Thursday, March 23, 2023

पराभवाचे पोस्टमॉर्टेम!

@#👿👿👿👿👿👿👿👿#@
           *पराभवाचे पोस्टमॉर्टेम!*
             *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
कुरुक्षेत्रावर कौरव पांडव युद्धात अर्जुनाला अभिमन्यूच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. मात्र जयद्रथ लपून बसला होता. अखेर श्रीकृष्णाने हा सूर्य हा जयद्रथ हे सांगताच अर्जुनाने आपला पण पूर्ण केला. जयद्रथ मृत्यूला टाळू शकला नाही. सांगायचं तात्पर्य इतकंच की अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताचा सूर्या यादव स्टार्क पासून लपला, तब्बल सातव्या क्रमांकावर खेळायला आला परंतु आपली विकेट तो वाचवू शकला नाही. मृत्यू अटळ आहे, फलंदाज कधी ना कधी बाद होणारच मात्र सूर्याप्रमाणे नाचक्की होऊन बाद होणे खरोखरच शरमेची बाब आहे. डर के आगे जीत है असे म्हणतात, इथेतर सतत तीन सामन्यात तिनदा गोल्डन डक, म्हणजेच पहिल्याच चेंडूवर बाद होत सूर्यकुमारने भित्यापाठी ब्रह्मराक्षस असतो हे दाखवून दिले आहे.

झाले काय तर दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती. अर्थातच शेवटचा सामना हा निर्णायक ठरला होता. दुसऱ्या सामन्यातल्या चुका टाळून भारतीय संघ हा सामना जिंकेल अशी क्रिकेट रसिकांना आशा होती आणि मैदानावर परिस्थिती सुद्धा आपल्या संघाला अनुकूल होती. भारतीय संघ २७० धावांचा पाठलाग करतांना २८ व्या षटकांत दोन बाद १४६ धावा इतक्या सुस्थितीत होता. खरेतर खुद्द ऑसी संघाला आपण हा सामना जिंकू असे वाटले नसेल. मात्र मैदानात विपरीत घडले. हाती आलेला सामना भारतीय संघाच्या मुर्दाड फलंदाजीने कांगारूंना बहाल करण्यात आला. रोहीत, गील, विराट, राहुल, पांड्या इत्यादी फलंदाजांना चांगली सुरुवात मिळूनही ते संघाला वाचवू शकले नाही.

फलंदाजीची चिरफाड करायची झाल्यास रोहितची फलंदाजी वानप्रस्थाश्रमाला लागली आहे. व्हाईट बॉल क्रिकेटचा बेताज बादशहा असलेला रोहीत तिशी गाठताच तंबूची वाट धरतो. त्याला बाद करण्यासाठी फारशी व्युहरचना करावी लागत नाही. स्क्वेअरलेग ते फाईन लेग ला त्याचे फटके म्हणजे दोन्ही संघासाठी पर्वणी असते. गेला तर षटकार नाही तर बाद. थोडक्यात काय तर उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक. सलामीवीर शुभमन गील या सामन्यात बऱ्यापैकी खेळला. त्याच्या छोटेखानी खेळीत त्याने कडक शॉट मारले. गिल बाद झाला आणि सूर्याला झाकून ठेवण्यासाठी राहुल मैदानात उतरला. त्याने विराटसोबत जवळपास सत्तर धावांची भागीदारी पण केली. सर्व काही सुरळीत चालू असताना त्याला ॲडम झाम्पाने त्याला झुकवले. 

षटकात सहापेक्षा कमी धावांच्या सरासरीचे गणित असताना राहुलने वेडे साहस करून संघाला बॅकफूटवर ढकलले. एकतर राहुलची खेळी सहामाही असते. एक चांगली खेळी करून तो बेडकासारखा हायबरनेशन (शितनिद्रा) मध्ये जातो. पहिल्या सामन्याच्या अमृत महोत्सवी खेळीच्या व्याजावर तो आणखी किती दिवस संघाला वेठीस धरून ठेवेल हे सांगता येत नाही. राहुलला बाद करत ॲडम झाम्पाने भारतीय फलंदाजीला फिरकीची झप्पी देत एकूण चार महत्त्वाचे बळी घेतले. राहुल बाद झाला तरी विराट मैदानात असल्याने सामना आपल्याच ताब्यात होता. दुर्दैवाने अक्षर पटेल स्मिथ कडून धावबाद झाला आणि भारतीय संघाला ओहोटी लागली.

अक्षरला बाद करतांना स्मिथ आणि यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरी ने जी चपळता आणि सूर मारले ते पाहता हे दोघेही खेळाडू जलतरण स्पर्धेत नक्कीच नाव कमावू शकतात. या दोघांची कामगिरी पाहता वन रनआऊट कॅन चेंज दी गेम असे म्हणावेसे वाटते. कारण इथूनच भारतीय फलंदाजीचा टेम्पो हरवला. विराटने अर्धशतक झळकावून सामन्यात जीव ओतला होता परंतु तो एकटा तरी किती पुरणार? तो बाद होताच सूर्यकूमार यादव आला आणि सामन्याचा पचका करून गेला.  गेल्या दोन सामन्यांत स्टार्कने त्याला मामा बनवले होते.या सामन्यात तर स्टार्क आपल्या मुळ रुपात नव्हता. जणुकाही त्याची झेरॉक्स कॉपी वाटत होता. तरीपण घाबरलेल्या सूर्य कुमारला ॲस्टन एगरने उडवले.

भारतीय फलंदाजीच्या सूर्याला ग्रहण जरी लागले आणि सामना ऑसींकडे झुकू लागला तरी तो आपल्या हातातून पूर्णपणे निसटला नव्हता. ९० चेंडूत ८५ धावा आणि पांड्या जडेजा ही जोडी खेळत असताना चेन्नई दूर नव्हते. फक्त गरज होती टिकून जबाबदारीने खेळण्याची. मात्र फिरकीसोबतच मिशेल स्टार्कने फास आवळणे सुरू केले आणि भारतीय फलंदाजी धापा टाकू लागली होती. पांड्या, जडेजा सारखे कसलेले अष्टपैलू खेळाडू ॲडम झाम्पाच्या मगरमिठीतून सुटू शकले नाही. या दोघांनाही झाम्पाने बाद करत भारताच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. तळाशी फलंदाजी करताना जो चिवटपणा, झुंज, प्रतिकार करावा लागतो, तो या सामन्यात दिसला नाही. तसेच आपल्या फलंदाजीत ताळमेळही दिसला नाही. जणुकाही सर्वांना आयपीएलचा होम सिकनेस झाल्यासारखे वाटत होते. शेवटी आपल्या असंघटित फलंदाजीचा कांगारूंच्या संघटीत गोलंदाजीने पराभव केला.

ऑसींतर्फे या मालिकेत मिशेल मार्श आणि मिशेल स्टार्क‌‌‌ या दुक्कलीने टीम इंडियाची दाणादाण उडविली. स्टार्कचे विशेष कौतुक करावे लागेल. आयपीएल सारख्या बाजारबसवींच्या नादी न लागता त्याने आपल्या संघाला प्राधान्य दिले. आपल्या देशासाठी खेळताना संघाशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहून त्याने संघाला आपले सर्वोच्च योगदान दिले. भारतीय खेळाडूंनी मिशेल स्टार्ककडून हे शिकायला हवे. तर स्टीव्ह स्मिथ कर्णधार पदावरून अपडाऊन होत असला आणि फलंदाजीत फारसा प्रभाव पाडता आला नसला तरी मैदानात आपल्या झुंजार व्यक्तीमत्वाने तो संघाचा खेळ उंचावतो. अक्षरला धावबाद करताना त्याची एक झलक दिसून आली होती. रुक जाना नहीं तू कहीं हार के हा कांगारूंचा मुलमंत्र आहे. विपरित परिस्थितीत सुद्धा कमबॅक करत ते चॅम्पियन सारखे खेळतात आणि सामने जिंकतात. भारतीय गोलंदाजांनी नक्कीच फलंदाजांपेक्षा उजवी कामगिरी केली. मात्र मुर्दाड फलंदाजीने गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फेरले आणि हातातोंडाशी आलेल्या मालिका विजयाला आपण मुकलो.
**********************************
दि. २३ मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Wednesday, March 22, 2023

आ अब लौट चले, अंतिम भाग

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
       *आ अब लौट चले, अंतिम भाग*
                *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
प्रवासाचा शेवटचा दिवस हा लगबगीचा असतो. यांत सर्वात अवघड काम असते ते आपल्या सामानाची आवराआवर करणे. शॉपिंग चा कितीही मोह आवरला तरी प्रथा म्हणून किंवा इतरांचे पाहून घेतलेल्या सटरफटर वस्तू अथवा कपडे बॅगचे पोट फुगवून टाकतात. त्यातही वापरलेले कपडे, वस्तू जाते वेळी प्रसरण पावून बॅगची चेन लावणे कठीण करून टाकतात. बरे झाले न्युटनने फारसा प्रवास केला नसावा, अन्यथा प्रवासात वस्तूंच्या प्रसरण पावण्याचा चौथा नियम त्याने शोधून काढला असता. आठवणीने एक एक सामान कोंबल्याने आपली बॅग विहिनबाई सारखी टम्म फुगून बसते. यांत गंमत म्हणजे ओढूनताणून एकदाची बॅग कुलुप बंद केल्यानंतर ऐनवेळी एखादी महत्त्वाची वस्तू एकतर  बाहेर राहून जाते अथवा आंत. मग पुन्हा एकदा सामानाचे इनकमींग आउटगोइंग करत बॅग बळजबरीने बंद करावी लागते.

