@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*अगंबाई अरेच्चा*
*मारली वाईन तर तबियत फाईन*
************************************
सध्या देशभरात थंडीची लाट असली तरी महाराष्ट्रातील जनतेला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण लोककल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या शासनाने जनतेच्या भल्यासाठी भलामोठा निर्णय घेतला आहे. खंडणीची पार्श्वभूमी असलेल्या सरकारने जनतेच्या आनंदात खंड पडू नये तसेच अखंड तळीरामांच्या दुःखाचे परिमार्जन करण्यासाठी वाईन सुपरमार्केट, किराणा आदी जागी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. खरेतर या ऐतिहासिक निर्णयामुळे तमाम वाईनप्रेमीत आनंदाची लाट उसळली असून अखिल भारतीय तळीराम संघटनेतर्फे शासनाचे अभिनंदन करण्यात आले आहे.
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर इथल्या लोकांना सरकारच्या कामाचे मुळी कौतुकच नाही. आता वाईन जागोजागी उपलब्ध झाल्याने सरकारचे कित्येक गंभीर प्रश्न चुटकीसरशी सुटतील अशी अपेक्षा आहे. पहिला प्रश्न म्हणजे समानतेचा. निश्चितच गरिब असो वा श्रीमंत, "वाईनच्या लाईन" मध्ये खरीखुरी समानता पाळली जाते. समतेचे धोरण म्हणजे आणखी काय वेगळे हवे. सोबतच गल्लीबोळात वाईन उपलब्ध झाल्याने गरजू जनतेला उगीचच पायपीट करावी लागणार नाही. शिवाय किराणा दुकानदार ओळखीचा असल्याने अडी नडीच्या वेळी उधारी पण मिळू शकते. यातच सामाजिक सद्भावना पण जपली जाते.
केंद्राच्या "आत्मनिर्भर भारत" ध्येयाला राज्य सरकारच्या या निर्णयाने चालना मिळेल अशी सर्वत्र चर्चा आहे. आता किराणा व्यापाऱ्यांना कोणी हलक्यात घेणार नाही. तर मुली किराणा दुकान पाहून "होणार सुन मी त्या घरची" हे गाणे गातील. मुलांना सुद्धा आता उच्चशिक्षणाचे वेड राहणार नाही. बारामाही तसेच कोणत्याही जागी हमखास चालणारा धंदा म्हणून मुले मेडीकल, इंजिनिअरिंग आणि इतरही शाखेपेक्षा सरळ किराणा दुकान टाकणे पसंत करतील. वाईन विक्रीमुळे किराणा दुकानात स्पर्धा वाढल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुरासुंदरींची वर्णी लागेल. एकप्रकारे हे रोजगार निर्मितीचे साधन होईल.
महाराष्ट्रात आलेली भरभराट पाहता इतर राज्यातून इथे इच्छुकांचे लोंढे येणार आणि "घर घरसे किराणा निकलेगाच्या" घोषणा सर्वत्र ऐकू येतील. वाईनविक्री चे आधुनिक जनक म्हणून महाराष्ट्राचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात आदराने घेतले जाईल. सरकारतर्फे आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गासाठी ड्रींकींग पार्क योजना राबविण्यात येईल. तसेच नियमितपणे किराणा दुकानातून वाईन घेणाऱ्यांना "वाईनबंधन" बांधण्यात येईल. प्रत्येक किराणा दुकानाबाहेर ग्राहकांना वश करण्यासाठी "पिऊन दाखवले" च्या स्पर्धा आयोजित केल्या जाईल.
वाईन निर्णयाने किराणा दुकानांचा कायापालट होईल. मात्र किराणा सामानात एकाची भर पडल्याने गृहिणींचे बजेट बिघडू शकते. मात्र "माझे घर माझी जबाबदारी" असल्याने सरकार तिथे काय करणार? वाईनची उपलब्धता सहज झाल्याने वाईनप्रेमींच्या संख्येत अचानक वाढ संभवू शकते. मग याचाच परिणाम म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीत महापौराऐवजी "मद्यपौर आमचाच" ची मागणी होऊ शकते. कारण सर्वात जास्त राजस्व देणारे म्हणून मद्यपींना राजदरबारी मोठे स्थान असेल. पुढे चालून तर वाईनच्या राजस्वने गदगद झालेले सरकार चक्क वाईनश्री, वाईन भुषण पुरस्कार जाहीर करू शकते.
वास्तविकत: हे लोककल्याणकारक सरकार आम जनतेसाठी राब राब राबते. मग आम ऐवजी 'जाम' जनतेसाठी थोड्याफार सुधारणा केल्या तर इतरांना पोट दुखायचे कारण काय? विद्यमान सरकारच्या दृष्टीने अन्न, वस्त्र, निवारा आणि 'सुरा' (वाईन) ह्या महाराष्ट्रातील जनतेच्या प्राथमिक गरजा आहेत. शिवाय कोरोनाची तिसरी लाट सुरू असताना "दो गज की दुरी,ग्लास है जरुरी" योजना राबविण्यात वावगे ते काय असणार? तसेच कोरोनाच्या लाटेत राज्याची अर्थव्यवस्था ज्या वाईनने सांभाळली तिला आता किराणाश्रय मिळाल्याने सरकार खाल्लेल्या मिठाला आणि पिलेल्या वाईनला जागले असेच म्हणावे वाटते.
एकंदरीत काय तर या राज्याचे सर्व प्रश्न सुटले असून जनता सोनियाचे दिवस अनुभवत आहे. मागेल त्याला आरक्षण मिळाल्याने राज्यात आनंदीआनंद आहे. बळीराजा संपुर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव मिळाल्याने सुखावला आहे. बेरोजगारांना विशेष कौशल्यासाठी किराणा दुकानात नौकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आजुबाजू चोहीकडे वाईनमार्ट उघडल्याने माता भगिनी आता रस्त्यावर बिनधास्त फिरू पाहत आहे. एसटी कर्मचारी असो अथवा आणखी कोणी,,ना कुठे संप आहे, ना कुठे उपोषण. या भुतलावरील समृद्ध आणि संपन्न राज्य म्हणून आपले राज्य नावारुपाला आल्याने जनता सुखाने गदगदीत झाली आहे. फक्त आता एकच उरले आहे, एकदाचे सरकारने "मारली वाईन तर तबियत फाईन" हे ब्रीदवाक्य म्हणून जाहीर करून टाकावे. कमीतकमी दारुबंदी साठी झटणाऱ्यांना तेवढाच दिलासा मिळेल.
**********************************
दि. २९ जानेवारी २०२२
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com