Tuesday, November 16, 2021

कांगारूंचा विश्वचषकावर कब्जा, उत्तरार्ध

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*कांगारूंचा विश्वचषकावर कब्जा, उत्तरार्ध*
                *डॉ अनिल पावशेकर*
************************************
दि. १४ नोव्हेंबर २०२१, आपल्याकडे "बालकदिन" साजरा होत होता तर दुबईच्या वाळवंटात दोन शेजारी संघ बॉल बॅटने इतिहास रचायला आतूर होते. ऑस्ट्रेलिया आयसीसी स्पर्धांचा शहेनशहा होता तर न्यूझीलंडच्या खात्यात चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी विजेतेपद होते. ॲलन बॉर्डर पासून कांगारूंची क्रिकेट जगतावर आजतागायत काही अपवाद वगळता जबरदस्त पकड आहे. तरीपण २००७ पासून टी ट्वेंटीत त्यांचा दुष्काळ काही केल्या संपत नव्हता. अखेर दुबईची संध्याकाळ त्यांच्यासाठी सोनेरी पहाट ठरणार होती.तर किवी संघ अंतिम सामन्यातील आपले अपयश खोडून काढायला तत्पर होता. अर्थातच भारत पाक लढतीसारखा हा सामना हाय व्होल्टेज नसला तरी दोन्ही संघ परंपरागत प्रतिस्पर्धी असल्याने सामन्यात चुरस निर्माण झाली होती.

किवी संघाला पाऊने दोनशेच्या आत गुंडाळून कांगारुंनी अर्धी लढाई तर जिंकली होती. शिवाय पाकविरूद्ध अटीतटीच्या सामन्यात मिळालेला विजय त्यांचे मनोबल उंचावून गेला होता. पाठलाग सुरू होताच दोन्ही संघ एकमेकांवर दबाव टाकण्यास उत्सुक होते. याचीच परिणती म्हणून ॲरोन फिंचने ट्रेंट बोल्टला उचलले. मात्र त्याचा हा प्रयत्न अंगलट आला आणि तो स्वस्तात बाद झाला. आश्चर्याची बाब म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर मिशेल मार्श येताच अनेकांच्या भुवया वर झाल्या. इतक्या महत्त्वाच्या सामन्यात, स्टीव्ह स्मिथ ऐवजी त्याला पाहून किवी संघाने समाधानाचा सुस्कारा सोडला असेल. मात्र साधाभोळा दिसणारा मिशेल "लायसन्स टू किल" घेऊन आला होता. शिवाय त्याने फिंचचा बळी गेला म्हणून विधवाविलाप न करता मिलनेला चांगलेच धुवून काढले. हिच प्रतिहल्याची मानसिकता कांगारू संघाला चॅम्पियन बनवत असते.

फिंचच्या जाण्याचा फार बागुलबुवा न करता,"गई बात गणपतके साथ" म्हणत वॉर्नर, मिशेल जोडीने किवीचा बॅंड वाजवणे सुरू केले. त्यातच उजव्या डाव्या हाताच्या फलंदाजांमुळे किवी गोलंदाज आपली लय गमावून बसले. वेगवान गोलंदाज असो की फिरकीपटू या दोघांच्या तडाख्यातून कोणीही सुटले नाही. कदाचित किवी संघाने फिंच, वॉर्नर, स्मिथ, मॅक्सवेलचा अभ्यास केला असावा परंतू चुकीने त्यांना मिशेल मार्शचा पेपर आला आणि त्यांचे सगळे समीकरण बिघडले. वॉर्नर तर जणुकाही विलियम्सला समोर पाहून सनराईझर्स हैदराबाद चा हिशोब चुकता करायला बसला होता. दोन महिन्यांपूर्वी ज्या फलंदाजाला हैदराबादने संघाबाहेर करण्यात आले होते, त्या वॉर्नर ने न्यूझीलंडला "जिगरमा बडी आग है" हे दाखवून दिले.

त्याच्या प्रत्येक फटाक्यांवर बदल्याची आग स्पष्टपणे झळकत होती. अखेर बोल्टने त्याचा झंझावत रोखला. मात्र यानंतर किवी ची स्थिती "आगीतून निघून फोफाट्यात" जाण्यासारखी झाली. वॉर्नर कमीतकमी क्रिकेटींग स्ट्रोक्स तरी मारत होता. परंतु ग्लेन मॅक्सवेल म्हणजे फलंदाजीतली रम्य भुताटकीच आहे. कोणत्याही चेंडूला कुठेही भिरकवणे हा त्याच्या डाव्या हाताच मळ आहे. शिवाय सद्यपरिस्थितीत गोलंदाजांना इतकं बेक्कार त्याच्याशिवाय कोणीही मारू शकत नाही. खरेतर याकरीता जागतिक गोलंदाज आघाडीतर्फे त्याच्यावर आयसीसी कडे अब्रूनुकसानीचा दावा करायला हरकत नाही.

