Thursday, May 30, 2024

ताश्कंद फाईल्स, अंतिम भाग

#@😈😈😈😈😈😈😈😈@#

    *ताश्कंद फाईल्स, अंतिम भाग*

           *डॅा अनिल पावशेकर*

—————————————————

ताश्कंद म्हटले की आपल्या मनात चटकन विचार येतो भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांचा. याच शहरात शास्त्रीजींचा दुर्दैवी, गुढ म्रुत्यू झाला होता. सध्या सेंट्रल पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, ताश्कंद इथे शास्त्रीजींचा अर्धाक्रुती पुतळा असून याद्वारे त्यांच्या स्म्रुती जतन केल्या गेल्या आहेत, त्यांना आदरांजली दिली गेली आहे. या घटनेची पार्श्वभूमी सांगायची झाली तर अॅागस्ट, सप्टेंबर १९६५ ला भारत पाक युद्धाला तोंड फुटले होते आणि यांत आपली सरशी होत असतांना पाकिस्तानने इतर देशांच्या मध्यस्थीने युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला होता. 


तत्कालीन सोवीयत प्रमुख अॅलेक्सी कोसिजीन यांनी पुढाकार घेत भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी आणि पाक राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांच्यात ताश्कंद करार घडवून आणला. ४ ते १० जानेवारी १९६६ दरम्यान झालेल्या बैठकीत संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि सोवीयतचे वरिष्ठ प्रतिनिधी सामील झाले होते. १० जानेवारीला या कराराला मुर्तरूप प्राप्त झाले. ९ कलमी या करारावर शास्त्रीजी आणि अयूब खान यांनी स्वाक्षरी केल्या. यानुसार युद्धबंदी स्थापीत होऊन दोन्ही देशांनी एकमेकांचे बळकावलेल्या प्रदेशावर हक्क सोडून देणे, १९४९ साली नक्की केलेल्या युद्धबंदी रेषेपर्यंत माघार घेणे, आर्थिक संबंध, वाणिज्य व्यापार वाढविणे यासह अनेक मुद्यांवर सहमती करण्यात आली. मात्र दुर्दैवी बाब म्हणजे या कराराच्या दुसर्याच दिवशी शास्त्रीजींचा ह्रदयविकाराच्या झटक्याने म्रुत्यू झाल्याचे सांगण्यात येते.


ताश्कंद शहरातील एक पाहण्याजोगे स्थळ म्हणजे टिव्ही टॅावर. जगातील बाराव्या क्रमांकाचे ऊंच असलेल्या या टॅावरची ऊंची ३७५ मीटर एवढी आहे. १९८७ ला निर्मित आणि व्हर्टीकल कॅंटीलिवर स्ट्रक्चर असलेला हा टॅावर टिव्ही, रेडिओ सिग्नल प्रक्षेपणासाठी उभारण्यात आला होता. सोबतच कॅाम्प्लेक्स हाइड्रो मिटीओरॅालॅाजीकल स्टेशन म्हणून आणि सरकारी विभाग, इतर संस्थांच्या संवादासाठी याचा उपयोग केला जातो. सहाव्या मजल्यावर प्रेक्षक गॅलरी आहे, ज्यातून ताश्कंद शहराचे दर्शन होते. तर आठव्या मजल्यावर रिव्हॅाल्हींग रेस्टॅारंट आहे. या टॅावरवर चढण्या उतरण्यासाठी तीन लिफ्ट, एलिव्हेटर्स आहेत. या टॅावरच्या प्रांगणात अनेक देशांच्या टिव्ही टॅावरच्या प्रतिक्रुती ठेवलेल्या आहेत.


याशिवाय इथे फिरण्यासाठी युद्ध संग्रहालय आणि मॅजीक सिटी पार्क पण आहे. दुसर्या विश्व युद्धावर आधारीत हे संग्रहालय १५ हेक्टर जागेवर बांधले गेले आहे. यांत इनडोअर, आऊटडोअर असे दोन विभाग असून इनडोअरला युद्धासंबंधी माहिती, शस्त्रे, तत्कालीन युद्धसामुग्री, युद्धात कामी आलेल्या सैनिकांची नावे, नाझींकडून जप्त केलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन मांडले आहे. तर आऊटडोअरला सैनिकांची विजयी मुद्रेतील पुतळे आहेत. भिंतींवर युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. मात्र याला व्हियतनामच्या वॅार मेमेरीयलची सर येत नाही. मॅजीक सिटी पार्क म्हणजे जणुकाही मिनी डिसनेलॅंड. रंगबिरंगी फाऊंटेन आणि लाईटींगने हा परिसर झळाळून निघतो. बच्चेकंपनी साठी फूल टू धमाल असलेला हा पार्क संध्याकाळी प्रेक्षक, पर्यटकांनी गजबजून जातो.


ताश्कंद प्रवासा निमित्त काही व्यक्तींची ओळखपाळख झाली, मानवी स्वभावाचे विविध रंग अनुभवास आले, त्यापैकी काही निवडक व्यक्ती आणि वल्लींचा थोडक्यात परिचय. टूर गाईड आयना, तिशीतली ही वल्ली टुरीझमचा कोर्स केलेली, शरिराने, दिसण्यात एकदम भारीभक्कम. त्यामानाने स्वभावाने हलकीफुलकी, इंग्रजीची उत्तम जाण असलेली, सदैव हिंदी गाणी गुणगुणायची, हसतमुख जणुकाही सदाफुली. बरेचदा तिला हिंदी, मराठी कळायचे नाही परंतु मथितार्थ लगेच जाणून तिची प्रतिक्रिया द्यायची. खाण्यात, फिरण्यात नंबर एक असलेली एक दोनदा भारत भ्रमणावर आली होती. मुंबई, दिल्ली हे तिचे आवडते शहर.


दुसर्या दिवसाचा गाईड, युवा नईम पंचविशीतला. नोकरी नसल्याने गाईड चे काम करणारा मात्र कामात एकदम चोख आणि प्रामाणिक तसेच कुटुंबवत्सल. तर समरकंदचा गाईड कमील अत्यंत उत्साही, कर्तव्यतत्पर, समरकंदची खडा न खडा माहिती असलेला. भाषा शास्त्रात प्राविण्य मिळवलेल्या कमीलला उज्बेक, रशियन, इंग्रजी आणि स्पॅनिश भाषा अवगत होत्या. आमचा ड्रायव्हर फय्याज म्हणजे अबोल प्राणी, बहुदा फक्त जेवणासाठी तोंड उघडणारा. जेवढं विचारलं तेवढंच बोलणार, कामाशी काम ठेवणारा. गाडीतला एसी बंद पडला की तो एसी पॅनलवर बुक्की मारून चालू करायचा, नाहीच जमले तर चाकूने पॅनल उघडून रोटेटर फिरवायचा. अर्थातच तो हे काम रोज करायचा मात्र पठ्याने शेवटपर्यंत एसी सुधरवला नव्हता. एसी बंद पडला की आम्ही चाकू चाकू म्हटलं की तो समजून जायचा की एसी बंद पडला म्हणून आणि चाकू घेऊन कामाला लागायचा.


ताश्कंद प्रवासाची आखणी आणि नियोजन करण्यात ग्लोबल ट्रॅव्हल्स पुणे चे अल्ताफ सर आणि आमचे सहकारी निलेश नेमाडे आघाडीवर होते. मग ते विमानाचे तिकीट बुकिंग असो की व्हिसा असो अथवा मनी एक्सचेंज. तर कधी हॅाटेल बदलवणे असो. या दोघांनीही अहर्निश सेवामहेचे व्रत घेतले होते. निलेश नेमाडे ही वल्ली २५ च्या वर देशाला गवसणी घातलेली, त्यामुळे विदेशी प्रवासाचा भक्कम अनुभव, चतूर, त्यातही प्रचंड उत्साही. नाही हा शब्द त्याच्या डिक्शनरीत नाहीच. कधीही विचारावे हाऊझ दी जोश? तर उत्तर असायचे, व्हेरी हाय सर. एखादा कठीण प्रसंग असो की अडीअडचण अल्ताफ सर आणि निलेशची जोडी संकटमोचक म्हणून हजर झालीच समजा.


थोडक्यात काय तर उज्बेकिस्तानला कोणी जावे तर ज्याला पर्यटनाची आवड आहे, इतिहास, युद्ध यांत विशेष रूची आहे. पर्यटनाने नवनवीन देश, लोक, संस्क्रुतीची ओळख होते. अनुभवाने मन प्रगल्भ होते, विचार करण्याच्या कक्षा रूंदावतात. परदेशातील वाहतूक व्यवस्था, सोशल सेन्स काय असते याचे दर्शन घडते. सामान्य ज्ञानात वाढ होते. मात्र याकरिता थोडा खिसा जरूर हलका करावा लागतो. सहा दिवस पाच रात्रीच्या या प्रवासाला आम्हाला अंदाजे प्रत्येकी सव्वा लाख रू इतका खर्च आला. मात्र कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, हे ओघाने आलेच. जाता जाता एवढेच म्हणता येईल,,

सैर कर दुनिया की गालिब, फिर ये जिंदगानी कहां!