या सर्व धावपळीत पेन, घड्याळ, चष्मा, मोबाईल चार्जर, पॉवर बॅंक, टुथब्रश आदि बारीकसारीक वस्तू लपाछपी खेळतात. कधी उशीखाली तर कधी बेडच्या खाली अथवा कपाटात लपून बसतात. एकवेळ जत्रेत हरवलेली मुलं शोधणं सोपं असतं परंतु अशा वस्तू शोधणं एक वैताग आणणारं काम असतं. अखेर एक वेळ अशी येते की घेतलं ते आपलं राहिलं ते दुसऱ्याला पावलं म्हणून रुम सोडून बाहेर निघावं लागतं. शेवटच्या दिवशी कसौलीहून संध्याकाळी पाचला चंदिगढला परतलो आणि आता वेध लागले होते घरी परतण्याचे. अर्थातच शेवटचा दिवस आपल्याला थोडा भावनिक करून जातो. एक मन म्हणते की एक दिवस अजून राहून जाऊ तर दुसरीकडे घराची ओढ लागलेली असते.

चंदिगढ ते दिल्ली परततांना शताब्दी एक्सप्रेसने जायचे ठरले होते. कारण एकतर संध्याकाळची वेळ आणि महामार्गावर वाहतुकीची दुरावस्था पाहता हा निर्णय योग्य ठरला होता. शताब्दी एक्सप्रेस १९८९ साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरुजींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आली होती. सध्या अशा प्रकारच्या पंचवीस शताब्दी एक्सप्रेस रुळावर धावत आहेत. या रेल्वेत राजधानी एक्सप्रेस सारख्या सुविधा असतात. कालका नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस चंदीगढला साडे सहाला येणार होती. आम्ही सर्वजण रेल्वे स्थानकावर पोहचतो न पोहचतो तोच अगदी वेळेवर ही एक्स्प्रेस आमच्या समोर उभी ठाकली.

मी प्रथमच एसी चेअर कार ने प्रवास करत असल्याने या प्रवासाबाबत उत्सुकता होती. प्रवास सुरू होऊन अर्धा तास होताच फराळाचा ट्रे समोर आला. फरसाण, भेळ आणि गोड पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटले. सोबतच चहा, कॉफी, आईस्क्रीम दिमतीला असल्याने मन गदगदून गेले. अन्न पुर्ण ब्रह्म म्हणतात ते याचसाठी. अर्थातच या फराळाचा फडशा पाडायला फारसा वेळ लागला नाही. खरेतर रेल्वेकडून इतक्या उत्तम सेवेची अपेक्षा नसल्याने थोडे अवखळ्यासारखे वाटत होते परंतु बदलाचे स्वागत करायलाच हवे. फराळाच्या एका तासातच पुन्हा एकदा रेल्वेने जेवणाची सोय केल्याने पोट तुडुंब भरून आले. पूर्ण कोच एसी,काचबंद असल्याने आणि रात्र झाल्याने बाहेर पाहण्याची सोय नव्हती. मात्र वाटेत कुरूक्षेत्र, पानिपत इथे थांबे असल्याने तेवढा काळ वगळता बाकी वेळ मोबाईलमध्ये गुंतून रहावे लागले.

शताब्दी एक्सप्रेसने अगदी नियोजित वेळेत दिल्ली गाठल्याने हायसे वाटले. नागपूरचे विमान दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ला असल्याने रात्री निश्चिंतपणे झोप लागली. सकाळी साडेसातला विमानतळावर पोहचलो आणि सर्व सोपस्कार आटोपत एकदाचे विमानात बसलो. प्रवासाच्या अखेरच्या टप्प्याला सुरुवात झाली. मात्र सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर त्यात नावीन्य कसले? कहानी में ट्वीस्ट अभी बाकी था! बोर्डिंग कंम्प्लीटेडची घोषणा झाली. सगळे स्थानापन्न झाले तरीपण विमान हलण्याचे नावाच घेईना. नऊ चे साडेनऊ झाले आणि वैमानिकाने घोषणा केली की तांत्रिक अडचणी मुळे उड्डाणाला विलंब होत आहे. विमान कधी उचक्या दिल्यासारखे तर कधी हुडहुडी भरल्यासारखे करत असल्याने हा तांत्रिक बिघाड कधी दुरूस्त होईल याचा अंदाज येत नव्हता. अखेर दहाच्या सुमारास विमानाने धावपट्टीवर चालणे सुरू केले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

फारतर दुपारी बारा पर्यंत नागपूरला पोहोचू असे समजून डोळे मिटून शांत बसलो होतो. एवढ्यात एका मित्राने सांगितले की विमान धावपट्टीकडे न जाता परत फिरत आहे. खरेतर ही चेष्टा मस्करी समजून मी डोळे उघडले नाही. पण थोड्या वेळाने डोळे किलकिले करून पाहिले तर मित्राचे म्हणणे खरे होते. वैमानिकाने सूचना दिली की वायुसेनेच्या कवायती साठी साडे बारा पर्यंत एअरस्पेस बंद करण्यात येत आहे आणि त्यानंतर कंट्रोल टॉवर कडून निर्देश आल्यावर उड्डाण केले जाईल. खरेतर हसावे की रडावे हेच समजत नव्हते. कमीतकमी अडीच तास एकाच जागेवर बसणे म्हणजे कंटाळवाणा प्रकार, त्यातही उड्डाणाची वेळ नक्की नसल्याने प्रवाशांत चुळबुळ सुरु झाली.

प्रवाशांनी प्रश्नांचा भडीमार करून एअर होस्टेसना भंडावून सोडले. एरवी चकार शब्दही न काढणाऱ्यांचा आवाज वाढत गेला. अखेर प्रवाशांचा असंतोष पाहता सर्वांना स्नॅक्स चे पाऊच देण्यात आले. बिस्कीट, कुकीज, फरसाण, स्वीट,फ्रुटी, चहा, कॉफीचे आंदण होताच प्रवाशांचा आवाज कमी झाला. मौका मिळताच मी दोन पाऊच मागून आपल्या पोटपूजेची सोय करून घेतली. एकतर फ्री, त्यात दोन दोन पाऊच, काय तो आनंद वर्णावा! सोबतच वातावरणातील ताण तणाव निवळावा म्हणून प्रवाशांना विमानाखाली उतरू दिले. पहिले पोटपूजा आणि नंतर फोटोबा! प्रवासी सेल्फीत दंग झाले. काही प्रवासी, ज्यांचा नियोजित प्रवासाचा खेळखंडोबा झाला ते वैतागून विमानतळ कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते. मात्र सर्वच हतबल होते. विनाकारण वादावादीत काहीच अर्थ नव्हता. अखेर या गोंधळात साडेबारा वाजले आणि या नाट्यावर पडदा पडला. विमानाला ग्रीन सिग्नल मिळताच ते आकाशी उंच झेपावले आणि नागपूर चंदीगढ नागपूर छोटेखानी प्रवासाला पुर्णविराम मिळाला.
प्रवास वर्णन समाप्त.
**********************************
दि. २२ मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Monday, March 20, 2023

मिशेल स्टार्क‌‌‌ नव्हे तर माइटी शार्क!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
   *मिचेल स्टार्क नव्हे तर माइटी शार्क*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
आमिरच्या दंगल चित्रपटातील एका दृश्यात आमिर त्याच्या गर्विष्ठ सहकाऱ्याला चीत करतो. तेव्हा तो सहकारी त्याला म्हणतो, दम है तेरे में, स्टेट लेव्हल चॅम्पियन को हराया तुने. त्यावर आमिर उत्तरतो, दिल छोटा मत कर, नॅशनल चॅम्पियन से हारा है तू. हे सांगायचे तात्पर्य इतकंच की, भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानचा दुसरा सामना पाहिला तर आपल्या क्रिकेट रसिकांना एवढेच म्हणता येईल, दिल छोटा ना करो, चॅम्पियन टीम से हारी है अपनी टीम. पहिल्या सामन्यात जीवावर आले पण बोटावर निभावले असं असताना टीम इंडियाची फलंदाजी पुन्हा एकदा कोसळली आणि कांगारूंनी मालिकेत बरोबरी साधली. खरेतर सामना म्हटला की हारजीत तर होणारच, मात्र आपले रथी महारथी फलंदाजीत एखाद्या धबधब्या सारखे कोसळले त्याचे वाईट वाटते.

