Monday, July 28, 2025

मॅंचेस्टरचा मुकाबला बरोबरीत

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

      मॅंचेस्टरचा मुकाबला बरोबरीत 

       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात झुंजार खेळी करत मालिका जिंकण्याचे इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले आहे. तब्बल दिडशे षटकांच्यावर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करून दमल्या भागलेल्या भारतीय संघाने बेन स्टोक्स ॲन्ड कंपनीचा मारा बोथट करत सामना अनिर्णित राखला आहे. खरेतर हा भारतीय संघाचा नैतिक विजय आहे. कारण ३११ धावांची ऊधारी चुकवतांना भोपळा न फोडताही दोन मोहरे गमावल्यावर ज्या प्रकारे राहुल, गील, वॅाशिंग्टन सुंदर यांनी खिंड लढवली ते नक्कीच कौतुकास्पद आहे.


झाले काय तर ही कसोटी मालिका अंतिम टप्प्यात आली असून इंग्लंड २/१ असा आघाडीवर आहे. वास्तविकत: भारतीय संघाने ३/० अशी बढत घ्यायला हवी होती. मात्र आपला संघ तुलनेत नवखा, थोडा अनुनुभवी असल्याने विजयाचा फायनल पंच आपण मारू शकलो नाही. मात्र पहिली कसोटी असो की लॅार्डसची, भारतीय संघाने पाचव्या दिवसापर्यंत झुंज दिली होती. थोडक्यात काय तर इंग्लंडला सहजासहजी विजय मिळवता आला नव्हता. अर्थातच शुभमन गिलचा संघ म्हणजे “छोटा बच्चा समझके हमको ना समझाना रे” हे इंग्लिश संघाला समजले असेलच.


राहिली बाब चौथ्या कसोटीची तर पहिल्या दिड दिवसात पीच गोलंदाजांच्या प्रेमात असल्याने भारतीय संघाची फलंदाजी बहरली नाही. जैस्वाल, राहुल, साई सुदर्शन आणि पंत ला चांगला स्टार्ट मिळूनही ते मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. आयसीसीने पंत ला संघनिरपेक्ष खेळाडू म्हणून घोषित करायला हवे. कारण तो नक्की कोणत्या संघाकडून खेळतो, कोणत्या संघाला फायदा पोहोचवतो हे शेवटपर्यंत गुपित असते. ग्लॅमरस किंवा चित्रविचित्र फटकेबाजी करून तो स्वत:ला आणि आपल्या संघाला शारिरिक मानसिक इजा पोहोचवतो.


त्याचे बेधडक खेळणे कधी बेपर्वाई बेजबाबदारपणात परिवर्तित होते ते सांगता येत नाही. म्हणूनच “आले पंतच्या मना तेथे कोणाचे चालेना” असे म्हणावेसे वाटते. पंतची शारीरिक जखम भारतीय संघाच्या मनात खोलवर जखम करून गेली. तर लोअर ॲार्डर ३१४/६ ते ३५८/१० असा पुन्हा एकदा कोसळला. परत एकदा मोठी धावसंख्या उभारून इंग्लंडला कचाट्यात पकाडायची संधी आपण गमावली. त्यातच दुसऱ्या दिवशी इंग्लंड फलंदाजीला येताच पीचने रंग बदलला. अचानक पीच इको फ्रेंडली म्हणजेच बॅटर फ्रेंडली झाल्याने इंग्लंडचे चांगले फावले.


भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा आणि खेळपट्टीचा सॅाफ्ट कॅार्नर मिळताच इंग्लंड संघाने त्यावर ६६९ धावांचा प्रेमग्रंथ रचला. क्राऊली, डकेट, पोप पाठोपाठ रूट, स्टोक्सने दणदणीत दिडशतकी खेळी करत भारतीय गोलंदाजीची पिसे काढली. भरीस भर म्हणून त्यांच्या “लोअर ॲार्डरने संघाचे हमदर्द बनत साथ दिली, जी आपल्या साठी सरदर्द ठरली”. बुमराहची अंगदुखी आता भारतीय संघाची डोकेदुखी ठरली आहे. त्यातच सिराजची मेहनत प्रत्येक वेळी रंगत आणेलच असे नाही. तर ठाकूरचा शार्दूलविक्रिडीत समास अजूनही क्रिकेट रसिकांना अगम्य आहे. “आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू संघ लाडके” या न्यायाने तो आजही संघात कायम आहे.