जिंदगी भी रही, तो ये नौजवानी कहां!

ताश्कंद प्रवास वर्णन समाप्त. धन्यवाद!

—————————————————

दिनांक ३० मे २०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++

Tuesday, May 28, 2024

इतिहासाच्या कुशीत, भाग ०८

#@😈😈😈😈😈😈😈😈@#

     *इतिहासाच्या कुशीत, भाग ०८*

           *डॅा अनिल पावशेकर*

—————————————————

उज्बेकिस्तान प्रवासाच्या चौथ्या दिवशी मोहीम होती समरकंद या शहराची. उज्बेकचे हे दुसर्या क्रमांकाचे शहर. या शहराची स्थापना, निर्मिती बाबत इ.स. पूर्व सातव्या शतकापासून पुरावे, माहिती मिळते. मात्र या शहराची खरी ओळख सांगायचे झाले तर चीन, मध्य आशिया आणि युरोपला जोडणार्या रेशिम मार्ग(सिल्क रुट) चे सर्वात महत्वाचे स्थान. रेशिम मार्गाची कहानी इ.स. पूर्व दुसर्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत आहे. जवळपास ६४०० किमी लांबीच्या या मार्गाने पूर्व आणि पश्चिम भुभाग जोडले गेले, त्यांच्यात व्यापार, आर्थिक, संस्क्रुती, राजकीय आणि धार्मिक बाबींत देवाणघेवाण झाली. मध्य आशियातील हे शहर वारंवार आणि निरनिराळ्या आक्रमणांचे मुक साक्षिदार आहे. अगदी अलेक्झांडर पासून अरब, मंगोल, तुर्क आणि रशियन आक्रमणाने इथे धुमाकूळ घातला होता.


ताश्कंद पासून ३०० किमी अंतरावर असलेल्या समरकंद साठी आम्ही हाय स्पिड ट्रेनचा पर्याय निवडला होता. जी ट्रेन जुन्या ट्रॅकवर २०० पर्यंत आणि नवीन ट्रॅकवर २५० किमी प्रती तास धावू शकते तिला हाय स्पिड ट्रेन म्हणतात. इथले रेल्वे स्थानक असो अथवा कोणतीही वास्तू, प्रत्येक जागा भव्य आणि प्रशस्त! अर्थातच कुठलीही गर्दी, धक्काबुक्की नाही की सतत कानावर आदळणार्या कर्कश सूचना. सर्वकाही शांततेत, सुव्यवस्थेत आणि वेळेवर. प्रत्येक कोच च्या दाराजवळ कोच अॅाफिसर प्रत्येकाला सिट समजवून सांगणे, वयस्करांना चढ उतरण्यास मदतीचे काम करत होते. इथेही विमानतळासारखी सुरक्षा व्यवस्था, तपासणी होती. तर आंत इकॅानॅामी आणि बिझनेस क्लास होते. सकाळी नऊ ला निघालेल्या हाय स्पिड ट्रेनने सर्वाधिक २३६ किमी ची गती गाठत बरोबर अकरा वाजता, तिच्या नियोजीत वेळी समरकंदला पोहोचवले.


समरकंदचे प्रमुख आकर्षण होते, गुर ए अमीर स्मारक, ज्याचा अर्थ होतो राजाचे, सेनापतीचे थडगे. उज्बेकिस्तामध्ये तैमूरला राष्ट्रनायक म्हणतात. या स्मारकात तैमूर, त्याची दोन मुले शाहरूख, मिरन शहा, नातू ऊलूघ बेग, मुहम्मद सुलतान आणि तैमूरचा धर्मगुरू सय्यीद बरका यांच्या सहीत एकूण नऊ थडगी आहेत. या स्मारकाच्या बांधकामावर मध्य आशियन स्थापत्य कलेचा प्रभाव आहे. यावरूनच पुढे मुगल वास्तू रचना, काबूलचे गार्डन अॅाफ बाबर, दिल्लीतील हुमायूंचा मकबरा आणि आग्र्याचा ताजमहल बांधल्याचे सांगितल्या जाते. या स्मारकाची आणि संलग्न दोन मिनारची ऊंची प्रत्येकी ३० मिटर आहे. आवारात दहा फूट लांबीचे, सहा फूट रूंदीचे आणि तीन फूट उंचीचे दगडी आसन आहे, त्यालाच तैमूरचे आसन म्हणतात. जवळच चार टन वजनी दगडी पात्र आहे, ज्यातील पाणी पवित्र मानतात.


तैमूर चीनच्या कामगिरीवर असताना वयाच्या ६९ व्या वर्षी न्युमोनियाने म्रुत्युमुखी पडला. त्याचा नातू मुहम्मद सुलतानने हा मकबरा बांधणे सुरू केले तर दुसरा नातू उलूघ बेगने हे बांधकाम पूर्ण केले. विटांच्या भिंती आणि पांढर्या निळ्या रंगाच्या टाईल्सने संपूर्ण मकबरा व त्याचा घुमट बांधला गेला आहे. १७ व्या शतकात बुखारा ही नवीन राजधानी झाल्याने व रेशमी मार्ग बदलल्याने समरकंदचे महत्व घटले. रशियन आक्रमणात, सोवीयत शास्त्रज्ञांनी तैमूरची कबर खोदून संशोधन केले. पण असे म्हणतात की तैमूरची कबर खोदाल तर जगाचा विनाश घडेल आणि योगायोग म्हणजे झालेही तसेच. नाझींनी सोवीयतवर आक्रमण करत हा समज पक्का केला. अखेर स्टॅलीनने तैमूरला परत थडग्यात पुरून वाद मिटवला. याच्या एक महिन्यानंतर स्टॅलीनग्रॅडला सोवीयत फौजांनी नाझींना घेरून बाजी पलटवली होती.


यानंतर रेगिस्तान चौक या स्थळाला भेट दिली, जे पर्यटकांनी गजबजून गेले होते. १४ व्या शतकापर्यंत इथे नदी असल्याचे मानले गेले होते. तीन मोठ्या मॅास्कची रचना असलेले हे स्थळ तीन वेगवेगळ्या काळात बांधले गेले आहे. पर्शियन वास्तुकलेचा नमुना असलेली ही वास्तू एकमेकांसमोरील तीन इमारतींची आहे. सर्वात डावीकडे उलूघ बेग मदरसा (१४१७ते १४२०) आहे, ज्याची निर्मिती स्वतः उलूघ बेग याने केली. यात दोन मजली मदरश्याला उंच मिनार, चार घुमट आणि धार्मिक शिक्षणासाठी काही खोल्या आहेत. मधली इमारत शेर दोर मदरसा (१६१९ ते १६४०) म्हणून ओळखली जाते. याचे आणि तिसर्या क्रमांकाच्या वास्तूचे बांधकाम (तिल्या कोरी मदरसा) तत्कालीन सेनापती यालंग्तुश बाखोडर ने केल्याचे सांगितले जाते. खरेतर या तिन्ही मदरशांचा उद्देश विद्यार्थियांना धार्मिक शिक्षण देणियासाठी होत होता. इथेच सरकारी आदेश, फर्मान सोडले जायचे. तैमूर साम्राज्याचे हे महत्वपूर्ण स्थळ होते.


समरकंदची ओळख असलेले आणि मास्टरपीस अॅाफ तैमूर एम्पायर असलेले स्मारक म्हणजे बिबी खानम मकबरा. १५ व्या शतकातील सर्वोत्तम, सर्वात मोठी वास्तू मानली गेलेल्या या इमारतीचे बांधकाम १३९९ ते १४०५ पर्यंत खुद्द तैमूरच्या देखरेखेखाली केले गेल्याचे मानले जाते. प्रवेशद्वार ३० मिटर तर मुख्य उमारत ४० मिटर उंचीची आहे. ही वास्तू लांबी १६७ मिटर तर रुंदी १०९ मिटर आहे. यांत चार मिनार आणि चार गोल घुमट आहेत. दिल्ली स्वारी यशस्वी झाल्यावर तैमूरने आपल्या पत्नीसाठी बिबी खानम मकबरा बांधल्याचे कळते. यालाच फ्रायडे मॅास्क, मॅास्क अॅाफ फिअर पण म्हणतात. कारण ही वास्तू बांधतांना प्रचंड पडझड झाली आणि बांधून पूर्ण होताच एक वर्षाच्या आत तैमूरचा म्रुत्यू झाला. वारा, हवामान आणि भुकंपाच्या झटक्याने ही इमारत खचत होती. १८९७ च्या भुकंपात आतली कमान गळून पडली. अखेर २० व्या शतकात सोवीयतने नंतर उज्बेकांनी याची पुनर्निर्मिती केली. 