झाले काय तर आपण अतिथी देवो भव: परंपरेला कट्टरपणे जागतो. कसोटी मालिकेतही ऑसी संघाला दोनदा आपटले आणि तिसऱ्यात आपण पटकनी खाल्ली. असेच काहीसे एकदिवसीय मालिकेत पहायला मिळत आहे. आपला संघ विजयात, प्रदर्शनात सातत्य केव्हा आणणार हा प्रश्नच आहे. कदाचित पाहुण्या संघाला नाराज न करण्याचा त्यामागे उदात्त हेतू तर नसेल ना असा संशय येतो. तसेही आपल्या कडे सध्या जी २० चा उरुस चालू आहे आणि त्यात ऑस्ट्रेलिया सहभागी आहे. मग कसेकाय आपण पाहुण्यांना नाराज करणार? शिवाय दुसरा सामना आपण जिंकला असता तर मालिकेची शेवटची लढत निव्वळ औपचारिकता ठरली असती. आता मालिका बरोबरीत आल्याने तिसऱ्या सामन्याचे महत्व अचानक वाढून टीम इंडियाने मालिकेत चुरस निर्माण केली असेच म्हणावे लागेल.

अर्थातच यातील गंमतीचा भाग सोडला तरी आपल्या फलंदाजांचे पाप लपवता येत नाही. डाव्याखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी आपल्या फलंदाजांना नेहमीच भंडावून सोडले आहे. मग तो चमिंडा वास असो की वासिम अक्रम अथवा ट्रेंट बोल्ट. मागे शाहिन आफ्रिदी आणि आता मिशेल स्टार्क. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत मिशेल स्टार्कचा झंझावात पाहता आणि त्याने ज्याप्रकारे दोन्ही सामन्यांत भारतीय फलंदाजांना गिळंकृत केले ते पाहता त्याला माइटी शार्क म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल असे वाटते. स्टार्कसमोर आपल्या फलंदाजांना ताथैय्या ताथैय्या करतांना पाहिल्यावर जगातील तमाम वेगवान डाव्याखुऱ्या गोलंदाजांना बसल्या जागी गुदगुल्या झाल्या असतील. स्टार्कला खेळणे म्हणजे इकडे आड तिकडे विहीर असे असते, त्याचे चेंडू कधी झपकन आत येतात तर कधी बॅटची कड घेऊन स्लीपमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतात.

तेहत्तीस वर्षीय, सहा फुट सहा इंच उंचीचा मिशेल स्टार्क म्हणजे गोलंदाजीतील आधुनिक आग्यावेताळ समजावा‌. भन्नाट वेगासोबत लाईन आणि लेंथमध्ये त्याच्या कमालीच्या नियंत्रणाने त्याला खेळून काढणे तारेवरची कसरत असते. शिवाय पहिल्या सामन्यात त्याच्या तोंडाला भारतीय फलंदाजांचे रक्त लागल्याने दुसऱ्या सामन्यात त्याने आपल्या फलंदाजांचा फडशा पाडला. गिल, रोहीत, सूर्या आणि राहुलला त्याने लिलया चकवले. त्यातही गील आणि सूर्याने अगदी पहिल्या सामन्यासारखे बाद होत निराश केले. स्टार्कने मागच्या सामन्यात विराट,सूर्याला तर या सामन्यात रोहीत, सूर्याला लागोपाठच्या दोन चेंडूत बाद करत आपली दहशत कायम ठेवली. दोन्ही वेळेस राहुलने त्याला हॅटट्रिक घेण्यापासून थोपवले ‌ मात्र राहुलवर विसंबून राहणे म्हणजे जागते रहो मेरे भरोसे मत रहो सारखे असते.

स्टार्कने हाहाकार माजवताच भारतीय गोटात पळापळी सुरू झाली. याचाच फायदा घेत सिन ॲबॉट, नॅथन इलिसने उर्वरित अर्धी फळी कापून काढली. थोडाफार प्रतिकार केला तो विराट आणि अक्षर पटेलने. मात्र आभाळच फाटलं तर ठिगळ लावणार तरी कुठे कुठे? पन्नास षटकांचा सामना आणि आपला संघ अवघ्या पंचवीस षटकांत, ११७ धावांत गुंडाळला जातो याचा उद्वेग वाटतो. अर्थातच हा आपला एकदिवसीय सामन्यातला चौथा निचांक आहे. यापुर्वी वरची फळी कोसळली की युवराज आणि धोनी, संताजी धनाजी सारखे धावून यायचे आणि संघाला तारुन नेत होते. या दोघानंतर संघात ह्या दोन जागा अजूनही भरल्या गेल्या नाहीत. किंबहुना रोहित, विराट सोडले तर बाकी उंची दुकान फिकी पकवान वाटतात. धुमकेतू सारखे उगवतात, थोडेफार प्रदर्शन करतात आणि पुन्हा गडप होऊन जातात. कदाचित टी ट्वेंटी च्या संस्काराने आत्ताचे फलंदाज तेवढा संयम, शिस्त, स्टॅमीना गमावून बसले असणार.

शेवटी काय तर आंध्रप्रदेशच्या वाय एस राजा रेड्डी स्टेडियम, कडप्पाला भारतीय फलंदाजांनी कडबाकुटार केला. आपली माती आपली माणसं म्हणतात ते यालाच. त्यातही दहा विकेट्सनी हरणे म्हणजे जखमेवर मीठ चोळणे होय. वास्तविकत: आपला संघ सुद्धा नऊ वेळा दहा विकेट्सनी जिंकला आहे. मात्र सध्याच्या काळात २०२०/२१/२२/२३ असे सतत  चार वर्षे दोनदा एकदिवसीय सामन्यात तर दोनवेळा टी ट्वेंटी सामन्यात आपल्या संघाने दहा विकेट्सनी मार खाल्लेला आहे. फलंदाजांनी नांगी टाकल्याने  गोलंदाजांना कसे स्फुरण चढणार? लढायसाठी कमीतकमी फळ्यावर धावा तरी असायला हव्या ना? इथे तर मोठ्या मुश्किलीने आपल्या संघाने शंभरी गाठली होती. मग ना वेगवान गोलंदाज कामी आले ना फिरकीपटू. 

मालिकेतला अंतिम सामना २२ मार्चला चेन्नईत खेळला जाईल. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीने असले तरी दुसऱ्या सामन्यातील विजयाने कांगारूंचे मनोबल निश्चितच वाढले असणार. पण भारतीय संघाला खचून कसे चालणार? कारण क्रिकेट मध्ये रावाचा रंक, रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही. मात्र झालेल्या चुकांतून काही शिकले तरच फायदा होईल. शुभमन गील, सूर्या, राहुल यांनी रोहीत, विराटला साथ देणे अपेक्षित आहे. तर जडेजा, पांड्याला आपल्या अष्टपैलूत्वाला न्याय द्यावा लागेल. दुसऱ्या सामन्यात आपल्या गोलंदाजांची पाटी कोरी असली तरी ते पुनरागमन नक्कीच करू शकतात. एकंदरीत काय तर बलाढ्य कांगारूंचा पाडाव करायचा असेल तर टीम इंडियाला आपले प्रदर्शन सुद्धा चॅम्पियन संघासारखे दाखवावे लागेल तेव्हाच कुठे ही मालिका आपण जिंकू शकतो.
**********************************
दि‌. २० मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Saturday, March 18, 2023

राहुलची अमृत महोत्सवी खेळी!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
      *राहुलची अमृत महोत्सवी खेळी!*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
स्थळ वानखेडे स्टेडियम मुंबई, निमित्त होते रात्रीस खेळ चाले क्रिकेटचे आणि प्रसंग बाका होता भारतीय विजयाचा. मैदानात मिचेल स्टार्च चे डावेखुरे वादळ घोंघावत होते. कोहली आणि सूर्य कुमार यादव नावाच्या दोन महारथींना लागोपाठच्या दोन चेंडूत गारद करत स्टार्च पुढचे भक्ष्य गिळंकृत करायची वाट बघत होता. अर्थातच राहुलला पाहताच त्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि इकडे तमाम क्रिकेटप्रेमी देव पाण्यात घालून बसले होते. कारण संकटकाळी सोडून जातो तो राहुल अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र यावेळी राहुल आपल्या क्रिकेट धर्माला जागला. झिरो से हिरो कामगिरी करत राहुलने अप्रतिम फलंदाजी केली आणि ऑसी संघाकडून सामना हिसकावून घेत संभाव्य पराभवाला विजयात रुपांतरीत केले.