फिरकी बाबत बोलायचे झाले तर जडेजा, वॅाशिंग्टनची जोडी इंग्लंडला वेसण घालू शकली नाही. लॅार्ड्सचा कटू अनुभव पाहता ३११ धावांची पोकळी कशी भरून काढणार ही चिंतेची बाब होती. त्यातच जैस्वाल, साई सुदर्शनने नमनाला घडीभर तेल ओतल्याने पुन्हा एकदा आपला शेअर बाजार गडगडण्याची दाट चिन्हे दिसत होती. मात्र कर्णधार गील आणि राहुलने मान खाली घालून फलंदाजी केली. या दोघांनी १८८ धावांची भक्कम भागीदारी रचत इंग्लंडला थोपवले. मात्र स्वराज्यावरचे संकट काही टळले नव्हते. हे दोघेही माघारी परतताच सगळी भिस्त जडेजा, सुंदर जोडीवर होती. कारण पंत जायबंदी झाल्याने त्याचे काही खरे नव्हते. तर शार्दूल सहीत लोअर ॲार्डर वरूण राजाकडे आस लावून बसले होते.


अखेर या डाव्याखुर्या दुक्कलीने सर्वस्व पणाला लावत बाजी मारली. दोघांनीही दमदार शतक झळकावून इंग्लंडचा हिरमोड केला. लढत भलेही बरोबरीत सुटली तरीदेखील आपल्या संघाची त्यांनी अब्रू राखली. अन्यथा मालिकेतील अंतिम सामना केवळ औपचारिकता राहिला असता. मात्र हा सामना बरोबरीत सुटताच भारतीय संघाला शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तर दुसरीकडे इंग्लंडला मालिका जिंकण्यासाठी शेवटच्या कसोटीत भारतीय संघाचा पायबंद करावा लागेल. 


हा सामना अनिर्णित राखण्यात इंग्लंड संघाचा अप्रत्यक्ष हात दिसून येतो. ज्याप्रकारे त्यांनी चौथ्या आणि पाचव्या दिवशी झेल सोडले ते पाहता क्षेत्ररक्षणाचे महत्व अधोरेखित होते. गील, जडेजाचे झेल सोडून त्यांनी स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेतली. तर आतापर्यंत मालिकेत सर्वाधिक त्रासदायक ठरलेल्या बेन स्टोक्सचे जखमी होणे भारतीय संघाच्या पथ्यावर पडले. निसर्ग सुद्धा भारतीय संघासाठी तारणहार ठरला. एकतर पीच स्लिपींग ब्युटी, त्यातच कधी पावसाचे शिडकावे तर कधी अपुरा प्रकाश मदतीला आला. सामना अनिर्णित अवस्थेकडे मार्गक्रमण करत असताना कहाणीत एक ट्वीस्ट बाकी होते, खरेतर ते मानसिक द्वंद्व होते आणि याची सुरुवात केली ती इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने.


जडेजा ८९ तर सुंदर ८० धावांवर नाबाद असतांना बेन स्टोक्सने जडेजाला सिझफायरचा पर्याय दिला. मात्र हातातोंडाशी आलेल्या शतकांना आपले दोन्ही फलंदाज कसेकाय नाकारणार? स्टोक्सच्या “पुकारता चला हूं मै” ला जडेजा सुंदर जोडीने “ना ना ना ना ना रे” करत प्रत्युत्तर दिले. दोघांनीही इंग्लंडची तब्येतीत जीरवत आपापले शतक साजरे केले. या मानसिक धक्क्याने इंग्लंड संघ चिडला. त्यांना जेंटलमेन्सच्या गेम ची आठवण झाली. परंतु जखमी पंतला घातक गोलंदाजी करतांना त्यांना स्फुरण चढले होते. अखेर व्हायचे तेच झाले, भारतीय संघाने मानसिक दबाव टाकत अनिर्णित सामन्यात नैतिक विजय मिळवला.


थोडक्यात काय तर जडेजा, सुंदर लढले आणि त्यांनी इंग्लंडला रडवले. राहुल,गील,जडेजा आणि वॅाशिंग्टन सुंदरने इंग्लंडच्या नाकावर टिच्चून फलंदाजी केली. सुंदरने गॅबा २०२१, अहमदाबाद २०२१, एमसीजी २०२४ आणि मॅंचेस्टर २०२५ ला संघ अडचणीत सापडला असताना उपयुक्त कामगिरी करत संघाला तारले आहे. तर सर जडेजा संघासाठी तन की शक्ती मन की शक्ती बोर्नव्हिटा आहे. गील राहुल जोडीने ७० षटके तर जडेजा सुंदर जोडीने जवळपास ५० षटके फलंदाजी करत सामना अनिर्णित राखला. तर इंग्लंड संघाकडे शेवटच्या दिवशी रफ जागेचा फायदा घेणारा स्पेशलीस्ट फिरकीपटू नव्हता, डॅासनची कामगिरी यथातथाच राहिली. सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून जरी बेन स्टोक्सची निवड झाली असली तरीही खरी महफील लुटली ती जडेजा सुंदर जोडीनेच. 