क्रमशः,,,

—————————————————

दिनांक २८ मे २०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

+++++++++++++++++++++++++

Sunday, May 26, 2024

डान्स पे चान्स मार लें, भाग ०७

 #@😈😈😈😈😈😈😈😈#@

      *डान्स पे चान्स मार लें, भाग ०७*

            *डॅा अनिल पावशेकर*

—————————————————

संध्याकाळी 'गाला डिनर' आणि सोबतीला 'बेली डान्स', म्हणजे जणुकाही आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे! खरेतर बॅले डान्स आणि बेली डान्स दोन्ही वेगवेगळे आहे. बॅले डान्सचा उगम पंधराव्या शतकात इटलीतून आणि प्रसार फ्रान्स, रशिया युरोपा पर्यंत. तर बेली डान्स मध्यपूर्वेतला, इजिप्त, तुर्की अरबी प्रदेशात व्याप्ती. बॅलेत नाच, संगीत, नेपथ्य आणि नाट्याचा समावेश तर बेली डान्समध्ये वाद्यांवर थिरकणे. बॅलेत हात, पाय आणि बॅाडी लाईनिंग तर बेली डान्समध्ये निव्वळ हिप्स, रिब केज, धड ( शरिराचा मध्यभाग) यांचा वापर होतो. अर्थातच दोन्ही डान्स विशिष्ट कला असून नागीण डान्स एवढे सोप्प नक्कीच नाही. बॅलेत स्ट्रेस फ्रॅक्चर, अॅचिलीज टेंडेनायटीस, स्प्रेन्ड अॅंकल्स आदी शारिरीक दुखापती संभवतात; तर या डान्समुळे चांगलाच व्यायाम घडतो.


बेली डान्सबाबत आणखी सांगायचं झालं तर यांत देश, विभागानुसार प्रकार आढळतात. पोट, कंबर आणि नितंब हे चरबी साठवण्याचे राष्ट्रीय कोठार नव्हे; तर बेली डान्स करीता उपयुक्त अंग आहेत. यात लयबद्धतेने हिप्स, रिब्स केजची वाद्य,संगीतावर लवचिक आकर्षक हालचाल केली जाते. हिप्स लिफ्ट करणे, ड्रॅाप करणे, ट्विस्ट करणे, रॅाक करणे यासोबच खांद्यांचे संतुलन राखणे महत्वपूर्ण मानले जाते. यांत अॅब्डॅामिनल मसल्सचे नियंत्रण तेवढेच महत्वाचे आहे. हिप्स द्वारे व्हर्टीकल, हॅारिझॅांटल आठच्या आकड्यांची करामत दाखवणे असो की हवेत वर्तुळे काढून दाखवणे असो, जबरदस्त मेहनत आणि सराव लागतो. वारंवार हिप्स मुव्हमेंटमुळे पाय आणि पाठीच्या लांब मसल्स ताणल्या जातात.


याशिवाय बेली डान्समध्ये हिप्स, रिब्स केजला सतत थिरकवत ठेवणे, स्टेप्स घेणे, टर्न होणे आणि गिरक्या घेणे इ. बाबी येतात. (गिरक्या म्हणजे आजकाल साक्षगंध, लग्नात नवरी मुलगी नव-या मुलाचा हात पकडून स्वतः भोवती गरगर फिरते, वेटोळे घेते ती कला) यांत आणखी कलाकारी म्हणजे फ्रंट बेन्ड, बॅक बेन्ड, हेड टॅास समाविष्ट आहेत. या सगळ्यांचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोलंबीयन गायिका शकीरा. तिचे गाणे व्हेनेव्हर, व्हेरेव्हर आणि हिप्स डोन्ट लाय प्रसिद्ध आहेत. शकीरा नंतर आणखी एक नांव घ्यायचे झाल्यास 'रिहाना'चे घेता येईल.


आता मूळ विषयाकडे वळू. तर या मेजवानीसाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे सर्वांसाठी ड्रेस कोड होता. पुरूषांसाठी कोट, टाय आणि ह्या सुचना हॅालच्या दर्शनी भागात स्पष्ट लावल्या होत्या. भलेही कोणी फॅार्मल ड्रेसमध्ये आले, तरी प्रवेश नाकारला जात नव्हता. परंतु ते सभ्यपणाचे लक्षण मानले जात नाही. काही मुली, स्त्रिया तर पारंपारीक वेषात, स्कार्फ बांधून आल्या होत्या. थोडक्यात काय तर पाहुण्यांकडून डिसेन्ट ड्रेस आणि सभ्यतेची अपेक्षा आयोजकांना असते. इथले वातावरण मंद धुंद प्रकाशात पण सुटसुटीत, निटनेटके आणि बसण्याची व्यवस्था प्रशस्तपणे केलेली असते. वाद्य संगीताने वातावरण निर्मिती केली जाते, खाद्य व पेय वितरीत केले जाते आणि हॅाल भरताच बेली डान्सला सुरूवात होते.


यांत सात नर्तकी भाग घेतात, प्रारंभ "डान्सपे चान्स मारले" या सुपरहीट गाण्याने होते. नर्तकींचे वर्णन काय ते करावे, त्या सप्ततारका साक्षात रंभा उर्वशी! जणूकाही कोमल काया की मोहमाया पुनव चांदणं न्हाली, सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्नप्रभा तनू ल्याली. ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली, अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली उतरली. काय ती दिलफेक अदा काय तो जलवा, रशियन सुंदरी म्हणजे अवर्णनीय, 'चाल है की मौज की रवानी जुल्फ है की रात की कहानी, होंठ है की आईने कॅंवल के, अॅांख है की मयकदों की राणी'. थोडक्यात काय तर रुपाची खाण नजरेत बाण! उत्तम पददालित्य, सहजसुलभ हालचाली, एक्सप्रेस संगीतावर तुफानी डान्स, एकदम डेडली कॅाम्बिनेशन, एकदम झकास, बोले तो बेली डान्स नंबर वन.


त्यातही टेबल भोवती येऊन जेंव्हा त्या थिरकतात, माधुर्यपूर्ण उंच आवाजात गात ललकारी देतात तेंव्हा तो स्वर थेट काळजात घुसतो, आपण इंद्रसभेत असल्याचा भास होतो. टेबलवरील खाण्याकडे कोणाचेही लक्ष नसते. जो तो हा नेत्रदिपक सोहळा डोळ्यात सामावून घेण्याच्या प्रयत्नात असतो. आपल्याला दोनपेक्षा जास्त डोळे असते; तर किती बरे झाले असते असा वेडा विचार मनाला स्पर्शून जातो. फारतर पंधरा वीस मिनिटांचा हा थरार असतो, पण अवघं वातावरण मंत्रमुग्ध होऊन जाते. 

—————————————————

दिनांक २६ मे २०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++

Friday, May 24, 2024

ताश्कंद सिटी टूर, भाग०६

#@😈😈😈😈😈😈😈😈@#

        *ताश्कंद सिटी टूर, भाग ०६*

             *डॅा अनिल पावशेकर*

—————————————————

ताश्कंद शहराची ओळख म्हणजे तिथली विविध स्मारके. त्यातही द्वितीय विश्व युद्ध, १९६६ चा भुकंप आणि तैमूरशी निगडीत स्मारकांचा समावेश होतो. तैमूर चौकातून मेट्रो पकडून केवळ पाच मिनिटांत इंडीपेन्डेन्स चौक गाठता येतो. खरेतर हा चौक म्हणजे या शहराची ओळख होय. जवळपास १२ हेक्टर्स क्षेत्रात विस्तारीत हा भाग व्रुक्षवल्ली, फुलझाडे आणि कारंज्यांनी सुशोभीत करण्यात आला आहे. १० ग्रॅनाईटचे कॅालम, शुभ्र मार्बल्सची डिझाइन आणि मेटल बॅार्डरने हे सर्व कॅालम जोडलेले आहेत. यावर पक्षांची कलाक्रुती रेखाटण्यात आली आहे. पहिले या चौकाला लेनिन चौक म्हणायचे परंतु १९९१ ला सोवीयत संघापासून हा देश स्वतंत्र होताच याचे नामकरण मुस्तकिलीक मायडोनी म्हणजेच इंडीपेन्डेन्स चौक असे करण्यात आले. सोबतच लेनिनचा पुतळा हटवून तेथे गोल्डन ग्लोब, ज्यावर उज्बेकिस्तानचा नकाशा आहे, बसवण्यात आला आहे.


गोल्डन ग्लोबच्या खाली एक शिल्प आहे, ज्यात एक माता आपल्या बाळाला सांभाळून बसलेली आहे. माता मात्रुभूमीचे तर बाळ उज्वल भविष्याचे प्रतिक मानले जाते. या चौकात लष्करी कवायती, सार्वजनिक समारंभांचे आयोजन केले जाते. या चौकालगतच उझ्बेकचे संसद भवन, मंत्रालये असल्याने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते. जवळच द्वितीय विश्वयुद्धाचे स्मारक आहे. जवळपास सर्वच संस्क्रुतीत मातेचे अनन्यसाधारण महत्व आहे आणि याचेच प्रतिबिंब इथे पदोपदी पहायला मिळते. एक मोठ्या स्मारकाच्या रुपात हा भाग निर्माण केला आहे ज्यात एक शोकग्रस्त माता जमिनीकडे टक लावून बघत आहे, जिच्या सुपुत्रांनी देशाकरीता बलिदान दिले आहे. इथे एक ज्योत सतत तेवत असते. बाजूच्या इमारतीत द्वितीय विश्वयुद्धात प्राणाची आहुती दिलेल्या उज्बेकच्या बारा प्रांतातील सैनिकांची नावे आणि बलिदानाचे वर्ष पितळी पत्र्यांवर पुस्तकाच्या रूपाने प्रदर्शनार्थ लावलेली आहेत.