झाले काय तर कसोटी मालिकेत कांगारुंनी पलटवार करत भारतीय संघाला चांगली टक्कर दिली होती. मात्र पहिल्यावहिल्या एकदिवसीय सामन्यात मो.सिराज, मो. शमीच्या वेगवान जोडीने त्यांना दोनशेच्या आंत गुंडाळून आपल्या फलंदाजांसाठी पायघड्या अंथरूण ठेवल्या होत्या. पण बरेचदा लो स्कोअरींग सामन्यात पाठलाग करणाऱ्या संघाची फसगत होते आणि छोटी धावसंख्या सुद्धा डोंगराएवढी भासते. या सामन्यात सुद्धा तेच झाले. पन्नास षटकांत जिंकण्यासाठी १८९ धावा म्हणजे सोप्पा पेपर. मात्र दिसते तसे नसते म्हणून जग फसते अशी अवस्था झाली. मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टोईनिसने अवघ्या पाच षटकांत सोळा धावांत टीम इंडियाचे ईशान किशन,कोहली आणि सूर्या हे महत्त्वाचे मोहरे तंबूत परतवले होते.

त्यातच स्टार्कचा तिखट मारा बघण्यासारखा होता. फलंदाजांनी चेंडू खेळतो म्हटले तर स्लीपमध्ये झेल जाणार आणि सोडला तर पायचितात सापडणे होते. थोडक्यात काय तर स्टार्कला धरलं तर चावते सोडलं तर पळते असं होतं. त्यामुळेच विराट, सूर्याला घाम फोडणाऱ्या स्टार्कला अपयशीचा ठप्पा लागलेला राहुल कसाकाय सामोरा जातो हे बघणे औत्सुक्याचे होते. त्यातही राहुलचा गत वर्ष दोन वर्षाचा ताळेबंद पाहता, राहुल इज पर्मनंट बट परफॉर्मन्स इज पुअर अशी कहानी होती. त्यातही त्याला कसोटीत डच्चू देण्यात आला होता. अखेर अनुकंपा तत्त्वावर त्याला यावेळी संघात स्थान देण्यात आले होते.

अर्थातच राहुल साठी करा अथवा मरा अशी परिस्थिती होती. त्यातही स्टार्कची हॅटट्रिक थोपवण्याचे संकट त्यांच्यासमोर आ वासून उभे होते. अखेर सर्व शंका कुशंकांना विराम देत तो मैदानात आपल्या खऱ्या रुपात अवतरला. तिकडे अर्धा संघ ८३ धावांत गुंडाळून कांगारू सामन्यात वरचढ झाले होते. समाधानाची बाब म्हणजे त्याच्या हाताशी जडेजा नावाचा लढवय्या साथीदार होता.यावेळी जास्त जोखीम न पत्करता या दोघांनी कांगारूंना ठंडा करके खाओ मोहिम राबविली. मात्र या जोडीचा जम बसताच त्यांनी कांगारूना धारेवर धरले. राहुलने प्वाईंट, थर्डमॅनला प्रेक्षणीय फटकेबाजी करत आपला बॅकलॉग भरून काढला. तर जडेजाच्या मुक्त खेळीला कांगारू लगाम घालू शकले नाही. 

या दोघांनी फलंदाजीत जबरदस्त युती करत ऑसी गोलंदाजांना वैतागून सोडले. सेना भाजप पेक्षाही बळकट या युतीने प्रचंड आशावादी असलेल्या कांगारूंची शेवटपर्यंत दाळ शिजू दिली नाही. शत प्रतिशत विजयाचं ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या राहुलने जडेजाला हाताशी घेत ७५ धावांची अमृत महोत्सवी खेळी केली. मुख्य म्हणजे या दोघांची भागिदारी टाटा नमक सारखी फ्री फ्लोवींग होती. कुठेही बीट न होता, न अडखळता या दोघांनी अशक्यप्राय आव्हान शक्य करून दाखवलं. या दोघांच्या अभेद्य भागिदारी पुढे स्टार्क, स्टोईनिस ॲन्ड कंपनीने अखेर नमते घेतले. खतरनाक स्टार्क दुसऱ्या स्पेलमध्ये शुद्ध शाकाहारी गोलंदाज झाला होता.

निश्चितच फलंदाजीतील राहुल, जडेजाचे योगदान विसरता येणार नाही परंतु तत्पूर्वी शामी, सिराजचे गोलंदाजीतील योगदान महत्त्वाचे ठरले होते. मिचेल मार्शच्या झंझावाती ८१ धावांनी ऑसी संघाने चांगले बाळसे धरले होते. एकावेळी त्यांनी तेविस षटकांत एकशे चाळीस धावांपर्यंत मजल गाठली होती. पण अठ्ठावीसव्या षटकापासून मो.शामीचा गोलंदाजीतील धडाडा सुरू झाला. त्याने जोश इंग्लीस, कॅमेरून ग्रीन आणि स्टोईनिसचा काटा काढत कांगारूंच्या मोठ्या धावसंख्येला आवर घातला. पाठोपाठ सर जडेजाने खतरनाक ग्लेन मॅक्सवेलला बाद करत त्यांच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या होत्या.

पहिला सामना जिंकून भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. टीम इंडिया द्विपक्षीय मालिकेत उत्तम कामगिरी बजावतो मात्र आयसीसी स्पर्धात माघारतो ही वस्तुस्थिती आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषक हाकेच्या अंतरावर आहे. शुभमन गील, राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर सारख्यांना लय सापडणे गरजेचे आहे. ओल्ड इज गोल्ड रोहीत आणि विराट कुठपर्यंत संघाचा भार वाहणार आहेत? तसेच पांड्या, जडेजा, शार्दुल, वॉशिंग्टन सुंदर आदी अष्टपैलूंनी सातत्य राखणे तेवढेच जरुरी आहे. गोलंदाजीत शामी, सिराजच्या तोडीचे आणखी दोनतीन गोलंदाजांची येणाऱ्या काळात गरज भासणार आहे. अर्थातच अशा दुहेरी मालिकांतून योग्य खेळाडूंची चाचपणी करणे शक्य आहे. तुर्तास राहुलला सापडलेला फॉर्म अल्पजीवी न ठरो म्हणजे कमावले म्हणून समजा. नाही तर संघातली एक जागा वाया घालवल्याचे पातक त्याच्या वाट्याला येईल.
**********************************
दि. १८ मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Monday, March 13, 2023

हिमाचल की गोद में, भाग ०४

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
        *हिमाचल की गोद में, भाग ०४*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
तीन दिवसीय प्रवासाच्या अखेरच्या दिवशी हिमाचल प्रदेशच्या कसौलीला जाण्याचे ठरले. चंदीगड ते कसौली अंतर फार तर साठ किमी. बस यूं गये और यूं आऐ असे वाटले होते. मात्र असे अजिबात झाले नाही. चंदीगड समुद्रसपाटीपासून एक हजार फुट उंचीवर तर कसौली जवळपास सहा हजार फुट उंचीवर. त्यातही हिमालय पर्वतरांगांना वळसा घालून चढणे म्हणजे आणखी एक दिव्य प्रवास. एका बाजूला काळजाचा थरकाप उडवणाऱ्या खोल दऱ्या तर दुसरीकडे उंच उंच पर्वत रांगा. सोबतच चंदीगड शिमला महामार्गावरून कसौली कडे डावे वळण घेतले की रस्ता दुपदरी असल्याने वाहनांच्या वेगाला मर्यादा येतात.

सकाळी कितीही लवकर उठून निघतो म्हटले तरी कडाक्याच्या थंडीने दहाच्या पहिले निघणे कठीण होते. अखेर स्वेटर जॅकेट घालून कसौलीच्या दिशेने निघालो. कसौलीला मिनी शिमला म्हणतात. हिमाचल प्रदेशाच्या सोलन जिल्ह्यातील हे एक हिल स्टेशन आणि छावणी नगर आहे. शिमल्याच्या दक्षिणेस असलेले आणि हिमालयाच्या खालच्या भागात स्थित हे स्थान देवदारच्या जंगलांनी घेरलेले आहे. कसौली या नावावरून बरेच मतप्रवाह आहेत. इथे वर्षभर फुलांचा मौसम  असल्याने कुसमावली, कुसमाली यावरून कसौली हे नाव पडल्याचे मानतात. तर काही कसुम या गावावरून किंवा इथे उगवणाऱ्या कसूम या फुलावरून कसौली हे नाव निश्चिती झाल्याचे मानतात.