—————————————————

दिनांक २८ जुलै २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

Sunday, July 27, 2025

एचएसईटी वर्कशॅाप २०२५

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

     *एच एस ई टी वर्कशॅाप २०२५*

—————————————————

दिनांक २३ जुलै ते २५ जुलै २०२५ ला शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर तर्फे बेसिक एच एस ई टी वर्कशॅाप आयोजित करण्यात आला होता. यांत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील जवळपास २० तर इतर आयुर्वेद महाविद्यालयातील दहा शिक्षकांचा सहभाग होता. तीन दिवसीय या प्रशिक्षण कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विविध दहा तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले असून पारंपारिक शिक्षण पद्धती आणि आधुनिक शिक्षण पद्धतीचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन काय नवनवीन उपक्रम राबवता येईल याचा उहापोह करण्यात आला, त्यादृष्टीने काय पाऊले उचलता येईल याबद्दल सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आले.


खरेतर सतत तीन दिवस ते सुद्धा सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत हा उपक्रम यशस्वीपणे राबविणे ही तारेवरची कसरत होती. परंतु डॅा राजेंद्र सोनेकर सर (अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर ), डॅा मनोज निंबाळकर सर (सचिव, स्टाफ कौन्सिल), डॅा मनिष भोयर सर (मुख्य समन्वयक एच एस ई टी), डॅा सुवर्णा व्यास (समन्वयक एच एस ई टी) यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले. अर्थातच या कामी एच एस ई टी टीमचे सदस्य डॅा अमित नकानेकर सर, डॅा विरेश बिराजदार, डॅा आकांक्षा अकुलवार, डॅा सोनाली फुलकर आणि डॅा रत्ना दामले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


“वेल बिगन इज हाफ डन” असे का म्हणतात याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी आला. साधारणपणे नवीन जागा, नवीन सहकारी, नवीन विषय म्हटले की थोडे अवघडल्या सारखे वाटते पण फर्स्ट डे फर्स्ट शो ला आम्हाला जो काही अनुभव आला तो थक्क करणारा होता. प्रारंभी सर्व सदस्यांचे एच एस ई टी टीम तर्फे हसतमुखाने स्वागत करण्यात आले. वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे वेळेत ब्रेकफास्ट वैगरे आटोपून आम्ही सर्वजण स्थानापन्न झालो. क्रिएटीव्हिटीचा सर्वोत्तम नमूना इथे बघायला मिळाला. यांत तीस सहभागी सदस्यांना सहा ग्रुप मध्ये विभागून प्रत्येक ग्रुपला कॅची नांवे देण्यात आली. जसे रिमेम्बर ग्रुप, अंडरस्टेंडिंग ग्रुप इ. मुख्य म्हणजे प्रत्येक ग्रुप मधील सदस्य नवनवीन असल्याने ट्यूनिंग जमायला वेळ लागला, पण लवकरच सर्व एकमेकांत मिसळून गेले.


सेल्फ इन्ट्रोडक्शन चा औपचारिक कार्यक्रमानंतर खरी धमाल केली ती आईस ब्रेकिंग उपक्रमाने. आपल्या मित्रांनी एकदुसर्याचे केलेले खरेखुरे वास्तव-अवास्तव वर्णन ऐकून सगळे पोट धरून हसले. वास्तविकत: हा एक शैक्षणिक कार्यक्रम होता परंतु आयोजकांनी कल्पकतेने त्याला ह्यूमन टच दिला. झाले काय तर इथे प्रत्येक सहभागी सदस्यांपैकी कुणी लेक्चरर, कुणी रीडर किंवा कुणी प्राध्यापक होते. मात्र दर दिवशी सत्राच्या प्रारंभी सामुहिक प्रार्थना केली जात होती ज्यामुळे शिक्षण, पद यांची श्रृंखला गळून आपण एक विद्यार्थी आहोत आणि या विद्यामंदिरात ज्ञानार्जनासाठी आलो आहोत ही भावना मनात घर करून गेली. या प्रार्थनेमुळे कधी कधी असे वाटायचे की आपण चक्क टाईम ट्रॅव्हल करून परत बालवयात गेलो आणि बालवाडी अथवा प्राथमिक शाळेत असल्याची निरागस अनुभूती मनाला आली.


विविध विषय आणि त्यानुसार तज्ज्ञांचे मार्गदर्शन हा या प्रकल्पाचा मुख्य गाभा होता. यानुसार पहिल्या दिवशी डॅा सई देशपांडे यांनी फिनॅामिनन ॲाफ लर्निंग, प्रिंसिपल्स ॲाफ ॲडल्ट टीचिंग, डोमेन्स आणि टॅक्सॅानॅामी यावर मार्गदर्शन केले. पाठोपाठ डॅा दीपक व्यास यांनी करिकुलम, आऊटकम्स ॲंड ॲाब्जेक्टिव्हस यावर प्रकाश टाकला. पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धात डॅा ह्रिषीकेश पाठक इनट्रॅाडक्शन टू टीचिंग लर्निंग मेथड्स, टीचिंग लार्ज ग्रुप्स यावर तर डॅा अमित नकानेकर सर यांनी कम्युनिकेशन्स यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात डॅा नीना नागदेवे यांनी मायक्रोटीचिंग ची उकल केली तर डॅा रोहित मोहरील यांनी टीचिंग स्मॅाल ग्रुप्स, वन मिनिट प्रिसेप्टर यावर प्रकाश टाकला. उत्तरार्धात डॅा अपेक्षा ढोले यांनी गिव्हिंग फीडबॅक प्रक्रियेची माहिती दिली. तर डॅा किरण टवलारे यांनी इन्ट्रोडक्शन टू असेसमेंट, असेसमेंट मेथड्स, असेसमेंट ॲाफ नॅालेज एमसीक्यू, एसएक्यू ॲंड एलएक्यू या विषयावर मार्गदर्शन केले.


तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवसाची सुरवात डॅा स्वप्निल पाटील यांच्या इंटीग्रेटेड टिचिंग या विषयावर झाली. सोबतच त्यांनी रिलाएबिलीटी आणि व्हॅलिडीटी या मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्य म्हणजे एज्युटेनमेंट या उद्देशाने चिकन डान्सची संकल्पना मांडली, जी खूपच परिणामकारक ठरली. यानंतर डॅा कल्पना टवलारे यांच्या असेसमेंट ॲाफ नॅालेज, स्ट्रक्चर्ड ओरल एक्झामिनेशन, असेसमेंट ॲाफ परफॅार्मन्स ओएससीई ॲंड अदर न्यू मेथड्स वर मार्गदर्शन झाले. तर एच एस ई टी च्या समन्वयक डॅा सुवर्णा व्यास यांनी शेवटच्या शैक्षणिक सत्रात ब्ल्यू प्रिंटींग वर सविस्तर माहिती दिली. तब्बल तीन दिवस, सहा सत्रात, दहा वक्त्यांनी विविध विषयांवर मॅराथॉन मार्गदर्शन केले. सध्या नवनवीन विषयांसोबतच परंपरागत शिक्षण पद्धती आणि आधुनिक शिक्षण पद्धतीची योग्य मांडणी केली गेली. पीपीटी, व्हिडिओज सोबतच प्रश्नोत्तरे, इंटरॲक्शन, ग्रुप टास्क, ग्रुप ॲक्टिव्हिटी द्वारे शैक्षणिक सत्रात रंगत आणली गेली. सोबतच डॅा मनिष भोयर सर, डॅा अमित नकानेकर सर आणि डॅा सुवर्णा व्यास यांच्या निरीक्षणात मायक्रोटिचिंग प्रेझेंटेड बाय पार्टिसिपंट्स पार पडले.


यानंतर वेळ होती ती समारोप समारंभाची आणि याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून श्री आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर चे प्राचार्य डॅा ब्रजेश मिश्रा सर उपस्थित होते. याप्रसंगी डॅा अनिल पावशेकर, डॅा सुप्रिया शेंडे, डॅा अरूण भटकर इत्यादी सहभागी सदस्यांनी फीडबॅक-मनोगत व्यक्त केले. तर डॅा सुवर्णा व्यास, डॅा मनिष भोयर, डॅा ब्रजेश मिश्रा सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डीन डॅा राजेंद्र सोनेकर सरांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील उपक्रमांची, भविष्यातील कार्यक्रमाची माहिती दिली. डॅा रत्ना दामले यांनी आभार प्रदर्शन केले तर डॅा अमित नकानेकर सर आणि डॉ. आकांक्षा आकुलवार यांनी समारंभाचे उत्कृष्ट संचालन केले.


थोडक्यात काय तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक द्वारे समर्थित, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर तर्फे आयोजित “बेसिक वर्कशॅाप इन हेल्थ सायन्स एज्युकेशन टेक्नालॅाजी” १००% यशस्वीपणे पार पडले आहे. मा. अधिष्ठाता डॅा राजेंद्र सोनेकर सरांचे कुशल नेतृत्व, मा. डॅा मनोज निंबाळकर सरांचे सहकार्य, मुख्य समन्वयक डॅा मनिष भोयर यांची सुसूत्रता, समन्वयक डॅा सुवर्णा व्यास यांचे मायक्रो प्लॅनिंग, डॅा अमित नकानेकर सरांचे अष्टपैलू कार्य, संपूर्ण  एच एस ई टी टीम चे रिअल ग्राउंड वर्क, मा. वक्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहभागी सदस्यांनी हिरहिरीने भाग घेणे, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग ह्या बाबी कार्यक्रमाच्या सफलतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठरल्या. 