मॅान्युमेंट अॅाफ करेज, १९६६ ला ताश्कंद भुकंपात बळी पडलेल्यांना हे स्मारक समर्पित आहे. ८.३ रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेच्या भुकंपाने ताश्कंद शहर आणि आसपासच्या भागांत दोनशेहून जास्त बळी घेतले तर तीस हजारांपेक्षा अधिक लोकांना बेघर केले आणि ऐतिहासिक स्थळ नष्ट झालेत. ताश्कंद सोबतच आणखी तीन शहरे सुद्धा या नैसर्गिक आपत्तीला बळी पडली. मात्र दहा वर्षात बळी पडलेल्या प्रत्येक शहरात मॅान्युमेंट अॅाफ करेज उभारण्यात आले आहे. या स्मारकात दगडी शिल्प असून एक व्यक्ती, पत्नी आणि मुलासोबत भुकंपापासून बचाव करतांना दिसत आहे. समोरच आणखी दोन दगडी शिल्प आहेत. एका दगडी चबुतर्यावर भुकंपाची तारीख २६ एप्रिल १९६६ कोरली आहे तर दुसर्या चबुतर्यावर भुकंपाची वेळ ५.२४ कोरलेली आहे. दुसर्या चबुतर्यापासून मानवी दगडी शिल्पापर्यंत जमिनीत एक फट, भेग, चिरा दाखवला आहे, जो त्या भुकंपाची तिव्रता दाखवतो.


या स्मारकापासून हाकेच्या अंतरावर आणखी एक दगडी स्मारक आहे, त्याला शोमुराडोव्हज मॅान्युमेंट म्हणतात. भलेही द्वितीय युद्धात शत्रुसैन्य ताश्कंद पर्यंत नाही पोहोचले परंतु युद्धाच्या झळा मात्र इथपर्यंत जरूर पोहोचल्या. या युद्धात इथले सैन्य कामी आले, अनेक कुटुंबे अनाथ झाली. अशावेळी शोमुरडोव्ह नावाच्या व्यक्तीने, जो व्यवसायाने लोहार होता, मानवीय संवेदनाने ओतप्रोत होता, युद्धात अनाथ, बेघर झालेल्या बालकांचा सांभाळ, संगोपनाचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास देखिल नेला. देशविदेशातील, जर्मनी सारख्या शत्रू राष्ट्रातील अशी एकंदर १४ बालके त्याने सांभाळली, लहाण्याची मोठी केली. त्याच्या याच मानवीय कार्यासाठी त्याचे १९८२ ला स्मारक उभारण्यात आले.


दिवसभराच्या भटकंती नंतर संध्याकाळचे आकर्षण होते गाला डिनर. अर्थातच ही एक प्रकारची मेजवानी असते, ज्यात गीत, संगीत, नाचगाणे याची संगत असते. गीत संगीता बाबत इथे बॅालिवूडची गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. शिवाय इथे येणार्या पर्यटकांत ६०% पर्यटक भारतीय असल्याने हिंदी गाण्यांना प्राधान्य दिले जाते. भरीस भर म्हणून या मेजवानीत ड्रिंक्स, कोल्ड्रिंक्स अनलिमिटेड असल्याने दर्दींची चंगळ असते. त्यातही बॅले डान्स असला की सोने पे सुहागा म्हणून समजा. 

क्रमशः,,,

—————————————————

दिनांक २४ मे २०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++

Thursday, May 23, 2024

नांव मोठं लक्षण खोटं, भाग ०५

#@😈😈😈😈😈😈😈😈@#

    *नांव मोठं लक्षण खोटं, भाग ०५*

           *डॅा अनिल पावशेकर*

—————————————————

ताश्कंद प्रवासाचा दुसरा दिवस चिमगम माऊंटेन आणि चारवाक लेक च्या भ्रमंतीत गेल्यानंतर रात्रीच्या जेवणाकरीता आर के रेस्टॅारंटचे बुकिंग होते. ताश्कंदच्या इंडीयन रेस्टॅारंट मध्ये हे सर्वाधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सुद्धा आहे. रणधीर कपूर, रिषी कपूर आणि शशी कपूरने इथे भेट दिल्याचे कळते. बॅालिवूड कलावंतांचे पोट्रेट सर्वत्र दिसतात. मात्र आम्हाला इथे फारसा चांगला अनुभव आला नाही. पाच व्यक्तींच्या मानाने जेवन अपुरे होते तर चव अगदी साधारण. त्यातही कर्मचार्यांची वागणूक उद्धट प्रकारची. अर्थातच याची आम्ही व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार जरूर केली. कितपत याची दखल घेतली जाईल, घेतली गेली असेल हे जरी सांगता येत नसले तरी जर आपण एखाद्या सेवेबाबत समाधानी नसलो तर तक्रार जरूर करावी. एकंदरीत काय तर आर के रेस्टॅारंट नांव मोठे लक्षण खोटे असेच वाटले.


तिसर्या दिवशीचा बेत ताश्कंद सिटी टूर चा होता. ताश्कंदला स्टोन सिटी सुद्धा म्हणतात. कारण या शहरात भरपूर दगडी स्मारके आहेत. सोवीयत संघाच्या पोलादी पंजातून स्वतंत्र होत हे शहर मोकळा श्वास घेत आहे. मात्र अस्मानी आणि सुलतानी अन्याय, अत्याचाराच्या खाणाखुणा आजही विविध स्मारकांच्या रूपात जतन केल्या आहेत. मेमोरीयल कॅाम्प्लेक्स अॅाफ व्हिक्टिम्स अॅाफ पॅालिटीकल रिप्रेशन. हे स्मारक २००० साली निर्माण करण्यात आले असले तरी याला १८६० ते १९९१ पर्यंतच्या रक्तरंजीत लढ्याची पार्श्वभूमी आहे. रणाविना स्वातंत्र्य कुणा मिळाले आणि माटी मांगे खून हे तितकेच खरे आहे. रशियन साम्राज्य विस्तार वाद्यांनी न केवळ या भूमीत शहरांचा विध्वंस केला तर जनतेचेही अतोनात हाल केले. मग ते छळछावण्या असोत की तुरूंग. स्टॅलीनचा कार्यकाळाबद्दल तर बोलायलाच नको.


ताश्कंद टिव्ही टॅावरच्या समोर असलेले हे स्मारक आठ उंच खांबांनी निर्मित असून छत गोलाकार, निळसर रंगाचे आहे. हे स्मारक बांधतांना जमिनीत बरीच मानवी सांगाडे आढळल्याने या स्मारकाच्या मधोमध एक सामुहिक कबर बांधलेली आहे. रशियन साम्राज्य विस्तारवादी, स्टॅलीन आणि केजीबीच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांच्या स्म्रुती प्रित्यर्थ या स्मारकाची निर्मिती उज्बेकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष इस्लाम कारिमोव्ह यांनी केली आहे. या स्मारका लगतच एका वास्तूत १८६० ते १९९१ पर्यंतचा ऐतिहासीक ठेवा म्युझीयम रूपाने जपून ठेवला आहे. या संपुर्ण परिसराला चिर्चीक नदी वेढा घालून जाते तसेच सुंदर फुलझाडांनी या भागाला सुशोभीत केलेले आहे.


प्रत्येक शहराची एखाद्या खाद्यपदार्थाने ओळख असते. ताश्कंद शहर हे ताश्कंद पुलाव साठी प्रसिद्ध आहे आणि बेश्क्यू झोन हे रेस्टॅारंट तर मध्य आशियातले सर्वोत्तम ताश्कंद पुलाव साठी नंबर वन मानले जाते. टिव्ही टॅावर लगतचे हे रेस्टॅारंट खाद्यप्रेमींनी सदैव गजबजून गेलेले असते. इथले आकर्षण म्हणजे तुम्ही इथे नान, पुलाव आदी निर्माण करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष बघू शकता. आठ दहा मोठ्या भट्ट्या, तंदुर, विशाल कढयांत नान, पुलाव तयार केला जातो. डायनिंग टेबलवर जेंव्हा प्लेटमध्ये पुलाव येतो तेंव्हा आपण सहज दोन प्लेट पुलाव खाऊ शकतो असे वाटते. पण प्रत्यक्षात असे होत नाही. कारण पुलावातील प्रत्येक भाताचा कण तेल तुपात ओलाचिंब झालेला असतो. जणुकाही एखादी माता आपल्या लाडक्या लेकराला आनंदाने न्हाऊ माखू घालते अगदी तसेच. 


जसे आपल्याकडे कण कण में भगवान, तसे इकडे कण कण में कोलेस्टेरॅाल! सोबतच पुलाववर ड्राय फ्रुट्सचा शिडकावा बसल्या जागी गुंगी  आणणारा असतो. दिमतीला भव्यदिव्य नान, बुंदी रायता, रंगबिरंगी सलाद, योगर्ट काय खावे काय खाऊ नये काही सुचत नाही. त्यातच हा पुलाव नॅानव्हेज असल्याने खाता खाता दम लागून थकले रे नंदलाला अशी आपली अवस्था होते. गमतीची बाब म्हणजे माझ्या पुलावमध्ये सुपारीच्या आकाराची दोन पांढरी अंडी दिसताच मी ती प्लेट टूर गाईड आयना कडे सरकवून दिली. तिने मात्र मिटक्या मारत तो पुलाव फस्त केला. नंतर तिने सांगितले की ती अंडी स्क्विरील ची होती. इथे कोणत्या खाद्यपदार्थात काय टाकतील याचा नेम नाही. अगदी ब्रेड, नान यांत सुद्धा!