अर्थातच नामकरणाचे कारण काहीही असले तरी कसौलीचे सौंदर्य अफलातून आहे. मुख्य म्हणजे इथले वातावरण कधी ढगाळ तर कधी स्वच्छ सूर्यप्रकाश, असे क्षणाक्षणाला बदलू शकते. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या कसौलीला आठ ते दहा टुरिस्ट प्वाईंट्स आहेत जे पर्यटकांना भुरळ घालतात. यात प्रामुख्याने क्राईस्टचर्च, मंकी प्वाईंट, सनसेट पॉईंट, मॉल रोड, भगवान श्रीकृष्ण मंदिर, श्री गुरू नानक जी गुरूद्वारा, गोरखा किल्ला आदींचा समावेश होतो. पर्यटनासोबतच इथे रोप वे, रायडींग, ट्रेकिंग, लॉंग ड्राईव्ह आपल्या आनंदात भर घालतात. इथले रोमांचक, रोमॅंटीक वातावरण पाहता कोई मिल गया सहित अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.

कसौलीला जगाच्या पटलावर आणण्याचे काम केले ते ब्रिटीशांनी. इ.स. १८३९ ला महाराजा रणजितसिंह यांच्या मृत्यूनंतर ब्रिटीशांना पंजाबवर कब्जा करायचा होता आणि याकरिता सैन्यछावणी, सैन्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी कसौलीला पसंती दिली. अर्थातच व्यापार, राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमण करत त्यांनी इ.स. १८५३/५४ ला एन्जलिकन चर्चची स्थापना केली. सेंट बरनबास आणि सेंट फ्रान्सिस यांच्या स्मरणार्थ निर्मित या चर्चचे पुढे ख्राइस्टचर्च असे नामांतर झाले.  गॉथिक शैलीत निर्मित हे चर्च हिमाचल प्रदेशातील सर्वात जुने चर्च आहे. या चर्च मधील खिडक्यांना लागलेली कांच इंग्लंडहून मागवली गेली होती. काचेच्या खिडक्यांमुळे चर्चच्या देखणेपणात आणखी भर पडते.

मंकी प्वाईंट हे कसौलीचे सर्वात ऊंच स्थान आहे. इथून संपूर्ण कसौलीचे मनोहारी दर्शन होते. साडेसहा हजार फुट उंचीवर हे स्थान बर्फाच्छादित आणि पाऊलाच्या आकाराचे आहे. अशी दंतकथा आहे की रामायण युद्धात लक्ष्मणाला जेव्हा मुर्छा आली तेव्हा हनुमानाने संजीवनी बुटी आणतांना पर्वत उचलतेवेळी एक पाऊल इथे ठेवले होते. त्यालाच मंकी प्वाईंट म्हणतात. इथे हनुमंताचे प्राचीन मंदिर आहे. पण सध्यातरी ह्या संपूर्ण परिसरावर भारतीय वायुसेनेचे नियंत्रण आणि नियमन आहे. याशिवाय कसौलीला गोरख्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेला गोरखा किल्ला आहे, जो पर्यटकांचा आकर्षण बिंदू आहे. सुबाथू पहाडावरील, निलगिरीच्या जंगलातील या किल्ल्याचे निर्माण गोरखा सेनापती अमर सिंह थापा यांनी एकोणविसाव्या शतकात केले होते. मात्र इ.स. १८५७ च्या युद्धात ब्रिटीशांनी हा किल्ला गोरख्यांकडून आपल्या ताब्यात घेतला. सध्या इथे भारतीय सेनेचे प्रशिक्षण केंद्र आहे.

खरी मजा तर कसौलीला कारमधून बाहेर पाऊल टाकताच आली. तसे तर चंदीगडहून निघताच हॉटेल मॅनेजर ने सांगितले होते की कसौलीला खूप थंडी असते, गरम कपडे सोबत घेऊन जा आणि तिथे मुक्काम करू नका. मात्र स्वेटर आणि जॅकेट समोर थंडी किस बला का नाम है, हे समजून आम्ही बिनधास्तपणे तिथे पोहोचलो. आतापर्यंत बोचरी थंडी, कडाक्याची थंडी, हाडं गोठविणारी थंडी असे ऐकले होते. कसौलीला परिस्थिती अगदी विचित्र होती. जणुकाही अंगावर कोणी बर्फाचे पाणी टाकले आहे अशी ओली थंडी होती. क्षणभरासाठी तर कशाला इतक्या थंडीत इथे आलो असे वाटले. कसौलीला पोहोचल्यावर सर्वात पहिले तुमचे वाहन पार्किंग ला ठेवावे लागते आणि इतर प्रेक्षणीय स्थळांना एकतर स्थानिक टॅक्सीने अथवा पैदल (पायदळ) जावे लागते. 

पार्किंग समोरच ख्राइस्टचर्च असल्याने कुडकुतच तिथे गेलो. आजुबाजुला ऊंचच उंच हिरवीगार झाडी आणि ‌थंडगार वाऱ्याने परिसर आणखीनच गारठला होता. कसेबसे चर्च पाहून बाहेर पडलो आणि परत पार्किंगला आलो. थोडी उष्णता मिळावी म्हणून ऊन्हात उभे राहीलो परंतु काही केल्या थंडी कमी होत नव्हती. तिथून मंकी प्वाईंट अंदाजे साडेतीन किमी. दूर होते. त्यातही टॅक्सी मंदिराच्या पायथ्याशी सोडणार आणि वर मंदिरात जायला यायला कमीतकमी एकदिड तास लागणार होता. आधीच जीवघेणी थंडी आणि त्यात हे साहस, वरून संध्याकाळी साडेसहाला शताब्दी एक्सप्रेसने दिल्लीला परतायचे होते. वेळेचे गणित पाहता इतर स्थळे पाहता येणार नाही म्हणून आम्ही सर्वांनी कसौलीला तिथेच रामराम करणे इष्ट समजले. खरेतर कुठलेही पर्यटन स्थळ असो, तिथली संपूर्ण माहिती, वातावरणाचा अंदाज आणि वेळेचा ठोकताळा मांडून नियोजन केले तर उत्तम. अन्यथा प्रवासात आणि पर्यटन स्थळांवर गोंधळ उडतो, इच्छा असूनही वेळेअभावी संपूर्ण परिसर पाहता येत नाही.
क्रमशः,,,
**********************************
दि. १३ मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Friday, March 10, 2023

दी सिटी ब्युटीफूल, भाग ०३

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
         *दी सिटी ब्युटीफूल, भाग ०३*
               *डॉ अनिल पावशेकर*
********************************
पानिपताहून निघतांना उशीर झाल्याने वाटेत कुरुक्षेत्र पाहणे शक्यच नव्हते. एकतर रात्रीचा वेळ आणि त्यात पुन्हा रहदारीने खोडा घातल्याने अखेर चंदीगड गाठता गाठता रात्रीचे साडेनऊ वाजले. अर्थातच अशावेळी कुठे काही जाण्यासारखे, पाहण्यासारखे नसल्याने पहिला दिवसाचा शो जवळपास संपल्यात जमा होता. मात्र तिथे कुणी स्वागताला असो वा नसो, कडाक्याच्या थंडीने सर्वांचे स्वागत केले. त्यातही मुक्काम चंदीगढ ऐवजी पंचकुला इथे असल्याने थंडीला आणखी धार चढली होती.

चंदीगडच्या जन्माची कथा रंजक आहे. रॅडक्लिफ रेषेने भारताच्या फाळणीसोबतच पंजाब प्रांताचे सुद्धा दोन भाग केले. पाकिस्तानच्या पंजाबला लाहोर ही आयती राजधानी मिळाली परंतु आपल्या पंजाबला नवीन राजधानीसाठी वाट बघावी लागली. अखेर इ.स. १९५२ ला फ्रेंच वास्तुरचनाकार ली कार्बुजीयर यांनी चंदीगड या शहराला मुर्तरुप दिले. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वात पहिले योजनाबद्ध शहर म्हणून चंदीगड ओळखले जाते. हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी असलेले हे शहर भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे. चंदीगड राजधानी क्षेत्रात मोहाली, पंचकुला आणि जिरकापूर का भागांचा समावेश होतो. सुंदर नगररचना, रहदारीचा विचार करून चौकांची गोलाकार रचना, सेक्टर नुसार विभाग आणि रहिवासी,व्यापार व्यवसायानुरुप इमारतींच्या रचनेने या सुटसुटीत शहराला द सिटी ब्युटीफूल म्हटले जाते.

चंदीगड प्रमाने पंचकुला सुद्धा नियोजनबद्ध शहर आहे. खरेतर पंचकुलाला रात्री पोहोचल्याने फारकाही निसर्गाचे दर्शन झाले नाही. मात्र सकाळी उठताच पंचकुलाचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने खुलून गेला होता. गुलाबी थंडी, प्रदुषण विरहीत शुद्ध स्वच्छ वातावरण, मनमोहक पर्वतांनी नटलेला परिसर पाहून मन प्रसन्न होते. त्यातच सकाळचे कोवळे ऊन हवेहवेसे वाटते. थोड्याच वेळात चंदीगडला सेमीनारमध्ये जायचे असल्याने नाश्ता करण्यासाठी रेस्टॉरंट गाठले. खरेतर सकाळचा नाश्ता म्हणजे आपली धाव पोहे, उपमा, सॅन्डविच, इडली पर्यंत. मात्र इथेतर नाश्त्यासाठी सर्वात लोकप्रिय आणि सहज उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे आलू पराठा. तेलातुपात चिंब भिजलेला जाडजूड आलू पराठा आणि सोबत लोण्याने भरलेली वाटी पाहताच ब्ल्यू आईज हिप्नोटाइझ तेरी करती है मैनू ची आठवण झाली.