यांत आयोजकांचे विशेष कौतुक करावे लागेल. कुठेही धांदल नाही की कुठेही गडबड नाही, अनावश्यक धावपळ नाही की कुठेही विसंगती नाही. प्रत्येक काम, प्रत्येक बाबी अगदी वेळेवर आणि निटनिटकेपणाने होईल याची दक्षता घेतली गेली. वक्तशीरपणा हा या कार्यक्रमाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट होता. प्रत्येक जागी आयोजकांनी घेतलेली मेहनत, कामाविषयी समर्पण, प्रयत्नात प्रामाणिकपणा झळकत होता. अगदी पहिल्या दिवशी जो उत्साह, कामाचा जो टेम्पो दिसला, तोच तिसऱ्या दिवशी पर्यंत कायम होता. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे तिन्ही दिवस मग ते ब्रेकफास्ट असो की लंच, प्रत्येक दिवशी नवनवीन आणि रुचकर पदार्थांनी जेवणाची गोडी वाढवली होती.  संपूर्ण जीएसी-एच एस ई टी टीमचे या उत्कृष्टपणे राबवलेल्या कार्यक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन, मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा! 

————————————————

दिनांक २७/०७/२०२५

डॅा अनिल पावशेकर, नागपूर 

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

Tuesday, July 15, 2025

लॅार्ड्सचा बखरनामा

 @#😈😈😈😈😈😈😈😈@#

            “लॅार्ड्सचा बखरनामा”

       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की लॅार्ड्सच्या रणभूमीवर झालेल्या निकराच्या लढाईत भारतीय संघ धारातीर्थी पडला असून इंग्लंड संघाने मालिकेत २/१ अशी बढत घेतली आहे. दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला आपल्या क्रिकेट प्रेमींच्या ह्रुदयासोबतच फुफ्फुस किडनी आतडे जिंकायची नामी संधी होती परंतु वारंवार विजयश्रीला अव्हेरणे भारतीय संघाला महाग पडले आणि हातातोंडाशी आलेल्या विजयाला मुकावे लागले. गोलंदाजांच्या मेहनतीला कधी क्षेत्ररक्षकांनी तर कधी फलंदाजांनी साथ न दिल्याने पहिल्या कसोटी प्रमाणे तिसऱ्या कसोटीतही आपल्या संघावर पराभवाची नामुष्की आली आहे.


झाले काय तर दोन्ही संघाने प्रत्येकी एक एक सामना जिंकल्याने मालिकेतली रंगत वाढली होती. त्यातही तिसरा सामना प्रसिद्ध लॅार्डस मैदानावर असल्याने त्याला आणखी ग्लॅमर प्राप्त झाले होते. मागील दोन लढतींचा अनुभव लक्षात घेता बेन स्टोक्सने चतुराईने प्रथम फलंदाजी पत्करली. पहिल्या दिवशी लॅार्ड्चे उत्साही वातावरण, हिरव्याकंच नैसर्गिक आवरणातील मंद मंद खेळपट्टी जणुकाही मंदाकिनी सारखी गुबगुबीत. गच्च भरलेले मैदान, लक्षणीय प्रेक्षणीय चढउतार! ना फलंदाजांवर मोहीत ना गोलंदाजांच्या प्रेमात. हाच तोरा या पीचने पहिले तीन दिवस दोन्ही संघांना दाखवला, जे काही करायचे आहे ते तुम्ही करा. कारण स्पष्ट होते, मेरेही पास तुझे आना है, तेरेही पास मुझे जाना है.


खेळपट्टीचा अंदाज घेऊन इंग्लिश संघाने बॅझबॅालला तिलांजली देत चक्क संथबॅाल खेळी केली. विशेषतः दुसऱ्या दिवशी बुमराहच्या स्विंग, सिमने इंग्लिश तंबूत वादळ निर्माण केले पण पुन्हा एकदा चेंडू बदलल्याने आपल्या गोलंदाजांना त्याचा फटका बसला. तरीही इंग्लंडला २७१/७ रोखण्यात यश आले होते. पण पुन्हा एकदा आपला संघ इंग्लंड संघाला चिरडण्यात अपयशी ठरला. जणुकाही इंग्लंड संघ क्रश असल्यासारखे आपले गोलंदाज, क्षेत्ररक्षक त्यांच्यावर भाळले आणि शेपटाने ११६ धावा जोडून धापा टाकणार्या संघाला चारशेच्या जवळपास घेऊन गेले.


इंग्लंडची धावसंख्या फुगल्याने आपल्या संघाला कमीतकमी १०० धावांची आघाडी घेणे गरजेचे होते आणि आपली वाटचालही तशीच सुरू होती. विशेषत: राहुलच्या शतकाने आपल्या आशा पल्लवित झाल्या होत्या पण पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीला शिघ्रपतनाने ग्रासले. जिथे इंग्लंड संघाने २७१/७ ते सर्वबाद ३८७ अशी झेप घेतली, तिथे आपण ३७६/६ ते सर्वबाद ३८७ असे गळपटलो. ना आघाडी मिळाली ना सामन्यात वरचढ होता आले. दोन्ही संघांनी सारखीच धावसंख्या रचल्याने तिथे “आजा मेला नातू झाला” हिशोब बरोबर झाला अशी स्थिती होती. पहिले तीन दिवस निकालाच्या दृष्टीने वांझोटे ठरले होते.