मिशेल मॅक्सवेल जोडीने किवी गोलंदाजांची चटणी केली. बिचारे गोलंदाज "इस दिल के टुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहा गिरा" करत हतबल झाले होते. त्यातच मॅक्सवेलच्या बॅटला चेंडू रक्ताची चटक लागताच किवींपुढे सपशेल शरणागती पत्करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अखेर १९ व्या षटकात रिव्हर्स स्विप मारुन मॅक्सवेलने विजयावर शिक्कामोर्तब केले. तब्बल १४ वर्षांच्या घोर तपस्येनंतर जेतेपद हाती लागताच कांगारू ड्रेसींग रूममध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. विशेषतः वॉर्नर,फिंच, मिशेल आणि मॅक्सवेलचा जल्लोष पाहण्यासारखा होता.

मात्र कित्येकांना कांगारूंचे सेलिब्रेशन खटकले आहे कारण मॅथ्यू वेड,मार्कस स्टोईनिस आणि ॲरोन फिंच यांनी चक्क बुटामधून बिअर पिली. या प्रकाराला "शूई" म्हणतात आणि याची सुरुवात १८व्या शतकात झाली होती. विशेषतः फॉर्म्युला वन रेसर, सुपरकार विजेते यांचे हे आवडते सेलिब्रेशन.अर्थातच विजयाने बेधुंद झालेल्या खेळाडूंना आवरणार तरी कोण. शिवाय कोणी कसे सेलिब्रेशन करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. इंग्लिश संघाने तर ॲशेस मालिका जिंकताच मद्यपान करून थेट खेळपट्टीवर मुत्र विसर्जन केले होते. बांगलादेश संघाचा नागीण डान्स, विंडीजचा गंगनम डान्स कोण विसरू शकेल. मात्र या धडाक्यातही जिंकल्यानंतर किवी संघाची विनम्रता आणि टीम इंडियाचा संयमता उठून दिसते.

एक मात्र खरे, कांगारू कर्णधार ॲरोन फिंचची या स्पर्धेतील कामगिरी विशेष नसली तरी "करून गेल गावं, झालं माझं नाव" अशी त्याची स्थिती आहे. केवळ चांगली फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण म्हणजे सामना जिंकणे नव्हे तर त्यामागे प्रबळ संघभावना आणि खेळात किलर इंस्टींक्ट असणे गरजेचे असते. उपांत्य फेरीत वेडचे लागोपाठ तिन षटकार ठोकणे असो की अंतिम फेरीत फिंच, वॉर्नर बाद झाल्यानंतर कांगारूंनी प्रतिहल्ला चढवणे असो, दोन्ही जागी ते प्रतिस्पर्धी संघाला पुरून उरले. बहुदा कांगारूंच्या याच मानसिक खंबिरतेचा अभाव इतर संघात दिसून येतो. न्यूझीलंड संघाने अंतिम सामन्यात त्यांचा फियास्को का होतो याचा विचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आयसीसीला त्यांच्यासाठी पर्मनंट रनर अपचा अध्यादेश काढावा लागेल. यानंतर लगेच किवी संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे आणि हे दोन्ही संघ विश्वचषकातले अपयश खोडून नवीन कहानी रचायला उत्सुक असणार. टीम इंडिया नवीन संघनायकासह किवींना कसे सामोरे जाणार हे लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत दोन्ही संघाला उभय मालिके करीता शुभेच्छा.
************************************
दि. १६ नोव्हेंबर २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Monday, November 15, 2021

कांगारूंचा विश्वचषकावर कब्जा

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
 *कांगारूंचा विश्वचषकावर कब्जा, पुर्वार्ध*
                *डॉ अनिल पावशेकर*
***********************************
आयसीसी क्रिकेट स्पर्धांत आपला दबदबा कायम राखत कांगारूंनी टी ट्वेंटी विश्वचषक आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात किवींना आठ गड्यांनी दणदणीत मात देत प्रथमच टी ट्वेंटीचे जेतेपद पटकावले आहे. एकतर्फी झालेल्या या लढतीत आपल्या साधारण गोलंदाजी नंतरही कांगारू फलंदाजांनी मनसोक्त फलंदाजी करत किवींना सामन्यात परतण्याची एकही संधी दिली नाही. काट्याच्या लढतीत विजिगीषु वृत्ती अंगी बाळगत फिंच ॲंड कंपनीने मैदानावर निर्विवाद वर्चस्व गाजवत आपणच कसे सिकंदर आहोत हे क्रिकेट जगताला दाखवून दिले आहे. अंतिम सामना कसा खेळायचा असतो, प्रतिस्पर्धी संघाचे मानसिक खच्चीकरण कसे करायचे असते याचा परिपाठ जणू कांगारू संघाने दाखविला आहे.

सामन्याच्या प्रारंभीच फिंचने नाणेफेक जिंकत नि:संकोचपणे गोलंदाजी पत्करली. कारण त्याला आपल्या संघाच्या कामगिरीवर शंभर टक्के विश्वास होता. न्यूझीलंडने सुरूवात तर चांगली केली मात्र समोर जोश हेजलवूड येताच किवी एक्स्प्रेसला ब्रेक लागला. हेझलवूडने जणुकाही कॉम्प्युटराईज्ड डिझाईन केल्यासारखी काटेकोरपणे लाईनलेंथ गोलंदाजी करत किवी फलंदाजांना चांगलेच जखडून टाकले. ग्लेन मॅकग्रा नंतर क्वचितच अशी सुरेख गोलंदाजी बघायला मिळत आहे.त्यातच पहिला बळी जाताच गुप्टील, विलियम्सने अकराव्या षटकापर्यंत ढक्कलगाडी केल्याने त्यांना फार धावा जमवत्या आल्या नाही. खरेतर इथेच किवी संघाने सामन्यातली आपली लय घालवली होती. 