यानंतर पुढचे ठिकाण होते ताश्कंद मेट्रो. १९६६ च्या भुकंपात उध्वस्त झालेल्या या शहरात विना अडथळा, कमी वेळेत प्रवासासाठी मेट्रोची गरज होती. याच निकडीतून १९६८ ला मेट्रोचे प्लॅनिंग सुरू झाले. सोवीयत संघातील ही सातव्या क्रमांकाची तर मध्य आशियातील पहिली मेट्रो आहे. १९७७ ला ही प्रवासी सेवेत रूजू झाली. यांत चार सर्व्हिस लाईन्स आहेत जे पन्नास मेट्रोस्थानकांना जोडतात. चार कोच असलेल्या या मेट्रोची अॅव्हरेज स्पिड ४६ किमी प्रती तास आहे तर एकंदरीत मार्गाची लांबी ७० किमी आहे. साधारणतः सहा लाख प्रवासी रोज ये जा करतात. जुन्या धाटणीची पण मजबूत असलेली ही मेट्रो यंत्रणा जवळपास ९ रिश्टर स्केल तिव्रतेच्या भुकंपाला सहन करण्याइतपत सक्षम बनवलेली आहे.


मला मात्र ताश्कंद मेट्रोपेक्षा नवी दिल्लीची एअरपोर्ट एक्सप्रेस मेट्रो सरस वाटली. १२० किमी प्रती तासाच्या भन्नाट वेगाने धावणारी एक्सप्रेस मेट्रो २०११ पासून प्रवाश्यांच्या सेवेत आहे. अॅारेंज लाईन म्हणून ओळख असलेल्या ह्या मेट्रोची लांबी २२.७ किमी असून यापैकी १५.७ किमी मार्ग जमिनीखाली तर बुद्धजयंती पार्क ते महिपलपूर पर्यंतचा ७ किमी मार्ग जमिनीवर आहे.  या मार्गावर सात मेट्रो स्थानके असून नवी दिल्ली ते एअरपोर्ट पर्यंतचे अंतर अवघ्या १५ मिनिटांत कापते. या मेट्रोच्या देखभालीसाठी तब्बल १०० अधिकारी कार्यरत असून ही देशातील सर्वाधिक वेगवान मेट्रो आहे. नवी दिल्ली ते यशोभूमी द्वारका सेक्टर २५ पर्यंतची हिची व्याप्ती असून दररोज अंदाजे ८२,००० प्रवासी या मेट्रोने प्रवास करतात.

—————————————————

दिनांक २३ मे २०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++

Wednesday, May 22, 2024

पर्बतोंसे आज मै टकरा गया, भाग ०४

#@😈😈😈😈😈😈😈😈@#

*पर्बतोंसे आज मै टकरा गया, भाग ४*

            *डॅा अनिल पावशेकर*

—————————————————

उझ्बेक प्रवासाच्या दुसर्या दिवसाचे स्थान होते चिमगम माऊंटेन आणि चार्वाक लेक. ताश्कंद पासून १०० किमी अंतरावरील ग्रेटर चिमगम माऊंटेन हे चटकाल पर्वत श्रुंखलेतील सर्वात उंच शिखर असून याची उंची जवळपास ३३०९ मिटर इतकी आहे. तर छोटे शिखर २१०० मिटर उंचीचे आहे. ताश्कंद पासून इथे यायला अंदाजे दिडदोन तास लागतात परंतु मार्गातील निसर्गरम्य द्रुष्ये, उंच पहाड, घनदाट हिरवीगार व्रुक्षराजी प्रवास सुकर करते. त्यातही हळूहळू तापमान कमी होत गेल्याने प्रवासाचा आनंद द्विगुणीत होतो. चिमगम माऊंटेनला उझ्बेकचे स्वित्झरलॅंड म्हणतात. कारण ही पर्वत श्रुंखला कुठे शुभ्र बर्फाने, कुठे हिरव्याकंच फर व्रुक्षांनी तर कुठे पांढर्याशुभ्र खळखळत्या जलधारांनी अलंक्रुत असते. चिमगम चा अर्थ ग्रीन ग्रास अथवा ग्रीन व्हॅली असा होतो.


इथे खरी मजा येते चेअर लिफ्ट ने शिखरावर जाण्यात! एकतर इथे कडाक्याची थंडी, जवळपास सहा डिग्री सेल्सिअस, त्यातही ओपन चेअर, सुरक्षेच्या नावाखाली चेअरला आडवी एक छोटी लोखंडी सळी! खरोखरच ही राईड म्हणजे डर के आगे, बहोत जादा डर है या प्रकारातली. मुख्य म्हणजे बेस कॅम्प ला ट्विन चेअर येताच तुम्हाला खो दिल्यासारखे अक्षरशः चेअरमध्ये ढकलून दिले जाते. अब तुम्हारे हवाले वतन साथियों म्हणत आणि देवाचा धावा करण्यावाचून तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो. जसजसे आपण वर ओढल्या जातो तसतसे पोटातले गोळे वाढत जातात. चुकूनही खाली लक्ष गेले तर पोटात फुलपाखरू उडायला लागते. प्रारंभी हवीहवीशी आणि गुलाबी वाटणारी थंडी हळूहळू शरीराची कुल्फी करू लागते.


भिती, रोमांच, धाकधूक या संमिश्र भावनेतून दहा मिनिटात शिखरावर आपण पोहोचतो परंतु तोपर्यंत आपली अवस्था दहा गेले आणि पाचच राहिले अशी होते. त्यातही खाली उतरायला पुन्हा एकदा त्याच अग्निदिव्यातून जावे लागेल या नुसत्या कल्पनेने अंगावर काटा उभा राहतो. पण आपला नाईलाज असतो. यावेळी एक शेर नक्की आठवतो, तो म्हणजे, ‘खुद ही को कर बुलंद इतना के आसमां पर पहुंचे और खुदा तुझसे पुछे, ऐ बंदे तू अब निचे उतरेगा कैसे!’ चेअर लिफ्ट मधून उतरतांना सुद्धा पुन्हा एकदा उडी मारतच उतरावे लागते कारण चेअर लिफ्ट सतत फिरत असते. मात्र एकदाचे खाली उतरले की ह्रदयाची धडधड कमी होते आणि सभोवतालचा नयनरम्य परिसर मन मोहून घेतो. आभाळाला हात टेकवणारी पर्वतशिखरे, भुरभूर वाहणारा गार वारा, काळजाचा थरकाप उडवणार्या खोल दर्याखोर्या मस्त मौसम तयार करतात.


पंधरा विस मिनिटे इथे रमल्यावर खाली उतरतांना पुन्हा तोच अनुभव, मनावर तेच दडपण, तिच भिती. मात्र यातून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुसर्या बाजुने वर येणार्या पर्यटकांशी संवाद साधणे. हाय, हॅलो, गुड मॅार्निंग करत आपली भिती दाबून इतरांच्या भितीची मजा घेणे. परदुःख शितलः असे म्हणतात ते याचसाठी. खाली उतरल्यावर सर्वात पहिले कोणते काम केले असेल तर ते कॅाफी पिणे. यानंतरचा पाडाव होता चार्वाक लेक. चार्वाक चा अर्थ चार बाग, चार गार्डन. हे जलाशय चिर्चीक, स्केम, कोसू आणि चटकाल या चार नद्यांद्वारे निर्मित केले गेले आहे. चिर्चिक या मुख्य नदीवर १६८ मिटर उंचीचे दगडी धरण बांधून हा प्रकल्प १९६४ ते १९७० दरम्यान पूर्णत्वास आला. मात्र हे धरण बांधतांना जवळपास १५० पुरातत्व वास्तु, स्थळे पाण्याखाली गेली.


१९६६ ला ताश्कंदला विनाशकारी भुकंपाने ग्रासले होते. त्यावेळी शहराच्या पुनर्निर्मितीसाठी वीजचे उत्पादन करण्याकरिता चार्वाक हायड्रो पॅावर स्टेशन उपयोगी पडले. या जलाशयाची नैसर्गिक रचना इतकी सुंदर आहे की जणुकाही निष्णात कलाकाराने एखादे रेखाचित्र रेखाटले असावे. खरेतर हे जलाशय मुख्य मार्गापासून आंत आणि बरेच खाली आहे. जलाशयाजवळ जाण्यासाठी स्पोर्ट्स मोटरबाईक (फोर व्हिल ड्राइव्ह) उपलब्ध असतात. हा एक वेगळाच थ्रिल आहे. कच्च्या रस्त्यावरून नागमोडी वळणांसह खाली उतरणे, वर चढणे जीवाचा थरकाप उडवून जातो. टू सिटर या बाईकवर प्रोफेशनल ड्रायव्हर बाजूला लटकून स्टिअरिंग सांभाळत असतो. अगदी आपल्याकडे अॅाटोरिक्षा चालवतात तसे.