मात्र तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात झॅक क्राऊलीने खोडसाळपणा केल्याने भारतीय संघ खवळला आणि तिथे एकदमसे वक्त बदल दिये, जज्बात बदल दिये, जिंदगी बदल दिये, हालात बदल दिये अशी परिस्थिती निर्माण झाली. साध्या वरणासारखी भासणारी कसोटी अचानक दाल तडका वाटू लागली. भारतीय संघात तिसऱ्या दिवसाअखेर ॲड्रीनॅलीन रश निर्माण झाले आणि त्याचा फटका इंग्लंड संघाला चौथ्या दिवशी बसला. भरीस भर म्हणून पीच गोलंदाजांकडे आक्रुष्ट झाली. स्विंग आणि बाऊंसने फलंदाजांची भंबेरी उडविली. विशेषतः सिराजने तिखट मारा करून इंग्लंडला गळती लावली तर वॅाशिंग्टनने सुंदर मारा करत बुमराहच्या साथीने इंग्लंडला १९२ धावांत गुंडाळले.


लॅार्ड्सवर तिरंगा फडकवण्यासाठी टीम इंडियाला फक्त १९३ धावा हव्या होत्या मात्र पीच ची स्थिती पाहता अब तेरा क्या होगा कालिया अशी मनात शंकेची पाल चुकचुकत होती आणि झालेही तसेच. पहिल्या तीन दिवसात २० बळी घेणाऱ्या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी तब्बल १४ फलंदाज प्राणास मुकले. पाचव्या दिवशी राहुल, पंत या अस्सल फलंदाजांवर आणि अष्टपैलू जडेजावर संघाची भिस्त होती. तर नितीश रेड्डी आणि वॅाशिंग्टन सुंदर हे दोन्ही नवोदित खेळाडू अष्टपैलू असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्यातरी ते रॅा मटेरियल आहेत, त्यांचे फिनिश्ड प्रॅाडक्ट मध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार. त्यामुळे या तिन्ही फलंदाजांचा कस लागणार होता.


मात्र जडेजाने एकाकी अपयशी झुंज दिली. भलेही बुमराह आणि सिराजने मिळून तब्बल १४ षटके खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी करत जडेजाला साथ दिली परंतु चौथ्या डावात १९३ चा गोवर्धन उचलण्यासाठी टॅाप ॲार्डरला मेहनत घ्यावी लागणार होती, जी त्यांनी नाही घेतली. असहायपणे आशाळभूत होऊन आपण बुमराह सिराजकडे धावांसाठी डोळे लावून बसलो. खरेतर हे चुकीचे होते, बैलाकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे होते. चौथ्या दिवशी ॲड्रीनॅलीन रश झालेल्या आपल्या संघाला १९३ चे लक्ष्य गाठतांना फलंदाजीत टेस्टेस्टेरॅानची निकड होती आणि त्याची जबाबदारी राहूल जडेजासह यशस्वी जैस्वाल, करुण नायर, कर्णधार गील आणि पंत यांची होती.


असे म्हणतात की विजयाला अनेक बाप असतात तर पराजय हा पोरका असतो, अनाथ असतो. तरीही फलंदाजीत जैस्वाल, करूण नायरचे अपयश ठळकपणे जाणवते. करूण नायर तर जणुकाही स्पिड गव्हर्नर लावल्यासारखा पन्नाशी ओलांडत नाही. तर पंतचा खेळ, त्याचे धावबाद होणे संघासाठी दुर्दैवी ठरले. सलामीला जैस्वालला जोफ्रा आर्चरने दोन्ही डावात सहज गिळले तर इंग्लंडने पहिल्या डावात गील चे फुटवर्क रोखतांना विकेट किपरला वर आणून त्याची नाकाबंदी करून टाकली होती. तसेच त्यांनी दुसऱ्या डावात पंत फटकेबाजी करू शकणार नाही अशा प्रकारे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण लावले. मुख्य म्हणजे आपण पहिल्या डावात ३१, दुसऱ्या डावात ३२ अवांतर धावा देत स्वतःसाठी खड्डा खोदला होता.


थोडक्यात काय तर चौथ्या डावात आपल्या फलंदाजांचा अग्नीपरिक्षा होती, ज्यात ते खरे नाही उतरले. तर पहिल्या डावात इंग्लंडला लवकर गुंडाळण्यात आपण अपयशी ठरलो. पहिल्या डावात आपल्या क्षेत्ररक्षकांची गचाळ कामगिरी, दोन्ही डावातल्या अतिरिक्त ६३ धावा ह्या चुका टीम इंडीयाच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. तर केएल राहुलचे शतक, जडेजाचे फायटींग स्पिरिट, सिराज बुमराह जोडीची तुफानी गोलंदाजी ह्या प्लस पॅाईंट ठरल्या. तर बेन स्टोक्स कर्णधार म्हणून गील पेक्षा उजवा ठरला.  जोफ्रा आर्चरने तो कसा खास गोलंदाज आहे हे त्याच्या वेगवान आणि अचानक उसळत्या चेंडूने दाखवून दिले. इंग्लंड गोलंदाजांचे झपकन आत येणारे चेंडू भारतीय फलंदाजांना खेळणे अवघड होते. दुर्दैवाने भारतीय संघाला चौथ्या दिवशी संध्याकाळी आणि शेवटच्या दिवशी फलंदाजी करावी लागली, तेव्हा खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजीला अनुकूल होती, हा मुद्दा सुद्धा तेवढाच जय पराजयावर परिणामकारक ठरला. 