मात्र याची भरपाई त्यांनी मिचेल स्टार्क कडून वसूल करायला सुरुवात केली. ज्या हेझलवूडने अप्रतिम गोलंदाजी केली त्याने स्टार्कच्या गोलंदाजीवर विलीयम्सचा सोपा झेल सोडला. मात्र कांगारूंनी त्याचा हसन अली होणार नाही याची दक्षता घेतली. कारण विलीयम्सला जिवदान मिळताच त्याच्या अंगी दहा हत्तीचे बळ आले आणि त्याने डोईजड होणाऱ्या कांगारूंना लोळवणे चालू केले. विशेषतः मिचेल स्टार्कला आवडते खाद्य असल्यासारखे किवींनी फाडून खाल्ले. कधीकधी घातक गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा स्टार्क या सामन्यात शुद्ध शाकाहारी प्राणी झाला होता. किवींनी त्याच्या चार षटकात तब्बल साठ धावा चोपून त्याचा पार चोथा करून टाकला.

केन विलीयम्स खेळपट्टीवर असेपर्यंत किवी संघ दोनशेच्या जवळपास जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. कारण तो ज्याप्रकारे सहजसुंदर फलंदाजी करत होता तोपर्यंत ते नक्कीच शक्य होते. मुर्ती लहान पण किर्ती महान असणाऱ्या विलीयम्सने आडदांड कांगारूंचा तोडीस तोड मुकाबला करत धडाकेबाज ८५ धावा ठोकल्या. त्याने किवी संघाला साथ दिली मात्र इतर फलंदाजांनी त्याला पुरेशी साथ दिली नाही. मिशेल, गुप्टील, फिलिप्स, निशम यांना आपापल्या खेळीला फायनल टच देता आला नाही आणि किवी संघ कमीतकमी २०/२५ धावांनी कमी पडला.

तब्बल चौदा वर्षांच्या वनवासानंतर ऑस्ट्रेलियाला टी ट्वेंटी चे पहिलेवहिले जेतेपद खुणावू लागले होते. स्पर्धेपूर्वी कोणाच्याही खिजगणतीतही नसलेला कांगारू संघ चक्क अंतिम फेरीत धडकला होता. त्यातच कर्णधार ॲरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथचे टी ट्वेंटीतले प्रदर्शन दारिद्र्य रेषेखालील होते. समाधानाची बाब म्हणजे सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नरला या स्पर्धेत लय सापडली होती. तर मिशेल मार्श हा खेळाडू विनोद मेहरा सारखा सहकलाकाराच्या भुमिकेत होता. त्याच्या निवडीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तरीसुद्धा तो निर्गुण निर्विकार चेहऱ्याने आपले कर्तव्य निभावत होता. ग्लेन मॅक्सवेल सारखा मानवी बॉम्ब संघात असणे कोणत्याही कर्णधाराला भुषणावह असते. फक्त तो आपल्या कंपूत न फुटता प्रतिस्पर्धी संघावर फुटावा एवढीच सर्वांची इच्छा असते. 

मुख्य म्हणजे उपांत्य फेरीत स्टोईनिस, वेडच्या दुक्कलीने पाकला ज्याप्रकारे बदडले होते ते पाहता कांगारूंची फलंदाजी किती खोलवर आहे याचा अंदाज येत होता. मागच्या सामन्यात स्टोईनिसच्या धिरोदात्त खेळीला मॅथ्यू वेडने शहाणी फलंदाजी करत "पाकमध्ये डर का माहौल" निर्माण केला होता. याशिवाय शिदोरी म्हणून पॅट कमिन्ससुद्धा उपयुक्त फलंदाजीसाठी राखीव होता. सोबतच आयसीसीसी स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा मानसन्मान आणि अनुभव कांगारूंच्या गाठीशी होता. मात्र किवी संघात उरात धडकी भरवणारे गोलंदाज होतेच कुठे. एक नवसाचा ट्रेंट बोल्ट वगळता इतर वेगवान गोलंदाज फारसे नावाजलेले नव्हते. 

किवी संघात मिचेल सॅंटनर आणि इश सोढी हे दोघे फिरकीपटू जरूर होते. मात्र त्यांचा समाचार घ्यायला फिंच, वार्नर आणि स्टीव्ह स्मिथ सक्षम होते. टी ट्वेंटीत कोणत्या गोलंदाजाला केंव्हा आणि किती मार पडेल याचा भरवसा नसतो. म्हणूनच सॅंटनर असो वा सोढी यांची स्थिती "बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी" सारखी होती. भरीस भर म्हणून खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडली होती. मैदानात टक्कर बलदंड फलंदाजी आणि सामान्य गोलंदाजीत होती. कांगारुंना जिंकण्यासाठी १७४ धावा म्हणजे "ऊंट के मुंहमे जिरा" सारखे होते आणि शेवटी झालेही तसेच.
क्रमशः,,,,
************************************
दि. १५ नोव्हेंबर २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Friday, November 12, 2021