ही राईड आटोपताच आम्ही दुपारच्या जेवनासाठी फैज उझ्बेक रेस्टॅारंटला गेलो. खरेतर उझ्बेक आहार हा मुख्यतः मांसाहारी असतो. अंडी, चिकन, लॅम्ब (मेंढी), मासे आणि काही ठिकाणी चक्क घोड्याचे मांससुद्धा त्यांच्या नियमीत आहाराचा भाग असतो. खाण्यात मोठ्या प्लेट एवढा गोलाकार अंतर्वक्र पाव, ज्याला ते नान म्हणतात असतो, सोबत योगर्ट (दही) आणि दोन प्लेट तुडुंब भरलेला सलाद. भाजी हा प्रकार उझ्बेक आहारात जवळपास नसतोच. तर्री, रस्सा कशाला म्हणतात हे त्यांच्या गावीही नसते. बरं नॅानव्हेज तरी कसं देतात तर कबाब करून. लोखंडी सळीत पिसेस लटकवून तर व्हेज सेक कबाब म्हणजे वांगे, आलू, टोमॅटो, सिमला मिरची भाजून परतवून. भात खरेतर अगदी प्रसादा सारखा दिला  जातो. पेय पदार्थात पाण्याचा वापर फारच कमी, त्याऐवजी आंब्याच्या पन्ह्याच्या चवीचा आंबटगोड हम्बोट चेरी ज्युस देतात.

क्रमशः,,,,

————————————————

दि. २१/०५/२०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

Monday, May 20, 2024

नवा गडी नवा राज, भाग ०३

#@😈😈😈😈😈😈😈😈#@

     *नवा गडी, नवा राज, भाग ०३*

           *डॅा अनिल पावशेकर*

—————————————————

ताश्कंदला पहिले तीन दिवस आमचा मुक्काम होता हॅाटेल उझ्बेकिस्तान इथे. हा संपुर्ण देश भुकंप प्रवण क्षेत्रात येतो. १९६६ ला ताश्कंदला विनाशकारी भुकंपाने बेचिराख केले होते परंतु बलदंड सोवीयत संघाने आपले बाहुबल दाखवत अवघ्या आठ वर्षात ताश्कंदचा कायापालट करून दाखवला. यांत हॅाटेल उझ्बेकिस्तानचा समावेश होतो. १९७४ ला निर्मीत, १६ मजल्यांचे आणि तब्बल २२३ खोल्यांचे हे हॅाटेल ताश्कंदचे सर्वात मोठे आणि उंच हॅाटेल मानले जाते. या हॅाटेलच्या उभारणीत संपुर्ण सोवीयत संघाच्या मजुरांनी हातभार लावला होता. तसेही सोवीयत संघाच्या प्रत्येक सदस्य राज्यात (देशात) त्या त्या देशाच्या नावावर सर्वात मोठे हॅाटेल्स बांधले गेले आहेत. मात्र प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर सध्या ह्या हॅाटेलची रया गेलेली आहे. समोरून भव्य दिव्य दिसणार्या, भासणार्या ह्या हॅाटेलला आता उतरती कळा लागलेली आहे. कोणत्याही द्रुष्टीकोनातून हे हॅाटेल फोर स्टार हॅाटेल वाटत नाही.


वारंवार आपण एखाद्या जुन्या महालात वावरत असल्याचा भास होतो. २०१० ला या हॅाटेलचे रिनोवेशन केले होते पण त्यालाही आता जवळपास १४ वर्षे झाली. इथली कुलींग व्यवस्था दम तोडत आहे. इंटेरीअर साधारण आहे तर रूम सर्व्हिस फारशी समाधान कारक नाही. पर्यटकांच्या द्रुष्टीने जीव की प्राण असलेली वायफाय सुविधा हाय काय नाय काय सारखी आहे. त्यातही मोबाईल चार्जिंगसाठी राऊंड सॅाकेट असल्याने तुम्हाला वेगळे अॅडॅप्टर विकत घ्यावे लागते. थोडफार समाधानाची बाब म्हणजे हे हॅाटेल शहराच्या मध्यभागी आहे आणि जवळच अमीर तिमूर चौक, मेट्रो, ब्रॅाडवे स्ट्रिट आहे. तसेच इथला ब्रेकफास्ट भरगच्च, विविधांगी असतो. व्हेज, नॅानव्हेजची व्हेरायटी भरपूर असल्याने चांगल्या पोटपूजेची हमी असते.


हॅाटेलच्या हाकेच्या अंतरावर ब्रॅाडवे स्ट्रिट आहे. याचे पूर्वीचे नांव सेलगॅाख स्ट्रिट आणि अमीर तिमूर चौक ते इंडीपेंडेंट चौका दरम्यान याची व्याप्ती. दोन्ही बाजूंनी दाट, गर्द हिरवीगार झाडी, कडेला फुलझाडांच्या रांगा. इथेही प्रेम युगलांचा राबता पण कोणतेही जोडपे अश्लिल चाळे करणे, चिमटे काढणे, गुदगुल्या करणे, लिचोडे घेणे, अंगाला अंग घासणे इत्यादी वाह्यात प्रकार करतांना दिसले नाहीत. तर जागोजागी खंडीभर फुलंच फुले असतांना, फुले तोडू नये, तोडल्यास प्रेयसीला द्यावी अशा खोचक सुचना सुद्धा लिहिलेल्या आढळत नाही. थोडक्यात काय तर पार्क असुनही एकदम सात्विक, सोज्वळ, शुद्ध शाकाहारी वातावरण!


ब्रॅाडवे स्ट्रिट ला खरेतर एक प्रकारची मिनी जत्रा म्हणायला हवे, कारण आबालव्रुद्धांपर्यंत सर्वांच्याच करमणूकीची सोय इथे आहे. खाद्यपदार्थांची दुकाने, चहा कॅाफी स्टॅाल, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, आईसक्रीम पार्लर, नाइन डायमेंशनल थ्रिलर गेम झोन तर युवा वर्गासाठी सॅाकर, बॅाक्सिंग, आर्चरी, शुटिंग, टेबल टेनिस ची सोय आहे. सोबतच आर्ट,पेंटिंग गॅलरी दर्दींना आक्रुष्ट करते. ब्रॅाडवे लगतच दोन थिएटर पण आहेत. रशिएन अकॅडेमीक ड्रामा थिएटर आणि अलिशेव नोरी ओपेरा, बॅले थिअटर. भटकंती करणार्यांसाठी सायकल आणि स्कुटर भाडेतत्वावर मिळतात. तर ज्वेलरी आणि सोविनीर शॅाप्समधून तुमचा खिसा हलका करायची संधी मिळते.


हॅाटेल उज्बेकिस्तीन आणि ब्रॅाडवे स्ट्रिटच्या मधोमध अमीर तिमूर चौक आहे आणि चौकाच्या मध्यभागी तैमूरचा अश्वारूढ पुतळा आहे. आपल्या द्रुष्टीने तैमूर एक क्रुर आक्रमक  आणि विध्वंसक एवढीच त्याची ओळख. मात्र उझबेकांचा तो राष्ट्रनायक आहे. उझ्बेकिस्तानच्या जवळपास सर्वच शहरात त्याच्या नावाचे चौक आणि त्याचा पुतळा आहे. तिमूर चौकाची कहानी रंजक आहे, नवा गडी नवा राज ची त्यात झळक आहे. वास्तविकतः १८८२ ला हा चौक रशियन तुर्कस्थानच्या पहिल्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत बांधला गेला. १९१७ ला या चौकाचे नामकरण रिव्हाल्युशन चौक असे झाले आणि १९४० च्या दरम्यान इथे जोसेफ स्टॅलीनचा पुतळा उभारला गेला. मात्र १९६१ ला हा पुतळा हटवल्या गेला आणि तब्बल सात वर्षानंतर १९६८ ला तिथे कार्ल मार्क्सचा पुतळा उभारला गेला. ही कहानी इथेच नाही संपत तर १९९१ ला उझ्बेकिस्तान सोवीयत संघातून बाहेर पडून स्वतंत्र झाल्यावर उझ्बेकचे पहिले अध्यक्ष इस्लाम कारिमोव्ह यांनी १९९४ ला तिथे कार्ल मार्क्सचा पुतळा काढून तैमूरला स्थापन केले. 


या भटकंतीत रात्र झाली होती आणि आता वेळ होती पोटपूजेची. कारण असे म्हटल्या जाते की ‘वॅार इज वॅार बट लंच इज अॅान ए शेड्युल’. ताश्कंदला इंडीयन रेस्टॅारेंट फारतर तीनचार, त्यात मुंबई रेस्टॅारेंट उत्तम, जणुकाही आपल्या शहराताच जेवन करत असल्याची फिलिंग. जेवन करण्याबाबत माझे काही नियम, घरी जेवायचे असले तर जगण्यासाठी खाणे. बाहेर असेल तर खाण्यासाठी जगणे! यातला गंमतीचा भाग सोडला तरी तिथचे अन्नपदार्थ पाहून काय खावे आणि काय नाही हे सुचत नव्हते. दोन मोठ्या प्लेटमध्ये हिरवेकंच सलाद, पीली दाल (तुरीच्या दाळीचे वरण), राजमा, जिरा राईस, चपाती, गाजराचा शिरा! तरीपण पोटात कावळे ओरडत असूनही मी खूप संयम राखला कारण माझी फेवरेट चिकन बिर्यानी सर्वात शेवटी येणार होती आणि एकदाची ती आल्यावर मी त्यावर तुटून पडलो. 