कारण इतकं तेलतूप पाहून डोळ्यांवर अंधारीच येते, भरगच्च खाद्यपदार्थ पाहून मन गांगारुन जाते. इथले अन्नपदार्थ तेल,तूप, दही, दुध, पनीर, लोण्याने अलंकृत केले असल्याने शरीरातील चरबीची ऐसी की तैसी होऊन जाते. एवढेच कशाला दोन चार दिवस असाच आहार घेतला तर चेहऱ्यावर तेलातुपाचा तवंग आल्यासारखे दिसते. गंमत म्हणजे मसाला पापड मागवला तर आणखी मजा आली. तो फक्त नावालाच मसाला पापड होता कारण त्यावर इतकं सलाद आणि पनीर टाकलं होतं की पापड बिचारं त्यांच्या ओझ्याने खाली मलूल होऊन पडलं होतं. अखेर दोन जणांनी मिळून एक डिश संपवली तेव्हा कुठे जीवात जीव आला. अखेर अन्न गळ्यापर्यंत येण्याच्या भीतीने नाश्ता नावाचा प्रकार आटोपला.

चंदीगडला संपूर्ण दिवस आणि संध्याकाळ सेमिनार मध्ये गुंतल्याने बाहेर पडता आले नाही. मात्र जेव्हा बाहेर पडलो तेव्हा सर्वत्र शुकशुकाट झाला होता. रात्री आठच्या सुमारास इथली बहुतांश दुकानं बंद झाली होती. त्यामुळे शॉपिंगोत्सुक मित्रांचा हिरमोड झाला होता. मला तर शॉपिंग अतिशय कंटाळवाणा, रटाळ प्रकार वाटतो. शिवाय आजकाल सगळीकडे सर्वकाही मिळत असल्याने तसेच ऑनलाईनची सोय असल्याने त्यातला उरलासुरला इंटरेस्ट निघून गेला. तसेही फॅशन, लॅटेस्ट ब्रॅण्ड, ट्रेंडींग, सॅम्पल पीस हे शब्द माझ्या डिक्शनरीत नसल्याने मी शॉपिंग च्या दोन हात दूरच राहतो. अर्थातच शॉपिंग नाही तर जाणार कुठे? मात्र इच्छा तिथे मार्ग असतोच.

शेवटी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू असणारे स्थान म्हणजे पब. त्यातही तिथलं हसोड, ए स्टेट ऑफ डान्स म्हणजे पब प्रेमींसाठी पर्वणीच. तिथलं फुड, म्युझिक, ॲम्बीअन्स आणि सर्व्हिस एकदम क्लासी. मात्र तिथे माझी अवस्था नाचता येईना अंगण वाकडे सारखी होती. कारण गणित, चित्रकला आणि नृत्यकला ह्या तिन्ही विषयात आमची नेहमीच वंचित आघाडी व्हायची. गणिताने तर इतक्यांदा पाठ शेकल्या गेली आहे की लहानपणी मला आपण कासव असतो तर किती बरे झाले असते असे वाटायचे. तिच कहानी चित्रकलेची. अक्षर चांगले काढता येऊनही चित्र काढलं की रंगाचा बेरंग होत असे. 

नृत्यकला तर पप्पू कान्ट डांन्स अशी आहे. अर्थातच नाच गाण्याला कुठे वयाचं बंधन नसतेच. मात्र तिथले एकंदरीत उत्साही, जल्लोषाचे दणदणीत वातावरण पाहता तुमचे पाय आपोआप थिरकल्याशिवाय राहत नाही. तिथल्या भिंतीवरील ट्रस्ट अस यू कॅन डान्स आणि शटअप ॲन्ड डान्स ह्या ओळी तुम्हाला कंबर हलवण्यास उद्युक्त करतात. याचा एकंदरीत परिणाम म्हणजे उमर पचपन की दिल बचपनका असलेले आणि इतरही कमी जास्त वयाच्या सर्वांची पाऊले डान्स फ्लोअर कडे वळतात.

खरेतर आपली ध्वनी ऐकण्याची क्षमता वीस हर्ट्झ ते वीस हजार हर्ट्झ इतकी आहे. हर्ट्झ हे ध्वनी फ्रिक्वेंसी मोजण्याचे एकक तर डेसिबल हे इंटेंसीटी लेव्हल मोजण्यासाठी वापरतात. मात्र पब मधले वातावरण पाहता ह्या दोन्ही गोष्टींचा इथे काही संबंध होता असे वाटत नव्हते‌ मात्र हौस, उत्साह, जल्लोषापुढे कोणाचे चालणार? सुरवातीला थोडं कठीण जात परंतु काही वेळातच तिथलं वातावरण सात्म्य होतंय. इतर मित्रांना तिथे आनंदात न्हाऊन पाहतांना आपणही आनंदी व्हायचे आणि आपणही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचे. उगाच आडवंतिडवं नाचून कशाला आपली हाडे लचकवून घ्यायची असा विचार करून आपल्या आवडीचे खाणे सुरू केले.
क्रमशः,,,
*********************************
दि. १० मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Monday, March 6, 2023

अब दिल्ली दूर नहीं, भाग ०२

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
        *अब दिल्ली दूर नहीं, भाग ०२*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
यावेळी उत्तरेला चंदीगढची मोहिम आखली होती. खरेतर थेट चंदिगढला जाता आले असते परंतु मार्गावर पानिपत आणि कुरूक्षेत्र या दोन ऐतिहासिक, जिव्हाळ्याचा स्थानांना यावेळी नक्कीच भेट द्यायची असल्याने प्रवास दिल्लीमार्गे ठरला होता. नागपूर ते दिल्लीचे अंतर जरी एक हजार किमी.असले तरी या मार्गावर एकूण विमानांच्या फेऱ्या आणि प्रवासाला लागणारा अवघा दिड तासांचा कालावधी पाहून अब दिल्ली दूर नहीं असे वाटते. बोर्डींग पास आणि सुरक्षा तपासणी झाली की विमानप्रवासाचा पहिला टप्पा जिंकल्याचा आनंद होतो. बोर्डींग पास प्राणपणाने जपत पाऊले आपोआप विमानाची वाट धरु लागतात.

खरी गंमत तर सुरवातीलाच येते. चकचकीत आणि निटनेटक्या एअर होस्टेस स्मितवदनाने आपले वेलकम करतांना पाहून मन भारावून जाते. हे हास्य कृत्रिम असते हे माहित असूनही मनाला अजीमो शान शहंशाह असल्याचा भास होते. शेवटी काय तर मनाचे समाधान जरूरी असते. पलभर के लिये कोई हमें प्यार कर दें, झुठा ही सही, हे उगाचंच नाही म्हटलं गेलं. हे तर काहीच नाही,जर बिझनेस क्लास असेल तर या रावजी बसा भावजी कशी मी राखू तुमची महरजीची फिलींग येते. याऊपरही आणखी एक म्हणजे जन्नत क्लास असतो. मात्र त्यासाठी तुम्ही विजय माल्या असणे गरजेचे आहे. आपली धाव फारतर इकॉनॉमी क्लास पर्यंत! म्हणून काय झाले, बिझनेस क्लास इज टेंपररी बट इकॉनॉमी क्लास इज पर्मनंट म्हणून मनाला समजवायचे. अथवा काळजाच्या झुंबराला माझं आर्थिक दुःख मी टांगलं म्हणून विषय संपवायचा. इकॉनॉमी क्लास आणि कॉम्पीमेंटरी नाश्ता देणारी एअर होस्टेस पाहून तू ही तो मेरी जन्नत है म्हणायचे. यानंतर वेळ येते अंग चोरत जायची. एकतर खुर्च्यांच्या दोन रांगांमध्ये फार कमी अंतर असते. त्यातही एखादा लठ्ठ भारती किंवा ओझेवाहू गाढव तुमची अडवणूक करत असतो. एवढे मोठे सामान घेऊन लोकं कसेकाय प्रवास करतात हे कळतच नाही. कसेबसे आडवे तिरपे होत एकदाचे आपल्या जागेजवळ येतो आणि समाधानाचा सुस्कारा सोडतो.