मॅथ्यू वेड ची क्रेझी फलंदाजी

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                 *अगंबाई अरेच्चा*
          *मॅथ्यू वेडने "क्रेझी किया रे"*
************************************
दुबईत झालेल्या टी ट्वेंटीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात कांगारूंनी झुंजार खेळी करत पाकिस्तानला मायदेशी रवाना केले आहे. पहिल्या उपांत्य लढतीसारखीच थरारकता या सामन्यात बघायला मिळाली. दोन्ही सामन्यांत १९ वे षटक धोक्याचे ठरले असून मॅथ्यू वेडच्या घणाघाती फलंदाजीने पाक संघाला नक्कीच वेड लागले असणार. पाकच्या हातातोंडाशी आलेल्या विजयाला मॅथ्यू वेडनं क्रेझी फलंदाजी करून हिसकवले आहे. स्पर्धेत आतापर्यंत अपराजित, अबाधित असलेली बिरूदावली मिरवणाऱ्या पाक संघाची ऐनवेळी "काशीवरून आणलं आणि वेशीवर सांडलं" अशी स्थिती झाली आहे.

खरेतर कित्येक क्रिकेट पंडीतांनी अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध पाक असा रंगेल अशी भविष्यवाणी केली होती. मात्र मैदानावरील क्रिकेट सर्वांना पुरून उरले आहे. स्टार खेळाडूंना बाजूला सारून न्युझीलंडच्या डॅरेल मिशेल, जिमी निशम तर ऑस्ट्रेलियाच्या स्टोईनिस आणि वेडने आपापल्या संघाला अंतिम लढतीचे तिकीट काढून दिले आहे. दवबिंदूच्या भुताटकीचा या स्पर्धेत चांगलाच गाजावाजा झाला. मात्र आपल्या जिगरबाज खेळीने किवी आणि कांगारू या दोन्ही शेजारी संघांनी प्रतिस्पर्ध्याला डोईजड होऊ दिले नाही. वास्तविकत: पाक आणि कांगारू हे दोन्ही संघ तुल्यबळ होते. दोन्हीकडे दादा फलंदाजांची कमतरत नव्हती. शिवाय उभय संघातील गोलंदाजी तोडीस तोड होती. तरीपण ऐन मोक्याच्या वेळी कांगारू संघाचे मनोबल वाखाणण्याजोगे होते, जे त्यांच्या यशाचे गमक ठरले.

प्रथम फलंदाजी करताना पाकने डावाची दमदार सुरुवात केली होती. या सामन्यात कांगारू गोलंदाज थोडे भरकटलेले वाटत होते. त्यातच क्षेत्ररक्षकांनी झेल सोडण्याचे औदार्य दाखवल्याने पाक संघाने पाऊने दोनशे धावा सहज जमवल्या. बाबर आझम, रिझवान आणि फखर झमनने सुंदर फटकेबाजी करत कांगारूंना सळो की पळो करून सोडले होते. प्रत्युतरात कांगारुंचा प्रथमा ग्रासे माक्षिकापात झाला. तर मार्श, स्टीव्ह स्मिथ, मॅक्सवेल शादाब खानचे बळी ठरले. त्यातच वॉर्नर ची विकेट पाकसाठी दिवाळीचा बोनस ठरला. शंभरीच्या आत अर्धा संघ गारद होताच पाकचे हिरवे निशाण फडकणे सुरू झाले होते आणि इथेच कांगारूंच्या दृढनिश्चयाची कसोटी लागली होती.

धावगती बाराच्या पुढे जाताच कांगारूंचे बारा वाजणार यात दुमत नव्हते. शिवाय स्टोईनिस, वेडची जोडी फारशी वलयांकित नव्हती. मात्र या सामान्य खेळाडूंनी असामान्य धैर्य, धुरंधरता दाखवत होत्याचे नव्हते केले. सर्वात पहिले दोघांनीही संयम दाखवत आपली विकेट सांभाळून ठेवली. उद्धट हसन अलीला ठोकून काढत त्यांनी तवा गरम केला. मग या स्पर्धेत सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या शाहीन आफ्रिदीला शेकून काढले. दरम्यान मॅथ्यू वेड चा झेल टपकवून हसन अलीने पाक संघासाठी असलेली शेवटची लाइफ लाइन तोडून टाकली होती. "कॅचेस विन मॅचेस" का म्हणतात ते याचसाठी. मिळालेल्या जिवदानाचा फायदा घेत वेड ने आफ्रिदीला बुकलून काढले आणि पाक संघाला नतमस्तक व्हायला लावले.