—————————————————

दिनांक १५ जुलै २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————


Monday, July 7, 2025

दो पंछी दो तिनके, ले के चलें है कहां

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

“दो पंछी दो तिनकें,लेके चले है कहां”


       ✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️

—————————————————

२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो परंतु भारतीय कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने ०६ जुलै हा सर्वात मोठा दिवस मानायला हरकत नसावी. कारण कोणत्याही स्टार फलंदाज किंवा गोलंदाजां शिवाय टीम इंडियाने एजबस्टनला इंग्लंड संघाला तब्बल ५८ वर्षांनी मातीत लोळवण्याचा भीमपराक्रम गाजवला आहे. पतौडी, वाडेकर, वेंकटराघवन, कपिल देव, अझरुद्दीन, धोनी, कोहली आणि बुमराह या दिग्गज कर्णधारांना एजबस्टनचा गड सर करता आला नव्हता पण हे शिवधनुष्य शुभमनने पेलले आणि ही कसोटी दिल का नव्हे तर गील का मामला आहे हे सिद्ध केले.


झाले काय तर पहिल्या कसोटीत दुधाने पोळल्याने आपला संघ दुसऱ्या कसोटीत ताक फुंकून पिणार हे नक्की होते. सोबतच फलंदाजीत लोअर अॅार्डर असो की क्षेत्ररक्षण, दोन्ही जागी कायदे में रहोगे तो फायदेमे रहोगे हे जाणून होते. त्यासाठी संघबदल गरजेचा होता आणि तीन बदलांसह आपला संघ इंग्लंडशी दोन हात करायला सज्ज झाला होता. तरीही बुमराहची छत्रछाया नसल्याने भारतीय संघ पोरका झाला होता. भलेही आकाशदीपचा समावेश झाला तरीही प्रतिस्पर्ध्यांच्या २० विकेट काढण्यासाठी आकाश पाताळ एक करावे लागणार यात दुमत नव्हते.


त्यातही सपाट खेळपट्टी आणि बुमहाचा वरदहस्त नसल्याने भारतीय गोलंदाजी संघाची कमजोरी कडी वाटत होती. मात्र इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाटा पीचवर गील ला “कम अॅान किल मी” केले. अर्थातच या संधीचा पुरेपूर फायदा भारतीय संघाने घेतला. जैस्वाल, गील ने तडाखेबंद फलंदाजी करत इंग्लंडच्या तोंडचे पाणी पळवले. तर वाहत्या गंगेत जडेजा, वॅाशिंग्टन सुंदरने हात धुवून घेतले. मुख्य म्हणजे शभमनने दणकेबाज द्विशतकी खेळी करत मैफिल लुटली. तंत्र, ताकद, टायमिंग आणि तिक्ष्ण नजरेचा धनी असलेल्या शुभमनने इंग्लंडच्या भूमीवर प्रिन्स युगाचा प्रारंभ केला.


प्रिन्सच्या धडक बेधडक खेळीने गलितगात्र झालेल्या इंग्लंड संघाला सिराज आकाशदीप जोडीने जेरीस आणले. वास्तविकत: मो. सिराज ढोर मेहनत करणारा गोलंदाज मात्र त्याला हवे ते यश मिळत नव्हते. निर्मल बाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याची विकेटची किरपा जणुकाही एजबस्टनसाठी थांबली होती. तर आकाशदीप इंग्लंड साठी डिफरंट फ्लेवर आणि सरप्राईज पॅकेज होतं. मात्र फळ्यावर जवळपास सहाशे धावा बघताच दोघांच्याही अंगी दहा हत्तींचे बळ आले होते. आकाशदीपने डकेट पोप ला लागोपाठ दोन चेंडूत माघारी धाडतात सिराजच्या उत्साहाला उधाण आले आणि त्याने इंग्लंड संघाचे शिरकाण केले. सिराजने आकाशदीपचा कित्ता गिरवत जो रूट, बेन स्टोक्सला लागोपाठ दोन चेंडूत तंबूत पाठवले.


भलेही हॅरी ब्रुक, स्मिथने मोठी शतके केली परंतु तरीही भारताला १८० धावांची भक्कम आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात राहुल, गील, पंत आणि जडेजाने आश्वासक फलंदाजी करत इंग्लंडला सामन्यातून बेदखल केले. शुभमनने दुसऱ्या डावात दिडशतकी खेळी करत पुन्हा एकदा आपली दादागिरी दाखवली. खरेतर भारतीय संघ ५०० धावांच्या आघाडीवर आपला डाव घोषित करू शकला असता परंतु बॅझबॅालच्या विषाची परीक्षा घेणे योग्य नसते ठरले. त्यातही एक कसोटी गमावल्याने भारताला आणखी एक पराभव नको होता. तर सहाशेच्या वरचे आव्हान इंग्लंड साठी अशक्य कोटीतली बाब होती.


