकेच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले तर बुमराह, सिराज, शमीच्या वादळात लंकेच्या फलंदाजीचा पालापाचोळा झाला. मुख्य म्हणजे या महत्त्वाच्या सामन्यात लंकेला काही चुकीच्या निर्णयांचा आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा चांगलाच फटका बसला आहे.

झाले काय तर मुंबईत धावांचा पाऊस पडणार हे अपेक्षितच होते. त्यात लंकेने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजी देत आ बैल मुझे मार करून घेतले. कारण सध्या नभात जरी शरदाचे चांदणे लखलखत असले तरी आपल्या फलंदाजीचे तारें जमीं वर बहरून आले आहे. अगदी दुसऱ्या चेंडूवर रोहीत बाद होऊनही साडेतीनशे चा टप्पा सहज ओलांडल्या गेला. मुख्य म्हणजे लंकेच्या गोलंदाजांनी ताज्या खेळपट्टीवर प्रारंभी सुरेख मारा करत शुभमन विराटला चांगलेच भंडावून सोडले होते. भरीस भर म्हणून लंकन खेळाडूंनी प्री दिवाळी ऑफर देत एक कॅच वर एक कॅच फ्री सोडत आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला.

इतर फलंदाजांचे सोडा, विराटला जीवदान देऊन कांगारुंनी जी चुकी केली तिच लंकेने केली. विराट स्वतःच्या धावा तर वाढवतोच परंतु संघाचा डाव सावरत त्याला सुंदर आकार सुद्धा देतो. एकदा झेल सुटल्यावर विराटने पुन्हा हवेत फटके न मारून आपले कमिटमेंट दाखवून दिले. त्याने शुभमन सोबत १८९ धावांची मोठ्ठी भागिदारी करत लंकन गोलंदाजांना जेरीस आणले. हे दोघेही शंभरी गाठतील असे वाटतांनाच मधुशंकाने दोघांचा बळी घेतला. खरेतर रोहीतला बाद करत त्याने लंकेला झक्कास सुरुवात करून दिली होती. दुसऱ्या टोकाला चमीरा त्याला उत्तम साथ देत होता. पण या दोघांनाही कुशल मेंडीस ने आक्रमणातून लवकर काढत फार मोठी चुक केली. कदाचित या दोघांना आणखी काही षटके दिली असती तर शुभमन, विराट वर दबाव वाढला असता.

शुभमन, विराट तंबूत परतताच डावाची सर्व सुत्रे हाती घेत श्रेयस अय्यर ने फलंदाजीतला आपला बॅकलॉग पूर्ण केला. त्याने सणसणीत सहा षटकार आणि तीन चौकार ठोकत त्याच्यातला टायगर अभी जिंदा है हे दाखवून दिले. गील, कोहलीच्या प्रयत्नांना सुवर्ण कळस चढविण्याचे बहुमूल्य काम श्रेयसने केले. त्याने राहुल आणि जडेजा सोबत दोन अर्धशतकी भागिदाऱ्या करत आपली धावसंख्या गुटगुटीत केली. वास्तविकत: हा आकडा आणखी फुगला असता मात्र मधुशंकाने हाताने कमी आणि डोक्याने जास्त गोलंदाजी करत आपल्या धावसंख्येला थोडेफार वेसण घातले. त्याचे ते ऑफकटर, स्लोअर वन आणि स्लो बाऊंसर आपल्या दिग्गज फलंदाजांना चकवून गेले. त्यातही त्याने गील, विराट आणि श्रेयसला ज्या खुबीने बाद केले ते पाहता त्याला फलंदाजांना नव्वदीत बाद करायचे पेटंट नक्कीच मिळू शकते.

लंकेची फलंदाजी पाहता साडेतीनशेच्या वरचे लक्ष्य म्हणजे त्यांच्या साठी दिल्ली (कोलोंबो) बहोत दूर है सारखे होते. शिवाय बुमराह,सिराज आणि शमीचे त्रिकुट ज्याप्रकारे आग ओकत आहे ते पाहता हा गोवर्धन ते पेलू शकणार नाही हे निश्चित होते. तरीपण ते एक सभ्य, सुसंस्कृत प्रतिकार  करतील असा अंदाज होता. मात्र झाले उलटेच. आपल्या वेगवान तिकडीने त्यांना पळता भुई थोडी केली. स्विंग, सिम आणि पेसच्या वावटळीत हाय काय नाय काय करत लंकेचा फलंदाजीचा हवामहल सफाचट झाला. कोण फलंदाजीला येत आहे, कोण बाद होत आहे, काही कळतच नव्हतं. बुमराहने पहिल्याच चेंडूवर त्यांचे नाक दाबल्याने सिराज, शमीसाठी त्यांनी तोंड उघडे करून टाकले. जणुकाही आशिया चषकातील सिराजच्या गोलंदाजीचा रिप्ले पाहत आहोत असे वाटत होते.

सिराजने त्याच्या पहिल्या दोन षटकांत तीन फलंदाजांना बाद करत लंकेचे कंबरडे मोडून काढले. सोबतच लायसन्स टू किल असलेल्या शमीने बेछूट गोळीबार करत लंकेच्या उरल्यासुरल्या आशा आकांक्षांना मुठमाती दिली. आपल्या वेगवान गोलंदाजांना तोंड देऊ शकेल असं एकही नांव, फलंदाज लंकेकडे नव्हता. शमीने पाच फलंदाजांना केवळ बाद केले असे नव्हे तर स्विंग चीज क्या है आप मेरी जान लिजीए याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. दुर्दैवाने लंकेकडे आपल्या त्रिकुटांचे मिसाईल थोपवण्याची डोम यंत्रणा नव्हती. त्यांची वाताहत कोणीही थांबवू शकले नाही. लंकन समर्थकांची अवस्था तर इस दिल के टुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहां गिरा सारखी होती.

टीम इंडियाचे चाहते मात्र या विजयाने गदगदून गेले आहेत. या विजयाने सेमीफायनलच्या घाटात, टीम इंडिया थाटात पोहोचली आहे. निव्वळ फलंदाजी अथवा गोलंदाजी नव्हे तर क्षेत्ररक्षकांनी सुद्धा सुंदर झेल टिपत आपली कामगिरी चोख बजावली आहे. तरीपण या स्पर्धेत ज्या प्रकारे आपले गोलंदाज लाईन, लेंथ ची लय टिकवून आहेत आणि सातत्याने बळी घेत आहेत ते पाहता ते आपल्या फलंदाजांपेक्षा काकणभर सरस आहेत असे वाटते. सिराज, शमी बळी मिळवत असतांना सुद्धा रोहीतने त्यांना आणखी न थकवता, त्यांच्या वैयक्तिक विक्रमाच्या नादी न लागता गोलंदाजीत बदल करत आपल्या नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली आहे. पूर्वी आपण फलंदाजीच्या दादागिरीने जिंकत होतो. प्रथमच आपल्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरवली आहे. थोडक्यात काय तर फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी मिले सूर मेरा तुम्हारा केल्याने टीम इंडियाचा वारू चौखुर उधळला आहे. सध्यातरी टीम इंडिया अनस्टॉपेबल असून एकमेव द.आफ्रिकेचा संघ आपल्याला टक्कर द्यायच्या स्थितीत दिसून येत आहे.
*********************************
दि. ०३ ऑक्टोबर २०२३ 
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...