एक मात्र खरे, पाक संघ हरला असला तरी या स्पर्धेतील त्यांचे प्रदर्शन दृष्ट लागण्यासारखे होते. उपांत्य सामन्यात त्यांना कांगारूंनी दिलेल्या धोबीपछाडीने त्यांच्या अतिउत्साही पाठीराख्यांना वेसन घातले असणार. पाकविरूद्ध भारतीय संघ हरताच उन्मादाने फटाके फोडणाऱ्यांना काल रात्री फुटलेले फटाके थोडेफार शहाणपण शिकवून गेले असणार. या स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी पाहता या संघाला कशाला तिथे पाठवले असेच वाटते. आयपीएल ग्रस्त भारतीय खेळाडू निस्तेज, निष्प्रभ आणि गलितगात्र दिसत होते. पहिल्या दोन सामन्यांत तर आपले खेळाडू फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन झाल्यासारखे खेळले. ज्या संघाविरुद्ध मर्दुमकी दाखवायची, तिथे गळपटले आणि लिंबुटिंबू संघाविरुद्ध शिलाजीत खाऊन खेळले. तरीपण उपांत्य फेरीसाठी भारतीय संघाचा पाळणा हललाच नाही. शेवटी टेस्ट ट्युब बेबी साठी टीम इंडिया अफगाणिस्तान वर अवलंबून राहीली. मात्र तिथेही "अफगाण जलेबी माशूक फरेबी" झाल्याने वांझोट्या संघाचा शिक्का टीम इंडियाच्या कपाळी लागला.

प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर भारतीय संघाची निवड चुकीची होती. मोठ्या नावापेक्षा मैदानावर कामगिरी करणाऱ्यांना डावलले गेले होते. पहिल्या दोन महत्त्वाच्या सामन्यात फलंदाजांच्या अपयशाने गोलंदाजी विस्कळीत झाली होती. उर्वरित सामन्यात भारतीय फलंदाजांनी दाखवलेली कामगिरी म्हणजे "बैल गेला आणि झोपा केला" अशी होती. अखेर आपला संघ उपांत्य फेरीपुर्वीच स्पर्धेला मुकला. निश्चितच आगामी न्युझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात बरीच कापाकापी झाली मात्र त्यासाठी दुर्दैवाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची आहुती द्यावी लागली. संपूर्ण स्पर्धेत बहारदार कामगिरी करणारा पाक संघ एका झेल मुळे, १९ व्या षटकात आपले सर्वस्व गमावून बसला. पाक संघाच्या या स्पर्धेतील गच्छंती बाबत त्यांचे पाठीराखे फारतर एवढेच म्हणू शकतात,,,
"बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले"
"बहोत बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले"
*************************************
दि. १२ नोव्हेंबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

Saturday, November 6, 2021

मंतरलेल्या दिवसांचे तंतरलेले साथीदार

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                  *अगंबाई अरेच्चा*
   *मंतरलेल्या दिवसाचे तंतरलेले साथीदार*
*************************************
आपल्या जिवनात आईवडील आणि गुरुसोबतच मित्रांचे अनन्यसाधारण महत्व असते. आपले राहणीमान, वागणूक आणि सामाजिक वावर यावर आपल्या मित्रपरिवाराचा चांगलाच ठसा उमटला असतो.Man is known by company  he keeps असे म्हटले जाते ते याकरीता. विशेषतः कॉलेजच्या दिवसातले मित्र आपल्याला जास्त जवळचे वाटतात कारण ते जास्तवेळ आपल्या सोबत असतात आणि मुख्य म्हणजे या मैत्रीला युवावस्थेचा तडका, उत्साहाची भरती आणि बेफिकरीची धुंद असल्याने एक आगळीवेगळी मजा असते. अर्थातच मैत्री हा माझा विकप्वाईंट असल्याने मी बालपणापासून माझा मित्रपरिवार चांगला जपला आहे. याबाबतीत तरी मी जो मित्रवान तो भाग्यवान आहे असे ठामपणे म्हणू शकतो.

"श्री" ८६ बॅचला ज्या बेधुंद आणि धुरंदर मित्राची संगत लाभली त्यात प्रदिप पाटीलचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आपल्या धुंदीत जगणारा हा अवलीया बाकी जगाला सिगरेटच्या  थुटक्याऐवढीही किंमत देत नसे. शर्टची वरची दोन बटने उघडून, गळा चेहऱ्यावर पावडर शिंपडून, सर्वांना दिसेल असा सोन्याचा गोफ गळ्यात घालून ही स्वारी कॉलेजच्या पोर्चमध्ये उभी राहीली की आमचे थ्रीडी स्कॅनींग चालू व्हायचे. अर्थातच आमच्या हाती काही नाही यायचे पण याच्या गळाला अलगद मासे फसायचे.

अभ्यासाच्या नावाने आनंदीआनंद असल्याने सहजा कोणी क्लासमध्ये बसण्यास अजिबात उत्सुक नसायचो. मात्र घरून आणलेले खाण्याचे डब्बे लंगरमध्ये आल्यासारखे कोणीही खाऊन मोकळे व्हायचे आणि माझी उपासमार व्हायची. परंतु प्रदिप पाटील आणि युवराज काळे हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मले असल्याने माझी पोटपाण्याची चांगली सोय व्हायची. या दोघांनी कॉलेज जिवनापासून ते आतापर्यंत कधीही मला बिलाकरीता खिशात हात टाकू दिला नाही. अशी आमची मैत्री ही कृष्णसुदाम्याच्या तोडीचीच आहे.
 