क्रमशः,,,,,

दिनांक २० मे २०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

—————————————————

नवा गडी नवा राज, भाग ०३

Saturday, May 18, 2024

सफर उझ्बेकिस्तानची, भाग ०२

#@😈😈😈😈😈😈😈😈@#

    “सफर उझबेकिस्तानची,भाग ०२”

        ✍️डॅा अनिल पावशेकर✍️

————————————————

दिल्ली विमानतळावर चेकइन, इमिग्रेशन आणि सिक्युरीटीचे सोपस्कार पार पाडत बोर्डींग गेटजवळ पोहोचलो आणि आपण ज्या देशात पाऊल टाकत आहोत त्याची एक पुसटशी कल्पना आली. सर्वत्र गुलाबी चेहरे, धिप्पाड, धडधाकट शरीरयष्टीच्या आक्रुत्या, मुली स्त्रियां स्कार्फ बांधून, पायघोळ अंगरख्या सारखे ड्रेस आणि बोलतांना स्तॅाव स्तोव्ह ची बाराखडी! अर्थातच भुभाग, सभोवतालचे वातावरण, खानपान, जिन्स यावर आपले रंगरूप अवलंबून तर जोडीला जैसा देस वैसा भेष असणार. मात्र संपुर्ण सहा दिवस ताश्कंद, समरकंद वावरतांना कुठेही परकीय असल्याची किंवा भेदभावाची वागणूक जाणवली नाही. मुख्य म्हणजे काही नागरिक तर स्वतः पुढाकार घेत आमच्याशी बोलत होते. इथे पर्यटनाला येणार्यांत ६०% पर्यटक भारतीय असल्याने फ्रॅाम इंडीया म्हटले तरी वर्षानुवर्षे ऋणानुबंध असल्यासारखे त्यांचे चेहरे खुलतात आणि त्याचे कारणही विशेष आहे.


इथले वैद्यकीय क्षेत्र सरकारी ताब्यात आहे आणि खाजगी रूग्णालये बोटावर मोजण्याइतपत. त्यातही सरकारी दवाखान्यात कितपत काळजी, दक्षता घेतली जाते हे वेगळं सांगायची गरज नाही. तर तिथली खाजगी वैद्यकीय सेवा सामान्यांच्या आवाक्या बाहेरची. मग गरजू जनतेसमोर दोन पर्याय असतात. एकतर तुर्की किंवा भारत. उझबेक नागरिकांना तुर्कीत व्हिजा लागत नाही. पण जायला पाच तास लागत असल्याने ते दिल्लीला येणे पसंत करतात कारण अवघ्या सव्वादोन तासांत त्यांना दिल्ली गाठता येते. मात्र इथे येण्यासाठी त्यांना व्हिजा आवश्यक असतो. भारतातील वैद्यकीय सेवेबाबत ते अत्यंत समाधानी आहेत, क्रुतज्ञ आहेत. मेडीकल टुरीझम यानिमित्ताने भरभराटीला येत आहे.


आपल्या देशाबद्दल त्यांना आस्था, कौतुक असण्याचे आणखी कारण म्हणजे बॅालिवूड! त्यातही शाहरूख खान म्हणजे त्यांच्या गळ्यातला ताईत! सोबतच राज कपूर, काजोल आणि मिथुन चक्रवर्ती प्रचंड लोकप्रिय आहेत. बॅालिवूड गाण्यांचा तर इथे वेगळाच फॅनबेस आहे. काहींना तर आपली हिंदी गाणी मुखोद्गत आहे. मग ते रेस्टॅारंट असो की बॅले डान्स (याबाबत पुढील लेखात सविस्तर माहिती देण्यात येईल) हिंदी गीतांनी आपला तिथे ठसा उमटवला आहे.  तर मा. पंतप्रधान मोदींबाबत इथे बरेच कुतुहल आणि उत्सुकता पहायला मिळाली.


भौगोलीक बाबतीत सांगायचे झाले तर उझ्बेकिस्तान डबल लॅंड लॅाक्ड (दुहेरी भुपरिवेष्टीत) देश आहे. लॅंड लॅाक्ड कंट्री म्हणजे ज्या देशाच्या सिमांना सागरी किनारा नाही आणि त्या देशातील नदी वैगरे जलस्त्रोत आपली जलसंपदा समुद्र किंवा सागरात न सोडता देशांतर्गत जलाशय किंवा तलाव, सरोवरात सोडतात. हा देश कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजकिस्तान, अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांनी वेढलेला आहे. केंद्रिय आशियातील हा देश पूर्वी सोवीयत संघाचा हिस्सा होता. पण १९९०/९१ पासून सोवीयत संघाची शकले होऊ लागली आणि तब्ब्ल १५ नवीन देश उदयास आले, उझ्बेकिस्तान त्यापैकी एक देश!


इस्लाम हा इथला प्रमुख धर्म असून सुन्नी पंथीयांचे इथे प्राबल्य आहे. उझ्बेक ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे, या खालोखाल रशियन भाषा पण बोलली जाते. इंग्रजीचा फार वापर नसला तरी कामचलाऊ इंग्रजीने काम जमून जाते. ताश्कंद ही राजधानी आहे तर समरकंद, बुखारा आणि खिव्ह ही प्रमुख शहरे आहेत. मस्जिद, मॅासेलिअम (कबरी) आणि प्राचीन रेशीममार्गाशी (सिल्क रूट) जुळलेली शहरे, द्वितीय महायुद्धाशी संबंधीत खाणाखुणा ही या देशाची ओळख आहे. इथली लोकसंख्या केवळ साडेतीन करोडच्या जवळपास आहे तर क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने या देशाचा ५६ वा नंबर लागतो. सोम हे इथले अधिक्रुत चलन असून आपला एक रुपयाला १४५ सोम मिळतात. इथली अर्थव्यवस्था मुख्यतः कापूस, सोने, युरेनियम आणि नैसर्गिक वायू साठ्यांवर अवलंबून आहे.


ऐतिहासिक द्रुष्ट्या इथे इ.स. पूर्वी पासून अलेक्झांडर नंतर पर्शिअन सासानी साम्राज्याचा दबदबा होता. मात्र ८ व्या शतकातील अरबी आक्रमणाने या भुभागाचा चेहरामोहरा, संस्क्रुती बदलून गेली. १३ वे शतक चंगेझ खान ने तर १४ वे शतक तैमुरलंगने गाजवले. यानंतर तर्को मंगोल संकरातून बाबर उदयास आला, ज्याने आपल्या देशावर आक्रमण करून मुगल सत्तेचा पाया रचला. १९ व्या शतकात उझबेकिस्तान रशियन अधिपत्याखाली आला, जो नंतर १९९१ ला सोवीयत संघापासून स्वतंत्र झाला.


विमानतळातून बाहेर पडताच दोन गोष्टी प्रामुख्याने आपले लक्ष वेधतात, त्या म्हणजे इथलं सर्वकाही भव्यदिव्य, प्रशस्त वास्तुकला आणि नजर लागण्या सारखी शिस्तबद्ध वाहतूक. इथे लेफ्टहॅंड ड्राइव्ह असल्याने ड्रायव्हर शेजारी बसलं तर वारंवार चुकचुकल्या सारखे वाटते. ताश्कंद शहरात कुठे कुठे चक्क दहा पदरी मार्ग आहेत. लेन कटींग किंवा ओवहरटेकिंग कटाक्षाने टाळले जाते. हॅार्न तर चुकूनही ऐकू येत नाही. स्वच्छ चकचकीत रस्ते दिमतीला हिरवीगार व्रुक्षवल्ली मनमोहून घेतात. पादचार्यांची तर विशेष काळजी घेतली जाते. पादचारी सुद्धा रोड ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॅासिंगचाच उपयोग करतात. मला तर इथल्या ड्रायव्हर्सचे वारंवार कौतुक वाटते. इतक्या शांत डोक्याने कोणी कसकाय ड्रायव्हिंग करू शकतो याचं अप्रुप वाटते. बहुदा इथली ड्रायव्हर मंडळी जन्मजात तपस्वी असावी किंवा डोक्यात बर्फासारखी शितलता ठेवण्याचा हिमालयात येऊन एखादा क्रॅश कोर्स केला असावा! 