प्रवासाला जातांना सोबत सुटसुटीत सामान असण्याकडे माझा कल असतो. तसेही मुल्यवान वस्तू, ऐवज आपल्याकडे नसल्याने बॅग जागेवरच असली काय अन गहाळ झाली काय, नो प्रॉफिट नो लॉस असते. मात्र आपल्या सीटच्या वरची बॅग कॅबीन हमखास कचकचून का भरली असते हे एक कोडेच आहे. अखेर कुठेतरी थोडक्या जागेत बॅग कुचकून (ठासून) दोन्ही हात मोकळे झाल्याचे समाधान लाभते. उड्डाणाला वेळ असल्यास आतील प्रवाशांची लगबग पाहण्यासारखी असते. हौशे नवशे गवशे सेल्फीप्रेमी विविध,वेडेवाकडे चेहरेचाळे करून सेल्फी घेण्यात व्यस्त असतात. काही अनस्टेबल व्यक्ती मिनिटा मिनिटाला आपली बॅग जागेवरच आहे की नाही हे सतत उठून पाहत असतात.

सर्वात शांत, स्थिर चित्त असतात तर ते फ्रिक्वेंट फ्लायर्स. इतरांच्या माकडचाळ्यांना दुर्लक्षित करून, हे कधी सुधरणारे प्राणी नाही हे समजून स्वस्थ बसतात. सगळ्यात वैताग आणतात बचर बचर खाणारे आणि टॉयलेट कडे धावत सुटणारे. काही महाभाग तर जणुकाही सोनोग्राफी केंद्रातून ब्लॅडर फुल्ल करून आल्यासारखे सतत येरझाऱ्या घालत असतात. तर बकासुराच्या वंशजांना काळ वेळेचे काही भान नसते. त्यांना पाहून अचाट खाणे, मसणात जाणे ही म्हण तंतोतंत लागू पडते. एवढ्यात बोर्डिंग कंम्प्लीटेडची घोषणा होते आणि प्रवासाच्या उंच टप्प्याला सुरूवात होते.

खरेतर मला विमान प्रवास जेवढा आवडतो, तेवढीच भीती पण वाटते. मात्र डर के आगे जीत है समजून पुन्हा प्रवासाला लागतो. टेक ऑफ करतांना पोटात गुदगुल्या झाल्या की समजायचे आता आपला जमिनीशी संपर्क नाही. अब तुम्हारे हवाले वतन साथीयों म्हणत शांत बसायचे. टाईमपास म्हणून मेनूकार्ड वाचायचे, किंमती तपासायच्या आणि आपल्याला परवडेबल नाही म्हणून पाणी मागून मोकळे व्हायचे. ते सुद्धा यासाठी की मधातून फिरणाऱ्या फुड ट्रॉलीजमुळे तुमची इच्छा असो वा नसो, अन्नापदार्थांच्या सुवासाने पोटात कावळे ओरडले नाही तरी  चिमण्या तरी चिवचिवाट करतातच. तसेही भुक लागणे यांत नर्व्हस, केमिकल आणि फिजीकल अशा तिन्ही बाबींचा अंतर्भाव असतो. (अन्नपदार्थांच्या गंध, स्मरणाने, दर्शनाने, चघळण्याने, जठरात अन्नाच्या उपस्थितीने पाचक रस स्त्रवतात). एकंदरीत काय तर आजुबाजुच्या खादाडखाऊंच्या खाण्याने आपोआप सहप्रवाशांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.

एव्हाना विमानाला दिल्लीचे वेध लागले असते आणि हळूहळू कधी उजवीकडे तर कधी डावीकडे कुस पलटवत ते उतरण्याच्या तयारीत असते. खरेतर टेकऑफ आणि लॅंडीग ह्या विमान प्रवासातील प्रमुख बाबी असतात. याच वेळी सर्वात जास्त दक्षता घेतली जाते. इथेच वैमानिकांचा कस लागतो. आपण जास्त विचार करायचा नाही, तशरीफ ला जोर का झटका धीरे से बसला की लॅंडीग झाले म्हणून समजायचे आणि विधात्याचे दोन्ही हात जोडून आभार मानायचे, तसंही आपल्या हाती इतकंच असतंय. स्मुथ लॅंडीग हा अफलातून प्रकार आहे. काही वैमानिक इतके निष्णात असतात की जणुकाही गुलाबी गालांवरून हळुवारपणे मोरपीस फिरवावे इतक्या नाजुकपणे लॅंडींग करतात, पोटातले पाणी सुद्धा हलत नाही.

दिल्ली हे ठाणे सहज काबीज केल्यावर आता पुढचा जवळपास २५० किमी. चंदिगढ पर्यंतचा प्रवास टॅक्सीने करण्याचा निर्णय झाला. याकरिता पहिलेच दोन टॅक्सी बुक केल्या होत्या. मात्र दिल्लीत सकाळी दहाला पोहचुनही टॅक्सी वाले आत्ता येतोय, जवळच आहे असे करता करता बारा वाजवले आणि यांतच महत्वाचे दोन तास वाया गेले. शेवटी दुपारी बाराच्या सुमारास आम्ही मार्गस्थ झालो परंतु हाती निराशाच आली. इकडची रहदारी म्हणजे एकदम बेक्कार! जिकडेतिकडे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. जागोजागी, चौकाचौकात वाहतुक सिग्नल तर कधी लष्करी भागातून जातांना वेगमर्यादेचे पालन करावे लागल्याने आणि गर्दीने प्रवासाची मजा निघून गेली. त्यातच कसेबसे ट्रॅफिक जॅम मधून सुटका होताच टॅक्सीने वेग पकडला आणि कर्नाल बायपास ने आम्ही निघालो. बराच वेळ झाला तरी दुसरी टॅक्सी नजरेत पडत नव्हती. तिचा घोळ झाला होता, ती कर्नाल बायपास ऐवजी गाझीयाबादला वळल्याने आणखी खेळखंडोबा झाला.

इकडे सूर्य देवता माथ्यावरून वेगाने सरकत आपल्या गंतव्यास निघाला होता तर दुसरीकडे पानिपतचे रणमैदान चुंबकासारखे आपल्याकडे आकर्षित करत होते. पानिपत शहरात पोहचताच पुन्हा रहदारीचे तेच रडगाणे! कधी उड्डाणपूलाचे बांधकाम तर कधी अरूंद रस्ते, अस्ताव्यस्त रहदारीने वैताग आणला होता. त्यातच गुगल मॅपचा चकवा भंडावून सोडत होता. दिवे लावणीची वेळ झाल्याने आपल्याला काही बघायला मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. अब्दालीचे कंदहार ते पानिपत आणि नागपूर ते पानिपत अंतर जवळपास एकसारखेच आहे, ते म्हणजे अंदाजे अकराशे किमी.

 सायंप्रकाशात अखेर महामार्गाला तिनदा चक्कर मारल्यावर शहरापासून सात किमी.अंतरावर पुर्वेस असलेले पानिपतचे रणतीर्थ दृष्टिपथात आले आणि मन गलबलून गेले. मराठ्यांचे सेनापती सदाशिवराव भाऊ, श्रीमंत विश्वासराव, इब्राहिम खान गारदी, जनकोजी शिंदे आणि ज्ञात अज्ञात मराठी वीर हिंदुस्थानच्या माती साठी धारातीर्थी पडले, केंव्हा एकदा त्या पावनभूमीला जवळ करतो असे झाले होते. त्या वीरभूमी परिसरात जवळपास अंधार झाला होता आणि त्या अंधूक प्रकाशातही मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकत असल्याचा भास होत होता. आश्चर्य म्हणजे त्या अंधाराला चिरत दोन उमदे अश्व माझ्याकडे नजर रोखून होते. आणखी डोळे फाडून पाहले तर ते अगदी ओळखीचे निघाले. उजव्या बाजूला विश्वासरावांचा दिलपाक अश्व तर डावीकडे सदाशिवराव भाऊंचा आवडता चंद्रसेन अश्व! मात्र दोघांच्याही डोळ्यातून गंगाजमूना वाहत होत्या, दोघेही मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते.