प्रदिप गांधीनगरला आणि मी देवनगरला राहत असल्याने एकमेकांकडे नियमीतपणे जाणेयेणे असायचे. जेव्हा प्रदिपच्या परिवारातील सदस्य बाहेरगावी जायचे तेव्हा मी प्रदिपकडे स्वयंपाक करून आम्ही चांगला ताव मारत होतो. आता मात्र मी पाककला विसरत चालल्याने स्वयंपाकघरात फक्त जेवनापुरती उपस्थिती लावतो.

 त्याकाळी दुरदर्शनवर युजीसीचा कंट्रीवाईड क्लासरुम नावाचा कार्यक्रम प्रक्षेपित व्हायचा. अगदी तद्वतच आमचा कंट्रीवाईन क्लासरुम प्रोग्राम असायचा. अर्थातच त्या वयात काय बरे, काय वाईट याची फारकाही समज नसल्याने किंवा आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अथवा आपण वेगळ्याच ग्रहावरचे प्राणी असल्याची गुर्मी असल्याने आम्ही कोणालाच मोजत नव्हतो ना कुणाची फिकर करत होतो. 

मात्र बाहेर कितीही बेशिस्त वागलो तरी आम्हाला आमच्या गुरूजनांचा विशेष लळा होता. कारण ते काय शिकवायचे आणि आम्ही काय समजायचो याचे काही सोयरसुतक नसल्याने आनंदीआनंद होता. मुख्य म्हणजे पहिले एकदोन क्लास होताच आमचा संयम सुटायचा, मग कधी संगम टॉकीज तर कधी आशिर्वाद टॉकीजकडे मोर्चा वळायचा. मस्तपैकी मॅटीनी शो पाहून ताजेतवाने झालो की संस्कृत किंवा स्वस्थवृत्ताच्या क्लासमधये झोपा काढायचो.

 त्याकाळी श्री राठी सर स्वस्थवृत्त तर पंडीत श्री शर्मा सर संस्कृत शिकवायचे. श्री राठी सर आमचे आवडते सर. त्यांचे ते राजबिंडे रुप, एखाद्या हिरोसारखे व्यक्तीमत्व आणि मुख्य म्हणजे युवा विद्यार्थ्यांसोबत त्यांची केमिस्ट्री चांगली जुळल्याने ते आम्हाला मित्रासारखे वाटायचे. संस्कृतचा क्लास म्हणजे आमच्यासाठी काला अक्षर भैस बराबर असायचा. परंतु खोड्या करायचो, चित्रविचित्र आवाज काढायचो आणि पंडीतजी मग अंगावर खेकसत आम्हाला क्लासबाहेर काढायचे,, याच्यात आम्हाला स्वतःचा गौरव वाटायचा.

युजी आणि पीजी आम्ही दोघेही सोबत असल्याने आमची ढवळ्यापवळ्याची जोडी नेहमी चर्चेत रहायची. विशेष म्हणजे "पीजी"ला प्रदिपने "पीजीओ" जिप घेतली आणि तो ड्रायव्हर तर मी कंडक्टर म्हणून गुरूजनांच्या सेवेत २४ तास असायचो. पीजी आटोपताच दोघांनीही आपापले वेगळे बस्तान मांडले आणि आपापल्या संसारात रमलो. परंतु नेमके एकाचवेळी दोघेही काळाच्या दुष्टचक्रात सापडल्याने चांगलेच भरडले गेलो. संदर्भ वेगळे, पार्श्वभूमी वेगळी असली तरी ज्याचे जळते त्यालाच कळते अशी परिस्थिती होती.

मात्र संकटाला संधी समजून पुढे जाण्यातच खरा अर्थ असतो. झाले काय तर संकटाने पिळून निघताच आम्ही दोघेही खऱ्या अर्थाने मुक्त झालो. अभिमान, दंभ, फुशारकी, स्वार्थ, फायदा, तोटा, नफा, नुकसान, मानसन्मान ही अवजड लक्तरे आपोआप गळून पडायला लागली आणि उरले ते निर्मळ मन. आयुष्यात संकटे तर येणारच मात्र आपण त्याला कसे तोंड देतो हे जास्त महत्त्वाचे आहे.

आज प्रदिप आयुष्यातील प्रचंड उलथापालथ पचवून ठामपणे उभा आहे. अर्थातच Behind every successful man, there is a woman हे विसरून कसे चालणार? प्रदिपच्या आयुष्यात आलेल्या वादळी तुफानाला परतवून लावतांना अर्चना वहिनीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत साक्षात सावित्रीलाही मागे टाकले. या दोघांच्या संसारवेलीवर अतिशय गोड आणि गुणी अशी रुचा आणि रिया ही फुले उमलली आहे. कर्मधर्मसंयोगाने आज प्रदिप आणि रुचा या दोघांचाही  वाढदिवस आहे. आपण सर्वांतर्फे या दोघांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि भावी जिवनाकरीता प्रभुचरणी मंगलप्रार्थना.
🌹🌹🌹💐💐💐💐🎂🎂🍰🍰🥧🥧🍮🍮🍭🍭🍬🍬🍫🍫🍫🍿🍿🌹🌹🌹🌹💐💐
डॉ प्रदिप पाटील हे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, त्रिमुर्तीनगर, नागपुरचे संचालक असून नॉन सर्जिकल कार्डीॲक उपचार पद्धतीचे तज्ञ आहेत.
*************************************
दि. ०६ नोव्हेंबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