कितीही रश अवर असो की लगबग असो वाहतुकीचे नियम ते जणुकाही आईच्या पोटातून शिकून आल्यासारखे पाळतात. आणखी एक विशेष बाब म्हणजे कोणत्याही वाहनांवर टक्करच्या खाणाखुणा किंवा स्क्रॅचेस आढळत नाही, धुळ सुद्धा दिसत नाही. इथल्या जवळपास ९९% कार शेवर्ले कंपनीच्या आहेत कारण या कंपनीचे सरकार सोबत टायअप आहे. जर तुम्हाला शेवर्ले व्यतिरिक्त इतर कंपनीची कार घ्यायची असेल तर कारच्या दुप्पट किंमत मोजावी लागते. हास्यास्पद बाब म्हणजे इथे दुचाकी, मोटर सायकल अजिबात दिसत नाही कारण त्यांची किंमत कारपेक्षा कितीतरी जास्त असते. उझ्बेकिस्तानला दुचाकी, मोटरसायकल घेण्यासाठी तुमचे आडनाव अंबानी किंवा अदानी असावे लागते. बहुतेक मध्यमवर्गिय शेवर्ले ची बिट्स वापरतांना दिसतात. या शिवाय पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी दोन बस एवढ्या मोठ्या सरकारी बस, कुठे कुठे ट्राम तर मेट्रोचा वापर होतो. 

क्रमशः,,,,

————————————————

दि. १८ मे २०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++

Friday, May 17, 2024

मुसाफिर हुं यारों, भाग ०१

😈😈😈😈😈😈#@

       *मुसाफिर हुं यारों, भाग ०१*

           *डॅा अनिल पावशेकर*

*********************************************************************************************

२०१९ च्या व्हिएतनाम प्रवासानंतर कोरोना आणि इतर कारणांनी विदेश सफारीत जवळपास तीन चार वर्षे खंड पडला होता. पण २०२४ ला अखेर योग जुळून आला आणि यावेळी लक्ष्य होते मध्य आशियातील प्रमुख स्थान व उझ्बेकिस्तानची राजधानी ताश्कंद आणि प्राचीन सिल्क रूटच्या केंद्रस्थानी असलेले समरकंद हे शहर. विशेष म्हणजे दिल्ली ते ताश्कंद थेट विमानसेवा असल्याने जवळपास दोन हजार किमी चे अंतर अवघ्या सव्वा दोन तासांत कापल्या जाते. ना वारंवार विमान बदलविण्याची गरज ना कंटाळवाणा दिर्घ प्रवास! खरेतर ताश्कंद म्हटले तर मनाला चटका लागतो आणि आठवते भारताचे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांचा दुर्दैवी गुढ म्रुत्यु तसेच समरकंद म्हणजे भारतात मुगल साम्राज्य स्थापन करणार्या बाबर ची भूमि.


यावेळी ताश्कंद मोहिमेत सहभागी मित्र होते डॅा प्रदीप पाटील, डॅा अजय कुलवाल, डॅा अजय अनासाने आणि डॅा निलेश. दिल्लीहून ११ मे रोजी दुपारी पाऊने दोन ला विमान असल्याने आणि सकाळच्या नागपूर दिल्ली विमानाच्या वेळेत फार कमी अंतर असल्याने वेळेवर गोंधळ, धांदल टाळण्यासाठी आम्ही आदल्या दिवशी नागपूर दिल्ली रेल्वे प्रवासाचा बेत आखला. रेल्वे प्रवास म्हणजे काही अलिखीत नियम असतात. प्रवाशांची तुफान गर्दी, धक्काबुक्की, रेल्वे स्थानकाचा एक टिपीकल अप्रिय गंध, कानावर सतत आदळणार्या घोषणा, कधी आपण तर कधी सोबतचे सामान हरवण्याची अनामिक भिती! त्यातही वेटिंग हॅाल गजबजून असतात. कधी एकदाची आपली गाडी येते आणि कधी आपली यातून सुटका होते असे वारंवार वाटते. पूर्वी सासू सुनेचा तर आता सुना सासुंचा छळ करतात. मात्र सुना सासुंचाच नव्हे तर तमाम जनतेचा छळ करण्यात रेल्वे आजही नंबर वन आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्याचा भक्कम पुरावा म्हणजे नेमके आपण प्रवासासाठी निवडलेली ट्रेन ऐन वेळेवर लेट होणे!


दिल्लीसाठी आम्हाला विशाखापट्टणम् नवी दिल्ली ही आंध्रप्रदेश सुपरफास्ट ट्रेन उपलब्ध होती. साधारणतः ६६ ते १३० किमी प्रती तास या गतीने ती धावते. ३१ तास ४० मिनिटात १९ थांबे घेत ती २१०० किमी अंतर कापते. अगदी नियमीत असणारी ही गाडी नेमकी आमच्या प्रवासाच्या वेळी रुसून बसली. वास्तविकतः या गाडीचा रूटीन मार्ग काही कारणास्तव वळविण्यात आल्याने पंचाईत झाली. दोन तास उशिरा धावत असल्याने प्रवासाचा पुरता हिरमोड झाला. तरीपण एकदाचे गाडीत बसलो आणि समाधानाचा सुस्कारा सोडला. मात्र हा आनंद क्षणिक ठरला. कारण नागपूर नंतर उरलेले १००० किमी अंतर गाठण्यासाठी या गाडीने धीरे धीरे चलो मोरे साजना चे रुप घेतले. सुपरफास्ट ट्रेनच्या गती आणि धडधडीने जे शरीर डुलायचे किंवा प्रवासाचा जो मौसम बनायचा, तो बनलाच नाही. वन्स लेट अॅालवेज लेट सारखी ही गाडी उपेक्षीत झाली आणि आमच्यासारख्या उपेक्षितांचे अंतरंग कोणालाही कळणार नव्हते. मागून येणार्या जवळपास आठ गाड्यांना पास दिला गेला आणि ही गाडी वेळ आणि वेग दोन्ही बाबतीत नापास झाली.


तरीपण ही ट्रेन मेकअप करून दिल्लीला थोडीफार मागेपुढे पोहोचेल अशी अपेक्षा होती. आग्रा आणि मथुरे नंतर ही गाडी सुस्त अजगरासारखी झाली. काही केल्या गती पकडेना. जणुकाही संथ वाहते क्रुष्णामाई सारखी वाहत होती. दिल्ली विमानतळ फारतर अकरा पर्यंत गाठणे जरूरी होते. पण ट्रेनची गती पाहता दिल्ली बहोत दूर है असेच वाटत होते. कधीकधी तर मथुरे नंतर उतरून चारचाकी वाहनाने उरलेला प्रवास पुर्ण करावा असे वाटत होते. मात्र दिल्लीची व्यस्त रहदारी आणि प्रवासाचा खेळखंडोबा होण्याची भिती होती. सकाळी पाच ला पोहोचणारी एपी एक्सप्रेस साडेदहा वाजले तरी नवी दिल्ली स्थानकापासून दूरच होती. जसजसा वेळ वाढत होता तसतसं ह्रदयाची धडधड वाढत होती. कारण दिल्ली विमानतळावर वेळेत पोहोचलो नाही तर संपूर्ण ताश्कंद प्रवासावर पाणी सोडावे लागले असते.एकदाची ट्रेन तिलक नगर स्थानका जवळ आल्यावर थोडे हायसे वाटले. पण पुन्हा एकदा आऊटरवर या गाडीने बसकण मांडली. आता मात्र आमचा संयम सुटला होता. काही केल्या गाडी पुढे सरकेना. प्राण कंठाशी येणे म्हणजे काय असते याची जाणीव झाली. शेवटी स्थानिक प्रवाश्यांच्या सल्ल्याने या गाडीतून उतरलो आणि भाग मिल्खा भाग चा अध्याय सुरू झाला.


एकतर आऊटरवर उतरलो, त्यातही सामानाच्या दोन मोठ्या बॅग हातात घेऊन तिलकनगर स्थानकावर येणे, ओव्हरब्रिज चढून प्लॅटफॅार्म ओलांडणे चांगलेच दमछाक करून गेले. सोबतच आयपीओ वरून मेट्रो पकडायची की नवी दिल्लीहून विमानतळासाठी मेट्रो पकडायची यांत संभ्रम होता. अखेर ई रिक्षावाले देवदूता सारखे धावून आले. त्यांनी अगदी दहा मिनिटांत आम्हाला नवी दिल्ली मेट्रोला पोहचवून आमचा मार्ग सुकर केला. मनोमन दोन्ही ई रिक्षावाल्यांना हात जोडत आम्ही लगबगीने एअरपोर्ट एक्सप्रेस मेट्रोत दाखल झालो. कधी जमिनीखालून तर कधी वरून मेट्रोचा गारेगार प्रवास सुखावून गेला. दिल्लीच्या अस्तव्यस्त रहदारीवर बर्याच प्रमाणात का होईना पण दिल्ली मेट्रो हा रामबाण इलाज आहे. विकासाच्या नावाने बोंबा ठोकणार्यांनी आणि बोटे मोडणार्यांनी वाहतुकीसाठी सर्वात स्वस्त, मस्त विकसीत पर्याय म्हणूण मेट्रोच महात्म्य जरूर जाणून घ्यावे. अवघ्या विस मिनिटांत एक्सप्रेस मेट्रोने आम्हाला टर्मिनल तीन ला आणून सोडले. थोडक्यात काय तर प्रवासाच्या पहिल्या टप्यात रेल्वेने छळले होते, मेट्रोने सुटका केली असे म्हणावेसे वाटते.

क्रमशः,,,,,

————————————————-

दिनांक १७ मे २०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com




टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...