टीम इंडियाच नांव पैलतीरावर न्यायची जबाबदारी पुन्हा एकदा सिराज आकाशदीप जोडीवर होती. आणि दुसऱ्या डावात इंग्लंडचा खात्मा करायचा विडा उचलला तो आकाशदीपने. सपाट पीचवर लाईन आणि लेंथवर अचूक मारा करत त्याने इंग्लिश फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. कधी चेंडू आत तर कधी बाहेर काढले. आकाशदीपचे चेंडू धरले तर चावते सोडले तर पळते असे होते. त्याची गोलंदाजीतील अशी ही बनवाबनवी इंग्लिश फलंदाजांसाठी चमत्कारिक होती. जो रूट सारख्या दिग्गज खेळाडूला त्याने ज्याप्रकारे बोल्ड करून मामा बनवले ते पाहून तमाम भारतीय चाहते नक्कीच गदगद झाले असतील.


जो रूट हा इंग्लिश फलंदाजीचा कणा आहे मात्र दोन्ही डावात भारतीय गोलंदाजांनी हा कणा मुळापासून उखडून टाकला. ज्याप्रकारे दोन्ही डावात आपली फलंदाजी शुभमन भोवती केंद्रित होती, तोच रोल जो रूटचा इंग्लंड साठी होता. दुसऱ्या डावात इंग्लंडकडे सामना अनिर्णित ठेवणे हा पर्याय उपलब्ध होता पण त्यांनी बॅझबॅाल एके बॅझबॅालचे पाढे म्हटले. प्रत्येक वेळी तुम्ही जिंकणारच असे नाही, कधी कधी लढत अनिर्णित राखणेही नैतिक विजय मानला जातो. मात्र इंग्लिश फलंदाजांना टॅाप गिअर शिवाय दुसरा गिअर माहिती नसावा. एजबस्टनचा अभेद्य गड शुभमन, सिराज, आकाशदीप या त्रिमुर्तींनी सर केला.


शुभमनच्या अद्वितीय कामगिरीचे जेवढे कौतुक करावे तितके ते कमी आहे. मात्र सिराज आकाशदीप द्वयीने सामन्यात रंगत आणली. दोघांनीही प्रत्येकी एका डावात ६/६ बळी टिपले. दोघांनीही फुल लेंथ, शॅार्ट ॲाफ गुड लेंथ, शॅार्ट लेंथवर प्रत्येकी १/१ बळी घेतले तर गुड लेंथवर प्रत्येकी २/२ बळी मिळवले. पहिल्या डावात सिराजने सहा इंग्लिश फलंदाजांना सुपुर्दे खाक केले तर दुसऱ्या डावात आकाशदीप ने सहा इंग्लिश फलंदाजांना ढगात पाठवले. मुख्य म्हणजे या दोघांनाही क्षेत्ररक्षकांनी उत्तम साथ देत मागील सामन्यातले प्रायश्चित्त घेतले. या दोन्ही लो प्रोफाइल गोलंदाजांनी आपल्या मनगटाच्या बळावर प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे हे दाखवून दिले. या दोघांच्या कामगिरीवर अवघे क्रिकेट चाहते फिदा असून भविष्यातही ते आपल्या कामगिरीत सातत्य राखतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.


भारतीय कसोटी संघाच्या कक्षा रूंदाणारा हा विजय आहे. सेना देशांमध्ये (साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ॲास्ट्रेलिया) मालिका बरोबरीत आणणारा हा विजय आहे. शुभमनचा कर्णधार पदावरील पहिलाच विजय आहे. तर किंग कोहलीच्या राजेशाही नंतर प्रिन्स युगाच्या नांदीचा हा विजय आहे. १९७१ चा वाडेकरांच्या नेतृत्वाखालील विजय, २००१ साली ॲासी विरुद्ध कोलकात्याचा विजय आणि गॅबावर पुन्हा एकदा ॲासी वरील कसोटी विजय जेवढा मोठा, तेवढाच किंवा त्यापेक्षा काकणभर सरस हा विजय म्हणता येईल. “टूटा है गाबा का घमण्ड” नंतर “चकणाचूर हुआ एजबस्टन का गुरूर” असे नक्कीच म्हणता येईल. थोडक्यात काय तर गील च्या शुभ नेत्रुत्वात सिराज आकाशदीप हे दोन गोलंदाज म्हणजे “दो पंछी दो तिनके देखो ले के चले है कहां, ये बनाएंगे इक आशियां” असे म्हणावेसे वाटते.

—————————————————

दिनांक ०७ जुलै २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...