Monday, November 1, 2021

"क्रूझायण" अंतिम भाग

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
            *"क्रूझायण", अंतिम भाग*
                *डॉ अनिल पावशेकर*
************************************
भारत पाक सामन्यात भारतीय संघाचा भुरका झाल्याने आम्ही खिन्न मनाने आपल्या रुमकडे परतत होतो. जेवनाची इच्छाच मरून गेली होती. भारतीय संघ इतक्या वाईट पध्दतीने हरल्याने अन्न कसे काय गोड लागणार हा प्रश्नच होता. मात्र कर्णमधुर, मादक आवाजातली एक घोषणा ऐकताच आमचे कान टवकारले गेले. अंगाअंगात रोमांच उभे राहिले. जणुकाही गंगास्नानाचे पुण्य लाभल्याची मनात भावना निर्माण झाली. मित्रमंडळींच्या डोळ्यात एक आश्वासक चमक दिसू लागली होती. "अंत भला तो सब भला" म्हणून सर्व आनंदाने गलबलून गेले होते. "जिसे ढुंढा गली गली, वो तो यहीं मिली" चे समाधानी भाव सर्वांच्या चेहऱ्यावर उमटले होते. केवळ आम्हीच कशाला क्रूझमधील बहुतांशी व्यक्ती "पाऊले चालती थिऐटरची वाट" चे वारकरी झाले होती. कारण ती घोषणा खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव मानणारी होती. एखाद्या सार्वजनिक विषयावर क्षणार्धात एवढे एकमत तुम्हाला कधीच आढळणार नाही. 

ती घोषणा होती ऐटीन प्लस शो (ॲडल्ट शो) ची. अर्थातच सजीव म्हटले की लैंगिकता,वासना ही नैसर्गिक भावना कोणालाच चुकली नाही. याउलट तुम्ही जितके याचा बाऊ कराल, तितकी ती भावना तुमच्या मानगुटीवर बसेल. मात्र यातील संकल्पना आणि मर्यादा याचे निश्चित असे मापदंड नक्कीच नाही किंवा ते कोणीही आखू शकत नाही. मा.न्यायालयाने ३७७,४९७ आदी कलमांचा पुनर्विचार केल्याने कित्येकांना मोकळे रान मिळाले आहे.सोबतच लिव्ह इन रिलेशनशिपचे पिल्लू सोडल्याने "मै चाहे ये करू, मै चाहें वो करु, मेरी मर्जी" अशी भावना वाढीस लागली आहे. तरीपण संस्कार, नैतिकता, प्रामाणिकता आणि स्वैराचार यात लक्ष्मणरेषा असते. याचे पालन नाही केले तर "रेखाओंका खेल है मुकद्दर, रेखाओंसे मात खा रहे हो" अशी अवस्था होऊ शकते.

अर्थातच वयस्करांची या शो साठी लगबग पाहून मानव प्रगत जरी झाला तरी तो मुळात प्राणीच आहे यावर शिक्कामोर्तब झाले. लगेच आम्ही पण फार आढेवेढे न घेता थिएटरमध्ये दाखल झालो. खरेतर कार्डेलिया एम्प्रेस हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रूझ आहे आणि याचे प्रत्येक जागी सगळ्या बाबींचे तंतोतंत पालन केले जाते. मग ते थिएटर मधला बॉलिवूड डान्स शो चा ड्रेस कोड का असेना.या शोमध्ये तोकड्या कपड्यात जवळपास पंधरा नृत्यांगना आपले नृत्य कौशल्य दाखविणार होत्या. वास्तविकत: यापेक्षाही अर्ध्या कपड्यातील टिव्ही मालिका किंवा चित्रपट आपल्या नजरेखालून गेल्याने त्यात वावगे असे काहीच वाटत नाही. मात्र या शो चे नाव ऐकून प्रत्येकजण आपापला कयास लावत असतो आणि हे आपल्या पुर्व संचित कल्पना,स्मृतीच्या आधारे असू शकते. हा फक्त नावापुरताच ऐटीन प्लस शो आहे, अश्लीलता अजिबात नाही. मात्र सौंदर्य,नृत्यदृष्टी नसणाऱ्यांनी आणि सोवळे पाळणाऱ्यांनी दोन हात दुर राहिल्यास उत्तम.

रात्रीचे अकरा वाजले होते, निशाराणीची जादू प्रत्येकवर असर दाखवू लागली होती. पंचतारांकित थिएटर, दणक्यातले संगित आणि समोर होता सर्वांगसुंदर अप्सरांचा घोळका. कमनीय बांधा, सळसळते तारुण्य,दिलखेचक अदा,नृत्यचपलता आणि संगतीला एकसे बढकर एक बॉलिवूडची भन्नाट गाणी. जणुकाही आपण चुकून स्वर्गात तर आलो नाही ना असा भास होत होता. काय ती सुंदरता, काय ते तारुण्य, काय ते पददालीत्य,,, "एकदम झकास, बोले तो नंबर वन" असा नृत्याविष्कार त्यांनी सादर केला. सोबतच नाजुकता,मादकता आणि "दिलकी नजरसे, नजरोंकी दिलसे" चा बेजोड मिलाफ त्यांनी घडवून आणला, त्यासाठी शब्द अपुरे पडतील. शिवाय त्या जेव्हा प्रेक्षकांत येऊन नृत्य करू लागल्या तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून ह्या परीं या ग्रहावरच्या नक्कीच नाही अशी माझी ठाम समजूत झाली.