 मी मात्र अवाक् होऊन जागच्याजागी खिळलो होतो. तेवढ्यात जमीनीवर दणदणीत पाऊले टाकत काळाकभिन्न, प्रचंड देहाचा ढालगज आपल्याच ऐटीत चालत येत होता. कोण होता तो? अरे हा तर शिंद्यांचा मानबिंदू जव्हारगंज हत्ती होय. पण याच्या अंगावर भाले, तलवारींच्या जखमा आणि एवढे साखळदंड का? कोणी केली याची ही दुरावस्था? काही कळायला मार्ग नव्हता, अस्वस्थपणे बघत मी निरूत्तर झालो होतो. वेळ साधत दोन्ही अश्वांनी माझ्या खांद्यावर मान टेकवली, जव्हारगंज ही पुढे सरसावला, त्याची जखमी सोंड आशिर्वाद रुपी शिरावर विसावली, अवघे विश्व नि:शब्द झाल्याची स्थिती होती, काय भावना असतील त्यांच्या? काय संदेश दिला असेल या मुक्या प्राण्यांनी,,,?
क्रमशः,,,
*********************************
दि. ०६ मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Saturday, March 4, 2023

स्वच्छ इंदूरात फलंदाजीचा कचरा!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
    *स्वच्छ इंदूरात फलंदाजीचा कचरा.*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
स्वच्छता सर्वेक्षणात सतत सहाव्यांदा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इंदूर शहरात टीम इंडियाने फलंदाजीत अक्षरशः कचरा करून तिसरा कसोटी सामना घालवला आहे. पहिल्या दोन कसोटीत उत्कृष्ट प्रदर्शन करणारा भारतीय संघ ऑसी फिरकीपुढे गळपटला आणि मालिकेतील महत्वपूर्ण आघाडी गमावून बसला. ज्या फिरकीच्या भरवशावर टीम इंडियाची दादागिरी चालायची, त्याच फिरकीच्या चक्रव्यूहात भारतीय फलंदाजांचा अभिमन्यू झाला. देशांतर्गत फिरकीचे ब्रह्मास्त्र वापरून विरोधकांना नामोहरम करणारा आपला संघ यावेळी स्वतःच्या रचलेल्या जाळ्यात फसला. थोडक्यात काय तर शिकारी खुद यहाँ शिकारी बन गया असे म्हणावेसे वाटते.

झाले काय तर नागपूर, दिल्ली पाठोपाठ इंदूरची खेळपट्टी पाहून बॅटर तेरी कब्र खुदेगी स्पिनिंगवाली पीचपर अशी स्थिती होती. त्यातच पुर्वीच्या दोन कसोटीत नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमन यांच्या महाआघाडीने वारंवार प्रयत्न करूनही रोहित सरकार कोसळले नव्हते. याचाच अतिआत्मविश्वास भारतीय संघाला नडला. मात्र यावेळी कांगारूंना स्टीव्ह स्मिथ नावाचा खडूस, कावेबाज आणि चाणाक्ष कर्णधार लाभला होता. पहिल्या दोन कसोटीत पॅट कमीन्सने त्यांचे नेतृत्व केले होते. तरीपण कमीन्स कर्णधार पदाच्या दृष्टीने कधीच कम्फर्टेबल नव्हता. नवा गडी नवा राज येताच ऑसी गोलंदाज शिस्तीत वागले आणि त्याचे फळ त्यांना लगेच मिळाले.

फिरकीचे भूत गाडण्यासाठी कर्णधार रोहित पुढे सरसावला खरा परंतु यावेळी टॉड मर्फीने त्याला चकवले. रोहितचा बळी जाताच टीम इंडियाच्या साम्राज्याचा पाया खचू लागला. कोरोनाच्या साथीपेक्षा फिरकीच्या साथीत एकापेक्षा एक धुरंदर फलंदाज शरण जाऊ लागले. त्यातच सर्वांच्या फलंदाजीतील दोष आपल्या माथी घेणारा के एल राहुल संघात नसल्याने खापर फोडावे तरी कोणाच्या नावावर हा सुद्धा प्रश्नच होता. अर्थातच यापूर्वी फलंदाजीत वस्त्रहरण होऊ लागताच अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल प्रयत्नांची शर्थ करून लाज राखायचे. मिले सूर मेरा तुम्हारा करत हे तिघेही फलंदाजीत सुगम संगीत गायचे.

मात्र चमत्कार वारंवार होत नसतात. सूर की नदीयां हर दिशासे बहते सागर में मिलें असं असतंय ते. तेंव्हाच कुठे जय हे, जय हे, जय हे असतं! इथे तर फलंदाजीचे सूर बेसूर झाल्याने पराजय है, पराजय है हे ठरलंच होतं. त्यातही कांगारूंनी ८८ धावांची महत्वाची आघाडी घेतली होती. झालं गेलं विसरून दुसऱ्या डावात कमीतकमी दीडशेच्या वर आघाडी घेतली असती तर काही आशा होती. पण तिथेही मन के हारे सब हारे होते. अकेला देवेंद्र क्या करेगा हे राजकारणात ठीक आहे परंतु एकटा पुजारा किती बॅटपूजा करणार? त्याने एकाकी खिंड लढवली परंतु त्याचे प्रयत्न थिटे पडले.

पहिल्या डावात टीम इंडिया एक बाद सत्तावीस ते सर्वबाद एकशे नऊ अशी गडगडल्याने ऑसीं फिरकीपटूंचा आत्मविश्वास दुणावला होता. मॅथ्यू कुहनेमन ने भारताची अर्धी फळी कापली तर या मालिकेत आतापर्यंत निद्रिस्त असलेला नॅथन लायन जागा होऊ लागला होता. टॉड मर्फी, कुहनेमन त्याच्या कानामागून येऊन तिखट झाले होते. त्यातच ८८ धावांची आघाडी मिळताच नॅथन मधला लायन जागा झाला. एकच लॉयन नॅथन लायन करत त्याने दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांचा फडशा पाडताना तब्बल आठ बळी घेतले. रोहित सरकार कोसळवत त्याने अब की बार लायन सरकारचा दावा केला. त्याला फक्त मुकद्दर का सिकंदर पुजाराने थोपविण्यासाठी प्रयत्न केले. बाकी सगळे रोते हुए आते है सब होते.

कांगारूनी केवळ टीम इंडियाला पराभूतच केले नाही तर आपल्या संघाने एक लाजिरवाणा पराक्रम सुद्धा केला आहे. देशांतर्गत कसोटीत यापूर्वी भारतीय संघ १९५१-५२ साली इंग्लंडविरुद्ध १४९५ चेंडूत हरला होता. यावेळी तो ११३५ चेंडूत! प्रश्न हरण्याचा नाही तर त्यातून बाहेर येण्याचा आहे. नुकतेच इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने न्युझीलंडला फॉलोऑन दिला. मात्र किवीज संघाने जबरदस्त उसळी मारत कसोटी रंगतदार केली आणि इंग्लंडला एका धावेने पराभूत केले. अर्थातच हीच अपेक्षा क्रिकेट रसिकांना टीम इंडियाकडून असणार.

राहिली बाब ऑसी फलंदाजांची तर उस्मान ख्वाजाला भारतीय खेळपट्ट्या मानवलेल्या दिसतात तर ट्रॅव्हिस हेड, लाबूशेन आणि स्मिथ आपला दर्जाशी इमान राखून खेळतात. भलेही त्यांच्या फार मोठ्या वैयक्तिक धावा झाल्या नसतील परंतु उपयुक्त खेळ्या करतातत. मात्र खरी कमाल केली ती त्यांच्या फिरकीपटूंनी. पुर्वीच्या दोन कसोटीत अपना भी टाईम आयेगा म्हणून शांत बसलेला नॅथन लायन निर्णायक क्षणी टीम इंडियावर तुटून पडला. या कसोटीत रोहितचे नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करणे म्हणजे हात दाखवून अवल‌क्षण करण्यासारखे झाले. मध्यफळीत श्रेयस अय्यरने निराश केले तर शुभमन गील साठी ही कसोटी शुभ समाचार घेऊन नाही आली.

आपले फलंदाज ढेपाळल्याने त्याचा मानसिक दबाव गोलंदाजांवर आला. त्यातच गोलंदाजीत टप्पा आणि दिशा भरकटल्याने काम कठीण झाले होते. जडेजाची नोबॉल वर विकेट घेण्याची कला टीम इंडियाच्या चिंता वाढवित आहे. पण ओल्ड इज गोल्ड उमेश यादवने कांगारूंचा पहिला डाव गुंडाळून सामन्यात थोड्याफार आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावातही आपली फलंदाजी कोमेजल्याने विजयाचा गुलाब ऑसीच्या कुंडीत उगवला. मालिकेचा एकतर्फी निर्णय लागता लागता आता लढत बरोबरीत यायची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या संघाच्या फायद्यासाठी फिरकीचे जाळे विणले गेले. मात्र हे जाळे कांगारूंनी भेदले आहे. आता खेळपट्ट्यांच्या नावाने बोंबा ठोकण्याचे कारण नाही. थोडक्यात काय तर,,जब अपनी हो जाए बेवफा तो दिल टुटे, जब दिल टुटे तो रोये क्यूँ? शेरास सव्वाशेर कधीतरी मिळतोच! फक्त यावेळी अश्विन जडेजाला कुहनेमन आणि नॅथन लायन मिळाले. बाकी फलंदाजीत दोन्ही संघ समसमान असले तरी खेळपट्ट्यांनी त्यांना दारिद्र्यरेषेखाली आणले आहे. मालिकेचा अंतिम सामना अहमदाबादला आहे, तिथे मालिका टीम इंडियाच्या नावे होते की कांगारूंचा संघ बरोबरी साधतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
*********************************
दि. ०४ मार्च २०२३
मो. ९८२२९२९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...