अखेर एकदाची ही नृत्यमैफिल आटोपली आणि आम्ही भानावर आलो. कुठे ते कृत्रिम संहारक हायड्रोजन बाॅम्ब आणि कुठे हे शब्द, स्पर्श, रुप, रस, गंधाचे सौंदर्य बॉम्ब. जवळपास अर्धा तासाच्या बेधुंद मैफिलीतून निघताच क्रिकेटमधील पराभवाचा लवलेशही कुठे दिसला नाही. संगीत नृत्याने रोम रोम बहरून आला होता. खरेतर इथून निघूच नये असे वाटत होते परंतु आमचा नाईलाज होता. अगदी शंभर टक्के पैसा वसूल असा हा कार्यक्रम होता. "जिंदगी भर नहीं भुलेंगी क्रूझ की ये रंगीन रात" असंच या घटनेचे वर्णन करता येईल. अखेर आणखी वेळ न दवडता आम्ही आपापल्या रूमवर परतलो.

दुसऱ्या दिवशी क्रूझ दुपारी बारा वाजता मुंबईला पोहोचणार होते. मात्र याकरीता सकाळी आठ पासूनच प्रवाशांना याबाबतीत सूचना देण्यात येऊ लागल्या होत्या. वास्तविकत: कुठेही प्रवासात आपण एक-दोन दिवस जरी मुक्काम केला तरी त्या जागेचा आपणास लळा लागतो. खाणे,पिणे आणि फिरणे एवढीच दिनचर्या असल्याने घरी परतायला कोणाला आवडेल. शिवाय तेच ते रुटीन, भाजीपाला आणा, घरातील जळमटं काढा, दळण दळून आणा, किराणा आणा,,मला तर अशा गोष्टींचा भयंकर राग येतो. मात्र घरोघरी मातीच्याच चुली असते हे आठवून मनाची समजूत घालत असतो. शिवाय क्रूझवरून परततांना सामानाची आवराआवर करणे अत्यंत कंटाळवाणे काम असते. सर्व आटोपून सामानाला कुलूप लावून बसताच एखादी कामाची वस्तू नेमकी कशी काय आत राहून जाते याचेच मला दुःख असते.

 सोबतच रुममधील सामान उचलू उचलून पाहण्याची प्रक्रिया आणखी आपला जीव घेते. पेन,चष्मा, चिल्लर पैसे, चाव्या आपली नजर चुकवून नेमक्या अडचणीच्या जागी जाऊन का फसतात हेच मला कळत नाही.  नेतांना सामान कमी असते परंतु परततांना काहीही खरेदी केले नसले तरी आमच्या बॅग्ज विहीनबाई सारख्या का फुगून बसतात कोण जाणे. काही प्रवाशांना हॉटेल,क्रूझ आणि इतरत्रही तुम्हाला वापरण्याकरीता दिलेले सामान सावडायची फार वाईट सवय असते.कवडीमोल किमतीचे टुथ ब्रश, पेस्ट, शेविंग क्रिम,बारक्या चिरक्या साबण, बोटभर शॅम्पू चोरण्यात काय आनंद मिळतो देव जाणे. काहींना चहा, कॉफी,साखरेचे छोटी पाकीटे जमा करतांना पाहून त्यांच्या दरिद्रतेची किव येते. अशा प्रवाशांमुळे म्हणूनच की काय रूम सोडताना (चेक आऊट) वेटर नेहमीच आमच्याकडे संशयाने पाहत असतो. मात्र अशा प्रसंगाला आम्ही नेहमीच धैर्याने सामोरे जात असतो.

अखेर क्रूझने एकदाचे मुंबई गाठले आणि आमचा प्रवास पुर्णत्वास आला. जवळपास दोन दिवसांच्या थोड्याफार बंदिस्त भटकंतीत मनमुराद आनंद लुटला गेला. अर्थातच याकरीता कॉर्डेलिया एम्प्रेस क्रूझ आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांचा सेवा देण्यात मोलाचा वाटा होता. इथे "अतिथी देवो भव" याचे तंतोतंत पालन केले गेले आणि हेच या क्रूझच्या लोकप्रियतेचे गमक आहे. पर्यटनाने तुमचे अनुभवविश्र्व समृद्ध होते. एवढेच नव्हे तर विचारप्रक्रियेतही मोलाची भर पडते. नवनवीन स्थळांना भेट दिल्याने जगाची नवी ओळख होते. "केल्याने देशाटन" म्हणतात ते याचकरीता. मग वाट कसली बघता मित्रांनो, भरा बॅग आणि निघा प्रवासाला. मी तर पुढे जाऊन देवाला आणखी म्हणेल मला यापुढचा ही जन्म मानवी रुपातच, याच मित्रांसोबत दे.कारण अजूनही बरेच जग पालथे घालायचे आहे, आणखी उनाडक्या करणे बाकी आहे. धन्यवाद.
प्रवास वर्णन समाप्त.
*************************************
दि. ०१ नोव्हेंबर २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...